शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९





चिंतन
** आपला इतिहास भाग :२ **

"  जो जिता वही सिकंदर.. असे का म्हणू मी....? "
___________________________________________

पाश्चिमात्य देशातील इतिहासात नैतिक दृष्ट्या  सक्षम नसलेल्या अलेक्झांडर उपाख्य सिकंदर ,नेपोलियन बोनापार्ट, मुसोलिनी, अडॉल्फ हिटलर इ. ते आजतागायत अनेक शासनकर्यांना त्याच पाश्चिमात्य देशांनी सर्व जगात वैचारिक दृष्ट्या यशस्वीपणे पसरविले..व जगाने स्विकारले सुध्दा..! विशेषकरून त्यांच्या आपल्या देशातील तत्कालीन मेकॉले नावाच्या त्यांच्या शिक्षण तज्ज्ञाने,त्यांचीच संस्कृतीला पोषक असलेल्या शिक्षणाला आपल्या गळी उतरवले..अन् आपण ते उतरवलेलेे पित गेलो..!

( याच मेकॉले भाऊ च्या धूर्त शिक्षण पद्धतीवर मी मागे.... माझ्या फेसबुक वॉल वर ११ फेब्रुवारी २०१८ रोजी एक उपरोधिक प्रहसन असलेला लेख लिहिला होता..! ज्या वाचकांना माझ्या प्रोफाईल वर मागे जाऊन तो लेख वाचायची " तीव्र " इच्छा असेल त्यांनी तो वरील तारखेला लिहिलेला लेख  नक्की वाचा..! )

असो.....

एवढच नाही तर पाश्चिमात्य विचारवंतांनी, अब्राहम लिंकन यांच्या पत्राला त्यांनी जगाला वाचायला भाग पाडले..अन् आम्हीही वाचत गेलो..! मला अद्याप पर्यंत " अब्राहम लिंकन चे हेड मास्तरांना पत्र " समजलेच नाही..किंवा माझी तिळमात्र ते पत्र समजून घ्यायची इच्छा नाही.कारण माझ्याच देशात त्यांच्याहून महान विद्यार्थी,शिक्षक, गरिबीला झगडून पुढे आलेले, विद्यार्थी.. उदा.  चाणक्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ.अब्दुल कलाम साहेब इ. अनेकानेकांचे संपूर्ण जगाने त्यांचे अनुकरण करून विनम्र वंदन करावे असे अनेकानेक थोर पुरुष,महिला होते,आहेत... त्यांचे अद्वितीय पत्र, साहित्य संपदा,कृतिशील कार्य असताना मग मी का म्हणून घरचं सोडून पळत्याच्या मागे धावू..?

पण आपला प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का...?
" आपल्याला घरातलं सोडून, हॉटेल मधल्या खाद्य पदार्थांचं लई मोक्कार आकर्षण..! "

मी किंवा इतरांनी त्यांची म्हणजेच आपल्या भारतातील थोरांची नावे जरी घेतली..तरी आपल्यातील
" दुसऱ्यांचे बाहुले "  झालेले  काहीजण काय म्हणतील.....

हे आमच्या जातीचे आहेत बरं का..!
हे आमच्या वंशाचे आहेत बरं का..!
हे तुच्छ जातीचे आहेत बरं का..!
हे अमक्या..समूहाचे प्रतिनिधित्व करतात बरं का..!
हे अमक्या विचारांचे आहेत बरं का..!
इत्यादी...!
आणि आम्ही इथच माती खाल्ली..!
अन् आजही खात आहोत..!

आपण मात्र..आपल्या भारतातील.... भेदाभेदीच्या,भांडणाच्या,कुरघोडीच्या इ.अनेक तुच्छ गुणांमुळे वरील सर्व पाश्चिमात्य शासनकर्त्यांपेक्षा कितीतरी पटीने सर्व बाबतीत सदा सर्वकाळ सर्वश्रेष्ठ असणाऱ्या अनेक अनेक भारतीय शासन सम्राटांना सर्व जगात वैचारिक दृष्ट्या प्रसारित करण्यात कमी पडलो आहोत...पडत आहोत...!

आजही भारतातील अनेक महाभागांना.........
" जो जिता वही सिकंदर " असे म्हणण्यात मोठ्या गर्व वाटतो..!
नव्हे..नव्हे या शीर्षकावर चित्रपट निघाला आहे हे विशेष..!
हेच वाक्य आपण...आपल्याच भारतातील  थोर ऐतिहासिक राष्ट्रपुरुषा महाराज पुरुषोत्तम उपाख्य पुरू यांचे नाव घेऊन का नाही म्हणू शकलो..?  जो जिता वही सिकंदर असे का म्हणू मी....?

उलट " जो जिता वही पुरुषोत्तम..!" असे आपण का म्हणू शकलो नाही..याचे कुणीच आत्मचिंतन केलेच नाही...अन्..करत सुध्दा नाही..! वास्तविक हे तेच महाराज पुरुषोत्तम होते,ज्यांनी स्वतः ला जगज्जेता म्हणवून घेणाऱ्या अलेक्झांडर ला आपला अद्वितीय भारत देश जिंकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता..! थोडक्यात महाराज पुरुषोत्तम उपाख्य पुरू हे आपल्या भारताचे पाहिले संरक्षक म्हणून आपण मोठ्या अभिमानाने त्यांचा उल्लेख करायला हवा..!

वरील छायाचित्रातील पाठ्यपुस्तक २००७ साली प्रकाशित झालेले होते.याच जुन्या इयता ६ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात धडा क्रमांक ९, महाजनपदे या पाठात  पान क्रमांक ३८ वर अलेक्झांडर उपाख्य सिकंदर वर त्याच्या छायाचित्रासह एक अख्खा परिच्छेद लिहिला आहे पण..आपल्या महान भारतीय सम्राट पुरुषोत्तम उपाख्य पुरू यांच्या विषयी एक साधी ओळ  तर द्या सोडून...एक साधा शब्दोल्लेख देखील नाही..!
दुर्दैव आपले...!

आपल्यातील बऱ्याच जणांना नेहमी परदेशातील लोकांच्याच तळ्या उचलण्यातच धन्यता वाटत आली आहे..! अगदी थेट प्राचीन भारतीय इतिहासापासून ते  आधुनिक भारताच्या अलीकडच्या राजकीय इतिहासात देखील..! तेथे आपण आपल्याच मातीतील माणसांना  पुढे करायला  का कमी पडलो..?

आता येथेच बघा..मी " जो जिता वही सिकंदर "  हेच वाक्य आपल्या भारतातील एखाद्या राष्ट्रपुरुषाचे नाव घेऊन लिहिले तर...
" अरे, हा अमक्या.. जातीचा..विचारधारेचा...धर्माचा..पंथाचा..
सांस्कृतिक चळवळीचा आहे बरं का..! हा आपला नाही..!!" असे मनातल्या मनात,कधी..कधी जाहीररीत्या म्हणून..आपण आपल्याच राष्ट्रपुरुषांच्या कार्याला मर्यादित नक्कीच करत आहोत..!

भारताच्या इतिहासाचा प्रारंभ प्राचीन भारतीय इतिहासापासून सुरू होतो.भारतावर पाहिले परकीय आक्रमण करणाऱ्या क्रूर आलेक्झांडर ला रोखणाऱ्या आपल्या महाराज पुरुषोत्तम यांच्या अनेक मूल्यांचे अनुकरण कळत नकळत भारताच्या पुढील पिढीतील अनेक राजे महाराजे करत राहिली..!

आपण अशा अनेक देशहिताच्या बाबींना मर्यादित  केल्यामुळे कित्येक परकीयांचे आपल्या भारत देशावर राज्य गाजविण्याचे मनसुबे यशस्वी झाले आहेत अन् होत देखील आहेत..!फक्त माध्यमं भिन्न..भिन्न..!

आपल्या भारतात, भारतातील, आपल्याच मातीतील  अनेक थोर शासन सम्राट..थेट प्राचीन भारतीय इतिहासापासून ते आधुनिक भारताचा इतिहास व वर्तमानातील सुध्दा...यांना आपण आपल्यातील अनेक दुर्गुणांमुळे मर्यादित करून ठेवले..!

मी इतिहास तज्ञ नाही.पण सदरील  हे जुने पाठ्यपुस्तक जे की सध्याला बंद केले आहे व त्यातील हा घटक शिकवत असताना ज्या भावना सतत जाणवत होत्या त्या विषयी व्यक्त केले आहे हे कृपया सर्व वाचकांनी नम्रपणे समजून घ्यावे ही नम्र अपेक्षा..!

सध्याच्या इ.६ वी च्या पाठ्यपुस्तकात देखील सिकंदर वर अख्खा एक परिच्छेद त्याच्या फोटो सह  लिहिला आहे.
पण..महाराज पुरुषोत्तम उपाख्य पुरू यांच्या विषयी एक शब्दही उल्लेखित नाही..!
नवीन पुस्तकाचा फोटो व मजकूर या पूर्वीच्या पोस्ट केलेल्या
" आपला इतिहास भाग क्रमांक: १ मध्ये अपलोड केलेला आहे.

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक  भिंतीवर लेखन दिनांक: नोव्हेंबर २०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १६/११/२०१९

एकूण भाग दोन समाप्त..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा