बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

पुष्पा २


 


चिंतन ©️


पुष्पा २


==================================


फक्त आणि फक्त अलू अर्जुन..!

ग्रामीण भागातील लोक देवता , त्या देवतांचे पूजन अन् तिथले उत्सवी वातावरण पुष्पा २ मधील काही प्रसंगात अप्रतिम सादर केल्या गेले आहे. काली माताचे रूप अन् त्या उत्सवातील पुष्पाचे अप्रतिम नृत्य या चित्रपटात सर्वोत्कृष्ट श्रेणीतील आहे. एखाद्या लोककलेला, नृत्याला इतकं समरसून भारतीय चित्रटसृष्टीत पहिल्यांदाच कुणीतरी सादर केले आहे असे मला वाटते. याबाबतीत अभिनेता अलू अर्जुन, दिग्दर्शक सुकुमार अन् नृत्य दिग्दर्शक यांना मनापासून दाद द्यायलाच हवी. 


पुष्पा २ चित्रपटाच्या शेवटी अलू अर्जुनचे हात पाय बांधून देखील जी भयंकर मारधाड प्रस्तुत केली आहे ती बघून उरले सुरले तिकिटाचे पैसे फिटून जातात. असे दणक्यात अन् जब्राट सादरीकरण फक्त आणि फक्त तेलगू, तमिळ अन् मल्याळम चित्रपटसृष्टीतीलच कलाकार , दिग्दर्शक अन् इतर कलाकार सादर करू शकतात.सगळं खोटं असूनही पुष्पा ही व्यक्तिरेखा खरोखरची आहे असे वाटू लागते, त्याचं कारण, अभिनेता अलू अर्जुनने पुष्पा या व्यक्तीरेखेत ओतलेले प्राण..! माझ्या मते मणिरत्नम दिग्दर्शित  वेलू नायकन चित्रपटात कमल हसन यांनी ज्या पद्धतीने वेलू नायकन ही व्यक्तिरेखा अगदी समरसून सादर केली होती, त्याचं तोडीस तोड सुकुमार दिग्दर्शित पुष्पा भाग १ अन् पुष्पा भाग २ मध्ये अलू अर्जुनने पुष्पा ही व्यक्तिरेखा अप्रतिम सादर केली आहे.


पुष्पा १ मध्ये हाणामारी होती अन् त्याच्या सोबत भावनेची  किनार देखील होती, मात्र पुष्पा २ हा चित्रपट भावनेला व्यक्त होण्यात काहीसा कमी पडतो. तरी देखील पुष्पा २ चे सादरीकरण इतकं जब्राट झालं आहे की, बाकी सगळ्या बाबी गौण वाटू लागतात अन् पैसे वसूल होऊन भारी करमणूक होते. 


मी वैयक्तिक मुळात गजेंद्र अहिरे सर गुलजार साहेब, अन् सी.प्रेमकुमार यांच्या सामाजिक अन् भावनिक समृध्द चित्रपट कलेचा निस्सीम चाहता आहे. मानवी मनाच्या भाव भावनांचे रेशीम धागे या तिघांनी ज्या अप्रतिम पद्धतीने आपापल्या विविध कलाकृतीत सादर केलेली आहे ते सदैव कौतुकास्पद आहे. मानवी भावनेवर, मानवी संवेदनांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या रसिक मनांसाठी गजेंद्र अहिरे सर गुलजार साहेब, अन् सी.प्रेमकुमार यांच्या कलाकृती सदैव हृदयात राहतील यात तिळमात्र शंका नाही.


मात्र भावूक रसिक मनाला पुष्पा सारख्या श्रेणीतील कलाकृती जेवणाच्या ताटातील मिरचीच्या ठेच्या सारखं  झणझणीत आनंद देऊन जातात हे मात्र खरं..!


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १८/१२/२०२४, बुधवार

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

हसमुख विलास..!'


 



आमचे गाव आमची माणसं ©️


' हसमुख विलास..!'


================================


भूतकाळात स्वतः ला शोधणे फार सोपे असते, फक्त त्यात आपण कुठं होतो याचा शोध ज्याला त्याला घेता यायला हवा.

मग तो शोधक भूतकाळ स्वतःचा असो की, आपल्याच भूतकाळाला समांतर आयुष्य जगलेल्या काहींचा..!  आपल्या गतकाळातील आठवणींच्या भूतकाळाला अन् त्यातील व्यक्तीरेखांना भेटल्यावर किंवा भेटताना आपल्यातील तथाकथित अहंकाराच्या अन् भेदाभेदीच्या भिंती पाडाव्या लागतात. तरच भूतकाळाच्या आयुष्यातील नितांत सुंदर भाव विश्वाचा पसारा उलगडला जातो. त्या पसाऱ्यात फक्त आणि फक्त निरागस हास्य अन् निरागस प्रेम असते. त्यात ना कुणाच्या पदाचा अहंकार असतो ना कुणाच्या आर्थिक क्षमतेचा बेगडी फुगवटा ना जातीचा तकलादू अहंकार अथवा न्युनगंड..! ज्यावेळी निरागस हास्य अन् निरागस प्रेम भेटतं तेंव्हा तिथं अस्तित्व असते ते त्या निरागस नात्याचे..!

तिथं अस्तित्व असते ते विधात्याने सुंदररित्या बनविलेल्या मानवी मूल्यांचे..!

तिथं अस्तित्व असते ते अहंकार विरहित अन् न्यूनगंड विरहित  जगलेल्या क्षणांचे..!

तिथं अस्तित्व असते ते एकमेकांच्या इतिहास , भूगोल अन् नागरिकशास्त्राचे ..!

तिथं अस्तित्व असते ते त्याच गतकाळातील गल्ली बोळातील भेटलेल्या निरागस अन् अवखळ नात्याचे..!

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथं अस्तित्व असते ते विधात्याने निर्माण केलेल्या रक्तविरहित नात्यातील सर्वोत्तम नात्याचे..! ज्याला मित्र असं म्हणून विधात्याच्या अनौपचारिक नात्यातील अदृष्य शक्तीला आपण प्रेमाने पुजत असतो.


दिनांक ८/११/२०२४ रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर स्थित अन् मूळचे पालखेड येथील आमच्याच आळीतील एक मातृतुल्य  वयाने खूप ज्येष्ठ असलेले तथा माझ्या स्व.आईच्या जिवलग मैत्रिण ज्यांना आम्ही मायेने आबाई म्हणतो त्यांना भेटायला मी अन् माझी धर्मपत्नी गेलो होतो. तीर्थस्वरूप आबाई यांना आम्ही श्रद्धेने भेटलो. तीर्थस्वरूप आबाई ह्या माझा बालमित्र सुनील शांतीलाल शेठ जैन याच्या मातोश्री आहेत. ( त्यावर एक स्वतंत्र लेख नंतर लिहिण्याचा मनोदय आहे.) त्या भेटीच्या नंतर प्रिय बालमित्र विलास उत्तम निकम भेटला. अर्थात तो भेटला नाही, तर  मीच त्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलात एखाद्याने धाड टाकावी तशा आविर्भावात तोंडाला रुमाल बांधून गेलो होतो. मात्र जिथं एकमेकांची ओळख खूप खोलवर अन् उघडी नागडी असते तिथं तुम्ही स्वतः ला कोणत्याही ढोंगी रुपात सादर करूच शकत नाही. अगदी तसेच झाले. माझ्या देहबोलीतून विलासने मला ओळखले अन् म्हणाला...

" नंदू, नको शहाजूकपणा करू रे..!"

मी मूळ रुपात आलो. सोबत माझी पत्नी होती.तिला प्रिय बालमित्र विलासचा परिचय करून दिला. या मित्राला अगदी ऐसपैस भेटलो ज्याच्यावर मी अन् माझा जिवलग बालमित्र विजय गायकवाड नितांत प्रेम करत आलेलो आहोत. प्रिय बालमित्र विलासच्या तीर्थस्वरुप सासुबाई , माझ्या स्व. तीर्थरूप वडीलांच्या माजी विद्यार्थिनी आहेत. छत्रपती संभाजीनगर येथेच वास्तव्यात असणाऱ्याला विलासच्या सासुबाईंची देखील आम्ही उभयतांनी दर्शन घेऊन भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी माझ्या वडिलांच्या शिक्षक म्हणून असलेल्या कित्येक आठवणींना उजाळा दिला. 


विलास निकम..!

अगदी साधं सरळ  सुंदर आयुष्य व्यतीत करणारं व्यक्तिमत्व..! स्वतच्या आयुष्याचा ना बडेजाव ना इतर कुणाला दूखावण्याची मनोवृत्ती. लेखक व.पु. काळे, शंकर पाटील अन् अगदी अलीकडे सी. प्रेमकुमार यांनी लिहिलेल्या सर्व सामान्य व्यक्तीरेखांचे प्रतिनिधित्व करणारे जे कुणी आहेत त्यापैकी एक आमचा प्रिय बालमित्र विलास निकम..!दरवर्षी गावच्या यात्रेला गेल्यावर सगळ्या गावाला भेट दिली, मात्र काहींना गावात भेट दिली नाही तर यात्रेला गेल्याचे आत्मिक समाधान लाभत नाही.त्या मोजक्या निरपेक्ष व्यक्तिमत्त्वांपैकी विलास निकम एक आहे. विशेषतः ही कृतीयुक्त भावना माझा बालमित्र विजय गायकवाड अन् मी जपलेली आहे. वास्तविक विलास पालखेड येथे स्थायिक नाही. मात्र यात्रेला गेल्यावर गावात कुणाला ऐसपैस भेटावं असं प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे विलास निकम आहे. पालखेड येथे माझ्या सहासात जी काही मोजकी अजातशत्रू माणसं आली, त्यात प्रिय बालमित्र विलास हा एक होय. विलास निकम तसा माझा वर्गमित्र नाही. माझ्या माध्यमिक वयोगटात पुढील दोन वर्षांनी पुढे असणारा मित्र.! आमची पालखेड येथील   एकमेकांची गल्ली इंग्रजी अक्षर C मध्ये असणारी. ग्रामदैवत श्री. पारेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गल्लीत विलासचे घर अन् त्याच घराच्या पुढील घरातच हॉटेल होते. आमच्या बालपणी आमच्या पालखेड गावात मुख्य बाजारपेठ याचं गल्लीत होती. काळाच्या ओघात गावाचा फुगवटा वाढला अन्  बाजारपेठ तिकडं फुगवट्यात स्थलांतरित झाली.


विशेष म्हणजे आमच्या बालपणी आमच्या पालखेड गावात सर्वसाधारणपणे शेव, चिवडा अन् डाळीचे लाडू मिळण्याचे एकमेव हॉटेल होते ते विलासचे वडील स्व.उत्तम काका निकम यांचेच होते. मी अन् माझी समकालीन पिढी पालखेड गावात जगत असताना आपल्या आयुष्याकडून अत्यंत माफक अपेक्षा ठेवून जगली. त्या काळातील आमच्या दररोजच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचे केंद्रबिंदू  विलासचे हॉटेलच असायचे. महिना , पंधरा दिवसाला आमच्या घरच्यांकडून खाऊ खाण्यासाठी दोन - पाच रुपये मिळायचे.त्या पैशातून खाऊ , त्यातल्या त्यात डाळीचे लाडू विकत घ्यायचे. विकत घेतलेले डाळीचे लाडू बाजूलाच असलेल्या मारोती मंदिरात निवांत बसून खात असायचो.लाडू खाण्याचा जास्त वेळ आनंद मिळावा या गोड हेतूने लाडूचा इवलासा इवलासा तुकडा करून खायचो.त्याकाळी लाडूचा इवलासा तुकडा करून खाण्यात जो आनंद होता, तो आज किमान किलोभर खरेदी केलेल्या लाडूत येत नाही. ही जाणवणारी जाणीव गतकाळातील आठवणींच्या हिंदोळ्यावर मनाला काहीसे दुःखी करते. प्रिय बालमित्र विलासचे वडील तीर्थस्वरुप उत्तम काका निकम यांनी स्वतः बनविलेल्या डाळीच्या लाडूची चव आयुष्यात पुन्हा कधी इतर ठिकाणच्या अनेकानेक मिष्टान्न पदार्थात आलीच नाही. बहुदा गावचं गावपण असलेली अन् जपलेली पिढी संपत चालली आहे यामुळं असं वाटतं की काय , माहीत नाही..!


प्रिय बालमित्र विलासचे आमच्या बालपणी असलेले पालखेड येथील हॉटेल आमच्या दररोजच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचे केंद्रबिंदू होतेच, त्याच बरोबर आम्हा काही बालमित्रांच्या भाव विश्वात, कलेच्या विश्वात एक रसिक म्हणून जगण्याचे ठिकाण होते. लेखक हरिभाऊ वडगावकर लिखित वगनाट्य ' गाढवाचं लग्न ' ऐकण्याचे कर्णमधुर भाग्य याचं प्रिय बालमित्राच्या हॉटेल मध्ये असलेल्या टेप रेकॉर्डरवर आम्हा काही बालमित्रांना लाभले. त्यातल्या त्यात दादू इंदुरीकर यांनी साकारलेले सावळ्या कुंभाराचे पात्र अन् त्यांची बोलण्याची एक विशिष्ट पद्धत एक रसिक म्हणून मनाला प्रफुल्लित करत असायची. याच वगनाट्यातील गंगीची भूमिका निभावली होती ती प्रभाताई शिवणेकर यांनी. गंगीचं बोलणं अन् त्याला वाक्यागणिक  सावळ्या कुंभाराने हाणलेली कोपरखळी गाढवाचं लग्न या वगनाट्याला रसिकांच्या हृदयात अजरामर करून गेली आहे. काळाच्या ओघात गाढवाचं लग्न हे वगनाट्य इतर अनेक कलाकारांनी सादर केले,पण दादू इंदुरीकर अन् प्रभाताई शिवणेकर यांनी सादर केलेल्या सावळ्या कुंभाराची अन्  गंगीची सर कुणालाच गाठता आली नाही. प्रिय बालमित्र विलास आम्हा मित्रांसाठी अन् स्वतः साठी देखील गाढवाचं लग्न या वगनाट्याला पुन्हा पुन्हा टेप रेकॉर्डरवर सुरू करायचा.दादू इंदुरीकर अन् प्रभाताई शिवणेकर यांनी सादर केलेल्या  सावळा कुंभार अन्  गंगीने सादर केलेल्या अभिनयाच्या जुगलबंदीला ऐकण्याचे कर्णमधुर भाग्य याचं मित्राच्या हॉटेल मध्ये आमच्या माध्यमिक वयोगटात पालखेड येथे लाभले आहे.


जुन्या मित्रांना भेटलं की, आत्म्याचा शोध घेण्याच्या दिशेने. पाऊल पडते.त्याचं कारण जुन्या मित्रांकडे आपलं खरं मन , खऱ्या अर्थानं मनमोकळे करता येते. तिथं काहीच लपून ठेवता येत नाही. आयुष्यातील वास्तववादी जगणं तिथच सापडते. आयुष्यभर ज्याच्या आकंठ प्रेमात पडावसं वाटतं, वाटतं, नव्हे नव्हे, इ.स. २०१८ पासून ते आजतागायत हे सुरू आहे अन् अंतिम श्वासापर्यंत सुरूच राहील.असं अत्यंत मनमोहक व्यक्तिमत्व म्हणजे सी. प्रेमकुमार..!सी. प्रेमकुमार ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा लिहितात , चित्रपटाच्या माध्यमातून सादर करतात तोच तर आपल्या आत्म्याचा शोध आहे.

सी.प्रेमकुमार मूळचे तामिळ चित्रपट लेखक तथा दिग्दर्शक आहेत.  meiyazhagan..! ( मैयाळगन) चा ढोबळमानाने अर्थ होतो आत्म्याची सुंदरता..! ही आत्मिक सुंदरता त्यांनी '96' अन् meiyazhagan..! ( मैयाळगन / मैयाजगन) या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट प्रकारे भावूकपणे सादर केली आहे. आत्म्याची ही सुंदरता अशीच असते, आमच्या प्रिय मित्र विलास सारखी अन् अजून भेटलेल्या  काहीं सारखी..! निरागस, प्रेमळ अन् साधं सरळ आयुष्य जगणारी..!


वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १३/११/२०२४, बुधवार


रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

जन सहयोगाची गोड गोड दिवाळी..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


जन सहयोगाची गोड गोड दिवाळी..!


===============================


माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग, व्यक्ती अन् त्याच प्रसंगाच्या अन् व्यक्तीच्या भाव विश्वात डोकावून पाहणारी मनं जेंव्हा कुणाला आपलंसं करतात, तेंव्हा प्रेमळ हृदय खुदकन हसायला लागते. ज्या मायेनं ओथंबून भिजलेल्या अतिशय सर्व सामान्य परिस्थितीतील भावूक अन् कष्टाळू मनाचा आनंद द्विगुणित होतो तेंव्हा खऱ्या गोड गोड दिवाळीची चाहूल अन् अनुभूतीही आपसूक येते.अशा कष्टाळू मनाला जेंव्हा कुणीतरी आपली बहीण समजून, आपल्याच कुटुंबातील सदस्य समजून अगदी मनापासून गोडधोड काहीतरी देतो तेंव्हा अजूनही जाणीवा जिवंत असणाऱ्या मनात प्राण आहे याची प्रचिती येते.


जन सहयोग सामाजिक संस्था छत्रपती संभाजीनगर येथील सदस्यांनी छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )परिसरात हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन केलेले आहे. अर्थात दुष्काळाचा शिक्का बसलेल्या मराठवाड्यात असे कार्य उभे करणे जरा कठीणच होते. मात्र ध्येयवेडी माणसं अजूनही या भूतलावर कुठे ना कुठेतरी आपले कार्य निष्काम कर्मयोगी भावनेने सामाजिक उत्तरदायित्व निभावत असतात. त्याचं सर्वोत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या जन सहयोग सामाजिक संस्थेचे प्रगल्भ नेतृत्व तथा जिवलग मित्र प्रशांत भाऊ गिरे होय. 


अनेक सामाजिक संस्था कार्यरत असतात.अनेकांचे कार्यही कौतुकास्पद असते. मात्र कौतुकास्पद कार्याला जेंव्हा निष्काम कर्मयोगी भावनेने जपलं जातं तेव्हा फार मोजक्या सामाजिक संस्था खऱ्या अर्थानं आपलं सामाजिक उत्तरदायित्व निभावत असतात. यासाठी जन सहयोग सामाजिक संस्था नक्कीच कौतुकास पात्र आहे. कोविडचा कालखंड असो की, रणरणत्या उन्हात पाण्याची टंचाई.या सर्व संकटावर मात करत जन सहयोग सामाजिक संस्थेने हजारो देशी वृक्षांना जपलं, वाढवलं आहे. आता हेच कार्य छत्रपती संभाजीनगरचे सिमोलंघन करून सुरू आहे. हे काम करत असताना जाणीव जागृत ठेवून कार्य केल्या गेले हे अत्यंत महत्त्वाचे कार्य ठरले आहे. जाणीव ठेवून जेंव्हा एखादं कार्य होते, तेंव्हा विधात्याचे खरे अस्तित्व त्या सर्व सामान्य परिस्थितीतील मनांत दिसून येते.


उद्यापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीच्या सणात स्री शक्तीचे पूजन अन् त्याच स्री शक्तिकडून पुरुषाचे औक्षण करण्याची आपल्या महान संस्कृतीची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. विधात्याने  या भूतलावर निर्माण केलेली सर्वात पवित्र शक्ती स्री आहे. स्रीचेच अस्तित्व आपल्याला विविध सण , उत्सव परंपरा इत्यादी आनंदोत्सव साजरा करायला प्रवृत्त करत असते. त्या आनंदात आपण स्री शक्तीचे पूजन, दर्शन, सेवा इत्यादी ऋणानुबंध जोडणारे मानवी मूल्य जोपासत आलेलो आहोत. आज दिनांक २७/१०/२०२४, रविवार रोजी जन सहयोग सामाजिक संस्थेने आपले नैतिक मूल्य अजून उंचावत दिवाळीच्या पूर्व संध्येला स्री शक्तीला वंदन करून गोडधोड देऊन अन् खऱ्या लक्ष्मीला , लक्ष्मी देऊन सन्मानित केले आहे. या सर्वोत्तम नैतिक उपक्रमाचे श्रेय जाते ते आमच्या जन सहयोग सामाजिक संस्थेचे प्रमुख अन् जिवलग मित्र प्रशांत भाऊ गिरे यांना..! 


जन सहयोग सामाजिक संस्थेचे कार्य उभे करण्यात अतिशय सर्व सामान्य परिस्थितीतील महिलांचे देखील योगदान राहिलेले आहे. कोणत्याही कार्याला जेंव्हा रूपडं येते, तेंव्हा त्या रूपडं आलेल्या कार्याला त्याच्या बाल्यावस्थेत मायेने जोपासणाऱ्या मनाला न विसरणारी माणसं जन सहयोग सामाजिक संस्थेच्या परिवारात आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील माता भगिनींना दिवाळीच्या पूर्व संध्येला भाऊबीज म्हणून दिलेली जाणीव असलेली कष्टाची लक्ष्मी अन् गोडधोड वस्तू श्रद्धेने भेट दिल्या. तेंव्हा हजारो वृक्षांना मनापासून आनंद नक्कीच झाला असेल. आपापल्या कुटुंबासाठी खऱ्या लक्ष्मी असणाऱ्या अनेक लक्ष्मींच्या भावूक मनात मायेचा ओलावा निर्माण झाला. आपला कुणीतरी श्रद्धेने सन्मान करत आहे ही भावना त्या सर्व माय माऊलींना सुखावून गेली. माझ्यामते मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय सामाजिक वातावरणातील स्री अन् पुरुषांचा कुणी सन्मान केला तर ती सन्मानित होणारी व्यक्ती आनंदित नक्कीच होत असेल, मात्र हृदयातून फारशी काही आनंदाने भावविभोर होत नसते.त्याचं कारण कळत नकळतपणे कधी ना कधीतरी कुणी ना कुणीतरी अशांचा सन्मान समाज  करत असतो. यामुळं सन्मानाच्या या बाबी अशांच्या आयुष्यात कधीतरी येऊन गेलेल्या असल्यामुळे मनाच्या सवयीचा भाग होऊन जातात. याउलट अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील स्री अन् पुरुषांचा जर कुणी यथोचित सन्मान केला तर अशी मने आनंदाने अत्यंत भावविभोर होतात. आपलाही कुणीतरी श्रद्धेने सन्मान करतो आहे ही बाब अशांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडते, आपलीही कुणीतरी दखल घेत आहे, आपल्यातील आर्थिक, सामाजिक न्युनगंड अवस्थेला दूर करून कुणीतरी आपल्याला, सन्मानित करत आहे हा भाव खऱ्या अर्थानं सर्व सामान्य परिस्थितीतील मंनाना अत्यंत सुखावून जातो. त्यात जर सन्मानित होणारी अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील स्री असेल तर तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या जातात.याची प्रचिती आज जन सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व सामान्य परिस्थितीतील स्री शक्तीचा सन्मान करताना जाणवली. स्री ही भावनेची देवता आहे याची जाणीव होते.


दिवाळी भेट गोडधोड सोहळ्यात आम्ही जन सहयोग सामाजिक संस्थेतील सर्व सदस्य मोठ्या गोडधोड मनाने सहभागी झालो होतो. 

होणारच..! त्याचं कारण, आमचा कुटुंब प्रमुख मधासारखा गोड गोड आहे. नाव त्याचं प्रशांत भाऊ गिरे..!


ता.क. - सर्व सामान्य परिस्थितीतील अनुभवलेल्या जाणीवा, जिवंत असे पर्यंत जिवंत असतात.


असो, सर्वांना जन सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त मनःपूर्वक गोड गोड शुभेच्छा..!


स्थळ - शेळी मेंढी प्रक्षेत्र परिसर पडेगाव - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)


वंदे मातरम्  🌳


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

(सदस्य - जन सहयोग सामाजिक संस्था छत्रपती संभाजीनगर. )


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: २७/१०/२०२४, रविवार



मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

आदरणीय भाऊ तोरसेकर, एक समृद्ध विचारांचे प्रगल्भ विद्यापीठ..! "


 


____________________________________________


मी प्रथमतः नम्रपुर्वक हे स्पष्ट करू इच्छितो की, खालील छायाचित्रात मी ज्येष्ठ पत्रकार व लेखक आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या जवळ , खूप जवळ बसलेलो असलो तरी भाऊंशी काहीही चर्चा केलेली नाही.

हल्ली कोणत्याही थोर,मोठ्या माणसांच्या नुसता जवळ जरी एखादा कुणी उभा राहिला तरी असले कित्येक माणसं , वर्तमापत्राद्वारे किंवा विविध तांत्रिक प्रसार माध्यमांवर असे मजकूर लिहितात की, 

" अमक्या...अमक्या शी अमक्या अमक्या विषयावर चर्चा करताना अमके..किंवा तमके..! "


असो,माझ्या व आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या एकमेकांसोबत असलेल्या छायाचित्रा बाबत माझ्या वतीने केलेले नम्रपूर्वक स्पष्टीकरण समाप्त झाले.

____________________________________________


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


" आदरणीय भाऊ तोरसेकर, एक समृद्ध विचारांचे प्रगल्भ विद्यापीठ..! "

__________________________________________


ज्येष्ठांच्या संगतीचा मला पहिल्यापासून छंद..! माझ्या आयुष्यातील आता पर्यंत सहवासात आलेल्या प्रत्येक जेष्ठ नागरिकांपासून मी सतत काहीतरी शिकत आलो.त्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना बोलते केले होते त्यांच्या गत अनुभवांचा खजिना खोलायला..!


आज दिनांक २१/१०/२०१८ रोजी मात्र माझ्या समोर असे ज्येष्ठ नागरिक उभे होते, ज्यांच्या सिद्धहस्त लेखनीचा तर मी प्रचंड चाहता होतोच...पण दिनांक २१/१०/२०१८ रोजी त्याच लेखणीच्या जादुगाराला प्रत्यक्ष याची देही याची डोळा व कानी ऐकण्याची व पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली.


ज्येष्ठ पत्रकार व लेखक आदरणीय भाऊ तोरसेकर यांना ऐकलं अन् एखाद्या विषयावर मुद्देसूद ,परखड विवेचन कसे असावे ,एखाद्या पत्रकाराची पत्रकारिता कशी असावी,त्यातील मुद्द्यांचे विवेचन कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण..माझ्या व उपस्थित सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले.


बहुदा परखड पत्रकार स्व. आचार्य अत्रे यांच्या बऱ्याच परखड विचारांचे सोने असेच त्याकाळी श्रोत्यांनी लुटले असणार.


माझ्या सारखी कित्येक माणसं विचारांवर , प्रचंड श्रद्धा बाळगून असतात.एखाद्या व्यक्ती वरील श्रद्धा कालपरत्वे बदलत असते,पण त्याच अशा कित्येक राष्ट्र पुरुषांच्या प्रगल्भ विचारांना कधीही अन् कुणीही मृत करूच शकत नाही.कारण विचार हे चिरंजीव असतात. विचार हे सदैव तरुण असतात..! मात्र ते विचार फक्त तरुण,चिरंजीव असून भागणार नाही तर..


ते विचार नदीतील वाहणाऱ्या पाण्या सारखे निर्मळ असावे..!


विचार एखाद्या वनराईने नटलेल्या पर्वतासारखे असावे..!

विचार हे पहाटेच्या मंद सुगंध देणाऱ्या हळुवार गार वाऱ्यासारखे असावे..!


विचार हे एखाद्या नववधू सारखे असावे, ज्या प्रमाणे नववधू आतुर असते,आपल्या भावी आयुष्या विषयी..!

ओढ असते तिला आपल्या होऊ पाहणाऱ्या सुंदर स्वप्ना विषयी..!


विचारांचे ही अगदी तसेच असावे..त्या विचारांना ओढ असावी आपल्यातून निर्माण होणाऱ्या उज्वल भविष्या विषयी..!


विचार हे एखाद्या क्षत्रियाचा तेज निर्माण करणारे असावे..!

विचार हे निरागस देखील असावे पण पोरकट कदापि नसावे..!


मी आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या सर्वार्थाने परिपूर्ण असणाऱ्या पोक्त विचारांचे सोने मी यथेच्छ लुटले.भाऊंची मिश्किल शैली, प्रत्येक मुद्द्यांचे सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडून गेली. 


 आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या खूप जवळ जाऊन मला त्याच्या साध्या सरळ वागण्याचे कमालीचे कौतुक वाटले.अगदी साधी राहणी.श्रोत्यांना आपलंस करणं, इ.अनेक गुण वैशिष्टे मला भावून गेली.भाऊंच्या जवळ जाऊन त्यांच्या मध्ये असलेली विद्वत्ता व नम्रता जवळून पाहिली.गर्दी खूप होती.भाऊ प्रत्येकाला काहीसा वेळ देत होते.


आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला एखाद्या ग्रेट माणसाचा वैचारिक स्पर्श हा परीस स्पर्शाहुन श्रेष्ठ असतो.मी दूर झालो..अन् दुरून न्याहाळत राहिलो त्या अतिशय सामान्य राहणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वाला,आदरणीय भाऊ तोरसेकर यांना..! मला विशेष आनंद याचा आहे की, आदरणीय भाऊ तोरसेकर माझ्या सुटसुटीत फेसबुक मित्रयादीत आहे..! 🌹


ता.क.: एखाद्या विद्वान माणसाला फक्त एक ते दीड तास ऐकणे म्हणजे एक संपूर्ण ग्रंथ वाचण्यासारखे असते.

मी दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ रोजी संध्याकाळी एक ग्रंथ मन लावून वाचला,ऐकला अन् प्रत्यक्ष पहिला देखील..!


वंदे मातरम्..!🙏


आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या लेखणीचा नियमित वाचक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


प्रसंग स्थळ: तापडिया नाट्य मंदिर,औरंगाबाद.


निमित्त - स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला


प्रसंग दिनांक: २१ ऑक्टोबर २०१८ आणि..

लेखन दिनांक - २२/१०/२०१८

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

आठवणी दाटून आल्या


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


' आठवणी दाटून आल्या '


=================================


सदरील फोटो प्रत्यक्षातील कुठला आहे माहीत नाही. सोशल मीडियावर प्राप्त झाला. सदरील फोटो बघून मन गहिवरून आले अन् आठवणी दाटून आल्या.


सदरील फोटो बघितल्यावर प्रामुख्याने दोन बाबी क्षणात नजरेच्या पटलावर आल्यात. त्या क्रमवार पुढीलप्रमाणे..


१) मी वाचलेले थोर लेखक धनंजय किर लिखित ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' पुस्तक अन् त्यातील परम वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्या चटकन डोळ्यासमोर आलेत. परम वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी डोळ्यात तेल घालून रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्याच्या खाली अभ्यास केला.दारिद्र्य अन् वंचित आयुष्याला शिक्षण घेऊन तिलांजली देऊन संपूर्ण मानव जातीला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून वंदनीय बाबासाहेब नावारूपाला आले. परम वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी आहे त्या परिस्थितीत शिक्षण घेतले अन् विश्वातील एक अतिशय विद्वान व्यक्तिमत्त्व त्यातून आकारास आले.


दुसरे उदाहरण देण्यापूर्वी नम्र पूर्वक व्यक्त होतो की, दुसरे उदाहरण तुलना नसून फक्त अत्यंत बिकट परिस्थितीत केलेला अभ्यास याचं मुद्द्याबाबत वाचकांनी समजून घ्यावा ही नम्र अपेक्षा.


२) माझे स्व.तीर्थरूप वडील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कोपरगाव येथे साधारणतः साठच्या दशकात होते. घरून कोणताही आर्थिक पाठिंबा अजिबात नव्हता.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 'कमवा आणि शिका' या ब्रीद वाक्याला प्रमाण मानून माझे तीर्थरूप वडील कॉलेजहून आल्यावर कोपरगाव स्थित आजच्या विष्णू चित्रपटगृहाच्या अलीकडील कोपऱ्यावर तत्कालीन असणाऱ्या हॉटेल मध्ये वेटर अन् भांडी धुण्याचे काम करत असायचे. रात्र झाली की, बाजूलाच असलेल्या विष्णू चित्रपटगृहासमोरील सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करायचे. अभ्यास झाला की, पुन्हा हॉटेलवर मुक्कामी यायचे. हॉटेलवर लाईटची सोय नव्हती. साधा दिवा ( चिमणी ) असायची. हा दिनक्रम जवळजवळ दोन वर्ष सुरू होता. जो पर्यंत माझे स्व. तीर्थरूप वडील हयात होते तो पर्यंत अधून मधून त्यांच्या प्राथमिक, माध्यमिक अन् महाविद्यालयीन आयुष्यातील अतिशय खडतर प्रवासातील आठवणी आमच्या सोबत व्यक्त व्हायचे. जानेवारी २००० मध्ये मी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना आवर्जून कोपरगाव येथे सदरील ठिकाणांची भेट घेण्यासाठी घेऊन गेलो होतो. माझ्या तीर्थरूप वडिलांनी ज्या हॉटेलमध्ये काम केले होते, तिथं ज्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळी तिथे हॉटेल नव्हते.मात्र बदल झालेली इमारत होती.तिथं गेल्यावर गतकाळातील आठवणी जाग्या होऊन माझ्या तीर्थरूप वडिलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या तीर्थरूप वडिलांचे डोळे ओले झालेले त्यावेळी बघितले होते. विष्णू चित्रपटगृहाच्या परिसरात गेल्यावर गतकाळातील आठवणी जाग्या होऊन काही वेळ माझे तीर्थरूप वडील त्या ठिकाणी उभे होते. गतकाळातील लाईट खांब अस्तित्वात नव्हता, मात्र परिसर तर तोच होता.जिथं रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्याच्या प्रकाशात माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी अभ्यास करून आपलं कर्तुत्व सिध्द केले होते.त्यावेळी तिथला परिसर माझ्या वडिलांनी पायी फिरून त्या परिसराला आपल्या हृदयात श्रद्धेने बंदिस्त केले होते. ती भेट एखाद्या तीर्थस्थळाला भेट दिल्याची आत्मिक शांती माझ्या वडिलांच्या आत्मिक मनाला देऊन गेली होती. ज्या ठिकाणी भेट दिल्यावर आपला खडतर भूतकाळ, भावूक भूतकाळ अन् श्रद्धेय भूतकाळ आठवणींच्या स्वरूपात भेटतो, त्यावेळी त्या खडतर, भावूक अन् श्रद्धेय मनाच्या देव्हाऱ्यात भावनेच्या गहिवरलेल्या तारा नक्कीच छेडल्या जातात.त्यातून आठवणींचे स्वर गुंजन करू लागतात. त्यातून बऱ्याचदा भावनेचा बांध फुटतो अन् त्या काळात मन वर्तमानात न राहता पुन्हा त्याच गतकाळातील आठवणीत रमून जाते. जसे की, ज्यावेळी माझे स्व.तीर्थरूप वडील कोपरगाव येथे त्यांच्या गतकाळातील स्थळांच्या आठवणीत रमून गेले होते.


आजही काही प्रसंग, फोटो, व्हिडिओ बघितले की, त्यांची तार कुठेतरी आपल्या मनाच्या कोपऱ्यात छेडल्या जाते. त्या प्रसंगाचा, फोटोचा अन् व्हिडिओचा कळत नकळतपणे संदर्भ अन् सांधर्म्य आपल्या पूर्वजांच्या स्मृतींशी जुळल्या जातो. त्यातून आठवणींचा पसारा उलगडला जातो. त्या आठवणीत ज्यांना आपण आदर्श मानतो ते कित्येकजण चटकन डोळ्यासमोर येतात. बिकट परिस्थितीत कुणी तरी स्वतः ला सिध्द केलेल्या आठवणी मनाला गहिवर निर्माण करतात. विशेषतः ज्यांचं आयुष्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अन् आश्रित म्हणून व्यतीत झालेलं असतं, अशांच्या आठवणी मनात गहिवर निर्माण करतात.


माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी श्रीरामपूर येथेही अत्यंत बिकट परिस्थितीत घेतलेल्या महाविद्यालयीन आयुष्यावर वडील हयात असताना मी फेसबुकवर पाच भाग लिहिलेले आहेत. मात्र ते ब्लॉगवर प्रकाशित केलेले नाहीत. भविष्यात त्याला पुस्तक रुपात प्रकाशित करण्याचा मनोदय आहे.श्रीरामपूर येथे आम्ही सह परिवार वडिलांच्या सोबत, त्यांच्या गतकाळातील आठवणींच्या ठिकाणी भेट दिली होती.


वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: ८/९/२०२४, रविवार

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

तीर्थरूप वडिलांच्या आठवणीतील प.पू.भगवान बाबा


 

चिंतन ©️


तीर्थरूप वडिलांच्या आठवणीतील प.पू.भगवान बाबा 


=================================


माझे स्व.तीर्थरूप वडील त्यांच्या थोरल्या बहिणीच्या सासरच्या गावी बालमटाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यादेवी देवी नगर  (अहमदनगर ) येथे प्राथमिक शाळेत शिकायला होते. तो कालखंड होता साधारणतः इ.स. १९४० ते इ.स. १९५० दरम्यानचा..! त्यावेळी दरवर्षी बालमटाकळी येथे हिंदू धर्मातील धार्मिक सप्ताह आयोजन तेथील गावकऱ्यांच्या द्वारे आयोजित केल्या जात असे. त्या सप्ताह निमित्त मुख्य धार्मिक गुरुवर्य प्रवचनकार / कीर्तनकार  म्हणून आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री. भगवान बाबा महाराज असायचे. 


थोर राष्ट्रसंत श्री. भगवान बाबा महाराज यांचा मुक्काम तत्कालीन बालमटाकळी गावातील शाळेतील वर्ग खोल्यात असायचा. परम पूज्य श्री.भगवान बाबा महाराज यांच्या मुकामाच्या वेळी त्यांची सेवा करण्याचे भाग्य माझे स्व.तीर्थरूप वडील अन् त्यांच्या काही बालमित्रांना त्यावेळी लाभले होते. त्यावेळी मुक्कामाच्या ठिकाणी दिवाबत्ती करणे, परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांचे  पाय दाबून देणे, भोजन आटोपल्यावर ताट तांब्या उचलून धुवून ठेवणे, परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांच्या प्रवासातील घोड्यांची निगा राखणे इत्यादी कामे माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांनी अन् तत्कालीन बालमटाकळी स्थित काही बालमित्रांच्या भाग्यात होते. परम पूज्य श्री. भगवान बाबा यांची देहयष्टी उंचीपुरी काटक होती. आवाज उंच अन् कडक होता. बालमटाकळी येथील धार्मिक सप्ताह सुरू झाला की, दररोज परम पूज्य श्री. भगवान बाबा यांचे प्रवचन / कीर्तन सेवा असायची. बालमटाकळी येथील समस्त नागरिक परम पूज्य श्री.भगवान बाबा महाराज यांच्या अमृतवाणीत गुंग होऊन जायचे. 


वरील सर्व आठवणी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी मला , माझ्या पत्नीला अन् माझ्या दोन्ही मुलांना बऱ्याचदा सांगितलेल्या होत्या. घरातील ज्येष्ठ माणसं ही आपल्या सोबत त्यांच्या आयुष्यातील कित्येक आठवणींचा खजिना घरातील बालकं , तरुण अन् प्रौढांकडे रिक्त करत असतात.फक्त ज्येष्ठांना मायेनं समजून उमजून घेणारे स्री अन् पुरुषांना मन असावं लागत, दुसरं काहीच नाही..! आपल्या सोबत घरातील ज्येष्ठ असण्यापेक्षा , ज्येष्ठांच्या सोबत आपण असायला हवे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले. 


२८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांच्या सोबत सहपरिवार तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे माऊली विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला  गेलो होतो. त्यावेळी पंढरपूर येथील मुक्काम माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांच्या आग्रहाखातर परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांच्या मठात केला होता. वास्तविक मी पंढरपूर येथील मुक्काम गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या मठात अगोदरच नियोजित केलेला होता.पण पंढरपूर येथे संध्याकाळी माझ्या वडिलांच्या वाचण्यात ' भगवान बाबा मठ ' असे वाचण्यात आले अन् माझ्या वडिलांनी मला आदेश दिला की, " आपण परम पूज्य श्री. भगवान बाबा महाराज यांच्याच मठात मुक्कामी जायचे. दुसरे कुठेच नाही "  मी वडिलांचे ऐकले अन् परम पूज्य श्री.भगवान बाबा महाराज यांच्या मठात आम्ही सह परिवार मुक्कामी थांबलो होतो. वास्तविक मलाही त्या क्षणापर्यंत माहीत नव्हते की, पंढरपूर येथे परम पूज्य श्री भगवान बाबा महाराज यांचा मठ आहे म्हणून..! त्या मुक्कामाच्या रात्री परम पूज्य श्री भगवान बाबा महाराज मठ पंढरपूर येथे कोणत्या तरी एका महाराजांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली होती. आमचे जेवणं झाल्यावर आम्ही त्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिलो होतो.


आम्ही ज्यावेळी पंढरपूर येथील श्री. भगवान बाबा महाराज यांच्या मठात मुक्कामी थांबलो होतो त्यावेळी माझे स्व.तीर्थरूप वडील पुन्हा एकदा त्यांच्या बालपणातील , प्राथमिक वयोगटातील आठवणीत रमून गेले होते. 


आजही  श्री. भगवान बाबा महाराज यांच्या मठात २८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही  मुक्कामी थांबलो होतो त्यावेळच्या तेथील पावत्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. आपल्या पूर्वजांच्या, श्रद्धेयांच्या आठवणी जाग्या झाल्या की, त्याच गतकाळातील त्यांच्या स्पर्शाने , सहवासाने पूनित झालेल्या वस्तू आपल्याला त्याच श्रद्धेय आठवणीत घेऊन जात असतात. जसे की,  श्री. भगवान बाबा महाराज यांच्या पंढरपूर स्थित मठात तीर्थरूप वडिलांच्या सोबत आम्ही मुक्कामी थांबलो होतो त्यावेळच्या पावत्या..! काहींच्या दृष्टीने ही बाब क्षुल्लक असेल, पण ज्यांना भावना अन् मन त्यातल्या त्यात ते श्रद्धेय असेल त्यांच्या दृष्टीकोनातून या बाबी नक्कीच परम वंदनीय ठरतात.


ता.क. - श्रद्धेय आठवणी ह्या जपून ठेवल्या की, श्रद्धेय स्वर्गवासी माणसं देखील सतत आपल्या अवती भोवतीच आहेत याची सतत जाणीव होत असते.


असो, आज परम पूज्य श्री भगवान बाबा महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याला माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून श्रद्धापूर्वक विनम्र वंदन..!🙏🏻


जय भगवान बाबा 

वंदे मातरम् 


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २४ ऑगस्ट २०२४, शनिवार

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

हरवलेलं पाकीट


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


हरवलेलं पाकीट


===================================


हरवलेली वस्तू कुणाची का असेना ती त्याला मनाने अस्वस्थ करत असते. मनाची अस्वस्थता आपल्या सोबत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या जीवांना देखील अस्वस्थ करत असते. त्यातल्या त्यात ज्यांची जी वस्तू हरवलेली आहे ते मन जर सर्व सामान्य मानवी समूहातील असेल तर त्या जीवाची होणारी अस्वस्थता फार वेदनादायी असते. 


काल दिनांक ९/८/२०२४, शुक्रवार रोजी नेहमी प्रमाणे मी अन् माझी धर्मपत्नी रात्री साधारणतः ९:३० वाजेच्या आसपास फेरफटका मारायला घराचे बाहेर पडलो होतो.मुख्य रस्त्याने जात असताना रस्त्यावर एक पाकीट पडलेले माझ्या पत्नीच्या  नजरेत आले. माझ्या पत्नीने अन् मी आजूबाजूला कुणी आहे का याची खातरजमा केली.जेणेकरून रस्त्यावर पडलेल्या पाकिटाच्या बाबतीत चौकशी करता येईल.मात्र आजूबाजूला कुणीच नव्हते. पाकीट काहीसे वजनदार होते. त्यात बघितले तर बरीच रक्कम होती अन् काही कार्ड होते. आजूबाजूला कुणीही दिसत नसल्यामुळे मी अन् माझी धर्मपत्नी पाकीट घेऊन घरी आलो. रात्रीचे साधारणतः दहा वाजले होते. घरी आल्यावर पाकीट उघडून त्यात काय काय आहे हे आम्ही बघितले. त्यात नोटांच्या अन् नाण्यांच्या स्वरूपात रक्कम होती. पाकिटाच्या  दुसऱ्या कप्प्यात आधार कार्ड्स, पॅन कार्ड,बँकेचे एटीएम कार्ड होते. त्यातील एक आधार कार्ड छोट्या मुलीचे होते. त्या पकिटावरून ते एका सर्व सामान्य नागरिकाचे वाटत होते. संबंधित पाकिटात असलेल्या आधार कार्ड , पॅन कार्ड आणि एटीएम कार्डवर ' सुरेश किसन मासोळे ' असे नाव होते.संबंधित व्यक्तीचे एकाच क्रमांकाचे दोन आधार कार्ड अन् त्यावर दोन भिन्न भिन्न पत्ते होते. एक पत्ता वडगाव कोल्हाटी ( बजाजनगर छ. संभाजीनगर ) येथील तर दुसरा पत्ता खवडा डोंगर, रमाई नगर तिसगाव ( छ. संभाजीनगर ) येथील पत्ता होता. संबंधित व्यक्तीला संपर्क होईल असे मोबाईल नंबर त्या पाकिटात आढळून आले नाहीत. आता रात्रीचे १०:३० वाजले होते. वडगाव कोल्हाटी पत्ता वाचल्यावर मी त्याचवेळी माझा खूप जिवलग बालमित्र आण्णासाहेब कारभारी म्हस्के ( बजाजनगर ) यास कॉल केला अन् सर्व प्रकार सांगितला.तसेच उपरोक्त नावाच्या व्यक्ती बाबत काही खातरजमा होईल का याबाबत चर्चा केली.आण्णासाहेबने सांगितले की, त्या परिसरातील काही कामगार अन् काही व्यक्तींना याबाबत आपण उद्या चौकशी करूया असे मला सांगितले.


आता रात्रीचे अकरा वाजले होते. इतर मार्गाने संबंधित व्यक्तीचा संपर्क होऊ शकतो का या विचारचक्रात मी होतो.अखेर संबंधित व्यक्तीच्या नावाचे फेसबुक अकाऊंट सर्च  करण्याचे ठरवले. ' सुरेश  मासोळे ' नावाचे अनेक फेसबुक अकाऊंट फेसबुक वर दिसू लागले होते. आता यापैकी नेमके कोणते हे शोधण्यासाठी मी , संबंधित व्यक्तीच्या आधार कार्ड वरील फोटोचा आधार घ्यायचे ठरवले. संबंधित व्यक्तीच्या नावाच्या फेसबुक अकाऊंट वरील प्रोफाईल फोटो अन् माझ्याकडे उपलब्ध असलेल्या आधार , पॅन कार्ड वरील फोटो मॅचींग होईना. अखेर संबंधित नावाच्या भिन्न भिन्न फेसबुक अकाऊंट चेक करू लागलो. अखेर एक फेसबुक अकाऊंट अन् त्यावर अपलोड केलेल्या फोटोत, एका छोट्या दीदीचा , संबंधित व्यक्तीचा फोटो अन् पाकिटात आढळून आलेल्या आधार कार्ड वरील छोट्या दीदीच्या अन् संबंधित व्यक्तीच्या फोटोत एक समानता आढळून आली. मला खात्री पटली होती की, हेच फेसबुक अकाऊंट आम्हाला सापडलेल्या पाकीट मालकाचे आहे. मात्र सदरील फेसबुक अकाऊंटवर शेवटची पोस्ट बरीच जुनी असल्याने सदरील फेसबुक अकाऊंट सुरू आहे की बंद आहे याची मला शंका आली. तरीपण संबंधित व्यक्तीला संपर्क करण्याच्या हेतूने मी त्यांच्या फेसबुक मेसेंजर वर मेसेज पोस्ट केला.मात्र कुठलाच संपर्क झाला नाही. अखेर संबंधित व्यक्तीच्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मध्ये त्याच आडनावाचे फेसबुक अकाऊंट चेक केले.त्यावर कुणाच्या फेसबुक अकाऊंटवर मोबाईल नंबर दिसतो का याची तपासणी केली.मात्र एकाच्याही फेसबुक अकाऊंटवर मोबाईल नंबर आढळून आला नाही.आता मध्यरात्रीचे बारा वाजले होते. मी माझ्या पत्नीला म्हणालो - " उद्या सकाळी लवकर आपण संबंधित व्यक्तीच्या आधार कार्ड वरील खवडा डोंगर, रमाई नगर तिसगाव ( छ. संभाजीनगर ) येथे जाऊ.त्या परिसरात संबधित व्यक्तीच्या नावाची चौकशी करू अन् जर योग्य त्या पुराव्यानिशी कुणी सापडले तर त्या व्यक्तीला आपल्याला सापडलेले पाकीट देऊन टाकू.यावर माझी पत्नी मला म्हणाली - " जर या नावाची व्यक्ती तिथं आढळून आली नाही तर..!"

मी लगेच म्हणालो - " शेवटचा पर्याय म्हणून ज्या मुलास त्याच्या बालपणी  अभ्यासाची  प्रेरणा दिली आहे तो आपल्याच गावचा अन् आपल्याच गल्लीतील एक होतकरू तरुण मुक्तेश्वर लाड याच आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.त्यास सकाळी कॉल करून पुढील मार्गदर्शन घेऊ. " 


आज दिनांक १०/८/२०२४, शनिवार रोजी भल्या सकाळी मी अन् माझी पत्नी खवडा डोंगर, रमाई नगर तिसगाव ( छ. संभाजीनगर ) येथील परिसरात पोहोचलो.त्या परिसरातील रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला थांबवून  ' सुरेश किसन मासोळे ' नावाची कुणी व्यक्ती या परिसरात राहते का ? विचारले. त्या दुचाकीस्वाराने होकार दिला अन् कोणत्या रस्त्याने जायचे अन् कुठं नेमकं त्यांचे घर आहे हे आम्हाला सांगितले. आम्ही आता निश्चिंत झालो होतो. ज्याचं ते पाकीट होते ते त्या व्यक्तीच्या ताब्यात दिले जाणार याचा मनस्वी आनंद झाला होता. चिखलाच्या अन् ओबडधोबड रस्त्याने जात आम्ही माहीत झालेल्या पत्यावर पोहोचलो होतो. पत्र्याचे शेड असलेल्या घराच्या समोर एवढ्या भल्या सकाळी कुणीतरी आलेलं बघून तिथली एक भगिनी जरा गडबडून गेली. मी त्यांना विचारले की,  " सुरेश किसन मासोळे येथेच राहतात का ? " 

त्या माऊलीने जरा भीतभीतच मला प्रत्युत्तर दाखल विचारले  " हा , काय झालं..?" 

मी म्हणालो - " घाबरु नका ताई. त्यांचे पाकीट आम्हाला काल रात्री सापडले आहे.ते त्यांना परत करायला आलो आहे. "

हे ऐकल्याबरोबर त्या माऊलीने सुस्कारा सोडला अन् म्हणाली.. " मला वाटलं का, माझ्या पोराने काही केलं की काय. त्यामुळं मी घाबरून गेली होती. काल तो भद्रा मारुतीच्या दर्शनाला खुलताबादला गेला होता. झोपलेला आहे अजून. उठवते त्याला. "


आईची माया आपल्या कोणत्याही वयोगटातील लेकराविषयी सदैव सावध अन् काळजीच्या भावनेत असते याचं मूर्तिमंत उदाहरण आमच्या समोर त्या क्षणाला आम्हाला जाणवले होते.


थोड्या वेळानं संबंधित व्यक्ती डोळे चोळत चोळत आनंदित मुद्रेने आमच्या समोर आली. मी जो फोटो आधार कार्डवर बघितला होता तिच व्यक्ती आमच्या समोर होती. आपलं हरवलेलं पाकीट आपल्याला मिळतंय या भावनेने ती व्यक्ती सकाळच्या राम पहारी खूपच आनंदून गेलेली जाणवू लागली होती. आनंद होणारच..! सर्व सामान्य लोकांना आपल्या अंग मेहनतीचे पैसे जर कुठे हरवले तर अशी माणसं सर्वाधिक चिंतातुर होत असतात. दिवसभराचे कष्टंच हरवले या जाणिवेतून अशी उदास होऊन जात असतात.कष्टाने कमावलेली रक्कम भले ती किती असू द्या, तिचं मूल्य , त्या सर्व सामान्य परिस्थितीतील माणसाच्या आयुष्यात अमूल्य असते. आमच्या समोर उभे असलेल्या व्यक्तीला आकाश ठेंगणं झालं होतं. त्यांनी सलगपणे बोलत आम्हाला सांगितले की, " काल दिवसभर गॅस टाक्या वाहण्याचे काम केले होते.रात्री घरी यायला उशीर झाला होता. घरी आलो तर माझ्या खिशात माझे पाकीटच नव्हते. पैसे पण त्यातच होते. माझ्या मुलीचे आधार कार्ड पण त्यातच होते.माझ्या मुलीच्या शाळेत शिक्षकांना मुलीच्या आधार कार्डची झेरॉक्स द्यायची होती, त्यासाठी पाकिटात आधार कार्ड होते. साहेब तुम्ही लई देवासारखे आलात. " असं म्हणून त्या व्यक्तीने दोन्ही हात जोडले. त्यावेळी माझ्या अंतर्मनात थोर हिंदी साहित्यिक प्रेमचंद मुंशी आणि थोर मराठी कवी नारायण सुर्वे यांनी आपापल्या साहित्यात व्यक्त केलेल्या अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील माणसाच्या किंवा मेहनती कामगारांच्या रूपातील एक वास्तवातील प्रतिनिधी माझ्या समोर उपस्थित आहे याची जाणीव झाली होती. आपल्या भारतातील बहुतांशी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिरेखा थोर साहित्यिक प्रेमचंद मूंशी अन् नारायण सुर्वे यांनी आपापल्या साहित्यात व्यक्त केल्या आहेत. त्या आजही आपल्या आसपास आहेत याची जिवंत जाणीव मला झाली होती, होत होती. 


माझे विचारचक्र थांबवून मी  सुरेश किसन मासोळे  यांचे हात माझ्या हातात घेऊन त्यांच्या पाठीवर हात ठेवला होता. एखाद्याचे मन भरून येणं काय असतं हे त्या क्षणी मला जाणवलं होतं. माझ्या जवळ असलेलं पाकीट , सुरेश किसन मासोळे यांच्या हातात सोपवले अन् त्यांना म्हणालो..

" सुरेश भाऊ, पाकिटात जे काही आहे ते नीट तपासून घ्या. रक्कम पण तपासून घ्या. "

इतक्यात बाजूला असलेल्या त्यांच्या माऊली म्हणाल्या..

" अहो, भाऊ तुम्ही एवढ्या काळजीने आलात.पाकीट तपासून आम्ही काय करणार. आजकाल कुणी काही सोडत नाही. तुम्ही तर आमची ओळख ना पाळख तरी पण आम्हाला शोधत शोधत आलात. "

तरीपण मी त्यांना म्हणालो - " ताई तसे नाही. आम्ही तुमचे पाकीट तुमच्या हवाली केलं हे आमचं काम आम्ही केलं. मात्र पाकिटात असलेल्या सर्व वस्तू अन् रक्कम कृपया आमच्या समोर तपासून घ्या.म्हणजे आम्ही निश्चिंत होऊ. "

माझ्या खूप आग्रहाने  सुरेश भाऊंनी पाकिटातील सर्व वस्तू अन् रक्कम तपासून घेतली. बरोबर असल्याची खात्री झाल्यावर मी त्यांना एक सल्ला दिला. 

" इथून पुढे पाकिटात स्वतः चा किंवा कुटुंबातील एखाद्याचा मोबाईल नंबर कागदावर लिहून ठेवत जा. अशी परिस्थिती उद्भवली की, मग त्या मोबाईल नंबरच्या आधारे संपर्क करणे सोपे होते. "

असे म्हणून मी त्यांना " राम राम, वंदे मातरम् " म्हणालो अन् आम्ही पती पत्नीने त्यांचा निरोप घेतला.


अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील माणसाच्या आयुष्यात कष्टाचे पाकीट सदैव सोबत असते. फक्त कधी कधी दिवसभराच्या कामाच्या व्यापातून ते पाकीट कधीतरी निसटून जाते. मग उरते फक्त आणि फक्त दिवसभराच्या कष्टाच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची व्यथा..! ती मनाची व्यथा दिवसभराच्या कष्टाच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा जाब स्वतः विचारत असते, कारण त्या पाकिटातील पै अन् पै दिवसभराच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाचे प्रतिनिधित्व करत असते. दिवसभर कष्टकऱ्यांची ही व्यथा अन् तगमग कुणाचे तरी ओरबाडून खाणाऱ्यांना कधीही समजणार नाही.


वंदे मातरम्

लेखक - नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1 


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)  

                                    

दिनांक - १० ऑगस्ट २०२४, शनिवार

शनिवार, २९ जून, २०२४

सेम टू सेम अन् विश्वास


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


' सेम टू सेम अन् विश्वास '


=================================


आज संध्याकाळी हेल्मेट खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका दुकानात मी अन् माझी धर्मपत्नी गेलो होतो. तिथं गेल्या गेल्या जे सद्गृहस्थ दुकान मालक म्हणून बसलेले होते त्यांना बघितल्या बघितल्या मला भारताचे महान वैज्ञानिक/ अंतरीक्ष शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांची आठवण आली. सदरील सद्गृहस्थ अगदी सेम टू सेम थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांच्या सारखेच दिसत होते. असं म्हणतात की, या भूतलावर एकाच व्यक्ती सारखे दिसणारे किमान पाच जण असतात.त्याचा प्रत्यय मला तर याचि देही याचि डोळा आज पुन्हा एकदा आला होता. मला असाच सेम टू सेम दिसण्याचा अनुभव मागील वर्षी दिल्ली प्रवासात फिरताना आला होता. त्यावेळी ती व्यक्ती पालखेड गावातील पण हल्ली छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या मित्रासारखी दिसून आली होती.


आकार अन् रंग निवडून हेल्मेट पसंद केले. आमची स्कूटी दुचाकी काहीशी दूरवर पार्किंग मध्ये लावली होती. डिकीत हेल्मेट बसते की नाही याची खात्री करण्यासाठी मी हेल्मेट घेऊन जाऊ शकतो का ? असे विचारले. संबंधित ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने " त्यात काय विचारता , घेऊन जा..!" असे म्हंटले. त्यांनी जरी माझ्यावर विश्वास दाखवला होता तरी देखील मी माझा महागडा मोबाईल त्यांच्या जवळ दिला अन् म्हणालो..

" माझा मोबाईल तुमच्या जवळ असू द्या. "

यावर ते सद्गृहस्थ म्हणाले - " अहो, मोबाईल कशाला देता " 

मी म्हणालो - " काका, तुमची अन् माझी अजिबात ओळख नाही.तुम्ही विश्वासाने महागडे हेल्मेट माझ्याजवळ दिले आहे. माझी स्कूटी दूरवर लावली आहे. मी तिकडून तिकडेच निघून गेलो तर..!"

त्यावर ते ज्येष्ठ सद्गृहस्थ हसून म्हणाले - " मी माणसं ओळखतो. "

तरीपण मी म्हणालो - " काका, तसे नाही, जग फार विचित्र आहे. कुणाचा भरवसा नाही. कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका. त्यात तुम्ही अन् मी तर अजिबात ओळखीचे नाही. आमची स्कूटी पण दूरवर पार्किंग केली आहे. माझा मोबाईल तुमच्या जवळ असू द्या. मी हेल्मेट स्कूटीच्या डिकीत बसते की नाही याची खात्री करतो अन् पुन्हा परत येतो."


अखेर मी माझा महागडा मोबाईल संबंधित व्यक्तीच्या काउंटरवर ठेवला अन् हेल्मेट घेऊन गेलो. हेल्मेट डिकीत बसते की नाही याची खात्री झाली अन् पुन्हा परत दुकानात आलो. माझा मोबाईल ताब्यात घेतला. संबंधित ज्येष्ठ व्यक्तीने माझ्याशी मग कित्येक वेळ अनौपचारिक गप्पा मारल्या.त्यात अजून वैचारिक खोली अन् त्याद्वारे मंथन झाले.


विश्वास असे मूल्य आहे जे एकदा गेले की, पुन्हा कधीच परत येत नाही. सेम टू सेम माणसं अन् विश्वास खूपच कमी प्रमाणात बघायला मिळतात.


वंदे मातरम् 


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: २९ जून २०२४, शनिवार.

सोमवार, १० जून, २०२४

रयतेचा स्वातंत्र्यदिन - शिवराज्याभिषेक दिन


रयतेचा स्वातंत्र्यदिन - शिवराज्याभिषेक दिन







 I







चिंतन ©️

रयतेचा स्वातंत्र्यदिन - शिवराज्याभिषेक दिन

==================================

वैयक्तीक अथवा सामूहिक मानवी मन स्वतंत्र असणं हे त्या त्या मानवी मनाच्या अवतीभोवती असणाऱ्या मानवी स्वातंत्र्याच्या सामाजिक वातावरणावर अवलंबून असते. जर वैयक्तिक अथवा सामूहिक मानवी मनाला कुणीतरी शारीरिक , भावनिक किंवा मानसिकरीत्या बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तर तिथली मानवी मने एकतर पारतंत्र्यात जातात किंवा मनाने खचून जातात. प्राचीन भारताच्या कालखंडात जर बघितले तर महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या रूपाने राजकीय स्थैर्य अन्  त्या पाठोपाठ राज्य निर्माण करणाऱ्या अन् तिथल्या खचलेल्या समाजमनाचे नेतृत्व म्हणून त्या नेतृत्वाचा उदय होतो. चंद्रगुप्त मौर्य आपल्या नेतृत्वगुणांनी मोठे मौर्य साम्राज्य निर्माण करतो. 

इतिहास हे त्या त्या कालखंडाचे अपत्य असते. इतिहास असे अपत्य आहे जे की, त्या त्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करत असते. प्रत्येक कालखंडाचा इतिहास मग त्यातली व्यक्तिमत्वे देखील आलीत ती सर्व कर्माने एकसारखीच असतील असे नसते. प्रत्येकाचे कार्य , कार्य करण्याची पद्धती कालपरत्वे बदलत जाते. एकमात्र नक्की त्या त्या कालखंडाला पोषक असणाऱ्या सामाजिक परिस्थितीनुसार राज्यकर्ते अन् त्यांनी निर्माण केलेल्या राजव्यवस्था निर्माण होत गेल्या अन् त्यातून समाजमनाला आपलंसं वाटणारे नेतृत्व त्या त्या कालखंडात उदयाला येत गेले. हा इतिहास आहे , हेच वर्तमान आहे अन् हेच भविष्य देखील असेल यात तिळमात्र शंका नाही. याला कोणताही कालखंड अपवाद नाही. फरक फक्त इतकाच की, त्या त्या कालखंडातील सामाजिक परिस्थिती नुसार त्या त्या कालखंडातील समाजमनाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते निर्माण होतात हा इतिहास ,हेच वर्तमान आहे अन् हेच भविष्य देखील आहे.

मध्ययुगीन भारताच्या कालखंडात जर डोकावून बघितले तर माझ्या मते आपल्या भारतवर्षात दोन असे महान राज्यकर्ते झाले ज्यांना सर्व सामान्य , तळागाळातील समाजमनाने अगदी हृदयातून स्वीकारले अन् साथ दिली. त्यांना अशा समाजमनाने अगदी हृदयातून स्विकरणायचे कारण होते त्या महान राज्यकर्त्यांचे आपल्या रयतेशी , त्यातल्या त्यात सर्व सामान्य रयतेशी असलेलं अत्यंत प्रेमळ प्रामाणिक नाते होय. त्याच सर्व सामान्य लोकांनी या दोन्ही राष्ट्र पुरुषांवर जीवापाड प्रेम केले अन् कृतीतून साथ देखील दिली.  मध्ययुगीन भारताच्या कालखंडातील ते दोन महान राज्यकर्ते होते महाराणा प्रतापसिंह महाराज अन् छत्रपती शिवाजी महाराज..! 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन केले. येथे ' रयत ' हा फक्त तीन अक्षरी  शब्द नसून त्यामागे खूप मोठा सामाजिक अर्थ अभिप्रेत आहे. तत्कालीन काळात  आपलं स्वार्थी हित जोपासणारे, गोर गरिबांवर अत्याचार , अन्याय करणारे या सर्वांना फाट्यावर मारून अगदी तळागाळातील सर्व सामान्य लोकांना सोबत घेऊन आपलंसं करून राजसत्ता स्थापित कुणी केली  असेल तर ती सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी..! त्यामुळं ' रयत ' हा फक्त तीन अक्षरी शब्द नसून त्या मागे छत्रपती शिव प्रभूंनी निर्माण केलेली अन् स्थापित केलेली संस्कृती आहे. अशी संस्कृती जिथं आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास हाय प्रोफाईल लोकांपेक्षा समर्पण वृत्ती अन् जाणीव असणाऱ्या सर्व माणसाला केंद्र बिंदू मानून ' रयतेचे राज्य ' प्रारंभ झाले. आणि याचे सर्वोतोपरी श्रेय जाते त्या महान व्यक्तिमत्त्वाला ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराज या पवित्र नामोल्लेखाने पुजतो.

मानवी आयुष्याला सर्वात प्रिय काय असेल तर तर स्वातंत्र्य असते. समस्त जणांच्या मनात स्वातंत्र्याची चेतना प्रज्वलित करण्यात ज्या पवित्र अन् श्रद्धेय मनाने आपल्या कृतीतून सिद्ध केले ते सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज होते. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेला जो स्वातंत्र्याचा आशावाद दाखवला होता तो त्यांनी रयतेचे राज्य स्थापित करून पूर्णत्वास नेला. तो मंगलमय पवित्र दिवस होता ६ जून १६७४. याच दिवशी गोर गरीब, वंचित, दीन दुबळ्या , सर्व सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक किल्ले रायगड येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला होता. ही घटना तिथून पुढच्या समस्त भारतीय समाजमनावर दीर्घकालीन परिणाम करणारी ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपन्न झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा तिथून पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत गेला. शून्यातून , स्वकर्तृत्वाने, श्रद्धा अन् जाणीव असणाऱ्या लोकांना सोबत घेऊन अंधारलेल्या मार्गातून पुढे जाऊन रयतेचे राज्य निर्माण केल्या जाऊ शकते याची प्रचिती आली. शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा त्या समस्त सर्व सामान्य लोकांचा होता, ज्यांना असे जाणवले होते की,कुणीतरी आपला माणूस राजसत्तेत सिंहासनावर आरूढ झाला आहे याची प्रचिती आली होती. सर्व सामान्य लोकांची हीच प्रेरणा आपल्या भारतात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी निमित्त ठरली. प्राचीन भारताच्या कालखंडात महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या रूपाने लोकशाहीची पाळेमुळे रोवण्यासाठी जो प्रारंभ झाला होता, त्याचा वेलू गगनावरी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने उंचच उंच गेला. शिवराज्याभिषेक सोहळा रयतेतील शेवटच्या मानवी घटकाला सुखावून गेला होता. ज्यावेळी एखाद्या राज्यकर्त्यांची एखादी कृती रयतेतील शेवटच्या मानवी घटकाला सुखावून जाते तेंव्हा तिथं खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य स्थापन झाल्याचा सामाजिक अर्थ वास्तवात उतरत असतो. हे भाग्य छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वकर्तृत्वाने, कर्म अन् धर्माने प्राप्त केले होते. त्यामुळं समस्त लोकांच्या हृदयात शिवराज्याभिषेक सोहळा ही घटना स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारी क्रांतिकारी घटना होती.

दिनांक ६ जून २०२४ , गुरुवार रोजी सकाळी छत्रपती शिवरायांचे मूळ गाव तीर्थक्षेत्र वेरूळ येथील स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले गढी परिसर - जि. छत्रपती संभाजीनगर येथे अतिशय नेत्रदीपक ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मी अन् माझी धर्मपत्नी पहाटेच तीर्थक्षेत्र वेरूळ येथे उपस्थित झालो होतो. आमचं नशीब, या पुण्यवान अन् अभिमानास्पद प्रसंगात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. माझा जिवलग मित्र, जाणीव असणारे व्यक्तिमत्त्व तथा गुरू बंधू मनोहर गावडे ( जि.प. शिक्षक ) तसेच राजेंद्र भाऊ पवार आणि त्यांचे इतर सर्व  सहकारी यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अभिषेक सोहळ्याचे खूपच छान नेत्रदीपक नियोजन केले होते. पहाटेच संपूर्ण परिसराला फुलांनी, आसन व्यवस्था इत्यादी आकर्षक पद्धतीने सजवले होते. १२५ जोडप्यांच्या शुभहस्ते , प्रत्येक जोडप्याच्या समोर असलेल्या शिवप्रभूंच्या मूर्तीवर वेद शास्त्र संपन्न ब्रम्हवृंदाच्या मुखातून निघणाऱ्या पवित्र मंत्रांच्या उच्चारात पूजन सोहळा श्रध्देने संपन्न झाला. सदरील कार्यक्रमाचे अतिशय नियोजपूर्वक आयोजन करण्यात आले होते. कुठेही नियोजन चुकणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. शिव प्रभूंचा पूजन सोहळा श्रध्देने संपन्न झाल्यानंतर जे पती पत्नी पूजन सोहळ्याला बसले होते त्यांना , त्यांनी अभिषेक करून पूजन केलेली छत्रपती शिवरायांची मूर्ती आयोजकांकडून श्रद्धापूर्वक सप्रेम भेट दिली.  एक श्रद्धेय अन् उत्कृष्ट नियोजन अन् आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे हृदयातून मनःपूर्वक कौतुक..!

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून जगण्याला प्रेरणा देणारा मूलमंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज या नावावर कित्येकांना प्रेरणा मिळाली.कित्येक पिढ्या जगल्या जिवंत राहिल्या आहेत अन् राहणार आहेत. प्रत्येकाचे  जगणं भिन्न भिन्न होते, आहे अन् राहील इतकेच..!

लेखाच्या शेवटी डॉ. सदाशिवराव शिवदे लिखित असलेल्या काव्यातील काही ओळी व्यक्त करून सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवरायांना विनम्र वंदन करून थांबतो.( काव्य ओळी स्रोत -  यू ट्यूब )

शककर्त्यांचा मेरुमनी तू , राजश्रींचा राजा 
युगंधराचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा 

महान मंदिर महाराष्ट्राचे , सुफलीत संचित संह्याद्रीचे
संजीवन हो जनामनांचे रयतेच्या रे तारणहारा , पावित्र्याच्या तेजा 
युगंधराचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा  || १ ||

छत्रपती शिवाजी महाराज की जय..!
हर हर महादेव 
वंदे मातरम्

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

लेखन दिनांक - १० जून २०२४, सोमवार.


शनिवार, १ जून, २०२४

hi , पापा


 


चिंतन ©️


' hi , पापा '


================================


खूप दिवसांनी अतिशय भावप्रधान असलेला '.मूळचा दक्षिण भारतीय चित्रपट '   हाय पापा ' हा चित्रपट बघितला.


आता पर्यंत बहुतांशी चित्रपटात अपत्यांच्या आयुष्यात असलेले आईचे गोडवे गायले गेलेले बघितले , मात्र माझ्या पाहण्यात पहिल्यांदा ' हाय पापा ' या चित्रपटात एका बापाची आपल्या चिमुकल्या लेकी विषयी अतिशय सुंदर भावप्रधान कथा बघण्यात आली. आपलं करियर अन् त्याच्या महत्वकांक्षेपोटी एका तरुण आईने चिमुकलीचा केलेला त्याग, लग्न झालेल्या मुलीच्या आईने आपल्या लेकीच्या वैवाहिक आयुष्यात खूप खोलवर डोकावल्यावर , हस्तक्षेप केल्यावर मुलीच्या संसाराची कशी धूळधाण होते त्याचं संयत पद्धतीने छान सादरीकरण करण्यात आले आहे. बऱ्याचदा विवाहित मुलींच्या वैवाहिक आयुष्यात तिचीच आई खल प्रवृत्तीचे काम करत असते. त्याचा परिपाक असा होतो की, नैतिक दबावामुळे किंवा कुसंगतीने मुलगी ऐकत जाते अन् स्वतः चे सुखी  वैवाहिक आयुष्य दुःखी करून बसते. उपवर असणाऱ्या मुलीच्या आई वडिलांचे उडणारे खटके त्यातून उपवर मुलीच्या वडिलांची अन् मुलीची होणारी घुसमट , वडील अन् मुलगी असणाऱ्या व्यक्तिरेखेने छान सादर केली आहे. समाजात एक स्री म्हणून विवाहित मुलीच्या आईला सामाजिक सहानुभूती मिळते.मात्र बऱ्याचदा याचं मुलीच्या आई आपल्या स्वभावानं आपल्या लेकीच्या वैवाहिक जीवनात दुःख निर्माण करू लागतात. ही एक काळीकुट्ट सामाजिक बाजू हाय पापा या चित्रपटात संयत पद्धतीने सादर केलेली आहे. 


एक पुरुष आपलं वैवाहिक आयुष्यातील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी किती संयमी वागतो , एका चिमुकल्या लेकीला जेंव्हा समजते की, आपल्या जन्मदात्या आईने आपला  त्याग केला यावेळी त्या चिमुकल्या लेकीने आपल्या बापाच्या गळ्यात पडून हाय मोकलून रडणं हे असे कित्येक प्रसंग माणसांच्या नात्यातील विविध रंग प्रदर्शित करतो. एक सासरा आपल्या नातीसाठी अन् जवयासाठी त्यांना भावनिक आधार देण्यासाठी पत्नी ऐवजी जावई बापू सोबत राहणे पसंद करतो हे बघून पुरुषाच्या भावनिक नात्याचा एक भावनिक पदर बघून मन भरून येते.


अभिनय, अतिशय संयत पटकथा आणि सर्वात उजवी बाजू म्हणजे समर्पक बॅक ग्राउंड संगीत खूपच छान सादर केल्या गेले आहे. चित्रपटाचे बॅक ग्राउंड संगीत ऐकूण बऱ्याचदा गहिवरून येते. सुंदर लोकेशन, हळुवार गाणी यामुळं हाय पापा हा चित्रपट हृदयात घर करतो. जयराम अन् मृणाल ठाकूर अन् त्यांची चिमुकली कन्या  यांनी आपल्यातील भाव भावनांचा गहिवर या चित्रपटात पुरेपूर ओतला आहे.विशेषत तरुण पतीच्या भूमिकेत जयराम यांनी कित्येक भावनिक प्रसंगांना आपल्या अभिनयाने खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे.त्यांना तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे ती त्यांच्या चिमुकल्या लेकीच्या निरागस अभिनयाने..!


चित्रपट खूप संथ गतीने पुढे जातो.त्यामुळं उतावीळ प्रेक्षकांना अन् ढिश्युम ढिश्युमची आवड असणाऱ्यांना ' हाय पापा ' हा चित्रपट बहुदा आवडणार नाही.


ता.क. - दक्षिण भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्व कलावंत बॉलिवूडला प्रत्येक क्षेत्रात फाट्यावर मारतात.

ग्रेट आहेत.


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १/६/२०२४, शनिवार.

शनिवार, २० एप्रिल, २०२४

हौशी मोबाईल रुग्ण

 


मला प्रवासात भेटलेले माणसं


हौशी  मोबाईल रुग्ण


==================================


आज दिनांक २०/४/२०२४ शनिवार रोजी  संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद कॉलेज समोरील शनी मंदिरात मी अन् माझी पत्नी दर्शनाला गेलो होतो. दर्शन आटोपले अन्  सोसाट्याचा वारा अन् विजांचा गडगडाटासह पाऊस सुरू झाला. आम्ही कित्येक भाविक मंदिरातच अडकलो.


साधारणतः रात्री ७:४५ आसपास पाऊस उघडला. आम्ही मंदिरातून घराकडे निघण्याचे ठरवले. आमच्या जवळचा  मोबाईल डाटा बंद करून मोबाईल एका cary बॅग मध्ये ठेवून खिशात ठेवला अन् आम्ही घराकडे निघालो. सर्वत्र लाईट गेलेली होती. आम्ही महावीर चौक ( बाबा पेट्रोल पंप ) येथे आलो अन् पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला.त्यामुळं आम्ही तिथं पुलाच्या खाली थांबलो. आमच्या सोबत कित्येकजण तिथं थांबलेले होते. ट्रॅफिक जाम झाली होती.रस्त्यावरील लाईट बंद होती.सिटी पोलीस मामा हातवारे करून वाहनांना मार्ग दाखवत होते. इतक्यात एका दुचाकीवर एक जोडपे आमच्या बाजूला येऊन थांबले. त्या दुचाकीवर मागे बसलेली  ती स्री गाडीवरून खाली काही उतरली नाही.तिच्या पुढे बसलेला पुरुष अन् पाठीमागे बसलेली ती स्री ओलाचिंब झालेले  होते. त्याही अवस्थेत त्या स्रीने तिच्या पर्स मधून मोबाईल काढला अन् त्यावर काहीतरी हाताळू लागली.  दुचाकीवर तिच्या पुढे अवघडलेल्या अवस्थेत बसलेल्या पुरुषाला त्या महिलेच्या हालचालीमुळे उभ्या असलेल्या दुचाकीचा बॅलन्स सांभाळणे कठीण होत होते.मी माझ्या पत्नीला म्हणालो...

" बघ, किती हौशी आहे. पुढे बसलेला पठ्ठ्या ओलाचिंब झालेला आहे. ट्रॅफिक जाम आहे.अंधार आहे.पाऊस सुरू आहे.अन् ही माया एवढ्या परिस्थितीत मोबाईलवर काहीतरी पाहण्याची हौस भागवून घेत आहे..!"


कमी प्रमाणत.रिमझिम पाऊस सुरूच होता. आम्ही थोडेफार ओलेचिंब झालेलो होतोच. असेही ओले झालेलो आहोतच म्हणून घराकडे निघण्याचा निर्णय घेतला. बाबा पेट्रोल पंप चौकात जास्त वेळ न थांबता घराकडे निघालो.आम्ही नगर नाक्याच्या पुढे निघालो. पाऊस सुरूच होता.रस्त्यावरील लाईट बंद होते. अंधार होता. इतक्याच आमच्या पुढे एक दुचाकीस्वार नजरेस पडला. तो पठ्ठ्या ओल्याचिंब अवस्थेत दुचाकी चालवत होता.दुचाकी चालवत असताना तो  पठ्ठ्या  एका हातात किराणा दुकानात मिळते त्या पारदर्शक cary बॅगमध्ये मोबाईल ठेवून त्या मोबाईल वर डाव्या हाताने काहीतरी हाताळत होता.  वरून रिमझिम पाऊस सुरू होता.रस्त्यावरील लाईट बंद होते. मोबाईल बघण्याची हौस तो पठ्ठ्या भागवूनच घेत होता. मी ते दृश्य माझ्या पत्नीला दाखवले.

" बघ, किती हौशी आहे हा पठ्ठ्या. रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र हौस पूर्ण करण्यासाठी याने मोबाईल भिजू नये म्हणून वरतून cary बॅग लावली अन् मोबाईल पाहण्याची हौस पूर्णच करू राहिला. याच्या हौसेला सलाम..!"


अखेर आम्ही त्याला क्रॉस करून पुढे निघून घरी पोहोचलो. आपण निवांत किंवा योग्य अवस्थेत  असलो की, मोबाईल हाताळणे योग्य .मात्र आज जे दोघेजण दिसले त्यांची अवस्था अन् त्या अवस्थेत त्यांनी हाताळलेले मोबाईल त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना संकटात ढकलत असतात.


काय म्हणावं याला..?

मोबाईल हौशी रुग्ण की, अजून काही..?


वंदे मातरम् 


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -२०/४/२०२४, शनिवार.

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

समाजसेवकांचे पितामह - महर्षि धोंडो केशव कर्वे


 


चिंतन ©️


समाजसेवकांचे पितामह - महर्षि धोंडो केशव कर्वे


=====================================


माझ्या मते, आपल्या संपूर्ण भारतात, सर्व समाजसेवकांमध्ये सर्वात दीर्घ आयुष्य लाभलेले एकमेव वंदनीय व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे होय.


थोडक्यात सर्व समाजसेवकांचे पितामह म्हंटले तर वावगे ठरणार नाही.असे दीर्घकाळ समाजसेवेचे व्रत घेतलेले वंदनीय व्यक्तिमत्व संपूर्ण विश्वात देखील महर्षी धोंडो केशव यांच्या व्यतिरिक्त इतर कुणी नसेल याची खात्री वाटते.


उंबरठा हा मराठी चित्रपट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याला एक प्रकारे विनम्र अभिवादनच होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तहहयात विधवा , परितक्त्या इत्यादी वंचित महिलांच्या सामाजिक तथा शैक्षणिक विकासासाठी कार्य केले होते.


उंबरठा चित्रपटात विधवा, परितक्त्या इत्यादी वंचित महिलांच्या अनेक प्रश्नांवर उहापोह करण्यात आला होता.स्व.स्मिता पाटील यांनी उंबरठा चित्रपटात खूप छान भूमिका केली आहे. विधवा ,परीतक्त्या इत्यादी वंचित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सुलभा ( स्मिता पाटील ) तिच्या परीने प्रयत्न करते. परखड लेखक विजय तेंडुलकर सर यांनी खूप उत्कृष्ट प्रकारे उंबरठा चित्रपटाची पटकथा कथा लिहिली आहे.ग्रेट मराठी चित्रपट दिग्दर्शक आदरणीय जब्बार पटेल सरांनी उंबरठा चित्रपटाचे उत्कृष्ट दिग्दर्शन केलेले आहे. विजय तेंडुलकर सर हे साहित्य क्षेत्रातील किती मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्त्व होते हे उंबरठा चित्रपट बघताना प्रत्येक क्षणी जाणवते. अतिशय उत्तम कथा- पटकथा अन् त्याला आकार दिला तो जब्बार पटेल सर सारख्या सर्वोत्तम दिग्दर्शकाने. उंबरठा चित्रपट बघताना  महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे थोर सामाजिक कार्य वेळोवेळी जाणवते. मी माध्यमिक वयोगटात असताना पालखेड येथे स्व.तीर्थस्वरूप दौलत काका कुमावत यांच्या घरी VCR व्हिडिओ वर उंबरठा चित्रपट बघितला होता.तेंव्हा उंबरठा चित्रपटातील विषय अन् त्याचं गांभीर्य समजले नव्हते. मात्र जेंव्हा समज आली तेंव्हा उंबरठा चित्रपट बघितला अन् क्षणोक्षणी जाणवले की, वंदनीय महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कार्य त्याकाळी किती जोखमीचे , धाडसाचे होते. उंबरठा चित्रपट माझ्या मते वंदनीय महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सामाजिक कार्याला वाहिलेली सर्वोत्तम कलाकृती आहे. 


महर्षी धोंडो कर्वे यांनी आपलं दीर्घ आयुष्य अविरतपणे सामाजिक कार्य विशेषतः महिलांचा सामाजिक उद्धार करण्यासाठी करण्यासाठी वेचलं. त्यात प्रामुख्याने विधवा विवाह प्रतिबंध मंडळ, अनाथ बालिका आश्रम, महिला विद्यालय, ग्रामीण शिक्षणासाठी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, जातीभेद ,अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी समता संघाची स्थापना इत्यादी संस्थेच्या मार्फत महान सामाजिक कार्य महर्षी धोंडो कर्वे यांनी केले.


समाज जेंव्हा पुरोगामी अन् त्यांचे पुरोगामित्व यांच्या चर्चा करतो, तेंव्हा वंदनीय महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नावाला आजही बहुतांशी वेळा का टाळत असतो..? पुरोगामी व्यक्तिमत्त्व म्हंटले की, काही विशिष्टच वंदनीय नावे काहींच्या मुखी असतात. अशी विशिष्ट वंदनीय नावे अशांच्या मुखी असायला काहीच हरकत नाही, ते सर्वजण वंदनीय आहेतच. मात्र स्वातंत्र्यपूर्व अन् स्वातंत्र्योत्तर काळात अनाथ, विधवा , परित्यक्ता महिलांसाठी अतिशय नाजूक सामाजिक विषय अन् त्या अंतर्गत सामाजिक कार्य ज्या थोर व्यक्तीने केले. आपलं अख्खं दीर्घ आयुष्य स्वातंत्र्यपूर्व काळात अन् स्वातंत्र्योत्तर काळात त्याच सामाजिक कार्यासाठी वेचलं त्यांच्या नावाचा आजचे तथाकथित पुरोगामी सहसा उच्चारताना आढळून येत नाही. 

हा सुध्दा जातीयवाद किंवा भेदभाव आहे का..?

असा वैयक्तिक प्रश्न मला पडतो.


असो, आज थोर समाजसेवक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती आहे. त्यांच्या अतुलनीय समाज कार्याला जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!🙏

( जन्मदिनांक - १८/४/१८५८ अन् मृत्यू दिनांक - ९/११/१९६२ )


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक - १८/४/२०२२, सोमवार

शनिवार, ३० मार्च, २०२४

एका मंदिराला बघून जाणवलं..!


 










चिंतन ©️

एका मंदिराला बघून जाणवलं..!

==================================

देवयानी, ययाति अन् शर्मिष्ठा यांची प्रेमकथा अजरामर आहे. याच त्रिकोणी प्रेमकथेला चौथा कोन देखील आहे, त्याचं नाव आहे कच..!

थोर लेखक वि. स. खांडेकर यांनी ही अजरामर प्रेमकथा आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ' ययाति ' द्वारे वाचकांच्या समोर अप्रतिम शब्द सामर्थ्याने प्रस्तुत केलेली आहे. त्याचं प्रेमकथेतील देवयानी, ययाति अन् शर्मिष्ठा यांच्यातील नात्याविषयी बऱ्याचदा बोलले जाते, मात्र तितकसं कच विषयी कुणी व्यक्त होत नाही. वि. स. खांडेकरांनी ययाति मध्ये कच विषयी  लिहिलं आहे.

याच चौकोनी प्रेमकथेत दैत्य गुरू शुक्राचार्य यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरते. दैत्य गुरू शुक्राचार्य यांचं विश्वातील बहुदा एकमेव असलेलं एक मंदिर कोपरगाव , जिल्हा - अहिल्यादेवीनगर ( अहमदनगर ) येथे आहे. सदरील मंदिर कोपरगाव ते शिर्डी रस्त्याच्या डाव्या बाजूला काहीसे आत मध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर कोपरगाव बेट येथे आहे. तेथे दैत्य गुरू शुक्राचार्य यांचं मंदिर आहे. मी बऱ्याचदा त्या ठिकाणी भेट दिली आहे. अर्थात त्याला निमित्त ठरले थोर लेखक वि. स. खांडेकरांनी ययाति मध्ये व्यक्त केलेली कथा..!

काळासोबत व काळाच्याही पुढे जाऊन मानवी वर्तनांचे अचूक वेध घेणारी दूरदृष्टी वि.स. खांडेकर या थोर लेखकास निसर्ग विधात्याने निसर्गदत्त दिली होती. वि. स. खांडेकरांचे लेखन म्हणजे मानवी मनाचे अचूक शब्दबध्द रेखाटलेले शब्दरूपी चित्र..! खांडेकरांचे साहित्य वाचतांना ती भाषाशैली पटकन वाचल्यावर कधीच अर्थबोधीत होत नाही. तर त्यांचे साहित्य वाचन करतांना हवी असते एकाग्रता व एकांतपणा..!  माझ्या मते ययाति हे साहित्य,  साहित्य विश्वातील अथांग महासागरच आहे. असा महासागर ज्यात प्रेम, वासना, शौर्य, सौंदर्य, अहंकार, करूणा, इ. मानवीय भावभावनांचे रस ओथंबून ओतलेय त्यात..! ययाति मधील प्रत्येक शब्द खूप विचारपूर्वक वाचल्यावर कळते काय अफाट सिध्दहस्त दैवी देणगीचा  किमयागार होता हा माणूस...! काळाच्या पूढे जाऊन भूतकाळातील पौराणिक पात्रांना आजच्या वर्तमानात शोधणारा महान लेखक ययाति मधून आपल्याला भेटतो.

शर्मिष्ठा,देवयानी, ययाति , कच अन् दैत्य गुरू शुक्राचार्य यांना आपल्या सहज सुंदर लेखणीच्या माध्यमातून समस्त रसिकांच्या हृदयात उतरवणारे खांडेकर..! काम, वासना अन् प्रेम यातील नाजुकशी किनार आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केली ती ययाति द्वारे..! ययाति हे जरी पुरातन पात्र असेल,मात्र तोच ययाति कित्येक कालखंडापासून समस्त मानवजातीचे प्रतिनिधित्व करत आलेला आहे अन् करत राहणार आहे.

ययाति ने मानवाच्या कोणत्या मानवी वर्तनाचे प्रतिनिधित्व केले...?
तर माझ्या मते....
ययाति हा प्रत्येक मानवातील वासनेचे प्रतिनिधित्व करणारा पुरुष..!
ययाति हा प्रत्येक मानवातील शौर्याचे प्रतिनिधित्व करणारा पुरुष..!
ययाति हा प्रत्येक मानवातील रसिकतेचे प्रतिनिधित्व करणारा  पुरुष..!
ययाति हा प्रत्येक मानवातील, स्री जाती विषयी आसक्ती बाळगणारा  पुरुष..!
सौंदर्यावर भाळून त्यात उध्वस्त होऊ पाहणाऱ्या प्रत्येक माणसाचे प्रतिनिधित्व देखील याच ययाति ने निभावले...!

मराठी भाषेला, साहित्याला उंचीवर नेणारा प्रेमळ मनाचा अन् मानवी भावना आपल्या लेखणीतून व्यक्त करणारा थोर लेखक म्हणजेच वि.स. खांडेकर होय..! 🙏🏻

ययाति चे मुख्य लिखाण संपल्यावर त्यातील शेवटचे जे सारांश असलेले काही प्रकरणे वि. स.खांडेकर यांनी लिहिलेले आहेत ते फक्त आणि फक्त एक सिद्धहस्त लेखकच करू शकतो. मानवी भाव भावनांचे त्यात गहनातले गहन भाव त्यात व्यक्त केल्या गेले आहेत. विशेष म्हणजे स्री, वासना, पुरुष त्याचे होणारे अधःपतन इत्यादी अनेक विषयांना वि. स.खांडेकर यांनी ययाति मध्ये आपल्या लेखणीतून अधोरेखित केलेले आहे.

ता. क. दैत्य गुरू शुक्राचार्य मंदिरात मजकूर लिहिलेले काही फलक आहेत. त्यांचे फोटो सदरील लेखाच्या सोबत प्रदर्शित करत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या मजकूर असलेल्या फोटोंचे  करावे. म्हणजे सदरील स्थळाचे महत्त्व लक्षात येईल.

असो, शुभ दुपार मित्रांनो..! 🙏🏻

वंदे मातरम्

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - ३० मार्च २०२४, शनिवार.

रविवार, २४ मार्च, २०२४

" स्वातंत्र्यवीर सावरकर "


 


चिंतन ©️


" स्वातंत्र्यवीर सावरकर "


===================================


काल सह परिवार रणदीप हुड्डा अभिनित अन् दिग्दर्शित ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' हा हिंदी चित्रपट बघितला. चित्रपट बघताना अन् घरी आल्यावर कित्येक वेळा डोकं सुन्न झाले होते. भारतमातेच्या या सुपुत्राला ज्या अत्यंत त्रासदायक यातना सोसाव्या लागल्या, जो कौटुंबिक क्लेश सोसावा लागला, जो त्याग करावा लागला तो आता पर्यंत विविध पुस्तकांच्या माध्यमातून वाचण्यात आलेला होता, पण ते वाचण्यात आलेलं सर्वकाही चित्रपटाच्या माध्यमातून बघितलं अन् डोळ्याच्या कडा पाणावल्या अन् डोकं सुन्न झाले होते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नियती इतका कसा काय अन्याय करू शकते हा प्रश्न सतत मनात येत होता. एखाद्या पुस्तकातून एखाद्याच्या यातना, वेदना वाचण्यात येतात. मात्र त्याच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील यातना , वेदना ज्यावेळी एखाद्या दृक श्राव्य साधनाच्या माध्यमातून आपण याचि देही याचि डोळा बघतो तेंव्हा आपलं हृदय पिळून निघते. अभिनेता रणदीप हुड्डा हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील तात्याराव सावरकर यांची भूमिका अक्षरशः जगले आहेत. या अभिनेत्याने वंदनीय तात्याराव सावरकर यांच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे.


चित्रपटाच्या सुरुवाती पासून ते मध्यांतरापर्यंत चित्रपटाचा वेग काहीसा कमी आहे, मात्र मध्यांतरानंतर ज्यावेळी वंदनीय तात्याराव सावरकर सेल्युलर जेल मध्ये प्रवेशित होतात तेंव्हापासून चित्रपटाने जो काही वेग घेतला तो अगदी शेवट पर्यंत टिकवून ठेवला आहे. ज्यावेळी तात्याराव सावरकर अंदमान येथील सेल्युलर जेल मध्ये जातात, तिथून पुढे अभिनेता रणदीप हुड्डा यांनी असा काही अप्रतिम अभिनय केला आहे की, आपण साक्षात तात्याराव सावरकरांनाच बघत आहोत याची अनुभूती येते. क्लोज कॅमेरा वर्क अन् त्या अँगल मध्ये रणदीप हुड्डा यांनी प्रत्येक क्षणातील आपल्या चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम साकारले आहेत. विशेषतः जेल मधील इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर स्वाभिमानाने व्यक्त होणे , जेलरच्या विरुद्ध होणारी उद्विग्नता , अंधार कोठडीतील होणारी जीवाची तगमग इत्यादी अनेक प्रसंग आपल्याला चित्रपट बघताना खुर्चीवर खिळवून ठेवतात. बऱ्याच प्रसंगात मन अगदी गहिवरून येते. काही प्रसंग मनाला अत्यंत वेदना देऊन जातात. चित्रपट बघताना एक प्रेक्षक म्हणून आपली ही स्थिती होते, तर प्रत्यक्षात वंदनीय तात्याराव सावरकर यांची त्यावेळची परिस्थिती किती वेदनादायक असेल याची जाणीव होते. थोडक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील अभिनयाचे जे सर्वोच्च शिखर रणदीप हुड्डा यांनी आपल्या जिवंत अभिनयाने गाठलेले आहे ते सेल्युलर जेल मधील प्रत्येक क्षणातील अभिनयातून गाठलेले आहे. ज्यावेळी जेल मध्ये तात्याराव सावरकर यांना भेटायला त्यांच्या धर्मपत्नी येतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यावर चष्मा नसतो.नजर अंधुक झालेली असते. धूसर नजरेच्या माध्यमातून आपल्या पत्नीशी होणारी चर्चा दोघांच्या नात्यातील भावूक नात्याला उंचीवर घेऊन जाते. जेल मधील भेटीची वेळ संपल्यावर माई सावरकर निघतात अन् अगदी शेवटच्या क्षणी तात्याराव सावरकरांना चष्मा प्राप्त होतो. चष्मा लावल्यावर आपली धर्मपत्नी दिसणार मात्र तो पर्यंत माई सावरकर दरवाजाचा उंबरठा ओलांडून गेलेल्या असतात. आपल्या पत्नीला पाठमोरे बघून तात्याराव सावरकर यांच्या आयुष्यातील अपूर्णता रणदीप हुड्डा यांनी आपल्या अभिनयाने अप्रतिम व्यक्त केली आहे. या छोट्याश्या प्रसंगातून वंदनीय तात्याराव सावरकर यांच्या अख्ख्या आयुष्याची अपूर्णता रणदीप हुड्डा यांनी कळत नकळतपणे व्यक्त केली आहे. ग्रेट सॅल्युट..!


एखाद्या नाटकातील स्वगत आपण एक नाट्यरसिक म्हणून बऱ्याचदा बघत आलेलो आहोत.मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी तात्याराव सावरकर यांच्या भूमिकेच्या द्वारे हिंदू अन् हिंदुत्व याचे बौद्धिक विवेचन क्लोज कॅमेरा मध्ये जेल मध्ये असताना आपल्या चेहऱ्यावरील अभिनयाच्या द्वारे उत्तमरित्या सादर केले आहे.


ज्या अभिनेत्याने वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका या चित्रपटात निभावली आहे ती भूमिका देखील लक्षात राहण्याजोगी आहे. भारत पाकिस्तान फाळणी, दंगलीच्या वेळी होणारी उद्विग्नता, होणारी संवादफेक संबंधित अभिनेत्याने खूपच छान प्रकारे प्रस्तुत केली आहे.


महात्मा गांधी अन् तात्याराव सावरकर यांची रत्नागिरी येथे घरी जी भेट होते त्यावेळचा अतिशय संयत अभिनय रणदीप हुड्डा यांनी सादर केला आहे. त्या प्रसंगातील शाब्दिक करारीपणा अप्रतिम आहे. दोन्ही व्यक्तिमत्वांमधील शाब्दिक बौद्धिक द्वंद्व विचार करायला प्रवृत्त करते.


चित्रपटाच्या शेवटी जे पॉप रॅप पद्धतीने गाणं सुरू होते त्याची खरंच आवश्यकता होती का..? हा प्रश्न मला पडला. पॉप रॅप पद्धतीच्या गाण्याऐवजी हृदयाला भिडणारं , सुमधुर चालीतील गाणं असायला हवे होते असे माझे वैयक्तिक मत आहे. स्वतः वंदनीय तात्याराव सावरकर थोर साहित्यिक शब्दप्रभू होते. त्या अनुषंगाने अर्थपूर्ण गाणं चित्रपटाच्या शेवटी असायला हवे होते.


असो, रणदीप हुड्डा अभिनित अन् दिग्दर्शित ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' या चित्रपटाच्या माध्यमातून थोर साहित्यिक, समाजसेवक, जाज्वल्य विचारांचे महामेरू अशा भिन्न भिन्न भावनांना चित्रपटाच्या माध्यमातून वंदनीय तात्याराव सावरकर यांना बघितल्याचा अनुभव आला.


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४ मार्च २०२४, रविवार

रविवार, १७ मार्च, २०२४

देवभूमी भाग क्रमांक १३ ( अंतिम भाग)



 





मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️

(अंतिम भाग क्रमांक  १३ )

===================================

रामपूर येथून दिनांक २२ मे २०२३ रोजीच्या सकाळी ६:३० आमची बस निघाली होती. उंचच उंच पर्वतरांगा मधील रस्त्याच्या कडेला बस, जीप इत्यादी वाहनांची गर्दी होती. आमची बस काहीशी उंच घाटात गेल्यावर रामपूर , सोनप्रयाग, गौरी कुंड अन् बाबा केदारनाथ या सर्वांना अगदी हृदयातून त्रिवार वंदन केले.माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. आपण पुन्हा कधी बाबा केदारनाथला भेटायला येऊ का.. हा प्रश्न  मनात आला. तेही आज रोजी जे माझे संपूर्ण कुटुंब आहे त्या सर्वांच्या सोबत तेही पायी चालत जाऊन येणे पुन्हा कधी आयुष्यात होईल का.. हा भावूक प्रश्न मनात आला होता. काही प्रश्नांना उत्तरे माहीत नसतात. असे प्रश्न आयुष्यात फक्त उत्सुकता अन् आतुरता निर्माण करण्यासाठी असतात.  आता सोनप्रयाग दिसेनासे झाले होते. आता नजरेच्या टप्प्यात फक्त आणि फक्त उंचच उंच पर्वतरांगा दिसत होत्या. नजरेत मावणार नाहीत एवढ्या खोल खोल दऱ्या रस्त्याच्या कडेला दिसत होत्या. केदारनाथ येथे जाण्यासाठी हरिद्वार ते सोनप्रयाग दरम्यान बसने प्रवास केला होता. त्या प्रवासातील रस्त्यांपेक्षाही आताचा रामपूर ते बद्रीनाथकडे जाणारा रस्ता अतिशय भयंकर, उंचच उंच पर्वतरांगा मधून, दऱ्याखोऱ्यातून , नागमोडी वळणं घेत आमचा प्रवास सुरू होता. बसच्या खिडकीतून खाली दरीत डोकावून पाहिलं की, मृत्यू आपल्याला बोलावत आहे असेच भासत होते. इतक्या त्या दऱ्या अतिशय खोलवर भीतीदायक होत्या. रस्ताही काही ठिकाणी अरुंद, पर्वताच्या कपारीतून कोरून काढलेल्या मार्गाने आमचा प्रवास पुढे पुढे चालला होता. गौरी कुंड ते बाबा केदारनाथ अन् पुन्हा बाबा केदारनाथ ते गौरी कुंड तसेच सोनप्रयाग जीप स्टँड ते रामपूर असा पायी प्रवास अगोदरच झालेला होता,त्यामुळं पायातील वेदना होत होत्याच. त्यात आता बसमध्ये निव्वळ बसून राहिल्यामुळे पोटरी अन्  मांडीत शिथिलता येऊन वेदना अजून वाढल्या होत्या. दुपारी १ वाजता आमची बस ज्यांना जेवणं करायची आहेत त्यांच्यासाठी एका हॉटेलच्या परिसरात रस्त्याच्या कडेला थांबली होती. बसमधून उतरताना एक एक पाऊल वेदनेमुळे संपूर्ण पायाला हळूहळू पुढे नेत होते. दाक्षिणात्य पदार्थ असलेले काही खाद्य पदार्थ विकत घेऊन आमची जेवणं उरकली होती. आमची बस दुपारी १:३० वाजता, पुन्हा बद्रिनाथकडे निघाली होती.

मजल दर मजल करत अन् हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगातील अतिशय खडतर घाटातील नागमोडी वळणे घेत असलेला रस्ता पार करत आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी साधारणतः ६ वाजता बद्रीनाथ येथे पोहोचलो होतो. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. अतिशय कडाक्याची थंडी होती. पायात बूट होते, अंगात स्वेटर , डोक्यावर थंडीची टोपी होती तरी देखील संपूर्ण शरीर प्रचंड थंडीमुळे पार थिजून गेले होते. रात्री साधारणतः ९ वाजता बद्रीनाथ भगवंताचे मनोभावे दर्शन घेतले. एक एक पाऊल टाकताना पायात पोटरी अन् मांडीत येणारे गोळे प्रचंड वेदना देऊ लागले होते. यापूर्वी माझ्या आयुष्यात पायाच्या वेदना काय असतात याची प्रत्यक्ष जाणीव येऊन गेलेली आहे. मी माध्यमिक शाळेत असताना आम्ही काही बालमित्र पालखेड येथील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेवाच्या यात्रेच्या वेळी गावापासून दक्षिण दिशेला साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर गोदावरी आहे. आम्ही  गोदावरी नदीतून ऐन मध्यरात्री पवित्र जल घेऊन अख्खी रात्र ते पहाटेपर्यंत पळत तर कधी वेगाने पायी चालत पालखेड येथे येत असायचो. गावात आल्यावर  सकाळी महादेवाच्या मिरवणुकीत गोदावरी नदीतून आणलेले पवित्र जल श्रद्धेने नेऊन महादेवाच्या पिंडीवर श्रद्धेने अर्पण करत असायचो. त्यावेळी अनवाणी पायी जाणे-येणे झालेले होते. त्यावेळी पायाच्या होणाऱ्या प्रचंड वेदना काय असतात याचा अनुभव गाठीशी होता. मात्र तो प्रवासा सपाट मैदानी प्रदेशातील होता. त्यावेळी चढणीचा होणारा अनुभव नव्हता. आता वयाच्या अनुषंगाने अन् उंचच उंच पर्वतरांगा पायी प्रवास केल्यामुळे जाणवणारी वेदना प्रचंड वेदनादायी जाणू लागली होती. अतिशय उंचीचा तोही अतिशय खडतर रस्ता पार पाडल्यामुळे पायाच्या वेदना भयंकर होत होत्या. माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुलं मात्र अजूनही चालताना सहजपणे चालत होते. 

रात्री साधारणतः ९ वाजता बद्रीनाथ भगवंताचे दर्शन आटोपून आम्ही पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी निघालो होतो. सर्वांना भूक लागली होती. आम्ही एका हॉटेल मध्ये आलो होतो. मुलांनी त्यांच्यासाठी पोळी भाजीचे जेवणाचे ताट मागवले होते. मला फारशी भूक नव्हती. मॅगीच्या दोन प्लेट मी अन् माझ्या पत्नीसाठी मागवल्या. मी माझ्या आज पर्यतंच्या आयुष्यात पहिल्यांदा मॅगी नावाचा खाद्य पदार्थ नाईलाजाने खाऊ लागलो होतो.घरी शेवया कित्येकदा खाल्ल्या होत्या पण मॅगी नावाचा पदार्थ आयुष्यात पहिल्यांदाच खाऊ लागलो होतो. गरमागरम मॅगी खाल्ल्यामुळे थंडगार पडलेल्या घश्याला आराम पडला होता.आमची जेवणं उरकली होती. सोबत गरम पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या. मुक्कामाच्या ठिकाणी साधारणतः रात्रीच्या वेळी १० वाजता पोहोचलो होतो. उद्या पहाटे ४ वाजता सर्वांनी उठून आवरून सावरून हरिद्वारकडे मार्गस्थ व्हायचे आहे असे सर्वांना सांगितले.मुक्कामाच्या बाजूलाच अलकनंदा नदीच्या वेगवान पाण्याचा आवाज कानी पडत होता.अतिशय थंडगार वातावरणात अन् विष्णू भगवंताच्या सानिध्यात आम्ही सर्वजण पटकन झोपी गेलो.

दिनांक २३ मे २०२३ रोजीची  पहाट झाली होती.ठरल्याप्रमाणे सर्वजण पहाटे ४ वाजता उठून आवरून सावरून मुक्कामाच्या ठिकाणाहून पहाटे ५:३० वाजता  बद्रीनाथ येथील पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या बस स्टँडकडे मार्गस्थ झालो. पायाच्या वेदना आता ओळखीच्या झाल्या सारख्या वाटू लागल्या होत्या.पुढे पडणारे प्रत्येक पाऊल आपल्या सोबत वेदनेला सोबतच घेऊन पडू लागले होते. परिसर अन् परिस्थितीमुळे होणारी शारीरिक अन् मानसिक वेदना आपली सखी, मैत्रीण होऊन जाते असे मी माझ्या मनाला ,  माझ्या पत्नीला व दोन्ही मुलांना सांगितले. वेदना रुपी मैत्रिणीला आपल्याला सोबत ठेवावेच लागणार होते, त्याचं कारण वेदना रुपी असलेली मैत्रीण ही या इथल्या परिसर अन् परिस्थितीमुळे आपल्या आयुष्यात आलेली होती. ज्यानं त्यानं आपापल्या वेदना रुपी मैत्रिणीला स्वीकार करून स्वतः ला तिच्या सहवासाला सहन करायचं असा वास्तववादी विचार स्वीकारून आम्ही चालू लागलो होतो. आम्ही सकाळी ६ वाजता बद्रीनाथ येथील बस स्टँड जवळ पोहोचलो होतो. तिथं चौकशी केली असता समजले की, बस उपलब्ध नव्हती, त्यामुळं आम्ही खाजगी जीप मध्ये बसून हरिद्वारच्या दिशेनं सकाळी ७ वाजता मार्गस्थ झालो. तो खाजगी जीपवाला पण पटकन निघायला तयार होईना. अखेर खूप गयावया करून, विनंती करून तो जीपवाला हरिद्वारकडे निघण्यास तयार झाला होता. बद्रीनाथ ते हरिद्वार हा प्रवास साधारणतः तेरा ते ते पंधरा तासांचा असणार होता.

काल दिनांक २२ मे २०२३ रोजीचा संपूर्ण दिवसभर बसमध्ये बसून बसून अन् आज दिनांक २३ मे २०२३ रोजी पुन्हा जीप मध्ये दिवसभर बसून बसून शरीर अजून ठणकायला लागणार होते याचा खात्रीशीर अंदाज आला होता. आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला होता. ज्या मार्गावर मृत्यू आपल्याला खुणावत आहे अशा भासणाऱ्या अतिशय खोल खोल दऱ्याखोऱ्या ,उंचच उंच पर्वतरांगा दिसत होत्या. शरीर थकले होते ,पण मन अजूनही टवटवीत होते. ते सतत रस्त्याच्या कडेला असलेल्या निसर्गरम्य परिसरात आपल्या डोळ्यांना भिरभिर फिरवून त्या विधात्याच्या अस्तित्वाला नजरेत सामावून घेत होते. दुपारच्या वेळी जेवणासाठी एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो. जेवणं आटोपल्यावर पुन्हा एकदा हरिद्वारकडे मार्गस्थ झालो. रात्री साधारणतः ९ वाजता हरिद्वार येथे आम्ही पोहोचलो. हरिद्वार येथे उतरल्या उतरल्या जोराच्या पावसाने आमचे स्वागत केले. हरिद्वार येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. रात्रीची जेवणं झाल्यावर अतिशय थकलेल्या शरीराला झोप आवश्यक वाटू लागली होती. आम्ही कुंभ नगरी हरिद्वार येथे आलो होतो. आपल्या कित्येक पूर्वजांनी आपापल्या सानिध्याने ज्या नगरीला पूनित केले होते त्या हरिद्वार नगरीत आम्ही पोहोचलो होतो. बाबा केदारनाथ अन्  बद्रिनाथ भगवान यांना श्रध्येने स्मरण करून बिछान्यावर पडल्यापडल्या आम्हाला पटकन झोप लागली.

दिनांक २४ मे २०२३ ची पहाट झाली होती. झोपेतून उठून सकाळची दिनचर्या आटोपली होती.मुलं थोडी उशिरा उठली होती. भागीरथी, अलकनंदा अन् मंदाकिनी या नद्यांच्या एकत्रित पवित्र जलाचा या भूमीवर जिथून सपाट मैदानी प्रदेशात प्रवेश होतो त्या हरिद्वार नगरीतील गंगेच्या परिसरात आम्ही आलो होतो. आम्ही हरी की पैडी येथे गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचलो होतो. दुपारी आई गंगेच्या पवित्र पाण्यात आम्ही सर्वांनी स्नान केले. काही आप्तस्वकीय अन् काही जिवलग स्नेही यांना श्रध्येने देण्यासाठी कॅन मध्ये पवित्र गंगाजल घेतले होते. परिसरातील देव देवतांचे दर्शन झाले होते. गंगेच्या त्याच परिसरात काही माणसं जुने नाणी, शिक्के विक्री करायला बसलेले होते. त्यांच्याकडून काही नाणी विकत घेतली. हरी की पैडी पासून पायी चालत चालत परिसर बघत बघत पुढे चालू लागलो होतो. रस्त्याच्या कडेला अतिशय मधुर कचोरी जिलेबी रबडीचे दुकान दिसले. आम्ही तिथं मस्तपैकी गोड गोड कचोरी  रबडी जिलेबी खाल्ली. त्या मिठाई दुकानाचे दुकानदार मालक वयस्कर होते.स्वभावाने खूपच तापड जाणवत होते. आम्ही दुपारी तीन वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. संध्याकाळी पुन्हा गंगेच्या किनाऱ्यावर जायचे होते.संध्याकाळी गंगेची आरती करीता उपस्थित राहायचे होते. दोन तास आराम केला होता. 

संध्याकाळी आम्ही गंगेच्या किनाऱ्यावर हरी की पैडी येथे गंगेच्या आरती करीता पोहोचलो होतो.हजारो भक्त आरती मध्ये सहभागी झाले होते. हिंदू संस्कृतीत निसर्ग पूजनाला अत्यंत महत्त्व आहे.नव्हे नव्हे निसर्ग पूजा हाच हिंदू धर्माचा आत्मा आहे. फार पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी  परंपरा सुरू केली ती आजही सुरू आहे अन् अनंत काळापर्यंत सुरूच राहील. निसर्गाचे अनंत उपकार समस्त मानवी आयुष्यावर आहेत याची जाणीव ठेवून आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांचे स्मरण अन् वेळोवेळी श्रद्धेने केलेले पूजन त्याचं द्योतक आहे. त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आई गंगेची , तिच्या पवित्र जलाची, त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आई गंगेची होणारी आरती..!  ज्या आई गंगेच्या किनाऱ्यावर मानवी संस्कृती अन् सभ्यता बहरली, याचं आई गंगेच्या किनाऱ्यावर आर्ष कालीन कालखंड, प्राचीन भारताचा दैदिप्यमान इतिहास कित्येक भारतीयांनी आपल्या शौर्याने अन् विद्वत्तेने समृध्द केला होता. आज त्याच निसर्गाच्या देणगीला , गंगेच्या पवित्र पाण्याला आम्ही हजारो भक्तांच्या उपस्थित श्रद्धेने पूजन करून वंदन करू लागलो होतो. हरिद्वार येथील आई गंगेची आरती याचि देही याचि डोळा आम्ही बघून कृतार्थ झालो होतो.

हरिद्वार येथे गल्ली बोळात हिंडताना अनेक मिठाईची दुकानं दिसली. तिथंली मिठाई,  मलईदार मसाला दूध, दुधाचे इतर मस्तपैकी पदार्थ अन् रबडी जिलेबी असे जिभेला पाझर फुटणारे पदार्थांची रेलचेल दिसली. सर्वांवर यथेच्छ ताव मारला होता.

काही वस्तूंची खरेदी केल्यावर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो होतो.बाबा केदारनाथ अन् बद्रिनाथ भगवान यांना स्मरण केले. त्या विधात्याने मानवी संस्कृतीला विकसित करण्यासाठी आई गंगेला या भूतलावर अवतीर्ण केले होते, त्या परिसरात आम्ही आमच्या आयुष्यातील काही भाग व्यतीत करत होतो. या विश्वाच्या स्थितीचा मालक बद्री विशाल अन् याच सृष्टीच्या अंताचा स्वामी बाबा केदारनाथ महादेव यांच्या भेटीमुळे आयुष्याचे अध्यात्मिक सार्थक झाल्याचा भाव हृदयात येत होता. या देवभूमीतील वास्तव्य असलेला आपला प्रवास संपवून  आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या प्रापंचिक आयुष्यात प्रवेश करून घेण्यासाठी निघण्याची वेळ आली होती. ज्याला त्याला त्या विधात्याने दिलेल्या भूमिका निभावण्यासाठी त्याच त्या दैनंदिन जीवनात प्रवेशित होण्याची वेळ आली होती. उत्पत्ती, स्थिती अन् लय म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना श्रद्धेने स्मरण करून आम्ही हरिद्वार येथील मुक्कामाच्या ठिकाणी पुण्य भूमीत निद्रेच्या स्वाधीन झालो होतो. उद्यापासून पुन्हा सुरू  होणारा परतीचा प्रवास अन् आयुष्य, आम्हा सर्वांच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वाट बघत होते.

बाबा केदारनाथ की जय..!
हर हर महादेव..!

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १७ मार्च  २०२४,  रविवार

[ देवभूमी या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखमालेतील  अंतिम भाग क्रमांक १३ वा समाप्त. ]