शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

दोन गोष्टी, दोन पितृतुल्य व्यक्तिमत्वांच्या..! "


 


आमचे गाव आमची माणसं ©️


" दोन गोष्टी, दोन पितृतुल्य व्यक्तिमत्वांच्या..! "


==================================


प्रसंग , साधारणतः नव्वदच्या दशकाच्या अखेरीस घडला होता. मी त्यावेळी पालखेड येथे वास्तव्य करत होतो. मी शिक्षक म्हणून सेवेत गावाच्या जवळील हडस पिंपळगाव, ता. वैजापूर येथे कार्यरत होतो. शाळेतून घरी आल्यावर माझा खूप जिवलग बालमित्र नितीन जैन याच्या कापड दुकानात निवांत जाऊन बसायचो.


तिथं आम्हा दोघा बालमित्रांचे कौटुंबिक स्नेही तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड देखील हमखास भेटायचे. तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड आम्हा दोघा मित्रांना नेहमी वडिलकीच्या दोन गोष्टी नेहमी समजावून सांगत असायचे.ही दोन्ही जेष्ठ व्यक्तिमत्वे आमच्या वडिलांच्या वयाची होती, पण नेहमी नितीन अन् माझ्याशी जिवलग मित्राच्या नात्याच्या सहवासात असायची.


असेच एकदा १ जानेवारी १९९७ रोजी सकाळी मी नित्य नियमाने ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन दररोजच्या नित्यक्रमानुसार नितीनच्या दुकानात काही वेळासाठी आलो होतो. तिथं तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड बसलेले होते. तिघांच्या मस्तपैकी गप्पा सुरू होत्या. नितीनच्या रेडिओ वर सुमधुर गाणी सुरू होती. त्या गाण्याकडे तिघांचेही लक्ष नव्हते. तिघेही गप्पांमध्ये पार रंगून गेले होते. मी तिथं गेल्या गेल्या नितीन जैन यास एक जानेवारी , नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.दुकानाच्या ओट्यावर तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड बसलेले होते. तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड यांना आम्ही काका अन् दादा या प्रेमळ संबोधनाने नेहमी उल्लेखित करायचो. नितीनला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नंतर मी काका अन् दादांना देखील त्यांचा हात माझ्या हातात घेऊन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या..! यावर ती दोघेही पितृतुल्य व्यक्तिमत्वे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागली. मी काही क्षण बुचकळ्यात पडलो.काय झालं तेही कळेना.अखेर तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड अखेर बोलते झाले.


त्यावेळी तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड मला म्हणाले होते - " अरे नंदू , आपून दररोज पहाटे झोपेतून उठतो, तिथून पुढचं आपलं दर्रोज नवीन वर्ष असतं..! अन् काय रे हे जाऊं दे, आपलं नवीन वर्ष तर गुढीपाडव्याला असतं ना..? हे काय काढलं अजुन..?"

मी अन् नितीन फक्त ऐकण्याच्या मनःस्थितीत होतो.नितीनने रेडिओचा आवाज खूप कमी केला होता. लगेच बाजूला बसलेले तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके उपाख्य काका मला म्हणाले ( ते मला नेहमी ' गुरुजी ' म्हणूनच उल्लेखित करायचे ) - " गुरुजी, आपल्या तळ्यापाळी जे घिसाड्याचे माणसं आलेली आहेत.त्यानला कशाचं नवीन वर्ष अन् कशाचं काय..! त्यांच्यासाठी समदी दिवसं सारखीच..!"

( आमच्या पालखेड गावाच्या दक्षिणेला जे मोकळे मैदान होते, त्या परिसराला निदान माझ्या पिढीपर्यंत तळ्यापाळी असं म्हणत असायचो. आता गावाचा फुगवटा झाला आहे त्यामुळं त्या परिसराला आता काय म्हणतात ते माहीत नाही.)


रंगनाथ पाटील काका अन् गिरजीनाथ दादांचे बोलणे ऐकून मी उभयतांना नवीन वर्षाच्या दिलेल्या शुभेच्छा जरा लाजल्या सारख्या झाल्या होत्या. आपण काहीतरी मीस करतोय याची भावना निर्माण झाली होती. पण मी स्वतः ला तथाकथित सुशिक्षित अन् आधुनिक काळातील समजत असल्यामुळे मला एक जानेवारी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे अप्रुप वाटत होते. तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड यांनी अर्थात मी प्रेमाने दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार माझ्या खांद्यावर हात टाकून प्रेमाने केला होता. यातच या जुन्या पिढीचे मोठेपण होते. स्वीकार केला पण दोन वडिलकीच्या गोष्टी देखील सांगून दिल्या..!


तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड या दोन्ही ज्येष्ठांच्या सहवासातील प्रत्येक क्षण मी माझा जिवलग बालमित्र नितीन जैन ( ह.मु. लासुर स्टेशन ) ,आम्हाला आयुष्यासाठी खूप काही देऊन गेला आहे. मी इ. स. १९८९ मध्ये चहा प्यायची बंद केली ती आजतागायत बंदच आहे.याचे संपूर्णपणे श्रेय जाते ते तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड यांनाच..! दादांनी त्यांच्या अख्ख्या हयातीत एकदाही चहा पिली नव्हती.माझा खूप जिवलग बालमित्र सोमनाथ गायकवाड ( ह.मु. बजाजनगर , औरंगाबाद ) याचे वडील होते गिरजीनाथ दादा..! एकाच आळीत राहत असल्याने कायम एकमेकांच्या घरी उठ बैस असायची.


तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके यांचे अन् आमचे घर देखील एकाच आळीत होते. त्यांचा थोरला मुलगा पोपट शेळके हा कायमस्वरूपी हडस पिंपळगाव येथे स्थायिक झाला होता. अर्थात आजही स्थायिक आहे. मी माझ्या शिक्षकी आयुष्यातील सेवेची जवळ जवळ सात वर्षे याच हडस पिंपळगावात व्यतीत केली. मी त्यावेळी पालखेड येथून 

हडस पिंपळगावात दुचाकीवर येणे जाणे करायचो. आठवड्यातून तीन चार दिवस तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका माझ्या गाडीवर सोबत यायचे.ते ज्या ज्या वेळी यायचे , त्या त्या वेळी दुपारच्या मध्यांतरी शाळेच्या जवळच असणाऱ्या पोपट शेळके यांच्या घराच्या ओट्यावर निवांत त्यांच्याशी गप्पा मारायचो. नातं गावचं होतं, त्यातल्या त्यात आम्ही एकाच गल्लीतील मूळचे रहिवाशी असल्याने खूप आत्मियात होती.तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका यांनी प्रवासात, भेटीत, बैठकीत ज्या ज्या गोष्टी आयुष्यात समजावून सांगितल्या होत्या, त्या आयुष्यभर पुरून उरतील इतका मोठेपणा त्यात दडलेला आहे. 


तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड या दोन्ही ज्येष्ठांना आपल्यातून कायमचे निघून जाऊन कित्येक वर्षे झाली आहेत. आजही या दोन्ही ज्येष्ठांच्या सहवासातील प्रत्येक क्षण अन् क्षण सतत सोबत असतो.आयुष्यात कधी काही प्रसंग आलाच तर ज्या काही ज्येष्ठांची आवर्जून आठवण येते त्यात तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड हे दोघेही त्या आठवणीत नक्कीच असतात. कुणी देहाने भले आपल्या सोबत नसेल, पण जर आपण एखायावर निरपेक्ष प्रेम केलेलं असेल तर अशी स्वर्गवासी माणसं देखील आपल्या सोबत सतत असतात, याचा मला अनुभव आहे. अशावेळी ही स्वर्गवासी माणसं, आपल्या सोबत असल्याची जाणीव तेंव्हाच होत असते,जेंव्हा आपण अशा काही रक्ताच्या अन् बिगर रक्ताच्या जेष्ठ नात्यांना कृतीतून प्रेम दिलेलं असेल. 


असो, आम्ही स्वतः ला  सुशिक्षित अन् आधुनिक काळातील नागरिक समजत असल्यामुळे सर्वांना ख्रिस्त नवीन वर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा..!🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १ जानेवारी ,२०२३, रविवार.

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

गतकाळातील एकत्रित मैत्रीची भेट..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


गतकाळातील मैत्रीची एकत्रित भेट..!


===================================


शिक्षक म्हणून लाभलेल्या मैत्रीचं गारूड काय असतं याचा अनुभव याचि देही याची डोळा आम्ही इ. स.१९९५ ते साधारणतः इ. स. २००५ दरम्यान घेतला.त्या आठवणी आम्हा काही त्याकाळातील सोन्यासारख्या लाभलेल्या काही जिवलग मित्रांना मनाने कधीही म्हातारे होऊन देणार नाही याची त्या सर्व मित्रांच्या वतीने मला पक्की खात्री वाटते.


आज दिनांक १८/१२/२०२२, रविवार रोजी आमचा खूप जिवलग शिक्षक मित्र उदय तुळशीराम साळुंखे राहणार नाशिक याच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास आम्ही शिक्षक मित्र नाशिक येथे आवर्जून उपस्थित होतो. लग्न सोहळा आटोपल्या नंतर प्रिय मित्र नितीन पगार सर याच्या नाशिक येथील घरी जावेच लागले कारण तो आमच्या गळ्यातील ताईत होता अन् आहे हेच एकमेव कारण..!


आमच्या शिक्षक म्हणून नेमणुका ज्यावेळी लासुरगाव केंद्रांतर्गत विविध शाळेत झाल्या होत्या, त्याच वेळी मैत्रीची नाती बहरत गेली. माझ्या उजव्या बाजूला बसलेला मित्र नितीन पगार हा भिसेवाडी या शाळेत कार्यरत होता. याच्या शाळेतील पटसंख्या कमी होती. या शाळेत केशवराव तुपे सर अन् नितीन हे दोघेजण कार्यरत होते. पटसंख्या कमी असल्याने प्रिय मित्र नितीन पगार याचा नेहमी केंद्रांतर्गत शाळेत फुटबॉल व्हायचा. त्या काळातील नितीन पगार हा एकमेव असा शिक्षक होता, ज्याची केंद्रांतर्गत सरासरी प्रत्येक शाळेत नेमणूक झालेली होती. या आमच्या जिवलग मित्रावर माझ्या ब्लॉगवर मी एक लेख लिहिलेला आहे.


माझ्या डाव्या बाजूला आमचा प्रिय विद्यार्थी बबन हजारे बसलेला आहे. बबनच्या बाजूला संजय लक्ष्मणराव हुमे ( लासुरगावकर) आहे. संजय हुमे अन् मी  हडस पिंपळगाव येथे सोबत कार्यरत होतो. एकमेकांना कौटुंबिक आधार दिलेले आम्ही दोघेजण..! कौटुंबिक जबाबदाऱ्या विशेषतः आई वडिलांच्या बाबतीत त्या सांभाळून कुटुंबासाठी काहीतरी करणे यात संजय हुमे अन् माझ्यात एक समानता होती. याच धाग्यामुळे आमच्यात मैत्रीचा धागा घट्ट होत गेला. माणूस सतत त्याच्या सारखा भावनिक पातळीवर कुणी आढळतो का याच्या शोधात असतो हेच खरं..! खूप परखड स्वभाव असलेला संजय हुमेने त्याच्या मातोश्रीच्या निधनाच्या वेळी माझ्या गळ्यात पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. जबाबदारीचा खांदा सापडला की माणूस आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतो हा माणसाचा स्थायी भाव आहे. 


प्रिय मित्र संजय हुमेच्या बाजूला जेजुरे सर आहे. प्रिय मित्र जेजूरे याची अन् माझी आज तब्बल २६ वर्षानंतर भेट झाली.हा आमचा प्रिय मित्र त्यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक लासुरगाव येथे कार्यरत होता. सध्याला प्रिय मित्र जेजुरे हा नाशिक येथे स्थायिक झाला आहे. मितभाषी, खूप समंजस स्वभाव अन् गणित विषयावर प्रभुत्व ही या प्रिय मित्राची विशेष ओळख..! प्रिय मित्र जेजुरे अन् उदय साळुंखे हे इ.स.१९९५ नंतर काही वर्ष दोघेजण लासुरगाव येथे रूम पार्टनर होते. मी अन् प्रभाकर पवार अधून मधून यांच्या रूममध्ये मुक्कामी थांबायचो.प्रिय मित्र जेजुरे सर  आज खूप दिवसांनी भेटला. त्याच्या घरी मनसोक्त गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात तो माझ्या पालखेड गावचा सोयरा आहे हे समजल्यावर अजुन आत्मीयता निर्माण झाली. अर्थात मैत्रीची आत्मीयता होतीच,पण माझ्या जन्मगावाचा सोयरा म्हंटल्यावर माझाही सोयरा झाला हा आत्मियतेचा भाव निर्माण झाला.


सर्वात कडेला आमचा प्रिय मित्र प्रभाकर पवार हा त्याकाळी शहाजतपूर येथे कार्यरत होता. या प्रिय मित्रावर मी माझ्या ब्लॉगवर एक लेख लिहिलेला आहे. सम विचारांची नाळ जुळलेली असल्याने आमच्या मैत्रीच्या नात्यात तीच विण जुळलेली आहे जी आम्ही त्याकाळी लासुरगाव केंद्रांतर्गत सोबत असताना होती..! मनातलं काहीतरी व्यक्त करावं असं मन प्रिय मित्र प्रभाकर पवार यांच्याजवळ नक्कीच आहे याची  मला नेहमी जाणीव होत असते. मनातलं व्यक्त करायला देखील समोरचा विश्वासू असावा लागतो.


आज मैत्रीच्या त्याच काळातील विण आम्ही सर्व मित्रांनी उलगडली. आम्हाला आज  एकत्र आणण्याचे श्रेय जाते ते आमच्या सर्वांच्या गळ्यातील ताईत प्रिय मित्र नितीन पगार याला..! 


मित्रांनो, आज मन खूप  हलकं हलकं झालं. त्याचं त्या औपचारिक आयुष्यात वावरत असताना शरीर अन् मन देखील औपचारिक होऊन जाते. पर्यायाने माणूस देखील त्यांचं वर्तन औपचारिक करू लागतो. औपचारिक वर्तनात माणूस एखाद्या रोबोट सारखाच भासू लागतो. मनात रुक्षता येते अन् आपण सदैव शिक्षक आहोत याच औपचारिक वर्तनात तुमचे अन् माझे वर्तन कळत नकळतपणे होऊ लागते. मात्र जेंव्हा आपल्या एकमेकांसारखी अनौपचारिक शिक्षक मित्र मंडळी भेटते तेंव्हा औपचारिकतेचा बुरखा फाडल्या जाऊन अनौपचारिक मैत्रीचा शालू पांघरल्या सारखं वाटतं. मन कसं प्रसन्न होऊन जाते. जसे की आज वाटले.


वयाच्या चाळीशीनंतर त्याच आपल्या विशीतील मैत्रीची नाती आज भेटली अन् पुन्हा एकदा आपण त्याच आपापल्या त्या शाळेत कार्यरत होऊन पुन्हा तोच आनंद घ्यावा असं मनाने म्हंटले. पण माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनाच्या सल्ल्याने थोडीच होत असतात. वास्तवाचे भान अन् वास्तवातील जबाबदाऱ्या सांभाळत मनाला आपलं कार्य करत आयुष्यात पुढे जावे लागते. मित्रांनो एक मात्र खरं आहे की,आपण जो शिक्षक म्हणून कार्यकाळ एकमेकांच्या सोबत व्यतीत केला तो कार्यकाळ एकमेवच होता. आपल्या त्या काळातील नवतरुण शिक्षकांना स्वतः च्या लेकरा सारखं जपणारे आपले काही जेष्ठ शिक्षक सध्या हयात नाहीत.मात्र त्या सर्व स्वर्गवासी जेष्ठ शिक्षकांचा वडिलकीचा मायेचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत आहे. आपल्या भेटीत त्या जेष्ठ शिक्षकांची आठवण निघत नाही असे कदापि होत नाही अन् होणारही नाही. हीच तर आपल्या काळातील लासुरगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांची खरी कमाई होती अन् आहे..!


प्रिय मित्रानो, भविष्यात पुन्हा एकदा भेटूच..! तेही नाशिकलाच..!! कारण आपला खूप जिवलग मित्र उदयची भेट होणे बाकी राहिली आहे..!🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १८/१२/२०२२, रविवार.

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

आचार्य रजनीश उपाख्य ओशो


 


चिंतन ©️


" महान तत्ववेत्ता आचार्य रजनीश उपाख्य ओशो..! '


====================================


आज महान तत्ववेत्ता आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचा  जन्मदिन आहे.( ज. दि. ११/१२/१९३१)

त्यानिमित्त  त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेला प्रथमतः विनम्र अभिवादन..!🙏


संपूर्ण मानवी वैचारिक सिद्धांतात माझ्या मते फक्त तिघेच असे पूर्णार्थाने सक्षम प्रगल्भ तत्त्वचिंतक झालेले आहेत. ते तिघेजण पुढील प्रमाणे होय.


(१) श्रीकृष्ण,

(२) सिद्धार्थ उपाख्य गौतम बुद्ध,

(३) आचार्य रजनीश उपाख्य ओशो..!


विशेष म्हणजे वरील तिघाही तत्ववेत्त्यांची बौद्धिक मिमांसा भिन्न भिन्न आहे, मात्र वास्तववादी आहे.


एखाद्यावर समाज एका विशिष्ट विचारसरणीचा शिक्का मारतो, पण वास्तवात समाजातील काहीजण जसे समजतात त्यापेक्षा एका वेगळ्याच वैचारिक उंचीवरील काही तत्त्वचिंतक असतात. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आचार्य रजनीश उपाख्य ओशो होय.


ओशो यांच्या ' संभोगातून समाधीकडे ' या पुस्तकामुळे त्यांच्यावर  अश्लीलतेचा शिक्का समाजव्यवस्थेने मारला. अर्थात असा शिक्का मारण्यात याच समाजव्यवस्थेतील प्रगल्भ वाचक अन् विचार करणारे नव्हते,तर पिढ्यानपिढ्या एका बंदिस्त अन् चाकोरीबद्ध वैचारिक अन् धार्मिक क्षेत्रातील  मानवी घटक होते. ' संभोगातून समाधीकडे ' असे पुस्तकाचे शीर्षक आहे म्हंटल्यावर त्यात निव्वळ अश्लीलतेचा भरणा असेल अशी चूक समाजातील काही मानवी घटकांनी केली अन् खूप गदारोळ झाला. संपूर्ण विश्वातील मानवाला आपल्याच पूर्वजांनी खजुराहो , कोणार्क येथील अद्वितीय शिल्पकलेच्या द्वारे स्री अन् पुरुष यांच्या भावोत्कट नात्याचा परिचय करून दिला आहे. मी या दोन्ही ठिकाणी भेट दिलेली आहे. खजुराहो अन् कोणार्क येथील अद्वितीय शिल्पकलेला बघितल्यावर लक्षात येते की, आपले पूर्वज किती उच्च कोटीच्या वैचारिक उंचीवरील होते. अर्थात खजुराहो अन् कोणार्क येथील अद्वितीय शिल्पकलेत ज्यांनी फक्त आणि फक्त अश्लीलता बघितली , अशांच्या वैचारिक क्षमतेला मर्यादा आल्या. मात्र ज्यांनी याच शिल्पकलेत आपल्या पूर्वजांची प्रगल्भता बघितली , मग पटते की, त्याकाळी आपल्या पूर्वजांनी किती प्रगल्भतेने एवढे मोठे कार्य आपल्या पिढीसाठी करून ठेवलेले आहे.


इतिहास साक्षीला आहे, जेंव्हा जेंव्हा परंपरागत वैचारिक सिद्धांताला छेद देणारे विचार कुणी व्यक्त करतो किंवा करते त्या त्यावेळी अशा विचारवंतांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागलेले आहे.ओशो ही याला अपवाद ठरले नाही. 


अतिशय कुशाग्र बुद्धीच्या बळावर अन् आपल्यातील अलौकिक वाकचातुर्याच्या सामर्थ्यावर आचार्य रजनीश यांनी समाज व्यवस्थेला हादरवून सोडले होते. ओशो यांची पुस्तकं अन् विविध व्याख्याने माणसाच्या मेंदूला सृजनशील अन् प्रगल्भ नक्कीच बनवतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आचार्य रजनीश यांनी त्याकाळी जे काही विचार व्यक्त केले होते ते त्याकाळच्या प्रत्येक धर्मातील धर्मगुरूंना पटणारे नव्हते. याचा अर्थ असाही होत नाही की, आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांनी जे जे व्यक्त केले आहे ते आपण पूर्णतः मान्यच करावे..! असे जर होत असेल तर मग आपण ओशो यांच्या मूळ सिध्दांताचेच अनुकरण करत नाही असा त्याचा अर्थ होतो. आपल्या तर्कसंगत बुध्दीच्या पटलावर प्रत्येक विचार, सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींचे जीवन इत्यादी अनेकानेक बाबींना ज्यावेळी आपण पडताळून आपली मते तयार करतो तेंव्हाच प्रगल्भ समाजाची स्थापना होते. प्रत्येकात गुण आहेत तसे दोषही आहेत.फक्त एकांगी मते व्यक्त करू नये असाच सार आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांच्या बऱ्याच विचारात जाणवतो.


आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांनी जी मते व्यक्त केली, ती पूर्णतः वस्तुनिष्ठ होती. वस्तुनिष्ठ यासाठी म्हणतोय की, ओशो यांनी ज्याच्यात जे योग्य आहे त्याचे समर्थन अन् विवेचन केले,मात्र त्याचवेळी ज्याच्यात जे अयोग्य आहे त्यावर कोणतीही भीडभाड न ठेवता विवेचन केले. प्रत्येकात जशी योग्यता असते, अगदी तशीच प्रत्येकात अयोग्यता देखील असते.याच वस्तुनिष्ठ वैचारिक बैठकीत ओशोंनी आपल्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला समाजाच्या समोर प्रस्तुत केले.


सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींना ओशोंनी संवेदनशील बनवलं नाही. याउलट सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींना ओशो यांनी आपल्या प्रगल्भ वैचारिक सिध्दांतांद्वारे श्रोत्यांच्या अन् वाचकांच्या समोर प्रस्तुत केले. मी इ. स. १९९९ मध्ये ओशो यांचं ' गांधीवाद एक व्यथा ' हे पुस्तक वाचले होते.खूपच सैद्धांतिक मांडणी या पुस्तकात ओशो यांनी केलेली आहे. मी मागील आठवड्यात औरंगाबाद शहरातील पुस्तकांच्या विविध दुकानात ' गांधीवाद एक व्यथा ' या पुस्तकाची चौकशी केली,पण कुठेही हे पुस्तक उपलब्ध नव्हते. महात्मा गांधी एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्व होते,पण त्यांनी अंगिकारलेला गांधीवाद अन् त्यातून निर्माण झालेली समाजव्यवस्थेची व्यथा याचे खूप अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात ओशो यांनी केलेलं आहे.


असो ओशोवर खूप काही व्यक्त करता येईल,पण आटोपते घेतो, कारण सगळेच वाचक प्रगल्भ वाचक नसतात..!🙏🏻


ता.क.: जून १९९८ पासून ओशो साहित्य संपर्कात आहेच. !


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: ११/१२/२०२२, रविवार.

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

खूप समंजस व्यक्तिमत्व डॉ. अरुण साळे साहेब..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!©️


खूप समंजस व्यक्तिमत्व डॉ. अरुण साळे साहेब..!


===================================


आज दिनांक २३/११/२०२२ रोजी माझी जन्मभूमी पालखेड ता. वैजापूर , जि. छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेव यांची कार्तिकी यात्रा होती. यात्रेला दरवर्षी गेलो की, गावातील काही घरं आहेत ज्याठिकाणी गेल्याशिवाय गावाला भेट दिल्याचे आत्मिक समाधान लाभत नाही. त्यातलं एक घर माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत अन् बाळू माळी यांचं..! 


आज याच ठिकाणी माझे बालपणीचे कौटुंबिक डॉ. आदरणीय अरुण साळे साहेब यांची भेट झाली. ( माझ्या डाव्या बाजूला उभे असलेले ) लहानपणी मला काहीही आजारपण आले की, आदरणीय डॉ. साळे साहेब माझी तपासणी करायचे अन् हळूच गोड गोड बोलत सुई टोचून द्यायचे. सुई टोचून झाल्यावर समजायचे सुई टोचून झाली म्हणून..! त्यावेळी डॉ. साहेबांचा हात आईच्या हातासारखाच जाणवायचा. माझी धन्वंतरी देवतेला प्रार्थना असेल की, या पृथ्वीवरील समस्त डॉक्टरांच्या हातात डॉ. साळे साहेबाच्या हातातील सुई टोचण्याचे आईपण येवो हीच प्रार्थना..! अर्थात यात माझा थोरला मुलगा चि. नमन देखील आला,कारण त्यालाही भविष्यात येणाऱ्या रुगांना सुई टोचायची आहे.


आमच्या घरी कुणी आजारी पडले की, घरातला कुणीतरी सदस्य आदरणीय डॉ.साळे साहेबांच्या घरी निरोप द्यायला जायचा. डॉ. साळे साहेब त्यांची जी पेटी होती ती एकतर स्वतः घेऊन यायचे किंवा घरातील सदस्य ती पेटी घरी घेऊन यायचे.घरी आल्यावर त्यांच्या पेटीतील सुई बाहेर काढायचे.घरात गरम करायला ठेवलेल्या पाण्यात ती सुई टाकायचे. जेणेकरून ती सुई निर्जंतुक व्हावी..! कधी कधी डॉ. साळे साहेब त्यांच्या घरूनच सुई निर्जंतुक करून आणायचे. खूप प्रामाणिक व्यक्तिमत्व..!


 डॉ. साळे साहेब अतिशय शांत स्वभावाचे अन् आजच्या आमच्या वयोगटात आमच्याच वैचारिक बैठकीतील आहेत. अगदी भिन्न भिन्न रंगाच्या गप्पांचा फड यांच्याशी आम्हा काही बालमित्रांचा रंगतो.त्यात आम्ही आमच्या वयोगटाच्या पेकटात लाथ घालतो अन् निख्खळ मैत्रीचा आनंद लुटतो. खूप मॅच्युरिटी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. साळे साहेब..!


मी आमच्या पालखेड गावातील काही व्यक्तींच्या अजातशत्रू असणाऱ्या स्वभावाच्या निख्खळ प्रेमात आहे. त्यात मला जाणवलेले खूपच शांत अन् अजातशत्रू व्यक्तिमत्वे म्हणजे तीर्थस्वरुप पारसनाथ पाटील मुलमुले साहेब, डॉ.साळे साहेब अन् स्वर्गीय सादेक चाचा बागवान होय.यातील स्व. सादेक चाचा बागवान यांचं व्यक्तीमत्व खूपच शांत श्रेणीतील नव्हते, तर खूप हसरे अन् खेळकर स्वभाव त्यांचा होता. अजातशत्रू मात्र नक्कीच होते.


आदरणीय डॉ. साळे साहेब यांच्याकडे बजाज M 80 दुचाकी गाडी होती. इतक्या कमी वेगात अन् आयुष्यात कधीही न चुकलेली ड्रायव्हिंग केली ती डॉ. साळे साहेब यांचीच..! मर्यादित वेग अन् संयमित ड्रायव्हिंग हे डॉ.साळे साहेबांचं वैशिष्टय होते.यावरूनच त्यांच्या स्वभावाचा अंदाज येतो. त्याकाळी ग्रामीण भागात डॉ. व्यवसायात फार काही आर्थिक स्थैर्य नसायचे. आहे त्या आर्थिक परिस्थितीत आदरणीय डॉ. साळे साहेब यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अमोल अन् महेश यांना योग्य ते नैतिक अन् औपचारिक शिक्षण दिले.आज त्यांची मुलं आपापल्या आयुष्यात स्थिरावलेली आहेत.


कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या देहबोलीतून अन् सार्वजनिक आयुष्यातील वर्तनावरून सहज लक्षात येतो असे मला वाटते. आदरणीय डॉ. साळे साहेब यांचा स्वभाव हा त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील वर्तनातून आम्हाला सहजपणे लक्षात येते असायचा. एखाद्या पुरुषाच्या सर्वांनी प्रेमात पडावं असं प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉ. अरुण साळे साहेब होय..!


काही वर्षांपूर्वी आदरणीय डॉ. साळे साहेब प्रभू श्रीरामाचे मंदिर असलेल्या श्रीरामपूर येथे स्थायिक झाले आहेत.विशेष म्हणजे त्यांचं तिथं स्थायिक होणं वैयक्तिक माझ्यासाठी खूप हृदयस्पर्शी आहे,कारण याच श्रीरामपूर गावात साठच्या दशकात माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी मराठा बोर्डिंग मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा व शिका ब्रीद अंतर्गत स्वतः ला आयुष्यात सिद्ध केले होते. घरून काहीही आर्थिक पाठिंबा नसताना जमेल ती कामे करून माझ्या स्व. वडिलांनी  जी साक्षरता प्राप्त केली होती त्या मागे याच श्रीरामपूर गावाचे कळत नकळतपणे योगदान होते. या भावूक संदर्भाने आदरणीय डॉ. साळे साहेबांचं माझ्या आयुष्यात माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांच्या सारखे श्रद्धेचे स्थान आहे..!🙏🏻


असो, आदरणीय डॉ. अरुण साळे साहेब आज तुमची भेट झाली अन् माझ्या आयुष्यातील गतकाळातील अनेक भावूक क्षणांना हिंदोळा मिळाला.शेवटी माणसाचे मन तरी काय असते हो..?

फक्त आणि फक्त गतकाळातील आठवणींना उजाळा देऊन आजच्या वर्तमानकाळात जगून भविष्याची नांदी सुरू करणारे आयुष्यच..! दुसरं काहीही नाही..!


वंदे मातरम्..!

हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २३/११/२०२२, बुधवार, कार्तिकी अमावस्या


सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

वेलू नायकन - कमल हसन सर..!





 


चिंतन ©️


वेलू नायकन - कमल हसन सर..!


==============================


माझ्या मते संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांमध्ये आता पर्यंत फक्त एकाच अभिनेत्याने सर्वोत्तम अभिनय केलेला आहे. त्या अभिनयासाठी त्या अभिनेत्याला इ. स.१९८७ साली राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. एवढंच नव्हे तर त्याच सर्वोत्तम अभिनयाच्या बळावर तो चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आला होता. 


तो चित्रपट होता वेलू नायकन..! मूळ तामिळ भाषेत होता. नंतर हिंदीत डब करण्यात आला होता. अभिनेता होता भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनयाचा चौरंगी चिरा ग्रेट कमल हसन सर, अन् या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ग्रेट  मणिरत्नम सर..! भारतीय चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत,ज्यांनी त्यांच्या प्रदर्शनानंतर त्याच विषयाला अनुसरून इतर अनेक चित्रपटांची नांदी सुरू केली. त्यात कमल हसन सर अन् मणिरत्नम सर यांच्या वेलू नायकन या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तो यासाठी करावा लागेल की, वेलू नायकन चित्रपटात ज्या पद्धतीने एका डॉन ची कथा सादर करण्यात आली होती, त्याच धर्तीवर थोडाफार बदल करून तिथून पुढे अनेकानेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. आता हीच जोडी पुन्हा एकदा तब्बल पस्तीस वर्षांनी पुन्हा सोबत येत आहे.KH 234 या चित्रपटात. हा चित्रपट इ. स.२०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 


कमल हसन यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेकानेक सर्वोत्तम चित्रपट केले. कमल हसन सर यांच्या चित्रपटसृष्टीतील संपूर्ण कारकिर्दीचा सारांश याच वेलू नायकन या चित्रपटात दडलेला आहे. वेलू नायकन या चित्रपटात कमल हसन सर यांनी तरुण, उमदा तरुण, प्रौढ, वार्धक्यात झुकलेल्या व्यक्तीची, व्यक्तिरेखा आपल्यातील सर्वोत्तम अभिनयाच्या बळावर लीलया पेललेली आहे. वेलू नायकन या चित्रपटात तर काही प्रसंग असे आहेत की, ज्यात कमल हसन सरांनी काहीही संवाद व्यक्त न करता ,फक्त आपल्या देहबोलीतून, आपल्यातील सर्वोत्तम अभिनयाच्या बळावर ते प्रसंग तिथून पुढील पिढीसाठी उत्तम पाठ म्हणून जिवंतपणे उभे करून ठेवलेले आहेत. संपूर्ण वेलू नायकन चित्रपटात कमल हसन सर सर्वोत्तम आहेत, त्यातल्या त्यात दोन प्रसंगात कमल हसन सर का म्हणून ग्रेट आहेत हे मान्य करावेच लागते.त्यातील पहिला प्रसंग पुढील प्रमाणे होय..


ज्यावेळी डॉन वेलू  नायकन पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या घरी त्याला दम द्यायला येतो. त्यावेळी बैठक खोलीत कुणीही नसते. पोलिस अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर बैठक खोलीत असलेला फोटो बघतो. त्या फोटोत  त्याच पोलीस अधिकाऱ्याची पत्नी , त्याची मुलगी असते. हे बघून स्तब्ध होतो.तो पर्यंत त्याला माहीत नसते की त्याची मुलगी या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे म्हणून. इतक्यात दुसऱ्या खोलीतून लहान मुलाचा आवाज ऐकू येतो.  बैठक खोलीत त्याची मुलगी जी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असते ती येते. वेलू नायकन त्यावेळी आपल्या नातवाला काहीतरी आनंदाने द्यावे यासाठी आपल्या जवळ देण्यासाठी काहीतरी आहे का हे बघतो. त्याची मुलगी आपल्या मुलाला काहीही देऊ नका असे भाव व्यक्त करते.त्याचवेळी ग्रेट कमल हसन सर यांनी जो सर्वोत्तम अभिनय एक शब्दही व्यक्त न करता फक्त आणि फक्त आपल्या देहबोलीतून व्यक्त केला आहे तो सदा सर्वदा सर्वोत्तम आहे.


वेलू नायकन या चित्रपटात कमल हसन सरांच्या सर्वोत्तम अभिनयाचा जिवंत दाखला असणारा दुसरा  प्रसंग म्हणजे चित्रपटाच्या सर्वात शेवटी,त्यांना भेटायला त्यांचा नातू आलेला असतो त्यावेळचा होय. हॅट्स ऑफ टू यू ग्रेट कमल हसन सर..! 


थोडक्यात वेलू नायकन हा चित्रपट श्रीमद्भगवद्गीतेचा सार व्यक्त करतो. तुम्ही जसे कर्म कराल, तसेच फळ तुम्हाला भोगावेच लागेल. भले तुम्ही नियतीच्या फेऱ्यात अडकून चूक केली असेल किंवा गुन्हा केला असेल, तरी देखील तुम्हाला याच मनुष्य जन्मात त्याचं प्रायश्चित्त भोगावेच लागले. यातून कुणालाही सुटका नाहीच..!


ग्रेट कमल हसन सर यांनी विविधांगी भूमिका कारकीर्दीत केल्या आहेत.त्यात प्रामुख्याने अप्पू राजा, पुष्पक ( हा मूकपट आहे) , हे राम, सदमा, अलीकडच्या काळातील विक्रम इत्यादी अनेकानेक चित्रपटात त्यांनी आपल्यातील सर्वोत्तम अभिनयाला रसिक माय बापांच्या समोर प्रस्तुत केलेले आहे.


असो,आज याच अष्टपैलू अभिनेत्याचा म्हणजेच वेलू नायकन ग्रेट कमल हसन सर यांचा जन्मदिन आहे.

( ज. दि. ७/११/१९५४ ) त्यानिमित्त या महान अभिनेत्याला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा..!

🌹🙏🏻


ता.क. : मी , हिंदीत डब करण्यात आलेल्या वेलू  नायकन चित्रपटाची DVD, एकोणाविस वर्षांपूर्वी थेट लासूर स्टेशन येथून रेल्वेने जाऊन, भाग्यनगर ( हैद्राबाद ) येथे खरेदी केली होती. त्यावेळी आजच्या सारखी, तांत्रिक उपलब्धता सहज नव्हती. त्यावेळी वेलू नायकन चित्रपटाची  DVD परिसरातील उपलब्ध नव्हती.


वंदे मातरम्


एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ७/११/२०२२, सोमवार.

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

" विश्वासाचे दुसरे नाव प्रिय विद्यार्थी गणेश..!"


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


" विश्वासाचे दुसरे नाव प्रिय विद्यार्थी गणेश..!"


=====================================


विश्वास अन् माणूस या दोन शब्दांच गारूड एवढं मोठं आहे की, याच विश्वासाच्या बळावर माणसाच्या आयुष्यात नात्यांना बहर येत असतो. हा असा बहर असतो, ज्याला पतझड माहीत नसते. विश्वासाने निर्माण होणाऱ्या नात्यात भोलेनाथ शंकराच्या रुपातील पवित्र श्रावणातील हिरवळ नेहमी शोभून दिसत असते. श्रावणातील हिरवळीने जशी आपली वसुंधरा सजलेली दिसते, अगदी तसेच विश्वासाच्या मानवी नात्यात देखील अशी हिरवळ शोभून दिसते. एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करणं सोप आहे,पण तोच विश्वास टिकून ठेवणं, त्या विश्वासाला चिरंतन अमरत्व प्राप्त करून देणे ही फार मोठी गोष्ट आहे. निदान माणसांच्या सध्याच्या गुंतागुंतीच्या आयुष्यात तरी विश्वास ही एक फार मोठी तपश्चर्याच आहे असे मला वाटते.


मला शिक्षक म्हणून सेवा करत असताना सत्तावीस वर्षे झाली. या सेवेच्या आयुष्यात बहुतांशी विद्यार्थी चांगले लाभले. अर्थात काही असेही लाभले , ज्यांना बघून आपला आपण निमूटपणे रस्ता बदलून पुढे जावे. मात्र जे जे विद्यार्थी चांगले लाभले त्यात त्या त्या विद्यार्थांनी प्राप्त केलेली नैतिक आचरणाची जी तपश्चर्या प्राप्त केली होती त्याचं ते फळ होते. अशा अनेकांनी स्वतः ला समाजात आहे त्या परिस्थितीत सिध्द केले.यात अग्रस्थानी आहे माझा खूप आवडता प्रिय विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे होय..!


मी इ. स.१९९९ मध्ये जि.प.प्रा.शा. हडस पिंपळगाव, कें. लासुरगाव,ता. वैजापूर जिल्हा - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पूर्वीच्या शाळेतून बदली होऊन हजर झालो होतो. संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराजांच्या अध्यात्मिक विचारांचा प्रभाव हडस पिंपळगावच्या नागरिकांवर खूप मोठा होता. अर्थात माझेही जन्मगाव पालखेड येथे आमच्याच घराच्या समोर संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराज आश्रम अन् श्री. पारेश्र्वर महादेवाचे मंदिर असल्याने या गावाशी माझी वैचारिक नाळ पटकन जुळली. येथील शाळेत इयत्ता सातवी मध्ये गणेश नानासाहेब गाजरे हा शिकायला होता. 


गणेश नानासाहेब गाजरे हा अभ्यासात फारसा हुशार नव्हता , पण प्रत्येक विद्यार्थ्याला जिथं खरं हुशार असायला हवं त्या नैतिक आचरण अन् अत्यंत विश्वासू या नैतिक मूल्यांच्या बाबतीत खूप श्रीमंत होता. अर्थात आजही आहे..! हडस पिंपळगाव येथील शाळेत लाभलेले सर्वच विद्यार्थी खूपच चांगले होते,पण ज्या विद्यार्थ्याने माझ्या स्व. वडिलांचे मन जिंकले होते त्यात बबन हजारे ( जळगाव, ता. वैजापूर ) या प्रिय विद्यार्थांच्या नंतर ते स्थान फक्त गणेश नानासाहेब गाजरे यानेच प्राप्त केले होते. त्याचं कारणही तसंच होतं. ज्यावेळी आपल्या पश्चात एखादा व्यक्ती आपल्या आई वडिलांची काळजी घेतो, त्यांची सेवा करतो अशी माणसं ही नियतीने आपल्या आयुष्यात पाठवलेली त्याच ईश्वरीय शक्तीचा अंश असतात या मताचा मी आहे.या माझ्या विचारला पुष्टी देणारे वर्तन प्रिय विद्यार्थी गणेश नानासाहेब गाजरे याचे माझ्या स्व. आई वडिलांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत राहिले. विशेषतः माझ्या स्व. वडिलांचा दशक्रिया विधी जो की, कायगाव ता. गंगापूर येथे गोदावरी नदीच्या तीरावर केला होता.त्या विधीची, तिथल्या व्यवस्थेची जबाबदारी याच माझ्या खूप आवडत्या विद्यार्थ्याने , गणेशने खूप जबाबदारीने पार पाडली होती. तो प्रसंग अन् ती सेवा माझ्या स्व. वडिलांना प्रत्यक्ष कृतीतून अर्पण केलेली एक सर्वोत्तम श्रद्धांजलीच होती. यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे थोरपण अजुन काय असू शकते..! ती थोरवी गणेशची नक्कीच आहे.


मी इ. स. १९९९ मध्ये इयत्ता सातवी वर्गाला शिकवायला असताना अभ्यासावरुन एकदा माझ्याकडून गणेशला छडी हातावर जोरात लागली. त्यात त्याला जखम देखील झाली होती. शाळा सुटली. मला उद्याचा धाक पडला होता की, आता उद्या गणेशचे वडील आपल्याला शाळेत नक्कीच याचा जाब विचारण्यासाठी येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत माझ्या वर्गात गणेशचे वडील आले,पण त्यांनी जाब विचारण्या ऐवजी मला असे म्हणाले की.

" गुरुजी, गणेश चुकला तर अजुन झोडपून काढा, आमचं काही बी म्हणणं नाही..!" 

हे ऐकूण मी स्तब्ध झालो होतो. त्यात पुन्हा जी शिक्षा गणेशला मी केली होती, त्याबद्दल त्याने साधे डोळे वर करून डोळ्याने देखील मला प्रत्युत्तर दिले नव्हते. एखाद्याने किती नम्र असावे याचा तो परमोच्च प्रसंग होता. 


मी अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे गणेश नानासाहेब गाजरे हा अभ्यासात फारसा हुशार नव्हता, पण त्याचं वागणं कमालीचं चांगलं होतं.बुध्दीमत्ता अन् त्याद्वारे आयुष्यात मिळणारे स्थैर्य या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक नाही असे मला वाटते. एक शिक्षक म्हणून मला असे वाटते की, दुनियादारीचे शिक्षण ज्याला मिळाले , किंबहुना अशाच लोकांनी आपल्या आयुष्यात यश प्राप्त केले आहे. बुध्दीमत्ता , दुनियादारीचे शिक्षण अन् त्याच्या सोबतीला जर नैतिक मूल्यांचा ठेवा सोबत असेल तर अशी माणसं सहसा आपल्या आयुष्यात अयशस्वी होत नाही. गणेश अभ्यासात जेमतेम होता त्यामुळे त्याने माध्यमिक शिक्षणाचा मार्ग अर्ध्यावर सोडून दिला. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने गावाच्या जवळच असलेल्या लासूर स्टेशन येथे एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. जिद्द, सचोटी, प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गणेशच्या अंगी असलेला निर्व्यसनीपणा या मूल्यांच्या आधारे स्वतः चा हॉटेल व्यवसाय ' जय बाबाजी हॉटेल ' या नावाने सुरू करण्याचे ठरवले. लासूर स्टेशन येथील सावंगी चौकात सुरुवातीला चहा अन् नाश्त्याचे हॉटेल सुरू केले. त्यात जम बसल्यावर थंड पेय असलेला व्यवसाय सुरू केला. काळाच्या ओघात त्यात चांगला जम बसला. विविध थंड पदार्थ, आईस्क्रीम तयार करण्याचा छोटेखानी प्रकल्प त्याने सुरू केला. जेणेकरून हाच माल दुसऱ्याकडून खरेदी करून ग्राहकांना विकण्यापेक्षा आपणच तयार करून विकु हा व्यावसायिक उद्देश त्यामागे होता. यात गणेशला यश मिळाले. गणेश त्याच्या व्यवसायात दिवसेंदिवस यश मिळवत होता अन् आहे .या यशाच्या मार्गात असताना त्याने त्याचा तोल ढळू दिला नाही हे विशेष..! नाहीतर बऱ्याचदा असे बघायला मिळते की, यश आपल्या सोबत अनेक अयशस्वी गोष्टीना सोबत घेऊन येत असते.


जी व्यक्ती,माणसं आपल्या आई वडिलांचा, घरातील जेष्ठांचा, स्रीयांचा कमालीचा आदर करतात, अशी व्यक्ती, माणसं सदा सर्वदा वंदनीय असतात. माझे स्व. वडील लासूर स्टेशन येथून कधी मधी पालखेड येथे जायचे. माझे स्व. वडील सावंगी चौकातून गावाकडे जाताना दिसले की, माझ्या स्व वडिलांना एखाद्या वाहनात बसून देई पर्यंत गणेश वडिलांच्या सोबतच असायचा. माझे वडील गावाकडून आल्यावर लासूर स्टेशन येथील माझ्या घरी त्यांना आणून सोडत असे. हे सर्व माझे स्व. वडील मला शाळेतून घरी आल्यावर अभिमानाने सांगत असे. हे नैसर्गिक नैतिक संस्कार , गणेशच्या अंगी होते त्यामुळे त्याचे स्थान माझ्या कुटुंबात खूप सन्मानाचे होते,आहे अन् राहील यात तिळमात्र शंका नाही.


मी माझ्या आयुष्यात अगदी माझ्या घरातील सदस्यांचे जे स्थान माझे काही बालमित्र, काही शिक्षक मित्र, जन सहयोग सामाजिक संस्था परिवार छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे सर्व सदस्य यांना दिलेले आहे तेच स्थान माझ्या या खूप प्रिय विद्यार्थ्याला म्हणजेच गणेश नानासाहेब पाटील गाजरे याला दिलेले आहे. हे स्थान माझ्या मुलांच्या पुढील पिढीत देखील राहील हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे..! कारण नियतीने आपल्या आयुष्यात जी काही देव माणसं कोणत्या ना कोणत्या रूपात पाठविलेली असतात ,ती हीच तर आहे..!🙏🏻


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ४/११/२०२२, शुक्रवार.

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

वीर झारा

 चिंतन ©️


वीर झारा...!


================================


वीर झारा हा एकमेव असा हिंदी चित्रपट होता,ज्यातील अतिशय कर्णमधुर गाणी ज्यांना संगीत दिले होते स्व. मदन मोहन यांनी. आणि स्व.मदन मोहन यांच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी महान दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्या सुमधुर बंदिशी त्यांचे हक्क विकत घेऊन आपल्या वीर झारा या चित्रपटात इ.स्.२००४ सारी उपयोगात आणल्या होत्या. थोडक्यात एखाद्या संगीतकाराच्या मृत्यूनंतर त्याच्या संगीताला एखाद्या चित्रपटात उपयोगात आणण्याचे हे दुर्मिळ उदाहरण..!


या चित्रपटात खूपच भावूक प्रेमकथा चित्रित केली होती.ज्यात नायक ,भारतीय असतो अन् नायिका पाकिस्तानी..! नायक ,नायिकेला भेटायला पाकिस्तान मध्ये जातो पण गुप्तहेर म्हणून त्याला अटक होते.त्याची प्रेयसी त्याला भेटण्याचा आटोकाट प्रयत्न करते,पण भेट होत नाही.अखेर पाकिस्तान मधील एक महिला वकील राणी मुखर्जी त्यांची केस न्यायालयात लढते अन् त्यांच्या बाजूने निकाल लागतो.पण तो पर्यंत नायक अन् नायिका खूप वृध्द झालेले असतात.


निस्सीम प्रेमाची आसक्ती अन् स्वच्छ ओढ असते त्यामुळे ते प्रेमीयुगलांचे मिलन होते ते त्यांच्या म्हातारपणी..!


थोडक्यात खरे अन् स्वच्छ प्रेम वय अन् सौदर्य पाहत नाही तर ते पाहते फक्त स्वच्छ भावना अन् त्यातील पावित्र्य..!

खूपच सुंदर कथा तेवढ्याच भावुकतेने चित्रित केली आहे.वास्तविक मला शाहरुख खान एक नट म्हणून आवडत नाही पण कथेच्या प्रेमामध्ये तो खूप आवडला होता.नायिका म्हणून प्रीती झिंटा हिने लाजवाब काम केले आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शक होते,यश चोप्रा..! ज्यांनी अतिशय साध्या ,सोप्या प्रेमकथा आपल्या चित्रपटात अतिशय सुरेख,भावूकतेने अन् प्रेमाच्या उत्कटतेने सादर केल्या. आज ती नजाकत कोणत्याही दिग्दर्शकाला जमत नाही. यश चोप्रा मध्ये नाजाकत होती याचं एकच उदाहरण पुरेसे आहे अन् ते म्हणजे अमिताभ बच्चन, जया भादुरी आणि लावण्यवती रेखा या त्रिकुटाला प्रत्यक्ष सिलसिला या चित्रपटात एकत्र आणलं..! कलाक्षेत्रातील ऑफलाईनआयुष्याला ऑनलाईन एकत्र आणणं वाटतं तितकं सोपं नाही. ती किमया फक्त आणि फक्त यश चोप्रा हेच करू शकले.


तत्कालीन काळातील ऐकीवात असलेल्या खऱ्या अर्थानं भावविश्वात गुंतलेल्या खऱ्या पात्रांना त्याच खऱ्या प्रेमकथेत गुंफून सादर करण्याचे कसब जमले ते यश चोप्रा यांनाच, सिलसिला या सदाबहार हिंदी चित्रपटात..!☺


ता.क. - वीर झारा चित्रपटातील माझ्या आवडत्या गाण्याची व्हिडीओ लिंक - https://youtu.be/Q9GdOXtbr44


या चित्रपटातील अजुन इतर सुमधुर गाणी कुणाला ऐकायची अन् बघायची असेल तर यू ट्यूब वर फुकट मध्ये उपलब्ध आहे 


वंदे मातरम्..!


एक तरल रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: २४/१०/२०२२, सोमवार. शुभ दीपावली..!🪔

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

" सदैव अभिमानास्पद प्रिय बंधू बाबासाहेब..! "


 

आमचे गाव आमची माणसं ©️


" सदैव अभिमानास्पद प्रिय बंधू बाबासाहेब..! "


===============================


काही नाती ही निसर्गदत्त असतात.त्या नात्यात सदैव प्रेमाचा अन् आदराचा सहवास दरवळत असतो.काही नाती कधीही शिळी होत नाही.या नात्यांना फक्त माहीत असते सदैव टवटवीत ताजेतवाने असणे.नात्याच्या बाबतीत माणूस हा एकमेव प्राणी इतर सर्व प्राण्यांपेक्षा जरा जास्तच श्रीमंत आहे असे मला तरी वाटते.नाती फक्त रक्ताच्या गोतावळ्यातच तयार होतात असे अजिबात नाही. माझ्या मते नाती ही माणसाच्या वर्तनाने अन् माणसाच्या वैचारिक मंथनातून तयार होतात.जेंव्हा रक्ताच्या नात्याच्या वर्तुळाला भेदून जेंव्हा रक्तविरहित नात्याच्या विश्वात काही नाती तयार होतात अशी नाती मैत्रीच्या देवतेचा प्रसादच असतो.माणसाच्या आयुष्याच्या मंथनातून जी नाती तयार होतात ती नाती अमृतासारखी संजीवन आयुष्य प्राप्त करून देणारी असतात हा माझा आज पर्यंतच्या आयुष्यातील वाटचालीतील स्वानुभव आहे.


मी माणसाच्या आयुष्यातील नात्यांच्या बाबतीत वरील उल्लेखित जे चिंतनीय मनोभाव व्यक्त केले आहे,त्यात माझा लहान भाऊ प्रिय बाबासाहेब एकनाथराव जगदाळे पाटील हा अगदी चपखल बसतो.


प्रिय बंधू बाबासाहेब एकनाथराव जगदाळे पाटील..!

( मूळ गाव - पालखेड , हल्ली मुक्काम - छ्त्रपती संभाजीनगर)


बाबासाहेब अन् मी तसे पालखेड येथील आमच्या एकाच गल्लीतील पूर्वाश्रमीचे वास्तव्याचे माणसं..! बाबासाहेब जगदाळे याचा थोरला भाऊ माझा जिवलग बालमित्र भानुदास जगदाळे उपाख्य भानू मामा याचा धाकटा भाऊ..! अतिशय विनम्र, प्रामाणिक अन् खूपच मेहनती असलेला प्रिय बाबासाहेब हा माझ्या स्वर्गीय वडिलांना विशेष प्रिय वाटायचा. त्याचं कारण, बाबासाहेब याचे असलेले वर्तन..! विशेष म्हणजे माझ्या स्व.वडिलांना नेहमी माझा जिवलग बालमित्र भानू मामा जगदाळे अन् बाबासाहेब जगदाळे या दोन्ही भावंडांविषयी सदैव अभिमान वाटायचा. त्याचं कारण नात्यांची असलेली जुनी विण..! भानुदास अन् बाबासाहेब जगदाळे या भावंडांचे स्व.वडील एकनाथ काका , माझे स्व. वडील अन् माझे सख्खे मोठे चुलते स्व. कचरू चंपतराव जाधव यांच्यात असलेलं स्नेह संबंधाचे नाते..! या जुन्या नात्याच्या विश्वात पुढील पिढी सहभागी झाली अन् नात्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे आत्मिक समाधान आम्हाला नक्कीच लाभले.


प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा शरीरयष्टीने काटक होता. त्यानं त्याच्या आयुष्याचा बाबतीत जे स्वप्न उराशी बाळगले होते त्यात त्याला यश प्राप्त झाले अन् आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी भारतीय सैन्यदलाचा मोठ्या अभिमानाने एक सक्षम घटक सहभागी झाला. प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे याने आपल्या आयुष्यातील भारतीय सैनिक म्हणून सेवा निभावताना ईशान्य भारतातील राज्ये अन् जम्मू काश्मीर मध्ये विशेष लक्षवेधक कामगिरी बजावली आहे. इ. स.१९९९ मध्ये ज्यावेळी कारगिल युद्ध सुरू झाले होते,त्यावेळी हाच आमचा प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हाती शस्त्र घेऊन आपल्या शत्रूच्या म्हणजेच पाकिस्तानच्या विरोधात उभा ठाकला होता. ज्यावेळी प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे याच्याशी त्याच्या सैन्यदलातील कार्याविषयी चर्चा निघते त्यावेळी ईशान्य भारताच्या राज्यातील सेवा अन् काश्मिर मधील सेवा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.


मी जो पर्यंत पालखेड येथे स्थायिक होतो तेंव्हा, जेंव्हा कधी प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा सैन्य नोकरीच्या सुट्टीवर घरी यायचा तेंव्हा बऱ्याचदा माझ्या स्व.वडिलांबरोबर निवांत बसून आमच्या पालखेड येथील घराच्या ओट्यावर बसून गप्पा करताना बघायचो. एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक अन् एक कर्तव्यनिष्ठ भारतीय सैनिक यांचं होणारं ते वैचारिक चिंतन बघण्याच्या एक विशेष अभिमान नेहमी जाणवायचा.


आमच्या पालखेड गावात पूर्वीच्या अन् माझ्या समकालीन पिढीत माझ्या परिचयातील काही फारच मोजकी माणसं होती अन् आहेत, जी की अजातशत्रू स्वभावाची होती अन् आहेत.त्यात आमचा प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे याचे नाव नक्कीच शीर्षस्थानी आहे.प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा कधीच कुणाच्याही निरर्थक बाबीत पडलेला नाही.कधीच कुणाला एका शब्दाने उभारलेला नाही. एखाद्या माणसाने त्यात स्री अन् पुरुष दोघेही आलेत, त्यांनी आपापल्या आयुष्यात अजातशत्रू स्वभावाची ओळख निर्माण करणे ही देखील खूप मोठी तपश्चर्या आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. आमच्या पालखेड गावात सध्याच्या पिढीत कुणी अजातशत्रू आहे का नाही हे माहीत नाही,कारण माझाच ,माझ्या जन्मगावाशी संपर्क मर्यादित झाला आहे.


मी माझ्या कौटुंबिक आयुष्यात कुटुंबाच्या बाबतीत जो विश्वास व्यक्त केला त्यात प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा एक अत्यंत विश्वासू पालखेडकर म्हणून माझ्या कुटुंबात नक्कीच आहे.


काल दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अन् शुभ मुहूर्तावर प्रिय बाबासाहेब जगदाळे याने बुलेट गाडी खरेदी केली. खरेदी केलेल्या गाडीचे पूजन करायला मागील पिढीपासून कौटुंबिक स्नेह असल्याने आम्हा उभयतांना बोलावून घेतले. गाडीचे पूजन केले अन् एका भारतीय सैनिकाच्या पूर्ण झालेल्या कृतीचे पूजन केल्याचे मनोमन सार्थक वाटले. यावेळी प्रिय बंधू बाबासाहेब याने मला सांगितले की,

" नंदू भाऊ, मला बुलेट विकत घ्यायची होतीच , पण ती १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अन् शुभ मुहूर्तावरच खरेदी करायची होती.ते माझे एक स्वप्न होते. वास्तविक माझ्या मुलाचा वाढदिवस येत्या काही दिवसांत आहे. मात्र मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी गाडी खरेदी करण्याऐवजी १५ ऑगस्ट हीच तारीख निवडली. मुलाचा वाढदिवस दरवर्षी येईल,पण आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुन्हा येणार नाही. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आम्हा सैनिकांना आम्ही प्राप्त केलेले मेडल अभिमानाने छातीवर लावण्याचा अधिकार असतो. इतर दिवशी असे करता येत नाही. म्हणून मी मनाशी पक्का निर्णय केला होता की, ' मी सैनिकी गणवेशात अन् छातीवर अभिमानाने अडकवलेली विविध मेडल लावूनच बुलेट गाडी खरेदी करणार, नसता नाही..! माझ्या इच्छेखातर छत्रपती संभाजीनगर येथील दुचाकी शोरुमवाल्यांनी फक्त एकट्या साठी दुकान उघडले अन्. मोठ्या सन्मानाने मला बुलेट दिली.आम्हा सैनिकांना हेच शुभ मुहूर्त असतात..!"


प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे याचं हे बोलणं ऐकून मी अन् माझ्या सारखी कित्येक भारतीय नागरिक जे की, स्वतः च्याच विश्वात रमून आनंद साजरा करतात ते खजील झाल्यासारखे वाटले.याउलट आमचा प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा खूप मोठ्या उंचीचा मला जाणवला. त्याने आप्तस्वकीयांपेक्षा भारतमातेच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्ताला सर्व प्रथम स्थान दिले. याचमुळे अशा लोकांना भारतमातेचे सैनिक म्हणतात याची मला त्याच क्षणी खात्री पटली अन् यांच्यामुळेच माझ्या सह इतर सर्व भारतीय नागरिकांचे अस्तित्व टिकून आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे.


सध्या प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा आपली सैनिकी सेवा नियत वयोमानानुसार निवृत्त होऊन भारतीय स्टेट बँकेत नोकरीला आहे. 


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १६/८/२०२२, श्रावण मास, मंगळवार

शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

अलबेला शाम - भाग क्रमांक : ५


 

आमचे गाव आमची माणसं ©️


अलबेला शाम - भाग क्रमांक: ५


" बकरीचे खरपूस दूध..!"


===============================


आम्ही माध्यमिक शाळेतील वयोगटात जो काही पराक्रम केला होता त्याचा कुठूनही संबंध जुळला तर तो या ना त्या कारणाने अभ्यासाशीच येऊन जुळत होता.आज आमच्या तत्कालीन माध्यमिक शाळेतील वयोगटातील कोणताही मित्र असा छातीठोकपणे सांगू शकणार नाही की, आम्ही म्हणजे फार काही सभ्य होतो म्हणून..! खेड्यात ज्या काही खोड्या करायच्या त्या आम्ही सर्व बालमित्र अन् वर्गमित्रांनी केल्या होत्या.अर्थात आम्ही हे करत असताना आमच्या चारित्र्यावर कुणाचा संशय निर्माण होईल किंवा आमचं नैतिक अधःपतन होईल असं काहीही गैरकृत्य केले नव्हते या विषयी आम्ही वर्गमित्र पुरेपूर काळजी बाळगून होतो. 


आम्हा तत्कालीन सर्व वर्गमित्रांच्या आयुष्याच्या वर्तुळाचा परीघ जर बघितला तर त्या परिघाच्या प्रत्येक वळणावर आमचा खूप जिवलग बालमित्र तथा वर्गमित्र शामकांत मुरलीधर शेळके हा नक्कीच भेटतो. त्याचं भेटणं आमच्यातील मित्रत्वाचा अंश पुन्हा पुन्हा आम्हाला नवसंजीवनी देत असायचा.शामचे आम्हा वर्गमित्रांना माध्यमिक शाळेतील वयोगटात भेटणं आमच्यात असणाऱ्या पौगडावस्थेतील वयोगटाला अजुन ऊर्जा देऊन जायचे.


आम्ही इ. स. मे १९८९ ते इ. स. मार्च १९९२ पर्यंत मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपापल्या अभ्यासिका मध्ये अभ्यास करायला एकत्र जमा व्हायचो. मी स्वतः, गणेश वाणी, विजू गायकवाड, बाळू कचरु घोडके , बाळू माळी, आण्णासाहेब कारभारी म्हस्के , शाम शेळके, पारसनाथ भोईटे, ज्ञानेश्वर मोकाटे, अजय काळे, शेख फारुख इत्यादी मित्रांनी आपापल्या अभ्यासिका मध्ये दररोज रात्री न चुकता एकत्र यायचो अन् अभ्यास करायचो.


आम्ही वर्गमित्र रात्री खूप उशिरा पर्यंत अभ्यास करायचो.ज्या दिवशी रात्री खूप उशिरा पर्यंत अभ्यास करायचा म्हंटल्यावर झोपेची समस्या निर्माण होणारच, त्याला आम्हीही अपवाद नसायचो. माणसाच्या झोपेला पळवून लावायला माणूस तऱ्हेतऱ्हेचे उपाय उपयोगात आणतो.आम्हीही रात्री उशिरा पर्यंत जागी असायचो त्यामुळं आम्हीही यावर उपाय शोधला होता अन् तो म्हणजे चहा..! अर्थात मी त्याही वेळी चहा पीत नसल्यामुळे माझ्यासाठी दूध असायचे..! अभ्यासिका मध्ये अभ्यास करणाऱ्या मित्रांपैकी गणेश वाणी याच्या घरी बकऱ्या होत्या.त्यावेळी गणेश वाणी याचे घर आमच्या पालखेड गावातील आमचे घर ज्या गल्लीत होते त्या गल्लीच्या दक्षिणेला शेळके पाटील यांची जी पडझड झालेली गढी होती तिच्याच बाजूला होते.प्रिय बालमित्र गणेश वाणी याच्या घराच्या समोरच बकऱ्या बांधलेल्या असायच्या.


आम्ही इयत्ता दहावीत असताना आण्णासाहेब म्हस्के याच्या अभ्यासाच्या खोलीत मी, आण्णासाहेब म्हस्के, शाम शेळके इत्यादी वर्गमित्र जमा झालो होतो.रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करायचा असल्याने झोप येऊ नये म्हणून मध्यरात्री चहा प्यायची आम्ही ठरवली. चहासाठी दुधाची सोय करावी लागणार होती.आम्ही सर्वानुमते असे नक्की केले की, गणेश वाणी याच्या घराच्या समोरील बाजूस ज्या बकऱ्या बांधलेल्या असतात त्यातील काही बकऱ्या नुकत्याच जणलेल्या होत्या.त्याच जणलेल्या बकऱ्यांचे दूध मध्यरात्री सगळीकडे सामसूम झाली की, दूध काढून आणायचे नक्की केले.अर्थात हे नियोजन करताना आमचा प्रिय बालमित्र गणेश वाणी तिथं उपस्थित नव्हता. त्यावेळी गणेश आमच्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यास करायला बसलेला होता. आम्ही नियोजन केल्यावर आमचा वर्गमित्र नंदकिशोर भाऊसाहेब जाधव याच्या माडीकडे गेलो,कारण त्याला विश्वासात घेतल्याशिवाय ही मोहीम फत्ते होणार नव्हती. त्यांचं मुख्य कारण, नंदकिशोर जाधव याचं घर जिथून बकरीचे दूध काढून ( चोरून ) आणायचे होते त्यापासून साधारणतः शंभर फुटापर्यंत होते. आणि नंदकिशोर जाधवला या नियोजनाची कल्पना द्यायचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या घराच्या पुढील बैठकीत लाईटवर असणारी शेगडी होती.जी आम्हाला चहा करायला उपयोगी येणार होती.आम्ही रात्री नंदकिशोर जाधव यांच्या घरी गेलो. माडीच्या पुढील बैठकीत कापूस एका बाजूला होता अन् त्याच्या बाजूला नंदू काहीतरी लिहायचे काम करत होता.आम्ही दरवाजा वाजवला ,नंदूने दरवाजा उघडला अन् म्हणाला..

" काय रे, नंदन काय झालं, तुम्ही समदेजण लई उशीरा आले,काय झालं..?"

आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत होतो.इतक्यात शाम शेळके नंदू जाधवला म्हणाला..

" हे, पहाय, आज आम्हाला लई उशिरा पर्यंत अभ्यास करायचा आहे.झोप येऊ नये म्हणून मध्यरात्री चहा करायचा आहे. तुझ्याकडे शेगडी असल्याने इथच चहा करू..!"


नंदकिशोर जाधव म्हणाला - " अरे, यात इचारायचे काय, करा ना मंग..!"

आम्ही पुन्हा एकामेकांच्या तोंडाकडे बघू लागलो.मला राहवलं नाही.मी लगेच त्याला म्हणालो..

" अरे, नंदू, चहा साठी जे दूध पाहिजे आहे, ते गणेश वाणी याच्या घराच्या समोरील बाजूस ज्या बकऱ्या बांधलेल्या आहेत त्यांचं ऐन मध्यरात्री गुपचूप काढून आणायचं आहे..!"

यावर नंदकिशोर जाधव पटकन म्हणाला - " अरे,मग काढू ना..! समदी सामसूम झाली की, दूध काढू अन् मस्तपैकी शेगडीवर चहा करू, तुला पण एक ग्लास भरून दूध गरम करून घेऊ अन् गणेशला दूध काढून आणल्यावर डायरेक्ट इथच बोलून घेऊन..!"


झालं , सगळं नियोजन ठरलं होतं.नंदकिशोर जाधव त्याच्या घराच्या कोपऱ्यावर उभा राहणार होता, कुणी तिकडून येतं की काय पाहायला. आण्णासाहेब म्हस्के, बाळू माळी हे, पोपटराव गुरू ऋषीपाठक यांच्या घराच्या कोपऱ्यावर उभा राहणार होते.मी अन् शाम शेळके बकरी दूध मोहिमेवर असणार होतो.आम्ही आपापल्या अभ्यासाच्या खोल्यांकडे निघून गेलो.मी माझ्या अभ्यासाच्या खोलीत आल्यावर बघितले तर गणेश वाणी अभ्यास करत होता. माझ्या मनात विचार येत होता की, आज गणेशच्याच बकऱ्यांचे दूध, त्याला न विचारता त्यालाच आम्ही पाजणार होतो.ही उघड उघड पांढरी शुभ्र चोरीच होती.  


मध्यरात्र झाली होती. मी गणेश वाणी याला म्हणालो.." यार, गणेश मला लई बोर होऊ राहिले ,मी म्हस्केच्या खोलीकडे एक चक्कर मारून येतो..!"

गणेश म्हणाला - " ये जाऊन,मी पण झोपतो आता..!" गणेशला काय माहित, आम्ही त्याच्याच बकरीचे दूध चोरून आणायला जाणार आहोत म्हणून..! ठरल्या प्रमाणे आम्ही नंदकिशोर जाधव याच्या घरी ऐन मध्यरात्री जमलो होतो.नंदकिशोर जाधव याच्या घरून मोठी चरवी ( पितळी भांडे ) शाम शेळके याने जवळ घेतली. नंदकिशोर जाधव म्हणाला ..

" थांब रे, मीच काढतो दूध, या बकऱ्या माझ्या गल्लीतल्या ओळखीच्या आहेत..!"

असं म्हणून नंदू जाधव दूध काढायला बकरिकडे गेला. मी अन् शाम शेळके त्याच्या घराच्या कोपऱ्यावर उभे राहिलो.नंदकिशोर जाधव याने एका बकरीचा एक पाय आपल्या गुडघ्याच्या खाली दाबला अन् बकरीच्या सडातून दूध काढायला लागला,पण ती बकरी त्याला काही दूध काढून देईना.अखेर नंदू जाधव आमच्याकडे परत आला.शाम शेळके याने चरवी हातात घेतली अन् तो बकरी दूध मोहिमेवर निघाला.नंदू जाधव त्याच्या घराच्या कोपऱ्यावर उभा राहिला.


शाम शेळके याने एका बकरीचा एक पाय आपल्या गुडघ्याच्या खाली दाबला अन् बकरीच्या सडातून दूध काढायला लागला. मी शाम शेळके याच्या बाजूला उभा राहिलो होतो. बकरी चिडीचूपपणे दूध काढून द्यायला लागली होती. मात्र दूध काढून घेत असताना दूध चरवीत पडत असताना चुर..चुर असा आवाज यायला लागला होता. शाम शेळके याने त्यावर एक युक्ती केली.ज्या डाव्या हातात चरवी धरली होती, त्या हाताचे चार बोटे करंगळी, अनामिका, मध्यमा अन् तर्जनी या बोटाना चरवीच्या आतील बाजूस घेऊन चरवी हातात धरली होती. उजव्या हाताच्या करंगळी, अनामिका, मध्यमा अन् तर्जनी या बोटांच्या मध्ये बकरीचे सड धरले अन् एका बाजूने अंगठ्याचा दाब देऊन दूध काढू लागला होता.दूध चरवीत पडताना चुर चुर असा आवाज येऊ नये म्हणून दुधाची धार चरवीच्या आतील बाजूस असलेल्या डाव्या हाताच्या बोटांवर दुधाची धार मारू लागला होता.आता दुधाचा चुर चुर आवाज येत नव्हता. मी नुसता शाम शेळके याच्या या अदभुत युक्तिकडे बघतच राहिलो होतो.दोन - तीन बकऱ्यांचे दूध काढून झाल्यावर चरवी भरली होती.आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नुकतेच काढलेले बकरीचे दूध नंदकिशोर जाधव याच्या घरी सुरक्षित ठेवले.


आम्ही सर्वजण आपापल्या अभ्यासाची खोलीकडे निघून गेलो. थोड्या वेळाने नंदकिशोर जाधव याच्या खोलीत सर्वांनी एकत्र जमायचे असे ठरले होते.चहासाठी साखर , चहा पत्ती नंदकिशोर जाधव त्याच्या घरचे तो देणार होता.मी माझ्या अभ्यासाच्या खोलीत आलो तर गणेश गाढ झोपी गेला होता.मी त्याला झोपेतून जागं केलं अन् त्याला म्हणालो..

" गणेश, चल आपल्याला नंदुच्या घरी चहा प्यायला जायचे आहे..!"

गणेश म्हणाला - " अरे,पण चहाला दूध कुठंय..?"

मी म्हणालो - " तू फक्त चल रे..!"

असं म्हणून गणेश वाणी व मी नंदकिशोर जाधव याच्या घरी आलो.तिकडून आण्णासाहेब म्हस्के,शाम शेळके, बाळू घोडके, बाळू माळी अगोदरच नंदू जाधवच्या घरी आलेले होते.


नंदकिशोर जाधव याने शेगडी सुरू केली होती.पातेल्यात खरपूस दुधाचा चहा उकळायला ठेवला होता.चहा उकळून झाल्यावर माझ्यासाठी मस्तपैकी एक ग्लास दूध गरम करणार होते. चहा तयार झाली होती. माझ्यासाठी दूध देखील गरम केले होते.चहा पिताना आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत बघत पित होतो.हसू येत होतं पण आम्ही प्रचंड संयम बाळगून होतो.इतक्यात गणेश वाणी याच्या तोडांतून वाक्य बाहेर पडले...

" चहा लईच भारी झाली रे..! एवढी खरपूस चहा मी पहिल्यांदाच पिऊ राहिलो..! "

आता मात्र आमच्या संयमाचा बांध फुटला होता.आम्ही हसायला लागलो होतो.गणेश वाणी आमच्याकडे पाहू लागला अन् म्हणाला...

" का,रे तुम्ही कम्हून हसू राहिले..?"

शेवटी नंदकिशोर जाधव गणेशला म्हणालाच..

" अरे, गणेश चहा खरपूस होणारच,कारण आम्ही चहासाठी दूध तुझ्याच बकऱ्यांचे चोरून आणले आहे..!"

हे वाक्य गणेशच्या कानी पडे पर्यंत त्याचा चहा पिऊन झाला होता.गणेश ताडकन खवळून उठला अन् त्याच्या सभ्य भाषेत आम्हा सर्वांना अनेक शब्दांचा प्रसाद दिला.माझ्याच बकरीचे दूध मला न विचारता चोरून आणून मलाच पाजू राहिले अशा अनेक वाक्यांनी गणेशने आपला राग व्यक्त केला होता.गणेशने खूप तनफन केली, पण आम्ही त्याला एकाही अक्षराने प्रत्युत्तर दिले नाही. कसे प्रत्युत्तर देणार..? शेवटी आम्ही त्याच्या बकऱ्यांचे दूध पिलो होतो.भले ते चोरून पिलो पण पिलो होतो.पिलेल्या दुधाला जगणारी मित्रमंडळी होतो आम्ही..!😊 अखेर गणेश वाणी शांत झाला अन् म्हणाला..

" जाऊ, द्या , पण इथून पुढं माझ्या बकऱ्यांचे दूध चोरू नका..!" आम्ही स्मित हास्य करून सहमती दर्शवली.


दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिय वर्गमित्र गणेश वाणी याच्या मातोश्री ज्यांना आम्ही आदराने बाई म्हणायचो त्या उठल्या अन् त्यांनी बकऱ्यांचे दूध काढायला सुरुवात केली.तर एकाही बकरीला दररोजच्या इतके दूध निघेना.त्यांनी संशय व्यक्त केला की, आमच्या बकऱ्यांचे दूध रात्री कुणी तरी चोट्यांनी काढले म्हणून..! तीर्थस्वरुप बाईंच्या बाजूलाच गणेश वाणी उभा होता. तो बाईंची तक्रार निमूटपणे ऐकत होता. तिकडून नंदकिशोर जाधव हा देखील त्याच्या घराच्या ओट्यावर उभा राहून निमूटपणे ऐकत होता. आम्हा मित्रांना नंदकिशोर जाधव याने थोड्या वेळाने हा सगळा प्रकार सांगितला होता.आम्ही सर्व बालमित्र या प्रसंगावर खळखळून हसलो होतो.


आम्ही वयाने मोठे होऊन आपापल्या आयुष्यात स्थिर झाल्यावर जेंव्हा कधी मी स्वतः, नंदकिशोर जाधव,गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के अन् शाम शेळके भेटायचो तेंव्हा तेंव्हा बकरीच्या खरपूस दुधाचा विषय नक्कीच निघायचा. त्या गतकाळातील आठवणी आठवून आम्हा मित्रात हास्याचा स्फोट नक्कीच व्हायचा.अर्थात आजही तो प्रसंग आम्हाला खळखळून हसायला भाग पाडतो.


दिनांक ३ जुलै २०२२, रविवार रोजी ज्यावेळी खूपच अत्यवस्थ अवस्थेत तब्येत असलेल्या आमच्या जिवलग बालमित्राला शाम शेळके याला ज्यावेळी मी, आण्णासाहेब म्हस्के अन् आमचे जेष्ठ बंधुतूल्य आदरणीय नारायणराव कुमावत सर ( शिक्षण विस्तार अधिकारी जालना )भेटायला गेलो होतो, त्यावेळी देखील गप्पांच्या ओघात शाम शेळके याने गणेश वाणी याच्या बकरीचे दूध कसे काढले होते हे हाताच्या बोटांचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते.त्यावर शाम शेळके सह आम्ही सर्वजण खळखळून हसलो होतो.


माणसाच्या आयुष्यात त्याच्या गतकाळातील आठवणी मग त्या खोडकर असो की, रंगीत त्या सर्व आठवणी आठवल्या की माणसाला खळखळून हसायला बाध्य करतात हेच खरं..! माणूस वार्धक्यात असो अथवा अंथरुणावर खिळून असो, गतकाळातील रम्य आठवणी दुःखावर काही वेळासाठी नक्कीच पांघरून घालायचं काम करतात. हा अनुभव मी, आमचा खूप जिवलग बालमित्र शाम शेळके याच्या दिनांक ३ जुलै २०२२ रोजीच्या भेटीच्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवला होता. अखेर याच आम्हा बालमित्रांच्या सुखद आठवणी माझ्या सोबत , आण्णासाहेब म्हस्के सोबत गप्पांच्या फडात रंगवून आमचा प्रिय बालमित्र शाम शेळके दिनांक ८ जुलै २०२२ ,शुक्रवार रोजी आमच्यातून कायमचा निघून गेला.😔 


विधात्याच्या घरी आमचा प्रिय बालमित्र शाम शेळके आमच्या गतकाळातील आठवणी नक्कीच तिथं कुणा एखाद्या नंदनला सांगत असणार अन् खळखळून हसत असणार..!


वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ७ ऑगस्ट २०२२, श्रावण मास, रविवार


क्रमशः

रविवार, २४ जुलै, २०२२

अलबेला शाम - भाग क्रमांक: ४



 


आमचे गाव आमची माणसं ©️


अलबेला शाम - भाग क्रमांक: ४


" अभ्यासिका करिता बल्पची चोरी..!"


===============================


माध्यमिक शाळेतील वयोगटात असताना आमच्या वर्गातील मित्रांचा अभ्यास तर सुरूच होता ,पण त्यासोबत खोड्या देखील सुरू होत्या.अर्थात त्याकाळी होणाऱ्या खोड्या या आमच्या वयोगटाचा अन् गरजेचा जाणवणारा दृश्य परिणाम होता असं आज प्रौढत्वाकडे झुकत चाललेल्या मनाला अन् शरीराला जाणवत राहतं.


अभ्यासाच्या खोल्या एकूण तीन होत्या.मी , गणेश वाणी अन् विजू गायकवाड आमची एक..! विजू गायकवाड हा काही दिवसांनी त्याच्या घरीच अभ्यास करायला गेला होता. दुसरी अभ्यासिका होती शाम शेळके,बाळू कचरू घोडके अन् बाळू माळी यांची..! तिसरी अभ्यासिका होती आण्णासाहेब कारभारी म्हस्के, ज्ञानेश्वर मोकाटे यांची..! अभ्यासिकेत अभ्यास करणारे आम्ही कधीही आमच्या अभ्यासाच्या खोलीत बल्प विकत घेतला नाही.त्यावेळी पिवळ्या रंगाचा प्रकाश पडणारा साठ किंवा शंभर वॅटचा बल्प सर्रास वापरले जायचे. आमची अभ्यासाची खोली,आमच्याच गल्लीत होती.आमच्या अभ्यासाच्या खोलीत असणारा लाईट, खोलीच्या लगतच असणाऱ्या मुलमुले कुटुंबाच्या घरातून भिंतीला छिद्र पाडून घेतलेली होती.एका महिन्यासाठी दरमहा पाच रु. आम्ही मित्र  मुलमुले मामींना द्यायचो.


आमच्याच गल्लीत आमच्या घराच्या समोर एक विद्युत खांब होता.माझे वडील त्या खांबाच्या खालील बाजूला घरातून वायर घेऊन एक बल्प लावायचे.गावातील ग्रामपंचायत गल्लीतील खंब्यावर बल्प सहसा लावतच नसे, त्यामुळं घरातून लाईट आणून वायर द्वारे तो गल्लीत उजेड पडेल या हेतूने बल्प लावल्या जायचा. आमच्याच गल्लीत कोपऱ्यावर माझे चुलत्याचे घर होते. माझे चुलते तत्कालीन पालखेड गावचे पोलीस पाटील होते.माझे चुलते त्यांच्या घराच्या समोरच राहणाऱ्या पोपटराव ऋषीपाठक गुरू यांच्या घरातून लाईट, वायर घेऊन गुरूंच्या घराच्या कोपऱ्यावर बल्प लावायचे.


आम्हा मित्रांच्या अभ्यासिका मधील कुणाच्याही खोलीतील बल्प शॉट झाला की, शाम शेळके याची लगेच आठवण आम्हा मित्रांना यायची.अर्थात आम्हीही त्यात सहभागी असायचो,पण शाम शेळके हा खूप धाडसी असल्याने त्याची आठवण यायची अन् पुढील नियोजनाला सुरुवात व्हायची. सहसा पुढील नियोजन बैठक रात्री व्हायची ती प्रिय वर्गमित्र नंदकिशोर भाऊसाहेब जाधव याच्या घरी किंवा शाम शेळके यांच्या अभ्यासाच्या खोलीत व्हायची..! ज्याच्या अभ्यासाच्या खोलीतील बल्प शॉट झाला आहे त्याच्या खोलीसाठी बल्प कसा मिळवायचा याचं बैठकीत चिंतन, मनन अन् नियोजन व्हायचे. असेच एकदा शाम शेळके यांच्या अभ्यासाच्या खोलीतील बल्प शॉट झाल्यामुळे त्याच्याच खोलीत नियोजन सुरू झाले.मी, गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के, बाळू माळी, बाळू घोडके इत्यादी आम्ही तिथं रात्री एकत्र जमलो. शाम शेळके म्हणाला..

" का, रे..नंद्या ,दादा ( माझे वडील) तुमच्या घराच्या बाहेरील लाईटच्या खांब्यावर बल्प लावत्या ना..रे..!"

मी " हो..!" म्हणालो. पुढे काय होणार याचा मला अंदाज आला होता.लगेच शाम शेळके म्हणाला..

" मंग, तुमचाच बल्प मध्यरात्री काढून आणु..!"

मी म्हणालो - " अरे शाम्या,  मी नियोजन करायच्या बैठकीत हाये अन् तू आमचाच बल्प रात्री काढून आणायचा म्हणतो, बावळट हाये का तू..?"

शाम म्हणाला - " चूप रे , नको शहाणपणा शिकू, चूप बैस..! फक्त दादांना ( माझ्या वडिलांना ) जाग यायला नको.नाहीतर तुझं म्हातारं लई डेंजर हाये भो, आपली लई धुलाई करील..!"  बाकीच्या मित्रांनी शामला सहकार्य करायचे ठरवले त्यामुळे मी चिडीचूप झालो.शाम शेळके म्हणाला..

" ठरलं तर मग, हे पहाय नंद्या, बरोबर रात्री बारा ते एकच्या सुमारास मी, म्हस्क्या ( आण्णासाहेब म्हस्के ) बाळ्या ( बाळू माळी ) अन् हा बाळ्या ( बाळू घोडके ) तुमच्या खोलीकडे येतो. गण्या ( गणेश वाणी ) तू खोलीतच थांब, तू बाहेर येऊ नको. बाळ्या ( बाळू माळी) अन् म्हस्क्या तूम्ही पोपट गुरूच्या घराच्या कोपऱ्यावर थांबा..! बाळ्या ( बाळू घोडके ) अन् नंद्या तुम्ही दोघेजण सुंदर शेठ जैन यांच्या घराच्या कोपऱ्यावर थांबा. नंद्या, मी तुझ्या घराच्या समोरील खांबावर  हळूच चढत चढत वर जाईल. तुम्ही जिथं आहात, तिकडून कुणी येताना दिसलं रे  दिसलं की, तुमच्या हातातील लाल बॅटरीचा उजेड माझ्याकडे करा.मी लगेच खाली उतरून नंद्याच्या खोलीत पळून जाईल..!"


शाम शेळके याने केलेलं नियोजन ऐंकुन मी पार थिजून गेलो होतो,कारण मी माझ्याच घरी बल्प चोरणाऱ्या मोहिमेत सहभागी होणार होतो.स्वतः ,स्वतच्या घरी चोरी  करणाऱ्या अतिशय दुर्मिळ माणसांच्या पंक्तीत मी स्वतः ला सुशोभित होताना बघत होतो. मला सगळ्यात मोठा धाक पडला होता तो दादांचा, म्हणजेच माझ्या वडिलांचा..! माझ्या वडिलांचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय अन् करारी होता. पण मित्रांच्या पुढे माझी कोणतीच दाळ शिजली नाही. जसे नियोजन केले होते त्यानुसार आम्ही आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणी मध्यरात्री जाऊन उभा राहिलो होतो.


मध्यरात्री सुराशे यांच्या दगडी जोत्यावर बसलेला शाम हळूच दबक्या पावलांनी आमच्या घराच्या समोरील खांबावर हळूच चढला अन् हळूच बल्प काढला.गल्लीत पूर्ण अंधार झाला होता.आम्ही सर्वजण आपापल्या ठिकाणावरून आमच्या अभ्यासाच्या खोलीत जमा झालो होतो.मला पार घाम फुटला होता.माझ्याच साक्षीने, मीच पहारा देऊन , माझ्याच डोळ्यासमोर आमच्याच बल्पची चोरी झाली होती.


दुसऱ्या दिवशी, दादांच्या लक्षात आले की, आपल्या घरासमोरील खांबावरील बल्प कुणीतरी चोरून नेला आहे म्हणून. माझे वडील बल्प चोरी गेलेल्या होल्डर कडे बघत होते अन् मी मुकाट्याने त्यांच्या बाजूला उभा राहून त्यांच्याकडे बघत होतो.


असाच पुन्हा दुसऱ्यांदा प्रिय बालमित्र आण्णासाहेब म्हस्के याच्या खोलीतील बल्प शॉट झाला होता.त्यावेळी जो बल्प मध्यरात्री गुपचूप काढून घेतला होता तो होता माझ्या चुलत्याने, पोपट गुरूंच्या घराच्या कोपऱ्यावर लावलेला तो..! तिथला बल्प चोरीला गेला की, माझे चुलते विचारात पडायचे की, आपला बल्प कोण चोरून नेत असेल..? असेच  बल्प आम्ही ज्या ज्यावेळी आमच्या खोलीतील शॉट झाले होते त्या त्यावेळी काढून आणलेले होते. सर्वात जास्त बल्प आम्ही काढले होते ते स्व.सुभाष शेठ छाजेड यांच्या दुकानाच्या बाहेर लावलेले. अर्थात या मोहिमेचे नेतृत्व असायचे ते आमचा प्रिय बालमित्र शाम शेळके याच्याकडे.


बल्पची चोरी आम्ही केली होती, ती कृती चूकच होती. या गोष्टी चुकीच्या आहेत ,हे त्या वयोगटात  आमच्या लक्षात येत नव्हतं, किंबहुना तो आमच्याकडून होणारा तो खोडसाळपणाच होता. आम्हा मित्रांच्या अभ्यासिका मधील काही मित्रांची आर्थिक परिस्तिथी मध्यम ते बिकट असायची ,त्यामुळं आम्हाला असे वाटायचे की, आपण अभ्यास करण्यासाठीच बल्पची चोरी करतोय, त्यात चुकीचे काहीच नाही अशी आमच्या त्या काळातील पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटाची धारणा होती.


काळाच्या ओघात मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो.शाम शेळके हा छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे महानगरपालिका अंतर्गत पाणी पुरवठा करायला लागला.बाळू माळी हा शिक्षक झाला.गणेश वाणी हा डॉक्टर झाला.आण्णासाहेब म्हस्के हा एमआयडीसी बजाजनगर ( औरंगाबाद ) येथे सुपरवायझर म्हणून नोकरीला लागला.विजू गायकवाड हा वैजापूर येथे नामांकित पत्रकार झाला.बाळू कचरू घोडके हा वाळूज - पंढरपूर येथील भाजी मंडई भाजीपाला संघटनेचा अध्यक्ष झाला. नंदकिशोर जाधव हा राजकीय क्षेत्रात आपलं करियर करू लागला.मी नोकरीला लागल्यावर  असेच एकदा मी पालखेड येथे स्थायिक असताना  शाम शेळके माझ्या घरी आला होता.माझे स्व. वडील बाहेरील ओट्यावर बसलेले होते. मीही बाजूलाच बसलेलो होतो. कित्येक वेळ त्यांचा गप्पांचा फड रंगला होता.ओघाओघात शामने माझ्या स्व.वडिलांना सांगून टाकले की, आम्ही मित्रांनी तुम्ही लावलेला बल्प चोरला होता म्हणून..! माझे वडील रागावले नाही. फक्त त्यांना याचे नवल वाटले की, एवढ्या बेमालूमपणे तुम्ही बल्पची चोरी केली ते ऐकून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.माझे वडील त्यावेळी एक वाक्य शाम शेळके अन् मला  म्हणाले होते  की, " जाऊ द्या, तुम्ही अभ्यासासाठी बल्पची चोरी केली, पण इथून पुढं असं काहीही करू नका..! चूक ती चूकच असते..! " माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी माझ्या सर्व वर्गमित्रांना, बालमित्रांना कधीच परकं समजलं नाही.माझे सर्व बालमित्र माझ्या स्व.वडिलांचे मित्रच होते.वास्तविक माझे स्व.वडील अतिशय शिस्तप्रिय अन् करारी व्यक्तिमत्व होते,पण माझ्या मित्रांच्या बाबतीत ते नेहमी हळुवार मायेनं वर्तन करणारे नाते निभायचे. विशेषतः शाम शेळके, विजू गायकवाड,डॉ.गणेश वाणी आण्णासाहेब म्हस्के यांच्या बाबतीत..!


आमच्या पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटातील या खोडकर आठवणी आठवल्या की, आमच्या धाडसी मित्राची म्हणजेच स्वर्गीय शामकांत मुरलीधर शेळके याची खूप खूप आठवण येते.शाम शिवाय आम्हा सर्व वर्गमित्रांचे वृंदावन सूने सुने झाले आहे.शाम शेळके हा आम्हा सर्व मित्रांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होता. नियतीने याच आमच्या जिवलग वर्गमित्राला दिनांक ८/७/२०२२, शुक्रवार रोजी आमच्यातून कायमचे हिरावून घेतले.मात्र या जिवलग मित्राच्या आठवणी आम्हा सर्व मित्रांच्या आयुष्यात आम्ही जो पर्यंत हयात आहोत तो पर्यंत त्या सर्व आठवणी संजीवन असतील यात तिळमात्र शंका नाही..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४/०७/२०२२, रविवार


क्रमशः

गुरुवार, २१ जुलै, २०२२

आभासी विश्वातील वास्तववादी मित्र, शिरीष भाऊ..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


आभासी विश्वातील वास्तववादी  मित्र, शिरीष भाऊ..!


===================================


आभासी विश्वात पण ,आपलं कुणीतरी भेटतं, फक्त आपलं त्याच्याशी भेटणं हे आभासी का असेना,पण त्याला वास्तवाची किनार असावी लागते. त्याच आभासी विश्वात आपल्या सारखं , साध्या सरळ पद्धतीने आयुष्य जगणारं ज्यावेळी कुणीतरी भेटतं तेंव्हा आभासी विश्वात देखील आपलं कुणीतरी आहे याची जाणीव होते. याच आभासी विश्वातील फेसबुक या माध्यमाचा वापर आपण कसा अन् कुणाच्या सोबत करतो त्यावर या विश्वातील नात्याची गुंफण तयार व्हायला सुरुवात होते. फेसबुक या आभासी विश्वात मी इ. स.२०१२ पासून कार्यरत आहे.फेसबुकचा योग्य वेळी अन् माझ्या दृष्टीने योग्य भासणाऱ्या फेसबुक मित्रांच्या सहवासात वावरणं मला आवडते. फेसबुक माध्यमावर वावरत असताना असाच एक प्रेमळ मित्र लाभला. त्यांचं नाव आदरणीय शिरीष भाऊ पडवळ..!


शिरीष भाऊ दिगंबर पडवळ..! ( राहणार - पुणे )

एकदम मस्त माणूस..! आयुष्यावर निस्सीम प्रेम करणारा एक अवलिया माणूस. आयुष्यावर निस्सीम प्रेम करत करत याच आयुष्याच्या प्रवासात सतत भटकंती करत असतो.मी मागील एका लेखात म्हंटले  होते की, प्रत्येक माणूस हा भटका आहे,फक्त प्रत्येकाची भटकी अवस्था भिन्न भिन्न असते, इतकेच..! शिरीष भाऊ पडवळ हे सध्या फार्मासिस्ट म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल,खडकी,पुणे येथे कार्यरत आहे. निसर्गावर अन् विद्यार्थ्यावर निस्सीम प्रेम करणारा एक अवलिया निसर्गवेडा , माणूसवेडा, माणूस अन् एक प्रांजळ मनाचा शिक्षक..! बऱ्याच वाचकांना प्रश्न पडला असेल की, शिरीष भाऊ तर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरी करत आहेत अन् मी त्यांना शिक्षक का म्हणतोय..? शिरीष भाऊ पडवळ यांनी आपली आरोग्य विभागातील नोकरी सांभाळत विविध शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे.


शिरीष भाऊ यांची अन् माझी फेसबुक मैत्री झाली अन् काळाच्या ओघात प्रिय शिरीष भाऊ पडवळ माझ्या ब्लॉगवरील लेखांच्या प्रेमात पडले अन् मीही त्यांच्यातील असणाऱ्या निसर्गवेड्या पर्यटकाच्या अन् प्रांजळ मनाच्या शिक्षकाच्या प्रेमात पडलो. प्रेम हे असेच असते.त्याला नेहमी दोन बाजू असतात.त्या जर एकमेकांकडे आकर्षित होणाऱ्या अन् पूरक असतील तर मानवी नात्याची वेल खुप सुंदर प्रकारे बहरते असे माझे ठाम मत आहे.अर्थात या मानसिक अवस्थेला शिरीष भाऊ अन् मीही अपवाद नव्हतो.


आम्हा दोघांचा फेसबुक या आभासी विश्वात बऱ्याच दिवसांपासून आभासी संबंध होताच,पण तो आभासी संबंध प्रत्यक्षात आला तो दिनांक १८ जुलै २०२२ अन्  १९ जुलै २०२२ रोजी..! यापैकी दिनांक १९ जुलै २०२२ मंगळवार रोजी, प्रिय शिरीष भाऊ पडवळ यांनी माझ्या सध्याच्या माध्यामिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, गणित, बुध्दीमत्ता इत्यादी घटकांवर सखोल मार्गदर्शन केले.फक्त आणि फक्त विद्यार्थांच्या प्रेमापोटी अन् आम्हा दोघांतील असलेल्या निव्वळ प्रेमळ नात्यापोटी शिरीष भाऊ, आपण दूर असणाऱ्या आमच्या शाळेत आलात.सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप आनंद वाटला. पाऊस होता, रस्त्याचे काम सुरू होते, तरी शिरीष भाऊ, स्वतः ची चार चाकी गाडी घेऊन माझ्या सध्याच्या शाळेत आले.यात त्यांचं निरपेक्ष प्रेम जाणवलं , दुसरं काहीही नाही..!


फेसबुक सारख्या आभासी विश्वात देखील, आपल्याला आपल्या सारखं घरगुती कुणीतरी भेटावं याची नेहमी अपेक्षा असायची.ती प्रिय शिरीष भाऊ पडवळ ( राहणार - पुणे ) यांच्या रूपाने पूर्ण झाली.शिरीष भाऊ, माझ्या छोट्या घरी दोन दिवस मुक्कामी होते.या मुक्कामात असे कधीच वाटले नाही की, आपण एका तात्पुरत्या ओळखीच्या व्यक्तीच्या सहवासात दोन दिवस व्यतीत केले म्हणून..! सध्या शिरीष भाऊ यांचे वय अठ्ठावण्ण वर्षे आहे. त्यांची दिनचर्या अन् आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे ते अन् अजूनही अगदी ठणठणीत वाटतात. वाटतात नव्हे आहेच..!  शिरीष भाऊ यांचा मुलगा अमेरिकेत उच्च पदावर नोकरीला आहे. आपल्या मुलाकडून कोणतीही अपेक्षा न बाळगणारे एक स्वावलंबी व्यक्तिमत्व म्हणून मला शिरीष भाऊ विषयी अजुन नितांत आदर वाढला.


दिनांक २०/७/२०२२ बुधवार रोजी सकाळी प्रिय शिरीष भाऊ यांना आपल्या संस्कृतीनुसार पूजन करून योग्य तो सन्मान देऊन सन्मानपूर्वक पुन्हा त्याच्या गावी जाण्यासाठी निरोप दिला.प्रिय शिरीष भाऊ पडवळ, तुमच्या सारखी भावप्रधान अन् जाणीव असणारी माणसं , घरी आल्यावर घरात आपलंच कुणीतरी असल्याची जाणीव होते.ज्याचा अनुभव आम्ही घेतला.


प्रिय शिरीष भाऊ पडवळ म्हणजे नियतीचे रक्तविरहीत नात्यातील असणारे सुंदर नाते म्हणजेच खूप संवेदनशील मित्र होय..! अशीच माया कायमस्वरूपी असू द्या हीच प्रेमळ अपेक्षा..! 🌹🙏🏻


ता.क. - प्रिय शिरीष भाऊ यांनी त्यांच्या आयुष्यावर ' मास्तरचं पोर ' हे पुस्तक लिहिलं आहे.मला त्यांनी ते पुस्तक सप्रेम भेट दिले आहे.


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२/०७/२०२२, शुक्रवार

शनिवार, १६ जुलै, २०२२

अलबेला शाम - भाग क्रमांक: ३






आमचे गाव आमची माणसं ©️

अलबेला शाम - भाग क्रमांक: ३

" फुटाण्याच्या चोरीचे आम्ही मुक साक्षीदार..!"

====================================

माध्यमिक शाळेतील वयोगटात आम्ही सर्व बालमित्र स्वर्गसुख अनुभवत होतो. शाम शेळके हा जरी आमच्या पालखेड येथील घरापासून गावातच दूर राहत होता ,तरी आमच्या मधील मैत्रीने ते अंतर कधीच दूर केले होते. मी, विजू  गायकवाड अन् गणेश वाणी ज्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यास करायचो त्या खोलीत आम्ही अन् आमचे बालमित्र अभ्यास झाला की,कधीमधी रात्री जमायचो.

आम्ही इयत्ता दहावीत असताना आमच्या वर्गातील सर्वात शांत अन् समंजस असलेला  आमचा प्रिय बालमित्र गणेश वाणी याने एकदा त्याच्या घरून रात्रीच्या वेळी खायला फुटाणे आणले होते.काही फुटाणे खाल्ले अन् उरलेले थोड्यावेळाने खाऊ या हेतूने गणेशने ते फुटाणे आमच्याच अभ्यासाच्या खोलीत गोधडीच्या खाली कोपऱ्यात  ठेवून दिले.काही वेळाने साधारणतः रात्री नऊच्या वेळी इतर अभ्यासाच्या खोलीत राहणारे मित्र जसे की, शाम शेळके अन् आण्णासाहेब म्हस्के त्यांचा अभ्यास झाल्यावर गप्पा मारायला आमच्या अभ्यासाच्या खोलीत आले होते.गणेश वाणी याने फुटाणे खायला आणलेले आहेत अन् ते गोधडीच्या खाली ठेवलेले आहेत, हे आण्णासाहेब म्हस्के याला कसे काय माहित झाले ,माहीत नाही,पण आण्णाने हळूच ,गुपचूप फुटण्याची पुडी घेतली अन् मस्तपैकी आमच्या अभासाच्या खोलीच्या समोर असणाऱ्या सुराशे पाटील यांच्या दगडी जोत्यावर खात बसला. शाम शेळके याला , आण्णासाहेब म्हस्के याने गुपचूप अर्थात चोरून घेतलेले फुटाणे खायचे नसल्याने तो सूराशे यांच्या जोत्यावर बाजूला बसला होता. थोड्यावेळाने गणेश वाणी याला , त्याने आणलेल्या फुटाण्याची आठवण आली अन् आता ते फुटाणे खावे या हेतूने त्याने फुटाणे ठेवलेल्या  अंथरलेल्या गोधडीच्या खाली  हात घातला. मी माझा अभ्यास करत बसलेलो होतो.गणेश अंथरलेल्या गोधडीला पुन्हा पुन्हा वर खाली करून बघू लागला , पण त्याला काही फुटाण्याची पुडी सापडेना.गणेशचे लक्ष आमच्या अभ्यासाच्या खोलीच्या बाहेर गेले.त्याला समोरील दगडी जोत्यावर आण्णासाहेब म्हस्के अन् शाम शेळके हे दोघेजण ऋषिपाठक गुरू यांचा जो वाडा होता त्या बाजूला तोंड करून बसलेले दिसले.

गणेशला पक्का संशय आला होता की, माझे फुटाणे या दोघांनीच लंपास केले आहे.गणेश हळूहळू खोलीच्या बाहेर आला अन् जोत्याच्या दिशेने चालला. मीही त्याच्या मागोमाग चाललो होतो. त्याला तिथं आण्णासाहेब म्हस्के हा मस्तपैकी फुटाणे खाताना दिसला.शाम शेळके बाजूला बसलेला होता.गणेशला कधीच राग येत नव्हता,पण त्याला त्यावेळी इतका राग आला होता की, त्याने मोठ्याने आण्णासाहेब म्हस्के याला बोलायला सुरुवात केली.शाम शेळके नुसता डोळे वटारून पाहत होता.मी अन् शाम शेळके सज्जन असल्याचा आव आणून समजूतदारपणा असल्याची भाषा वापरू लागलो होतो.गुपचूप अन् अचानकपणे गणेशने येऊन आण्णासाहेब म्हस्के वर सुरू केलेल्या शब्दांच्या भडीमाराने आण्णासाहेब म्हस्के पुरता गडबडून गेला होता.आण्णासाहेब म्हस्के याने जे तिथून धूम ठोकली तो सरळ आमच्या घराच्या बाजूला असणाऱ्या बोळीत शिरला अन् गणेश वाणी सरळ पळत जैन गल्लीत आण्णासाहेब म्हस्के याला पकडायला धावत गेला होता. आण्णासाहेब म्हस्के हा बोळीत शिरून नंतर त्याच ठिकाणी असणाऱ्या  नळाच्या पाण्याच्या खड्ड्यात लपून बसला होता, हे मी अन् शाम शेळके आम्ही दोघांनी बघितले होते. अंधाराचा फायदा घेऊन आण्णासाहेब म्हस्के हा नळाच्या पाण्याच्या खड्ड्यात लपून बसला होता.गणेशने त्याला गल्लीत शोधले पण म्हस्के काही सापडला नाही.वास्तविक मला अन् शाम शेळके आम्हाला माहीत होते की, ज्या नळाच्या पाण्याच्या खड्ड्यात आण्णासाहेब म्हस्के लपून बसलेला आहे म्हणून..! त्याच खड्ड्याच्या बाजूला उभा राहून गणेश वाणी,सापडत नसलेल्या आण्णासाहेब म्हस्के याला रागारागाने बोलत होता. इकडे मला अन् शाम शेळकेला हसू येत होते. ज्याला गणेश वाणी शोधत होता, तो आण्णासाहेब म्हस्के,गणेश वाणी उभा असलेल्या पाठीमागील खड्ड्यातच होता.पण आम्ही शेवटपर्यंत गणेश वाणी याला सांगितलेच नाही की,तू ज्याला शोधतोय तो तुझ्या पाठीमागेच आहे म्हणून..!

अखेर गणेश वाणी वैतागून अभ्यासाच्या खोलीत आला अन् झोपी गेला.मी अन् शाम शेळके त्या नळाच्या पाण्याच्या खड्ड्याकडे गेलो अन् आण्णासाहेब म्हस्के याला गुपचूप त्याच्या अभ्यासाच्या खोलीकडे जायला सांगितले. शाम शेळके देखील त्याच्या अभ्यासाच्या खोलीकडे निघून गेला अन् मीही आमच्या अभ्यासाच्या खोलीत येऊन झोपी गेलो.

आम्हा बालमित्रांना, आमच्या प्राथमिक अन् माध्यमिक शाळेतील वयोगटात असताना जे आयुष्य लाभले होते ते नियतीने आम्हाला आयुष्यात दिलेले सर्वोत्तम वरदान होते.आम्ही सर्व वर्गमित्रांनी तत्कालीन आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतला होता.तो गतकाळातील लाभलेला ,मिळालेला आनंद, एकमेकांच्या खोड्या आज आठवल्या की, प्रौढत्वाकडे झुकत चाललेले आमचे शरीर अन् मन अजुन चिरतरुण होत जाते.खंत फक्त याची वाटते की, या सगळ्या आठवणी ज्या बालमित्राच्या साक्षीने झाल्या, तो शाम मुरलीधर शेळके आज हयात नाही..!😔

वंदे मातरम्..!

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १६/०७/२०२२, शनिवार.

क्रमशः

 

मंगळवार, १२ जुलै, २०२२

" ते माझे गुरू..!"

 



चिंतन ©️


" ते माझे गुरू..!"


===============================


ज्यांनी ज्यांनी मला माझ्या आयुष्यात वाईट अनुभव दिले ते माझे गुरू ,कारण त्यांनी मला माणसं ओळखायला फुकटमध्ये शिकवलं..!


ज्यांनी ज्यांनी मला माझ्या आयुष्यात ज्ञान दिले ते माझे गुरू, कारण त्यांनी  माझ्या आयुष्याला समज दिली..!


जे कुणी,  माझ्या आयुष्यात, मी ऐन संकटात असताना  माझ्या मदतीला धावून आले ते माझे गुरू, कारण, त्यांच्यात त्या परम पित्या परामात्याचं रूप मला जाणवलं..!


जे कुणी नाहक कारणांनी या सुंदर आयुष्याची राख रांगोळी करून घेतात ते माझे गुरू, कारण त्यांनी त्यांचं आयुष्य ज्या नाहक कारणांनी उध्वस्त केले ते बघून मी वेळीच सावध झालो..!


ज्यांनी कुणी माझ्या आयुष्यात मायेचा अंकुर फुलविला ते माझे  गुरू, कारण ते  आई - वडील होते..! 


ज्यांनी कुणी माझ्या आयुष्यात मैत्रीचा अंकुर फुलविला ते माझे गुरू, कारण त्यांनी रक्तविरहित नात्यात विधात्याचा अंश असतो याची अनुभूती मला करून दिली..!


ज्यांनी कुणी माझ्या आयुष्यात वैचारिक, अध्यात्मिक शक्ती दिली ते माझे गुरू कारण त्यांच्यामुळे खूप थोडी फार मानसिक शांती लाभली..!


आणि...

सजीव कधी कधी चुकू शकतात, पण निर्जीव भासणाऱ्या ध्वजात चूक होत नाही,कारण तो ध्वज सतत आपल्याला प्रेरणा देत असतो,जगण्याची, सतत आयुष्यात फडफडण्याची, उभा राहण्याची, आपला दैदिप्यमान इतिहास , त्यातील प्रेरक शक्तींना आठवून त्यांच्यामुळे आज माझ्यातला मी उभा आहे याची जाणीव सतत होत असते..! ते ध्वज देखील माझे गुरू आहेत,कारण तो राष्ट्रध्वज आहे, तो भगवा ध्वज आहे..! 

🇮🇳 🙏🏻 🚩


वंदे मातरम्..!


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १३/७/२०२२,बुधवार, गुरू पौर्णिमा.

शनिवार, ९ जुलै, २०२२

अलबेला शाम - भाग क्रमांक: २


 


आमचे गाव आमची माणसं ©️


अलबेला शाम - भाग क्रमांक: २


" आमच्या अभ्यासिका ,एक रम्य ठिकाण..!"


===============================


शाम शेळके अन् आमच्या मैत्रीचा वेल बहरत चालला होता.माध्यमिक शाळेतील वयोगट हा तसा खूपच संवेदशील असतो.आम्हीही त्याला अपवाद नव्हतो.आमच्या पालखेड गावात केवळ आमचीच वर्गमित्रांची बॅच अशी होती, ज्यातील आम्ही वर्गमित्रांनी अभ्यासाच्या अभ्यासिका केलेल्या होत्या. आमच्या अभ्यासिका आलिशान अजिबात नव्हत्या.निव्वळ मातीची अन् धाब्याची घरे होती. त्यांना दर आठवड्याला शेण गोळा करून सारवून घेत होतो.पालखेड गावात आमच्या वर्गमित्रांच्या साधारणतः एकूण तीन अभ्यासिका होत्या.एक अभ्यासिका आमचेच एक जुने मातीचे घर होते.ते आमच्याच गल्लीत होते.त्यात मी , विजू वैजिनाथ गायकवाड अन् गणेश जगन्नाथ वाणी अभ्यास करायचो. दुसरी अभ्यासिका ही नंदकिशोर भाऊसाहेब जाधव याच्या माडीच्या समोर थोरात पाटील यांचं मातीचं घर होते.त्यात शाम शेळके, बाळू माळी अन् तिसरा सदस्य नेहमी बदलत असायचा.कधी तो बाळू कचरू घोडके असायचा तर कधी शेख फारुख तर कधी अजुन इतर कुणी..! तिसरी अभ्यासिका होती आण्णासाहेब कारभारी म्हस्के याच्या घराच्या बाजूला असणारी त्यांचीच एक खोली..! त्यात आण्णासाहेब म्हस्के, ज्ञानेश्वर मोकाटे असायचा. या अभ्यासिका मध्ये देखील तिसरा सदस्य नेहमी बदलत असायचा.कधी तो अजय काळे ( गुरु ) असायचा तर कधी अजुन इतर कुणी..! आम्ही वरील उल्लेखित वर्गमित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळ्या अभ्यासाच्या खोल्यात दररोज रात्री मुक्कामी अभ्यास करायला यायचो. फक्त आमचा बालमित्र नंदकिशोर भाऊसाहेब जाधव हाच एकटा त्याच्या माडीच्या खालच्या मजल्यावर अभ्यासाला असायचा.


आमच्या अभ्यासाच्या खोल्यांनी आम्हाला आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायला शिकवला.आमच्या अभ्यासाच्या खोल्यांनी आम्हा वर्गमित्रांमध्ये मैत्रीची घट्ट वीण तयार केली होती. रात्री खूप उशिरा पर्यंत अभ्यास करून झाला की, आमच्या सर्व अभ्यासिका मधील मित्रांचे भेटण्याचे ठिकाण ठरलेले असायचे अन् ते म्हणजे नंदकिशोर जाधव याच्या खोलीत.आज ज्यात ठिकाणी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्याच ठिकाणी आम्ही मित्र बऱ्याचदा रात्री अभ्यास झाल्यावर गप्पांचा फड रंगवायचो. प्रिय बालमित्र नंदकिशोर जाधव यांचे जे माडीचे घर होते, त्यातील खालच्या मजल्यावर असणाऱ्या घरातील ओट्यावर सकाळीच नंदू अंघोळ करून रेडी व्हायचा. घरातील ज्या ओट्यावर नंदू अंघोळ करायचा ते पाणी त्याच ओट्यात जिरून जायचे.नंदू भाऊसाहेब जाधव याची दररोज घराच्या आतल्या बाजूला असलेल्या ओट्यावर होणारी अंघोळ आमच्या दृष्टीने एक आश्चर्यच असायचे,कारण अंघोळ झाल्यावर काही क्षणातच ओट्यावरील पाणी पूर्णपणे जिरून जायचे.जसं काय या ठिकाणी अंघोळ कुणी केलीच नाही..! 


आम्ही इयत्ता नववी मध्ये असताना गावात चोरांचा सुळसुळाट झाला होता.त्यामुळे गावातील तत्कालीन पोक्त लोकांनी गावातील तरुणांचे गट तयार केले होते.त्यांना राखण करण्यासाठी रात्रपाळी दिली होती अन् गावातील गल्ल्यांचे वाटप करून दिले होते.कोणत्या गटाने कोणत्या गल्लीत रात्रपाळी साठी चक्कर मारायची याचे नियोजन केले होते.आम्ही जरी माध्यमिक शाळेतील वयोगटात होतो तरी आम्ही आमचा एक गट तयार केला होता अन् आम्हीही मध्यरात्रीच्या नंतर पहारा द्यायला जायचो.अर्थात पुढाकार असायचा प्रिय मित्र शाम शेळके याचा..! पहारा कमी अन् एका जागी बसून अन् शेकोटी पेटवून गप्पांचा फडच जास्त रंगायचा.मी बऱ्याचदा पेटलेल्या शेकोटी जवळच झोपी जायचो.शेकोटी पेटविण्याचं ठिकाण गावातील नाटकाचा ओटा परिसर असायचे.शाम शेळके याचे घरही तिथून जवळच होते. मुद्दामहून मध्यरात्री नंतर रस्त्याने दगडावर काठ्या वाजवत जायचो.अधून मधून जत्रेतील शिट्टी देखील वाजवायचो.याही कामात शाम शेळके हाच पुढाकार घ्यायचा.


शाम शेळके याच्या अभ्यासाच्या खोलीत एके दिवशी मध्यरात्री मित्रांचे कशावरून तरी कडाक्याचे भांडण झाले.त्या अभ्यासाच्या खोलीत एक लाकडी टेबल होता. ऐन मध्यरात्री शाम शेळके टेबल घेऊन अभ्यासाच्या खोलीतून बाहेर पडला होता. एका वर्तुळात आमच्या अभ्यासाच्या खोल्या असल्याने त्याचवेळी मध्यरात्री लगेच आण्णासाहेब म्हस्के आमच्या खोलीकडे पळत पळत आला अन् आम्हाला म्हणाला की, " अय, पटकन चला ,शाम त्याचा टेबल खोलीच्या बाहेर घेऊन घरी चालला आहे. ते चांगदेव शेळके गुरुजींच्या घरासमोर गल्लीतच बोलू राहिले...!"

मी, गणेश वाणी,विजू गायकवाड , आण्णासाहेब म्हस्के, नंदकिशोर जाधव तिथं जमा झालो. कसाबसा ऐन मध्यरात्री होणारा धुडगूस थांबवला अन् तो लाकडी टेबल पुन्हा अभ्यासाच्या खोलीत परत घेतला.


असे दिवसामागून दिवस जात होते अन् आमच्या अभ्यासाच्या खोल्या आम्हा वर्गमित्रांना आयुष्याचा अर्थ समजावून सांगत होत्या.त्या अभ्यासाच्या खोल्या आमच्यासाठी आमच्या प्रत्येकाच्या आई वडिलांच्या घरांपेक्षा प्रिय वाटत होत्या.आम्ही प्रत्येकजण आपापल्या घरी रमणार नाही, एवढे आमच्या प्रत्येकाच्या अभ्यासाच्या खोल्यात, अभ्यासिकेत रमून आमचं आयुष्य व्यतीत करू लागलो होतो.


ता.क. - प्रस्तुत फोटोत प्रिय बालमित्र स्वर्गीय शाम शेळके याच्या पायाच्या मागे जो खड्डा दिसत आहे, त्यावर एक प्रसंग आम्हा वर्गमित्रांच्या आयुष्यात त्याकाळी घडला होता.त्यावर पुढील भागात व्यक्त होईल..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ०९/०७/२०२२, शनिवार.


क्रमशः

रविवार, ३ जुलै, २०२२

" राॅकेट्री : द नंबी इफेक्ट "


 


चिंतन ©️


" राॅकेट्री : द नंबी इफेक्ट "


=============================


भारतीय माणसाने, भारतीय माणसासाठी , भारताच्या महान शास्त्रज्ञाला आपल्या कलात्मक अन् सर्वोत्तम अभिनयाच्या द्वारे वाहिलेली सर्वोत्तम कलाकृती म्हणजे राॅकेट्री : द नंबी इफेक्ट होय..!


आर. माधवन दिग्दर्शित अन् अभिनित राॅकेट्री : द नंबी इफेक्ट हा चित्रपट महान भारतीय अंतरीक्ष शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या कार्यावर आधारित आहे. अंतरीक्ष क्षेत्र, रॉकेट तंत्रज्ञान अन् त्यातील अभ्यासपूर्ण घटक याविषयी मला फारसे ज्ञान नाही, पण हे सर्व घटक ज्या पद्धतीने या चित्रपटात आर.माधवन यांनी सादर केले आहेत, त्यासाठी त्यांना ग्रेट सॅल्युट..!🙏🏻  


एवढे महान अन् विद्वत्तेचे धनी असलेले थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी आपल्या आयुष्यात कुणीतरी आरोप केले अन् त्यामुळे केवळ संशयाच्या भोवऱ्यात ज्या मरण यातना भोगल्या त्या बघून अंगावर काटे उभे राहतात.प्रचंड मानसिक अन् शारीरिक त्रास होऊनही नंबी नारायणन ज्या पद्धतीने स्वतः ला आयुष्यात सिध्द करतात ते बघून त्यांच्या समोर नतमस्तक झाल्या शिवाय राहवलं जात नाही. पण असे होताना भारताचा एक नागरिक म्हणून माझी मलाच लाज वाटते . कारण एवढ्या खूप मोठ्या उंचीच्या भारतीयाला आपण काय दिले तर.. त्यांच्या कुटुंबीयांला, त्यांना स्वतःला होणारा त्रास..!😔 नशीब, इ. स.२०१९ मध्ये भारत सरकारने थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचा योग्य तो सन्मान राखत त्यांना पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


चित्रपटाची सुरुवात ज्या पद्धतीने होते, विशेषतः बॅक ग्राउंड वर सुरू असलेल्या मंत्रोच्चारात होते, ते ऐकून तो प्रसंग दक्षिण भारतातील आहे याची जाणीव होते.या चित्रपटात आर.माधवन ,नंबी नारायणन यांचं अख्खं आयुष्य अक्षरशः जगले आहेत.आर.माधवन यांनी त्यांच्या आज पर्यंतच्या आयुष्यातील सर्वोत्तम भूमिका सादर केली आहे यात तिळमात्र शंका नाही.


भारताला रॉकेट तंत्रज्ञान प्राप्त करण्यासाठी नंबी नारायणन यांनी फ्रान्स मध्ये ज्या पद्धतीने आपली अस्सल विद्वत्ता ,समयसूचकता, जिद्द, चिकाटी उपयोगात आणली, ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या गुरूंच्या घरी वाटेल ती घरगुती कामे केली, ते बघून क्षणक्षणाला या थोर व्यक्तिमत्वासमोर आपले शरीर अन् मन पुन्हा पुन्हा नतमस्तक होते.


या चित्रपटात आर.माधवन यांनी माझ्या मते तीन प्रसंगात आपल्यातील सर्वोत्तम अभिनयाला सादर केले आहे. ते प्रसंग पुढील प्रमाणे..

(१) थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना तुरुंगात थर्ड डिग्री शिक्षा दिली जाते.काही दिवसांनी त्यांचा एक माजी सहकारी संशोधक मित्र त्यांना भेटायला पोलीस स्टेशन मध्ये येतो.त्यावेळी आर.माधवन यांनी जो अभिनय सादर केला आहे तो निव्वळ लाजवाब आहे.

(२) देशद्रोही म्हणून समाज थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना अन् त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकतो. नंबी नारायणन यांचं वय वाढत जाते.तब्येत देखील काहीशी स्थूल होत जाते. विशेष म्हणजे आर.माधवन यांनी खरोखर आपली तब्येत वाढवलेली आहे.त्यांची पत्नी आजारी पडते.आपल्या पत्नीला दवाखान्यात न्यायचे असते.बाहेर पाऊस सुरू असतो. एका रिक्षाला हात देऊन थांबवतात.रिक्षा थाबते, त्यात दोघे पती पत्नी बसतात,पण काही अंतर रिक्षा गेल्यावर दोघाही पती पत्नीला रिक्षातून ढकलून दिल्या जाते.त्यावेळी भर पावसात, आर.माधवन यांनी इतर वाहनांना थांबविण्यासाठी जो अभिनय केला आहे तो बघून मशाल अन् घायल चित्रपटातील अनुक्रमे दिलीपकुमार अन् सनी देओल यांच्या सर्वोत्तम अभिनयाची नक्कीच आठवण येते..! 

(३) नंबी नारायणन अन् त्यांची पत्नी एका लग्न समारंभात गेलेले असतात.तिथं ज्यावेळी वयस्कर होत चाललेल्या नंबी नारायणन यांना ते निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे असा फोन येतो. त्यानंतर आर.माधवन यांनी आपल्या पत्नीला मायेच्या कुशीत घेऊन जो अभिनय केला आहे, तो बघून तर असे वाटते की, आर.माधवन किती मोठ्या उंचीचा अभिनेता आहे म्हणून..!


फक्त संशयाच्या आधारावर एका खूप महान भारतीय अंतरीक्ष शास्त्रज्ञाला किती मरण यातना सोसाव्या लागल्या ते बघून आपले शरीर थिजून जाते.


मी अगोदरच उल्लेख केला आहे की, अंतरीक्ष क्षेत्र, रॉकेट तंत्रज्ञान अन् त्यातील अभ्यासपूर्ण घटक याविषयी मला फारसे ज्ञान नाही. पण रॉकेट तंत्रज्ञान, विकास इंजिन नसते तर आपण मंगळ ग्रहावर जगातील सर्वात स्वतः खर्चात पोहोचू शकलो असतो का..?

आपल्या देशाची आर्थिक स्थिती भक्कम नसताना ,आपल्या देशात जे आज अंतरीक्ष तंत्रज्ञान विकसित झाले आहे ते विकसित झाले असते का..?

इत्यादी अनेक बाबींमध्ये आज आपला भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे,त्याचे खूप मोठे श्रेय जाते ते थोर अंतरीक्ष शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनाच..!


चित्रपटाच्या शेवटी भारताचे पंतप्रधान वंदनीय नरेंद्र मोदी यांचे शास्त्रज्ञ अन् त्यांच्या कार्याविषयी जे मनोगत बॅक ग्राउंड वर सुरू असते त्यावेळी आपला भारत आता जगाच्या पटलावर मोठी सत्ता होण्याच्या मार्गावर पुढे पुढे जात आहे याची जाणीव होते..!


वंदे मातरम्..!🙏🏻🇮🇳🙏🏻


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ३ जुलै २०२२, रविवार.

शुक्रवार, १ जुलै, २०२२

अलबेला शाम - भाग क्र.१


 


आमचे गाव आमची माणसं ©️


अलबेला शाम


" प्रारंभ, मैत्रीच्या पर्वाचा..!"


==============================


मित्र अन् मैत्री काय असते असं कुणी विचारलं तर अनेकजण आपापल्या परीने आपल्या आयुष्यात भेटलेल्या अनेकांना त्यात शोधत बसतील.आपल्या आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक मित्राचे अस्तित्व तसे बघितले तर त्या प्रत्येक मित्राच्या भिन्न भिन्न प्रकारच्या स्वभाव वैशिष्ट्यांनी सजलेले असते. कुणाला तो मित्र श्रीकृष्णा - सुदामा सारखा भेटतो, कुणाला तो मित्र राज ठाकरे - बाळा नांदगावकर यांच्या सारखा भेटतो, तर कुणाला तो मित्र थोर लेखक सुहास शिरवळकर सरांच्या दुनियादारी मधील DSP उपाख्य दिगंबर शंकर पाटील उपाख्य दिग्या सारखा भेटतो. दुनियादारी मधील दिग्या जसा डेरींगबाज अन् मनाने निर्मळ ,तसाच आमचा प्रिय शाम..! या सर्व प्रकारच्या स्वभाव गुणांनी युक्त भेटणाऱ्या सर्व मित्रात तेच मित्र प्रत्येक रंगात आपल्या सोबत न्हावून निघतात,ज्यात दुनियादारी मधील दिग्या लपलेला असतो..!


थोर लेखक सुहास शिरवळकर सरांनी ज्या ताकदीने आपल्या दुनियादारी या कादंबरीत दिग्या उभा केला, रेखाटला तोच दिग्या एखाद्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटला तर अशा माणसाच्या आयुष्याची दुनियादारी नक्कीच प्रगल्भ होते. 


थोर लेखक सुहास शिरवळकर सरांचा मानसपुत्र असलेला दिग्या आम्हा काही बालमित्रांना त्यांच्या आयुष्यात लाभला अन् आमची मित्रांची दुनियादारी बहरत गेली.कोण होता तो, ज्यानं आम्हाला निडर व्हायला शिकवलं, रफ अँड टफ व्हायला शिकवलं.! तो होता आम्हा सर्व बालमित्रांच्या गळ्यातील ताईत शामकांत मुरलीधर शेळके..!


शामकांत मुरलीधर शेळके, ज्याला आजही आम्ही नेहमी आमच्या बालमैत्रीच्या नात्यातून ' शाम्या ' म्हणत असतो अन् तो ही आम्हाला आमच्या एकेरी नावाने हाक देत असतो.जसे की, ' नंद्या..! ' अर्थात वेळ काळ प्रसंग पाहून त्यात बदल होतो. शाम अन् माझ्या मैत्रीचा अध्याय तसा सुरू झाला तो आमच्या माध्यमिक शाळेतील वयोगटापासून..! त्याचं कारण आमची एकमेकांची पालखेड येथील घरे दूर होती, त्यामुळं प्राथमिक शाळेतील वयोगटात तो मैत्रीचा बहर,बहरला नाही. जेंव्हा आम्ही इयत्ता आठवी मध्ये प्रवेशित झालो त्यावेळी माझ्या सोबत होते, माझ्या गल्लीतील माझे खूप जिवलग बालमित्र गणेश वाणी अन् विजू गायकवाड..! जसजसा मैत्रीचा पसारा वाढत गेला तसतसे त्यात अजुन हिरे,माणिक मोती सामील होत गेले.इयत्ता आठवी मध्ये प्रवेशित झाल्यावर हा शाम आम्हाला त्याच्याकडे आकर्षित करायला लागला. त्यांचं बोलणे, त्याचा डेरींगबाज स्वभाव, त्याची प्रत्येक खेळातील चपळाई, त्याचा हजरजबाबीपणा इत्यादी गुणांनी आम्ही एकमेकांच्या मैत्रीच्या विश्वात सामील झालो. आमचा हा बालमित्र हजरजबाबीपणा मध्ये इतका तरबेज आहे की, एकदा त्याने कुलूप अन् किल्ली वरून सहजपणे व्यक्त केलेलं वाक्य आम्हा काही बालमित्रांच्या आयुष्यात अजरामर होऊन गेलेलं आहे. कुलूप अन् किल्लीचा विनोद बहुदा फक्त विजू गायकवाड, मी अन् शाम आम्हालाच माहीत असावा..! 😊


तसे बघितले तर आमच्या वर्गात तऱ्हेतऱ्हेचे नमुने होते. , काहीजण तथाकथित सभ्य श्रेणीत मोडणारे होते.अर्थात या संपूर्ण विश्वात, संपूर्ण मानव जातीस सभ्य श्रेणीत मोडणारे कुणीच नाही,कारण प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतो या सिद्धांतावर माझा प्रचंड विश्वास आहे. आमची श्री.पारेश्वर माध्यमिक विद्यालय ही शाळा इ. स.१९९२ पर्यंत , सध्याची पालखेड येथील जी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत आहे तिथं होती.याच इमारती मधील तीन वर्गखोल्या इयत्ता आठवी,नववी अन् दहावी साठी त्यावेळी उसन्या , वापरायला दिलेल्या होत्या.आमचा इयत्ता आठवीचा कोपऱ्यात होता. आमच्या माध्यमिक शाळेतील तुकड्या वाढल्यानंतर काही वर्ग रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्यातील झाडाखाली भरणाऱ्या शांतिनिकेतन सारखा शाळेच्या प्रांगणात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली भरायचा. त्यामुळं निसर्गातलं निरीक्षण अन् गावाच्या आत बाहेर जाणारी माणसं अधून मधून दिसायची अन् त्यांचं निरीक्षण करून जे भेटेल तेही ज्ञान प्राप्त व्हायचे.


आमचा खूप जिवलग बालमित्र शाम हा वर्गात आमच्या बॅक बँचर असणाऱ्या मोजक्या मित्रांपैकी एक होता.त्यात मी स्वतः, आण्णासाहेब म्हस्के ( ह.मु. औरंगाबाद ), शेख खाजा बागवान ( ह.मु. औरंगाबाद ), भागिनाथ गोरे, संतराम काळे ( खिर्डी ), गणेश निकम ( ह.मु. औरंगाबाद) कंमु बेग मिर्झा ( जळगाव) नंदकिशोर जाधव इत्यादी आम्ही प्रामुख्याने आम्ही मागेच बसायचो. शाळेच्या क्रीडा तासिकेला असणाऱ्या प्रत्येक वेळी हाच शाम पुढाकार घ्यायचा.क्रिकेट हा खेळ याचा जीव की प्राण..! क्रिकेट खेळाचे गारूड एवढे अंगात भिनलेले होते की, अक्षरशः याच प्रिय बालमित्र शामची गाय जळगाव अन् पालखेड सीमेवर असणाऱ्या बोर नदी परिसरात चरायला गेली होती. पावसाचे दिवस असल्याने तेथील गाळात फसली होती. शामला ही बातमी समजली ,तरी पठ्ठ्या एकदा क्रिकेट सामना खेळला अन् मग ती गाय आणायला गेला.अर्थात गायीला सुखरूप घरी घेऊन आला होता. बरेच दिवस ही आम्हाला दंतकथा वाटत होती,पण हे खरं होतं.


याच प्रिय बालमित्र शाम मुळे त्याच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या, त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या अनेक मित्रांचे आगमन माझ्या आयुष्यात होणार होते.माझा शामशी खूप संपर्क वाढला होता. शामची जी त्याच्या घराच्या परिसरातील मित्रमंडळी होती, ती देखील मैत्रीच्या देवतेने आपल्याला एखादा प्रसाद द्यावा तशीच खूप गोड होती.असणारच,कारण मुळात शाम हाच स्वच्छ मैत्रीच्या नात्यातील कोहिनूर होता..!🌹


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ०१/०७/२०२२, शुक्रवार


क्रमशः