गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

" माझ्या नाकावर टिच्चून..!"



***  मला प्रवासात भेटलेली माणसं  **"


" माझ्या नाकावर टिच्चून..!"

__________________________________________


आज दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी बसने शाळेत निघालो होतो.बसमध्ये आज खिडकी जवळील जागा काही मिळाली नाही.मग नाईलाजाने खिडकीजवळ बसलेल्या एका इसमाजवळ जाऊन बसलो..!


बापरे...!

तो..बचाबचा तोंडात गुटख्याच्या पुड्या ओतून चावत बसला होता.ज्या वासाची मला सर्वात जास्त अॅलर्जी तोच वास अहिंसात्मक मार्गाने सहन केला..खूप वेळ... तोंड वाकडे करून..!

बरं या दरम्यान दुसरीकडे जागा पण नव्हती..! वाहकाकडे ( कंडक्टर) कडे गाऱ्हाणे मांडावे तर त्याचाही तोबरा भरलेला होता..!


आज माझ्या नाकावर खूप अत्याचार झाला आहे.

हल्ली कुणीही..काहीही मागायचे असले की ,आंदोलन करतात..!

माझ्या नाकावर, टीच्चून जो अत्याचार झाला आहे,त्याबाबत माझ्या अत्याचार ग्रस्त नाकाला कुणी नाकावर टिच्चून न्याय देईल का हो...आंदोलन करून..?😂


ता.क : तो अत्याचार करणारा तरुण त्याच्या मोबाईल वर कुणाशी तरी " प्रेमळ संवाद " करत होता.मला प्रश्न पडलाय..की, असल्या वासाड्या लोकांबरोबर " प्रत्यक्ष  कृतीयुक्त प्रेमळ संवाद " कसा  काय करत असतील...

" त्या " ...? 😂


वंदे मातरम्..!


* दिनांक:२७ ऑगस्ट २०१८

* अत्याचार स्थळ: सरकारी बस.

* अत्याचार करणारा : धडधाकट तरुण.

* अत्याचारग्रस्त लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

" तुम्ही हे ऍप घ्या ..!"

 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" तुम्ही हे ऍप घ्या ..!"

======================================


दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजी मी नेहमी प्रमाणे औरंगाबाद बस स्थानकाहुन  सकाळी अंधारी येथे शाळेत जाण्यासाठी बस मध्ये बसलो.हडको टी पॉइंट आल्यानंतर आमची बस थांबली.खाली खूप गर्दी होती.माझ्या सिट वर माझ्या बाजूला कुणीच नव्हते.जागा रिकामीच होती.बंदुकीतून गोळ्या सुटाव्या तसे एकामागून एक माणसं बस मध्ये घुसू लागली.त्यात एक गोरे गोमट्या वर्णाचे हेअर डाय केलेले एक अंदाजे ७० वर्षाचे आजोबा पण होते.मी त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना माझ्या बाजूलाच जागा दिली.मी आपला माझा मोबाईल पाहण्यात मग्न झालो,कारण पुढील एक ते दीड तास " मैं और मेरी तनहाई " तोच मोबाईल होता..!☺मी दररोज बस मध्ये प्रवाशांशी नाहक बोलण्यापेक्षा तऱ्हेवाईक माणसांचे निरीक्षण करून माझ्या ज्ञानात भर पाडत असतो..! पण आज माझीच फजिती होणार होती.


अशी तशी आमची बस हर्सूल  येथे आली असेल.इतक्यात ते आजोबा मला म्हणाले,

" कुठले पाहुणे..?"

मी त्यांच्याकडे न पाहता माझ्या मोबाईल कडे पाहत म्हणालो,

"मला आज रोजी पर्यंत तीन गावं आहेत, मूळ गाव,पालखेड,नंतरचे लासूर स्टेशन व हल्ली मुक्काम येथेच औरंगाबाद मध्ये एका ठिकाणी...!"

यावर ते आजोबा मला पुन्हा म्हणाले,

"तुम्ही शिक्षक आहात का हो..?"

मी चमकुन त्यांच्याकडे पाहून  म्हणालो,

" तुम्ही कसं काय ओळखलं..?"

आजोबा-" तुम्ही लई चकपक पांढरे कपडे घातले, अन् लई आवरून सावरून बसला आहात त्यावरून ओळखले..!"

असं म्हणताच तेवढ्या वेळापुरता मी ,त्यांची नजर चुकवून मोबाईलच्या काचेत स्वतःला पाहून घेतले..!😂

मनात म्हणलं हे आजोबा,मला ऐन मार्च , एप्रिल महिन्यात याच रस्त्याने बसमध्ये भेटले असते तर मी त्यांना खाणीत काम करणारा कामगार नक्कीच वाटलो असतो,कारण रस्त्याचे काम अन् धूळ..!मग मी पण त्यांच्या वयाला अनुरूप गप्पांच्या फडात अधून मधून रंगलो.


आता आमची बस, चौका या गावाजवळ आली होती. एवढ्यात ते मला म्हणाले...

" तुमचा मोबाईल what's app  नंबर काय आहे..?

मी म्हणालो- " काका,मी सहसा माझा व्हॉट्स ऍप नंबर कुणाला देत नाही,कुणी काहीही पाठवतं..!"

आजोबा- " अहो,द्या हो..! तुम्ही आता ओळखीचे निघाले,आमचे पाहुणे आहेत तुमच्या गावाकडे....!"

मला पण त्यांच्या वयाकडे पाहून अन् ते काहीही पाठवणार नाही या अंदाजाने दिला माझा नंबर..!

लगेच ते त्यांच्या  मोबाईलच्या कामात  व्यस्त झाले. थोड्या वेळाने मला म्हणाले..

" हे एक app आहे,तेवढं प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करा..!"

मी-" माझ्या मोबाईल मध्ये स्पेस नाही..!"

आजोबा- " त्यातील काही डिलीट करा मग..!"

मी- " सगळं महत्त्वाचं आहे,त्यामुळं काहीही डिलीट करता येणार नाही..!"

आजोबा-" जास्त जागा नाही लागणार, करा काहीतरी डिलीट..!"

मी- " काका,मला ते app नाही लागत..!"

आजोबा- " तुम्ही घेऊन तर पहा..! वाटल्यास त्या app ची लिंक मी पाठवतो..!"

आता मात्र मला त्यांच्या आग्रहाचे अपचन व्हायला लागले होते.मी काहीसा सौम्य कडक स्वरात त्यांना म्हणालो

मी- " तुम्ही का मला आग्रह करू राहिले..?माझी अजिबात इच्छा नाही..!"

आजोबा-" मी लिंक तुमच्या नंबरवर पाठवली आहे,ती लिंक ओपन करून ते app घ्या..!"


आता आमची बस फुलंब्री बस स्थानक येथे आली. तेंव्हा लगेच आजोबा म्हणाले..

" केली का लिंक ओपन..?"

मी सौम्य उंच स्वरात म्हणालो- " तुम्हाला समजत नाही का हो..? मी नाही म्हणतोय अन् तुमचं तेच सुरू आहे..!"

यावर ते आजोबा शांत झाले.आता पाल फाटा आला होता.ते आजोबा पुन्हा म्हणाले..

" अहो,सर,त्या app मधून जर तुम्ही फेसबुक,व्हॉट्स ऍप सुरू केले तर तुम्हाला काही पैसे मिळतील..!"

मी काहीच न बोलता गुलजारजींची इजाजत चित्रपटातील " मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है..!" ही गझल ऐकण्यात मग्न होतो.


फरशी फाट्यावर आमची बस थांबली.त्याचा फायदा घेऊन ते आजोबा मला पुन्हा म्हणाले..

" मी काय म्हणतो,एकदा ते app घेऊन तर पहा..!"

मी- " मी,माझी जागा बदलू का हो..?"

यावर ते चूप बसले.सकाळचे ९ वाजले होते.आळंद गाव आले होते.पुन्हा त्या आजोबांचा पाल्हाळ सुरू झाला...

" सर,राग नका येऊ देऊ..! पण तुम्ही खरंच जर ते app मी पाठविलेल्या लिंक मधून जर घेतले ना,तुम्हाला थोडेफार पैसे मिळतील..!"

आता मात्र की रागात त्यांना म्हणालो- " हे पहा काका,तुमच्या वयाचा विचार करून मी तुम्हाला कडक स्वरात बोलू शकत नाही..! आता पुन्हा हा विषय काढला तर माझा नाईलाज होईल..!"

आजोबा एकदम चिडीचूप झाले.अखेर अंधारी गाव आले.मी उतरू लागलो.इतक्यात ते आजोबा मला पुन्हा म्हणाले...

" सर, जमलंच तर लिंक ओपन करून ते app घ्या..!"

मी रागाने त्यांच्याकडे पाहून खाली उतरलो.


उतरल्या बरोबर मी त्या आजोबांचा नंबर ब्लॉक करून टाकला. विचार करू लागलो की, काहीवेळा आपला चांगुलपणा नडतो आपल्याला..! मी त्यांना माझा व्हॉट्स ऍप नंबर नको होता द्यायला..! पण मी त्यांच्या वयाचा अन्  गावाकडच्या निघालेल्या ओळखीमुळे त्यांना माझा व्हॉट्स ऍप नंबर दिला होता.मी सहसा अनोळखी व्यक्तीला नंबर देतच नाही,पण त्यांनी माझ्या गावाकडची ओळख दिल्यामुळे मला त्यांचा उमाळा आला होता..! 


ता.क.: मोजक्याच माणसांना मी प्रेमानं अन् विश्वासाने माझा व्हॉट्स ऍप नंबर दिला आहे त्यांनी मला मेसेज न केल्याबद्दल गोड राग मानू नये..!😂  

जर राग आल्यास मला ब्लॉक करा..!😂😂


वंदे मातरम्..!


लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: २१ ऑगस्ट २०१९


सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

प्रिय विद्यार्थी अर्जुनचा धाकटा भाऊ प्रिय नंदू..!

 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


प्रिय विद्यार्थी अर्जुनचा धाकटा भाऊ प्रिय नंदू..!


===================================


अतिशय  नम्र आणि सालस माजी प्रिय विद्यार्थी नंदू शिंगाडे, तुला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बेटा..!🌹


नव्वदच्या दशकात तू जेंव्हा जळगाव ता.वैजापूर येथील  प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होतास, त्यावेळी तुझी शिक्षणाप्रती असणारी प्रचंड ओढ, भूक मी अगदी जवळून पाहिलेली आहे.अतिशय सर्व सामान्य परिस्थितीत तू शिक्षण घेतले अन् आज लासूर स्टेशन येथे स्वतचं शैक्षणिक कार्य सुरू आहे..!


सरस्वती कोचिंग क्लासेस या नावाच्या रूपाने लासूर स्टेशन येथे तुझ्या रूपाने एक सामाजिक जाणीव अन् बौध्दीक जाणीव असलेला प्रिय विद्यार्थी हे योग्यपणे हाताळत आहे याचा नक्कीच अभिमान वाटतो..! यात सातत्य असू दे..! शैक्षणिक कार्यात खूप आवश्यक असणाऱ्या आचारसंहिता बाबत, प्रिय नंदू , तुला मागेच हक्काने मार्गदर्शन केलेले आहेच, त्याचे पालन करतो आहेच, त्यात उणीव पडू देऊ नये..!🙏


तुझा मोठा भाऊ , माझा अतिशय प्रिय  विद्यार्थी अर्जुन शिंगाडे ( ह.मु. बजाजनगर औरंगाबाद) , याचा तू नेहमी तुझ्या आयुष्यात आदर्श असू दे..! कारण अर्जुन हा माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक आहे..! प्रिय अर्जुन, खूपच शांत अन् स्समजुतदार आहे..! माझ्या शिक्षकी आयुष्यातील वाटचालीत सुरुवातीला अशी अनेक प्रेमळ मुलं भेटली याचा नक्कीच आनंद वाटतो.त्यात अर्जुन चे स्थान खूप वरचे आहे..! विशेष म्हणजे तुझा मोठा भाऊ अर्जुन ,हा त्याच्या प्राथमिक शाळेतील वयोगटात असताना वर्गात सर्वात मोठा होता,पण त्याने कधीही दांडगाई केली नाही ,की कधीही आपल्यातील नैतिक मूल्यांचा तोल ढासळू दिला नाही..! प्रिय नंदू , तू  नशीबवान आहेस, प्रिय विद्यार्थी अर्जुन सारखा भाऊ तुला लाभलेला आहे..! प्रिय अर्जुन सारखा विनम्र विद्यार्थी लाभणे हे कोणत्याही शिक्षकांसाठी अभिमानास्पद आहे..!


वंदे मातरम्...!


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक : १८/८/२०२०

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

" अंश...एक..! रूपे दोन..!! "

 चिंतन


" अंश...एक..! रूपे दोन..!!  "


====================================


प्रत्येक जण आपापल्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करत असतो..!

जसे प्रभू रामचंद्र यांनी त्यांच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व केले..तर..

भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व केले..!

दोघेही एकाचेच अंश होते...पण..दोघांचे आचरण..उच्चारण..उपदेशन..भिन्न..भिन्न होते..!

कारण ,असे भिन्न भिन्न असणे..ही त्या कालखंडाची मागणी होती..! 


प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण दोघेही एकच आचरण...उच्चारण... उपदेशन करून त्या त्या कालखंडात जगले असते तर..तो त्या कालखंडावर अन्याय झाला असता..!

नियतीने असे...एकाच्याच अंशाला.. असे भिन्न...भिन्न वर्तन करायला भाग पाडले..! 

असे इतिहासात अनेक उदाहरणे आहेत की,जे एकाचेच अंश होते पण वर्तन भिन्न..भिन्न..!


असे असण्याचे एकमेव कारण म्हणजे..त्या..त्या कालखंडाचे ते अपत्य असणे होय..!


अन् या भारतमातेच्या सुपुत्रांनी ती आपल्या कृतीने ,युक्तीने पूर्ण केली..! तीच त्यांची कायमची ओळख बनून गेली.प्रत्येकजण स्वतंत्र असतो.एकाचाच जरी अंश असला तरी...तो स्वतंत्र असतो..! 

असे प्रत्येकाचे स्वतंत्र असणे..त्या..त्या कालखंडातील स्वातंत्र्याची, समाजमनाची मागणी असते..इच्छा असते...! नव्हे .नव्हे..असे प्रत्येकाचे स्वतंत्र असणे हे  त्या कालखंडाचे लाडके अपत्य असते..भिन्न..भिन्न आचरण..उच्चारण... उपदेशनाचे..!


" अटलजी तुम्ही नरेंद्र होता..तुमच्या कालखंडाचे |


भिन्न..भिन्न नरेंद्र असतात.. त्या..त्या कालखंडाचे |"


तुम्ही प्रभू रामासारखे जगले |


कुणी भगवान श्रीकृष्णा सारखे जगत आहे..|


नीती दोघांची  भिन्न..भिन्न |


पण उद्देश मात्र एकच आहे |


माझा देश अग्रेसर व्हावा |


भावपूर्ण श्रद्धांजली...अटलजींना...!


( निधन दिनांक - १६/८/२०१८ )


ता.क.: वरील मजकुरात उपमा अलंकार उपयोगात आणला आहे..! तुलना केलेली नाही..हे कृपया वाचकांनी नम्रपूर्वक समजून घ्यावे ..!


वंदे मातरम्..!


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: १७ ऑगस्ट २०१८

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

" राम.. राम..! " 🙏

 





आमचे गाव आमची माणसं ©️


" राम.. राम..! " 🙏


================================


माझे जन्मगाव पालखेड, ता. वैजापूर येथे आमच्या घराच्या समोरच ग्राम दैवत श्री.पारेश्वर महादेव मंदिर आहे.

माझ्या बालपणी मंदिरात प्रवेश करते वेळीच , डाव्या बाजूला कोपऱ्यात भिंतीवर मंदिरातील सर्व लाईट सुरू करण्याचे मुख्य बटण होते. मी त्यावेळी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होतो. त्यावेळी नेहमीप्रमाणे एक दिवस संध्याकाळी मंदिरात दर्शनाला गेलो होतो.त्यावेळी मंदिरातील सर्व लाईटचे मुख्य बटण आमच्याच गावातील वयोवृध्द व्यक्तिमत्व स्वर्गीय माणिक बाबा डोमाळे चालू करण्यासाठी चालले होते.मी आणि माझा जिवलग बालमित्र स्वर्गीय आप्पासाहेब सुराशे त्यांच्या मागे मागे गेलो.तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे यांनी लाईट चे बटन दाबल्या बरोबर " राम राम..!" असे म्हणाले..! मी आणि आप्पा ने अवतीभोवती पाहिले तर कुणीही नव्हते..! मला राहावले नाही.मी तिर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे यांना म्हणालोच.....

" बाबा, तुमच्या आसपास कुणीही नाही,मग तुम्ही " राम राम...!" कुणाला म्हणाले...?

यावर स्वर्गीय तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे आम्हाला म्हणाले....

" पोरांनो, यधळा जव्हा लाईट , दिवा लावला जातो ना, तव्हा, तव्हा राम.. राम असं म्हणायची रीत हाये..! कोणत्या बी कामाची सुरुवात राम राम असं म्हणून करत्या..! यधळा..यधळा समदेजण दमून भागून आलेले असतात..! तेवढंच देवाचं नाव घेतल्यानं मन शांत होत पोरांनो..! "


हेच स्वर्गीय तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे माझ्या आजोबांचे म्हणजेच चंपतराव जाधव यांचे खूप जिवलग मित्र होते, असे माझे तीर्थरूप वडील आजही सांगतात. तत्कालीन आमच्या पालखेड गावातील वारकरी सांप्रदायाची धुरा तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे यांच्याच खांद्यावर होती.


मग, काय त्या दिवसापासून बालपणी पालखेड येथील आमच्या घरातील चिमणी ( दिवा ) लावायचे काम बऱ्याचदा मीच करू लागलो. त्या दिवसापासून प्रत्येक दिवशी चिमणी ( दिवा) लागतेवेळी " राम ,राम ...!" म्हणायची जी श्रद्धेय सवय लागली ती, आजतागायत कायम आहे. कधी मनातल्या मनात तर कधी हळू आवाजात.


तीच सवय आणि तीच गतकाळातील सुखद आठवण माझ्या मुलांना देखील मागेच सांगितलेली आहे. त्यामुळे मुलंही घरातील, पार्किंग मधील दिवे ( लाईट, ट्युब ) लावताना एकट्यात कधी मनातल्या मनात तर कधी हळू आवाजात.." राम राम..!" असं म्हणतात.


माझ्या वैयक्तिक आयुष्यात संध्याकाळी दिवा लावते वेळी 

" राम..राम..!" म्हणण्याची सुरुवात करतेवेळी असणारे स्वर्गीय तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे आज हयात नाहीत अन् माझा अती प्रिय बालमित्र स्वर्गीय आप्पासाहेब सूराशे देखील हयात नाही..! पण त्यांच्या आठवणीतील ही श्रध्येय परंपरा मी जपून ठेवली आहे. आणि तीच श्रद्धेय आठवणीतील परंपरा निदान आज तरी मुलं सांभाळून आहेत, बाकी मुलं, ही श्रध्येय परंपरा पुढे सुरू ठेवतील की नाही, माहीत नाही..!


कोणत्याही सुखद आठवणीतील श्रद्धेय परंपरा ,आपल्या सांस्कृतिक वारस्याला पवित्र आठवणीने पुढे नेत असतात. जसे की माझ्या आठवणीतील, संध्याकाळी दिवे लावते वेळी म्हणण्याची श्रद्धेय परंपरा...

" राम, राम..!" 🙏


वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ११/८/२०२०, मंगळवार, गोकुळाष्टमी.

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

विजय वैजिनाथ गायकवाड, माझ्या आयुष्याचा साक्षीदार..!





" आमचे गाव , आमची माणसं..!"
                         
विजय वैजिनाथ गायकवाड, माझ्या आयुष्याचा साक्षीदार..!
======================================

 विजय  हे नाव ऐकल्याबरोबर विजुचे आम्ही बालमित्र सोडून त्याच्या इतर मित्रांना मुकुल आनंद दिग्दर्शित " अग्निपथ " चित्रपटातील विजय दीनानाथ चव्हाण या व्यक्तिरेखेतील " काही गुणांचा " पदोपदी अनुभव येत असेल..!अर्थात आम्हा बालमित्रांनाही विजू मधील    " विजय दीनानाथ चव्हाण " म्हणून भेट झाल्यावर कधी..कधी अनुभव येतो..! विजू मध्ये " विजय दीनानाथ चव्हाण " या व्यक्तिरेखेतील काही गुणवैशिष्ट्ये उतरली आहे..जसे..आक्रमकता,निर्भिडता, रूबाब,स्वतःचे विश्व स्वतः उभारणे,हे विश्व उभारतांना आप्तस्वकीयांना संरक्षण,सेवा व समर्पण निर्विकारपणे पुरविणे हे विजूने "  विजय दिनानाथ चव्हाण " च्या व्यक्तिरेखेतील गुणांसारखे गुण आजतागायत जपलेले आहे..!

विजय दिनानाथ चव्हाण ने आपले ध्येय साध्य करण्यासाठी खूप गोष्टींचा ,मोहपाशांचा त्याग केला  होता,अगदी विजूनेही तसाच त्याग केलेला आहे..!आपली भावंडे,त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात स्थिर होऊन यशस्वी होण्यामध्ये विजुचा हा त्याग मी पाहिलेला आहे..!काहीजण त्याच्या त्यागाकडे दुर्लक्ष करतात.कदाचित विजूच्या आक्रमक स्वभावामुळे त्याचा त्याग जाणवत नसेल..! किंवा अशी आक्रमक माणसं कशाची त्याग करतात..?या मनोवृत्तीमूळे काहींना तो लक्षात येत नसेल...बहुधा..!मुळात कमालीची आक्रमकअसलेली माणसं भावनेच्या बाबतीत कमालीची भावूकही असतात..! विजू,दार्शनिक अंगाने जरी आक्रमक दिसत असला तरी तो भावनेच्या बाबतीत अंतर्मुख होणारा माणूस आहे..!

एखादी व्यक्ती,लेखक,चित्रपट,चित्रपटातील व्यक्तिरेखा,इ.अनेक बाबतीत विजूने त्याची भावुकता जपलेली आहे.मग व.पू. काळेंचे लेखन असो,अभिनेत्री रेखाचे सौंदर्य असो, ओशोंचे विचार असो,अथवा शक्ती सामंत दिग्दर्शित " शक्ती " हा हिंदी चित्रपट असो या सर्वांवर विजूने स्वतपेक्षा काकणभर जास्त प्रेम केले आहे..!

हा माझा बालमैत्रीचा त्याच्या सोबतचा असलेला सजीव अनुभव सांगतो..! माझ्या आयुष्यात बालमित्रांनी मला खूप काही भरभरून दिले आहे..! विशेषतः डॉ.गणेश वाणी,डॉ.संजय राऊत,आण्णासाहेब म्हस्के व विजू..आणि हे आमचे सर्व बालमित्र जाणतात..!इतरही मित्रांचे माझ्या आयुष्यात खूप योगदान आहे.कोंदणात गोंदून ठेवावे असे हे बालमित्र..!

मी,सार्वजनिकरीत्या सांगू इच्छितो की, या मित्रांनी माझ्या घरात कायमचे जरी वास्तव्य केले तरी तो माझा आयुष्याचा कृतार्थाने भरलेला सर्वार्थ असेल..! वास्तविक विजू व माझ्यात बऱ्याच बाबतीत विचारधारा भिन्न आहेत.पण त्या जिथे जुळलेल्या आहेत,त्यावर आम्ही दोघांनीही भरभरून प्रेम केले आहे व करत राहणार..! प्रिय बालमित्र विजू,माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचा साक्षीदार आहे..!

आमचा बालमित्र विष्णु  एकनाथराव  पगार (ह.मु.औरंगाबाद)आम्हाला
" दोन ध्रुव " म्हणतो..!तरी देखील आम्ही खूप जिवलग मित्र आहोत..!

" विजय गायकवाड "  हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक नामांकित नाव आहे..!

विजू तुला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

वंदे मातरम्..!

ता.क. मित्र फक्त कौतुकी नसावेत,तर एकमेकांचे गुणदोष दाखविणारे असावेत.तसेच भिन्न विचारधारा असूनही जुळणाऱ्या धारांवर नितांत प्रेम करणारे असावेत.. दोन्ही बाजूंनी..!
उदा.विजू व माझ्यासारखे..!

लेखक व विजुचा बालमित्र: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 दि.३ ऑगस्ट २०१७