रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

शेवटची पिढी..!


 

#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


शेवटची पिढी..!


=====================


माणसाच्या आयुष्यात माणसांनी आपापल्या पिढ्यांना, पूर्वजांना पूजत पूजत आजच्या काळातील विज्ञानयुगा पर्यंत मजल मारली आहे. ही मजल मारताना माणसांच्या कित्येक पिढ्या खपल्या , खपत आहे अन् भविष्यात खपणार देखील आहे. माझे समवयस्क किंवा माझ्या पेक्षा ज्येष्ठ असलेल्या पिढीचे जे कुणी ज्येष्ठ आहेत ते एका अर्थाने सुखी म्हणायला हवेत. अर्थात सुखाच्या व्याख्या ज्याच्या त्याच्या बौद्धिक अन् मानसिक क्षमतेनुसार भिन्न भिन्न असतात. जुनी जाणती पिढी निरागसच होती अन् जे याचं पिढीतील हयात आहेत ते अद्यापही निरागसच आहेत.भले अशा ज्येष्ठांचा स्वभाव कसाही असो.मात्र ही जुनी जाणती पिढी निरागसच आहे. निरागसता फक्त बालवयात असते असे काही नसते.निरागसता ही साधी भोळी मानसिक अवस्था असते. साधी भोळी मानसिक अवस्था ही वयाला बंदिस्त नसते. या अशा साध्या भोळ्या अन् एका विशिष्ट पठडीतील मानसिक वर्तनात जगलेल्या अन् जगत असलेल्या पिढीच्या व्यक्त - अव्यक्त होण्याच्या पद्धती देखील एका विशिष्ट मर्यादे पर्यंतच येऊन थांबत असतात. या जुन्या जाणत्या पिढीचे भाव दर्शन अधून मधून घ्यायला हवे, आयुष्यातला बराच अहंकार कुठल्या कुठं पळून जातो.


मी अन् माझी पत्नी प्रवासात असताना रस्त्याच्या कडेला काही भाजी विक्रेते भाजी विकायला बसलेले दिसले.आम्ही आमचं वाहन थांबवलं अन् भाजी विक्रेत्यांकडे गेलो.तिथं बसलेल्या एका मावशीकडे आम्ही उभयतांनी आवश्यक तेवढा भाजीपाला विकत घेतला.घेवड्याच्या शेंगा अन् आळूची पाने विकत घेतली.भाजीपाला विकत घेताना त्यांचा भाव अजिबात केला नाही.त्या मावशींनी जो भाव सांगितला ती रक्कम त्या मावशीला दिली. घेवड्याच्या शेंगा अन् आळुची पाने विकत घेतल्यावर थोड्याशा घेवड्याच्या शेंगा अन् थोडे आळुची पाने मावशीकडे शिल्लक राहिली. आम्ही आमचा भाजीपाला विकत घेतला अन् निघालो इतक्यात..

त्या मावशींनी मला आवाज दिला..

" अरे भाऊ, थोड्याशाच घेवड्याच्या शेंगा आन...तीन चार आळुची पानं उरली हाये.घेऊन जा तशीच..!"

आम्ही परत त्या मावशीकडे आलो अन् थोड्याशा शिल्लक राहिलेल्या शेंगा अन् आळुची आमच्या पिशवीत घेतले.त्याचे पैसे मी त्या मावशीला द्यायला लागलो तर...ती मावशी मला म्हणाली...

" अरे भाऊ , एवढ्याचे कशाला पैसे देतो. .जा घेऊन तसेच..!"

मी त्या मावशीला म्हणालो - " तसं नाही मावशी, तुम्हाला याचे काहीतरी पैसे घ्यावेच लागतील.नाहीतर आम्ही घेत नाही. "

हे ऐकल्यावर त्या मावशींनी पुन्हा नकार दिला अन् आग्रहाने शेंगा अन् आळुची पानं बळजबरी आमच्याकडे सुपूर्द केली.नाही नाही म्हणत अखेर योग्य ती रक्कम दिली अन् मावशींनी मोठ्या मुश्किलीने ती रक्कम घेतली.


मी मावशींना बोलतं केलं. अगोदर मी माझा परिचय करून दिला.कुठला , काय करतो कुठे सेवा करत होतो वगैरे. माझ्या बोलण्यात अंधारी गावाचे नाव ऐकल्या ऐकल्या मावशी मध्येच मला थांबवून म्हणाल्या..

" अरे भाऊ, आमचे पाहुणे हाये अंधारी येथे. आन तू एवढ्या लांब येऊन जाऊन करत होतास का..? लई तरास झाला असण..!"

मावशीच्या त्या वाक्यात मला अपलुकीचा प्रश्न अन् काळजीचा स्वर जाणवला. पुरुषाच्या पेक्षा स्री आपुलकीने, मायेने विचारपूस करते काळजी व्यक्त करते हाच भावार्थ त्या मावशीच्या प्रश्नात अन् वाक्यात मला जाणवला होता.मावशींनी त्यांच्या अंधारी येथील पाहुण्यांची जी जी आडनावे सांगितली त्यावरून मला अजून खात्री पटली होती. 


मी शिक्षक म्हणून सेवा केलेल्या अंधारी गावातील मावशी नातेवाईक निघाल्याने मी मावशीकडे खूप आत्मीयतेने गेलो.अगदी जवळ जाऊन बसलो. माणसाच्या आयुष्यात ओळखीचा थोडासा जरी धागा जुळला की नात्याच्या प्रेमळ अन् मायाळू वस्राचे शिवणकाम खूप छान पैकी विणल्या जाते हा माझा स्वानुभव आहे.त्याची प्रचिती पुन्हा एकदा या मावशींच्या भेटीत मला जाणवली होती. अंधारी सारख्या दूरच्या गावी मी सेवेत होतो याचं मावशीला तिच्या बोलण्यावरून अप्रूप वाटलं होतं. आपल्या पाहुण्यांच्या गावी मी शिक्षक म्हणून सेवेत होतो यामुळं ती माय माऊली अगदी मनमोकळेपणाने माझ्याशी अन् माझ्या पत्नीशी बोलू लागली होती.अगदी थोडासा ओळखीचा धागा जुळला की, नात्यांची वीण घट्ट होत जाते हा अनुभव आम्हाला येत होता. नातं असतं तरी काय..? एकमेकांच्या सामाजिक अन् भावनिक जाणीवा ओळखून एकमेकांना आपुलकी, जिव्हाळा अन् निस्सीम प्रेम देणं अन् घेणं यापेक्षा नात्याची साधी सोपी व्याख्या दुसरी कोणतीच नसावी असे माझे ठाम मत आहे. मग ते नाते रक्ताचे असो अथवा रक्तविरहित..! बऱ्याचदा आपुलकी, जिव्हाळा अन् निस्सीम प्रेम आई वडील वगळता हे मूल्य रक्तविरहित नात्यात जास्त प्रमाणात आढळून येते.


आम्हाला पुढील प्रवासासाठी निघायचे होते.बऱ्याच गप्पा झाल्यावर त्या माय माऊलीचा निरोप घेण्यापूर्वी आम्ही पती पत्नीने त्या माय माऊलीचे दर्शन घेतले.मी निघण्यापूर्वी त्या माय माऊली मावशीच्या पाठीवर अगदी मायेने हात ठेवला अन् " येतो मावशी..!" असं म्हणालो.त्यावेळी त्या माय माऊलीचे डोळे पाणावले होते. कुणी आपल्याशी प्रेमाने, आपुलकीने , आत्मीयतेने कुठलाही बडेजावपणा न करता भेटलं की , भावूक माणसाचे मन भरून येते. असेच काहीसे त्या माय माऊलीला वाटले असावे. प्रवासात भेटलेल्या माय माऊलीचा भाव निरोप घेतला. राहून राहून मला असे वाटू लागले होते की, आपली स्व.आई तर या माय माऊलीच्या हृदयात येऊन आपल्याशी बोलत तर नसावी ना..? हा भावनिक प्रश्न माझ्या मनात आला होता.मी याविषयी माझ्या पत्नीला देखील बोललो.माणसाचे मन, आपल्या पूर्वजांना त्यांच्या पश्चात कुठे ना कुठे तरी अन् कुणात तरी शोधत असते ही मानसिक अवस्था माझ्याही बाबतीत होत होती. 


अत्यंत प्रेमळ , मायाळू अन् वय झालं तरी आपलं निरागस मन जपणारी ही शेवटची पिढी आहे असे मला जाणवू लागले होते.


वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १२/१०/२०२५, रविवार