शनिवार, ३० मार्च, २०२४
एका मंदिराला बघून जाणवलं..!
रविवार, २४ मार्च, २०२४
" स्वातंत्र्यवीर सावरकर "
चिंतन ©️
" स्वातंत्र्यवीर सावरकर "
===================================
काल सह परिवार रणदीप हुड्डा अभिनित अन् दिग्दर्शित ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' हा हिंदी चित्रपट बघितला. चित्रपट बघताना अन् घरी आल्यावर कित्येक वेळा डोकं सुन्न झाले होते. भारतमातेच्या या सुपुत्राला ज्या अत्यंत त्रासदायक यातना सोसाव्या लागल्या, जो कौटुंबिक क्लेश सोसावा लागला, जो त्याग करावा लागला तो आता पर्यंत विविध पुस्तकांच्या माध्यमातून वाचण्यात आलेला होता, पण ते वाचण्यात आलेलं सर्वकाही चित्रपटाच्या माध्यमातून बघितलं अन् डोळ्याच्या कडा पाणावल्या अन् डोकं सुन्न झाले होते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नियती इतका कसा काय अन्याय करू शकते हा प्रश्न सतत मनात येत होता. एखाद्या पुस्तकातून एखाद्याच्या यातना, वेदना वाचण्यात येतात. मात्र त्याच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील यातना , वेदना ज्यावेळी एखाद्या दृक श्राव्य साधनाच्या माध्यमातून आपण याचि देही याचि डोळा बघतो तेंव्हा आपलं हृदय पिळून निघते. अभिनेता रणदीप हुड्डा हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील तात्याराव सावरकर यांची भूमिका अक्षरशः जगले आहेत. या अभिनेत्याने वंदनीय तात्याराव सावरकर यांच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे.
चित्रपटाच्या सुरुवाती पासून ते मध्यांतरापर्यंत चित्रपटाचा वेग काहीसा कमी आहे, मात्र मध्यांतरानंतर ज्यावेळी वंदनीय तात्याराव सावरकर सेल्युलर जेल मध्ये प्रवेशित होतात तेंव्हापासून चित्रपटाने जो काही वेग घेतला तो अगदी शेवट पर्यंत टिकवून ठेवला आहे. ज्यावेळी तात्याराव सावरकर अंदमान येथील सेल्युलर जेल मध्ये जातात, तिथून पुढे अभिनेता रणदीप हुड्डा यांनी असा काही अप्रतिम अभिनय केला आहे की, आपण साक्षात तात्याराव सावरकरांनाच बघत आहोत याची अनुभूती येते. क्लोज कॅमेरा वर्क अन् त्या अँगल मध्ये रणदीप हुड्डा यांनी प्रत्येक क्षणातील आपल्या चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम साकारले आहेत. विशेषतः जेल मधील इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर स्वाभिमानाने व्यक्त होणे , जेलरच्या विरुद्ध होणारी उद्विग्नता , अंधार कोठडीतील होणारी जीवाची तगमग इत्यादी अनेक प्रसंग आपल्याला चित्रपट बघताना खुर्चीवर खिळवून ठेवतात. बऱ्याच प्रसंगात मन अगदी गहिवरून येते. काही प्रसंग मनाला अत्यंत वेदना देऊन जातात. चित्रपट बघताना एक प्रेक्षक म्हणून आपली ही स्थिती होते, तर प्रत्यक्षात वंदनीय तात्याराव सावरकर यांची त्यावेळची परिस्थिती किती वेदनादायक असेल याची जाणीव होते. थोडक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील अभिनयाचे जे सर्वोच्च शिखर रणदीप हुड्डा यांनी आपल्या जिवंत अभिनयाने गाठलेले आहे ते सेल्युलर जेल मधील प्रत्येक क्षणातील अभिनयातून गाठलेले आहे. ज्यावेळी जेल मध्ये तात्याराव सावरकर यांना भेटायला त्यांच्या धर्मपत्नी येतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यावर चष्मा नसतो.नजर अंधुक झालेली असते. धूसर नजरेच्या माध्यमातून आपल्या पत्नीशी होणारी चर्चा दोघांच्या नात्यातील भावूक नात्याला उंचीवर घेऊन जाते. जेल मधील भेटीची वेळ संपल्यावर माई सावरकर निघतात अन् अगदी शेवटच्या क्षणी तात्याराव सावरकरांना चष्मा प्राप्त होतो. चष्मा लावल्यावर आपली धर्मपत्नी दिसणार मात्र तो पर्यंत माई सावरकर दरवाजाचा उंबरठा ओलांडून गेलेल्या असतात. आपल्या पत्नीला पाठमोरे बघून तात्याराव सावरकर यांच्या आयुष्यातील अपूर्णता रणदीप हुड्डा यांनी आपल्या अभिनयाने अप्रतिम व्यक्त केली आहे. या छोट्याश्या प्रसंगातून वंदनीय तात्याराव सावरकर यांच्या अख्ख्या आयुष्याची अपूर्णता रणदीप हुड्डा यांनी कळत नकळतपणे व्यक्त केली आहे. ग्रेट सॅल्युट..!
एखाद्या नाटकातील स्वगत आपण एक नाट्यरसिक म्हणून बऱ्याचदा बघत आलेलो आहोत.मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी तात्याराव सावरकर यांच्या भूमिकेच्या द्वारे हिंदू अन् हिंदुत्व याचे बौद्धिक विवेचन क्लोज कॅमेरा मध्ये जेल मध्ये असताना आपल्या चेहऱ्यावरील अभिनयाच्या द्वारे उत्तमरित्या सादर केले आहे.
ज्या अभिनेत्याने वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका या चित्रपटात निभावली आहे ती भूमिका देखील लक्षात राहण्याजोगी आहे. भारत पाकिस्तान फाळणी, दंगलीच्या वेळी होणारी उद्विग्नता, होणारी संवादफेक संबंधित अभिनेत्याने खूपच छान प्रकारे प्रस्तुत केली आहे.
महात्मा गांधी अन् तात्याराव सावरकर यांची रत्नागिरी येथे घरी जी भेट होते त्यावेळचा अतिशय संयत अभिनय रणदीप हुड्डा यांनी सादर केला आहे. त्या प्रसंगातील शाब्दिक करारीपणा अप्रतिम आहे. दोन्ही व्यक्तिमत्वांमधील शाब्दिक बौद्धिक द्वंद्व विचार करायला प्रवृत्त करते.
चित्रपटाच्या शेवटी जे पॉप रॅप पद्धतीने गाणं सुरू होते त्याची खरंच आवश्यकता होती का..? हा प्रश्न मला पडला. पॉप रॅप पद्धतीच्या गाण्याऐवजी हृदयाला भिडणारं , सुमधुर चालीतील गाणं असायला हवे होते असे माझे वैयक्तिक मत आहे. स्वतः वंदनीय तात्याराव सावरकर थोर साहित्यिक शब्दप्रभू होते. त्या अनुषंगाने अर्थपूर्ण गाणं चित्रपटाच्या शेवटी असायला हवे होते.
असो, रणदीप हुड्डा अभिनित अन् दिग्दर्शित ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' या चित्रपटाच्या माध्यमातून थोर साहित्यिक, समाजसेवक, जाज्वल्य विचारांचे महामेरू अशा भिन्न भिन्न भावनांना चित्रपटाच्या माध्यमातून वंदनीय तात्याराव सावरकर यांना बघितल्याचा अनुभव आला.
वंदे मातरम्
एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २४ मार्च २०२४, रविवार
रविवार, १७ मार्च, २०२४
देवभूमी भाग क्रमांक १३ ( अंतिम भाग)
गुरुवार, ७ मार्च, २०२४
देवभूमी भाग क्रमांक १२
मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक १२ )
===================================
पावसाला सुरुवात झाली अन् आमची अजून तारांबळ उडाली. काल दिनांक २०/५/२०२३ रोजी बाबा केदारनाथाचे दर्शन झाल्यानंतर आज म्हणजेच दिनांक २१ मे २०२३ रोजीचा परतीचा पायी प्रवास देखील सुखरूप व्हावा अशी अपेक्षा होती. अपेक्षा फक्त अतिशय थंडगार हवा अन् त्यात होणारा अतिशय थंडगार पाण्याचा पाऊस, यापासून संरक्षण मिळावे अशी अपेक्षा होती. बाकी शारीरिक वेदना होणार होत्याच. रामबाडा आम्ही पार केले होते अन् पावसाला सुरुवात झाली होती.थोरला चिरंजीव नमनच्या बॅग मध्ये आम्हा चौघांचे रेन कोट होते,ते बाहेर काढून पटकन परिधान केले. बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरातून निघून आम्ही अर्धे अंतर पार केले होते. वेगवान उतरणीच्या रस्त्यामुळे गुडघे अन् पायाच्या बोटा मागील तळपाय यावर जास्त भार पडल्यामुळे त्रास व्हायला लागला होता. आता वेदना , पाऊस अन् अतिशय भयंकर थंडी यामुळे आम्ही त्रासदायक परिस्थितीतून गौरी कुंडकडे मार्गस्थ झालो होतो. अधून मधून एखादे छोटेसे दुकान दिसायचे. मस्तपैकी तळलेले गरमागरम पकोडे दिसायचे, मात्र जिभेवर संयम राखणे आवश्यक होते. जिभेच्या मोहाला बळी पडून संपूर्ण शरीराला अस्वस्थ करणे निदान या पहाडी प्रदेशात योग्य नव्हते.
आता दुपारचे चार वाजले होते. काळया ढगांनी अंधार दाटून आला होता. घोडे, खेचर , डोलीवाले , पाठीवर लोकांना ने आण करणारे माणसं यांना तिथं पिठ्ठू असे म्हणतात ते, पायी प्रवास करणारे अशा सगळ्यांनी मार्ग गर्दीने ओसंडून वाहत होता. बहुतांशी प्रवासी बाबा केदारनाथ कडून येऊन गौरी कुंडकडे जाणारे होते. पाय खूपच दुखू लागले होते.मात्र पावसाच्या धाकामुळे आम्ही वेदनेकडे लक्ष न देता अंतर कसे कमी होईल याकडे लक्ष केंद्रित केले होते. साधारणतः साडे चार वाजता पावसाचा जोर कमी झाला, मात्र पावसामुळे पायातले बूट ओले होऊन तळ पाय गारठून गेले होते.मी, माझी पत्नी अन् दोन्ही मुलांनी काहीवेळ थांबायचे ठरवले. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोटेखानी हॉटेल बाहेर आम्ही थांबलो. आतमध्ये जाणे योग्य वाटले नाही, कारण आमच्या अंगावरील रेन कोट पूर्णतः ओला झालेला होता.त्या हॉटेल मधील थोडीफार जागा जी कोरडी होती ती आम्ही आत गेल्यामुळे ती जागा अजून ओली झाली असती. दुपारच्या दोन वाजता आम्ही अमूल लस्सी पिलेलो होतो. त्यानंतर रस्त्याने अधून मधून पतंजली बिस्कीट खाऊन आताच्या चार वाजेपर्यंत चालत आलो होतो. आता घश्यात कोरड पडली होती. पुन्हा अमूल लस्सी पिण्यासाठी विकत घेतली.तिथल्या दुकानात थंडपेय फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नव्हती, कारण आजूबाजूचे वातावरण नैसर्गिकरीत्या अतिशय थंडगार होते. लस्सी पिऊन झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही दुपारच्या साधारणतः ४:१५ वाजता गौरी कुंडकडे मार्गस्थ झालो.
हळूहळू पावसाचा जोर ओसरला होता. आजूबाजूला उंचच उंच पर्वतरांगा असल्यामुळे लवकर अंधार दाटून आला होता. संध्याकाळचे सहा वाजले होते. दुपारचे साडे बारा ते संध्याकाळचे सहा दरम्यान आम्ही अतिशय उतरणीच्या रस्त्यावरून चालत येऊन गौरी कुंड येथील एकमेव असणाऱ्या बाजारपेठेतील गल्लीत पोहोचलो होतो. अरुंद गल्ली अन् तीही लोकांनी खूपच दाटीवाटीने फुलून गेली होती. आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळच्या ६:३० वाजता पोहोचलो होतो. पूर्णतः अंधार दाटून आला होता. खूपच थंडी जाणवत होती. रूम मध्ये गेल्या गेल्या सर्वांना सांगितले की, एकदम कुणीही बसू नका. नाहक पायाची नस ताणून पायात कळ येऊ शकते.हळूहळू बसा. अंगावरील रेन कोट बाजूला काढून ठेवले. आम्ही चौघांनी साधारणतः एक तास निपचित पडून आराम केला. आराम देखील वेदनादायी वाटू लागला होता. पाय वेदनेने खूपच ठणकत होते. आम्ही जिथे मुक्कामी थांबलो होतो, त्याच्या बाजूलाच गौरी कुंड होते. बाजूला जे गौरी कुंड होते, तिथले पाणी नैसर्गिकरित्या गरम आहे. विशेष म्हणजे आजूबाजूचा परिसर पूर्णतः थंड आहे. त्याच गौरी कुंडच्या बाजूला मंदाकिनी नदी आपल्या अतिशय थंडगार पाण्यासह वाहते. आता रात्रीचे आठ वाजले होते. गौरी कुंड मध्ये स्नान करणे धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले गेलेले आहे. त्यामुळं आम्ही गौरी कुंड मध्ये स्नान करण्यासाठी निघण्याची तयारी करू लागलो. आवश्यक ते वस्त्रे घेतली अन् जिन्याच्या पायऱ्या उतरून गौरी कुंडकडे मार्गस्थ झालो. एक एक पाऊल पुढे टाकतांना पायाची पोटरी अन् मांडीत गोळे येत होते. हळूहळू चालत आम्ही गौरी कुंड येथे पोहोचलो.
रात्रीचे नऊ वाजले होते. कडाक्याच्या थंडीत कित्येक भाविक गौरी कुंड परिसरात पूजा , आरती, मंत्रोच्चार इत्यादी धार्मिक विधी करण्यात मग्न झालेले होते. या संपूर्ण विश्वात त्या विधात्याने ज्या काही चमत्कारिक गोष्टी बनविलेल्या आहेत, त्यापैकी गौरी कुंड येथील गरम पाण्याचे कुंड होय. काल दिनांक २० मे २०२३ रोजी आम्ही पायी गौरी कुंड ते बाबा केदारनाथ अन् पुन्हा आज दिनांक २१ मे २०२३ रोजीचा बाबा केदारनाथ ते गौरी कुंडकडे परतीचा प्रवास हिमालयातील उंचच उंच पर्वतरांगा चढून - उतरून पूर्ण केला होता. तोच अतिशय खडतर, अतिशय जोखमीचा अन् उंचीचा रस्ता पायी चढल्या उतरल्यामुळे संपूर्ण पाय वेदनेने ठणकत होते. गौरी कुंड मधील गरम पाण्याच्या कुंडात प्रवेश केल्या केल्या गरम पाण्यामुळे शरीराला खूप आराम वाटू लागला होता. कडाक्याच्या थंडीत अन् तेही वेदनादायक शरीराला गरम पाण्याचा स्पर्श झाल्यामुळे पायाच्या वेदना खूपच कमी झाल्या होत्या. गौरी कुंड मध्ये स्नान करताना माझ्या मनात विचार आला की, बहुदा बाबा केदारनाथाला असे वाटले असेल की, पायी प्रवास करून भक्तांना माझ्याकडे येताना अन् जाताना शारीरिक वेदना होणार. त्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी तर बाबा केदारनाथाने गरम पाण्याचे कुंड निर्माण केले तर नसेल ना..? धाकटा चिरंजीव नयनने मला आवाज दिला अन् माझे विचारचक्र थांबले. गरम पाण्याच्या कुंडातून बाहेर यावेसे वाटत नव्हते,पण रात्रीची वेळ वाढू लागली होती. गौरी कुंड येथील स्नान अन् धार्मिक विधी आटोपून पुन्हा आम्ही रूमवर आलो. रात्रीचे दहा वाजले होते. अगदी हलके जेवणं केली. झोपण्यापूर्वी मी सर्वांना सांगितले की, उद्या पहाटे ३:३० वाजता उठायचे आहे. सकाळी साडे पाच वाजता आपण खाली सोनप्रयाग येथे पोहोचणे आवश्यक आहे. सर्वांनी होकार दर्शविला.मी, हर हर महादेव..! बाबा केदारनाथ की जय..! असा उच्चार केला.माझ्या पाठीमागे माझी पत्नी अन् दोन्ही मुलांनी देखील वरील उच्चार केला अन् झोपी गेलो. बाबा केदारनाथाच्या , हिमालयाच्या कुशीत झोपी जाताना आपल्या सोबत बाबा केदारनाथ आहे याची श्रद्धेय जाणीव हृदयात ठेवून डोळा कधी लागला ते कळलेच नाही.
दिनांक २२ मे २०२३, सोमवारची पहाट झाली होती. ठरल्या प्रमाणे पहाटे ३:३० वाजता आम्ही झोपेतून उठलो होतो. कडाक्याची थंडी काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हा सर्वांना येऊ लागला होता. आवश्यक ते कामे आटोपल्यावर रूम मालकाची परवानगी घेऊन आम्ही पहाटे ४:३० वाजता जीप स्टँडकडे पायी निघालो. पायात अधून मधून गोळे येत होते. अखेर साधारणतः दीड किलोमिटर अंतर पायी चालल्यावर जीप स्टँड आले. जीप मध्ये बसून नागमोडी वळणं घेत घेत आमची जीप सोनप्रयागला पहाटे ५:३० वाजता पोहोचली. सोनप्रयाग येथील जीप स्टँडहुन पुन्हा पायी चालत रामपूर येथील बस स्टँड कडे पायी चालत निघालो. जीप स्टँड ते रामपूर हे अंतर साधारणतः तीन किलोमीटर होते. आता उजाडले होते. रस्त्याच्या बाजूला साधारणतः तीन ते चार किलोमीटर किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अंतरापर्यंत भाविकांची रांग होती. ते सर्वजण गौरी कुंड मार्गे बाबा केदारनाथ कडे जाण्यासाठी आपापल्या हातात ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले कागद अन् इतर कागदपत्रे , झेरॉक्स घेऊन उभे होते. त्या सर्वांना जिथून गौरी कुंडकडे जीप निघतात त्या जीप स्टँड कडे जायचे होते.आम्ही काल रात्री सलगपणे थेट जीप स्टँड पर्यंत तेही रिमझिम पावसात रामपूर ते सोनप्रयाग येथील जीप स्टँड पर्यंत चालत पोहोचलो होतो. अपवाद फक्त एका ठिकाणी तेथील उपस्थित पोलिसांनी आमची तपासणी केली होती तेवढाच रीतसर अडथळा आला होता. आम्ही आता आज दिनांक २२/५/२०२३ रोजीच्या सकाळी रांगेत लोकांची जी प्रचंड गर्दी बघत होतो, ती बघून आपण किती नशीबवान ठरलो, आपल्याला सलगपणे जीप स्टँड पर्यंत सहजपणे जाता आले होते. आयुष्यात काही खडतर गोष्टी अंतर्मनातील श्रध्देने सहज सोप्या होऊन जातात हा भाव मनात येऊन गेला.
रामपूर येथील चहूबाजूने खूप मोठे गोलाकार असलेल्या बस स्टँड वर आम्ही पोहोचलो होतो. सकाळी ६:३० वाजता आमची बस उंचच उंच पर्वतरांगा ओलांडण्यासाठी अन् विष्णू भगवतांच्या स्थानाकडे, बद्रीनाथकडे मार्गस्थ झाली. आमची बस ज्यावेळी निघाली त्यावेळी मी श्रद्धेने जयघोष केला .माझ्यामागे इतरांनी देखील जयघोष केला..
बाबा केदारनाथ की जय..!
हर हर महादेव..!
वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻
एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ८ मार्च २०२४, शुक्रवार महाशिवरात्री
[ येणारा भाग क्रमांक १३ वा, हा देवभूमी या शीर्षकाखाली असलेल्या लेखमालेतील अंतिम भाग असेल. ]
क्रमशः


















