शनिवार, २९ जानेवारी, २०२२

" मोक्षनगरी काशी..!" भाग क्र.१

 



मला प्रवासात भेटलेली माणसं..!©️

          " ये बनारस हैं..! "


" मोक्षनगरी काशी..!"


( भाग क्रमांक -१ )


===================================


उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब यांच्या सुमधुर शहनाई चे स्वर , बनारसी पानाचा स्वाद, बनारसी शालूची मायेचं परिधान अन् परम पिता महादेवाच्या पदोपदी जाणवणाऱ्या अस्तित्वाची नगरी म्हणजेच बनारस..! तिला कुणी वाराणसी म्हणते, कुणी बनारस म्हणते तर कुणी काशी म्हणते..! प्रत्येक नावात उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब यांच्या सुमधुर शहनाई चे स्वर  ऐकू येऊन बनारसी पानाच्या, स्वादिष्ट मिठाईच्या स्वादातून बनारसी शालूचे वस्त्र परिधान करून अंतर्मन सर्वात शेवटी त्या परम पित्या काशी विश्वनाथ महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन जाते..!🙏🏻 अशा दुर्मिळ अस्तित्वाच्या स्वरूपाची जाणीव हीच काशी विश्वनाथ नगरी सतत करून देत राहते, तिथं पदस्पर्श करणाऱ्यांना, जसे की मला ही जाणीव सदैव होत राहिली..!


माणसांची गर्दी अन् अरुंद गल्ली यांचं अन् काशीचे अतूट नाते आहे. वाराणसीच्या गर्दीतील प्रत्येक माणूस, हा आपल्याला आपल्या श्रद्धेय संवेदना सतत जागृत करत असतो. वाराणसीतील माणसांच्या गर्दीत माणसाचा  धर्म दिसत असतो, अन् त्या प्रत्येक माणसांमध्ये धर्माचा अधिपती भोलेनाथ शंकर सतत जाणवत असतो. भोलेनाथ शंकर म्हणजे आयुष्याचं वैराग्य..! ते वैराग्य अनेक तपस्वींच्या सजीव देहाच्या रुपात काशीत पदोपदी दिसत असते.


उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं मनोमिलन होते ते काशीलाच..! उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या त्रिवेणी मनोमिलनाशिवाय माणसाच्या आयुष्याचा पूर्णविराम होऊच शकत नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिकुटांपैकी काशीची ' लय ' या शाश्वत सत्यावर कमालीची श्रद्धा..! वाराणसीच्या गर्दीतील फिरत असताना, बऱ्याचदा अनेक मानवी देह मृत पावून कुणीतरी त्यांचं सारथ्य करून राजा हरिश्चंद्राच्या घाटावर , मनकर्निकेच्या घाटावर श्रद्धेने नेताना दिसत असतात. आम्ही स्वतः वाराणसीच्या गर्दीतून फिरत असताना त्याच गर्दीतून वाट काढत जाणाऱ्या अंत्ययात्रा बघितल्या अन् काशीला मोक्षनगरी का म्हणतात हे पटत गेले. जी अंत्ययात्रा राजा हरिश्चंद्राच्या घाटावर , मनकर्निकेच्या घाटावर श्रद्धेने जाताना दिसत असते,  त्या मृत देहाला खांदा देण्यासाठी कुणीही पुढे येते अन् त्या मृत देहाला अग्नीच्या स्वाधीन करून दिल्या जातं..!  कित्येक धनाढ्य माणसं, आयुष्याच्या अंतिम समयी याच काशी नगरीत येतात अन् शिवशंकराच्या स्मशानात स्वतच्या देहाला अर्पण करतात. राजा हरिश्चंद्राच्या घाटावर , मनकर्निकेच्या घाटावर श्रद्धेने अखंडपणे मानवी मृतदेहाचे अंत्यसंस्कार होत असतात. 


भोलेनाथ शंकर म्हणजे स्मशानातील वैराग्य अन् वैराग्य हेच माणसाचं अंतिम सत्य..!  ज्या स्मशानाला माझ्या सारखा सर्व सामान्य माणूस भिऊन जगत असतो, त्याच स्मशानात आपलं वास्तव्य अन् अस्तित्व शोधणारा भोलेनाथ शंकर..! आम्ही ज्यावेळी वाराणसीच्या गर्दीतून फिरत होतो त्यावेळी त्याच गर्दीत माणसांचा निवांतपणा दिसत होता.काही वाचकांना प्रश्न पडला असेल की, गर्दीत माणसांचा निवांतपणा कसा काय असू शकतो..? तर माझ्या मते जी माणसं गर्दीत आपला निवांतपणा शोधत असतात, ती माणसं जीवन जगण्याची कला शिकलेली असतात.जशी एकांतात जीवन जगण्याची कला प्राप्त होते, त्याच प्रमाणे माणसांच्या गर्दीत देखील माणसात माणूस शोधल्यावर नक्कीच  प्राप्त होते. काशीच्या गर्दीतून हिंडताना कोणत्यातरी ईश्वरीय अनुभूतीच्या सहवासात असल्याचा ईश्वरीय आनंद नक्कीच मिळतो. गर्दीच्या गोंगाटात देखील स्वतच्या अस्तित्वाला त्या वैराग्याच्या अस्तित्वासमोर अंतर्मनातून नतमस्तक होऊन नतमस्तक व्हावंसं वाटतं..! त्यात  सोबत सदैव तीच आदीशक्ती असते जिचा स्वामी भोलेनाथ शंकर असतो..!


आयुष्याचं खरं वैराग्य प्राप्त केलेली , खरं साधुत्व प्राप्त झालेली माणसं याच काशीत आपली हयात व्यतीत करत असतात.त्यापैकी कुणी भोलेनाथ शंकराची आराधना करत असतो, कुणी शहनाईच्या सुमधुर स्वरांची आराधना करत असतो तर कुणी जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी ' हम रहे ना रहे, भारतमाता तेरा वैभव अमर रहे ' हे ब्रीद अंगिकारून स्वतः जनतेचं प्रतिनिधीत्व करत असतो..!🙏🏻


हर हर महादेव..!🕉️

वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ३०/१/२०२२, रविवार.

क्रमशः

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

पांघरून ' - पुन्हा एक विलक्षण प्रेम कहाणी..!


 


चिंतन ©️


' पांघरून ' - पुन्हा एक विलक्षण प्रेम कहाणी..!


==================================


उत्कट प्रेमाची अव्यक्त कहाणी आपण यापूर्वी काकस्पर्श या अती सुंदर कलाकृतीत बघितली आहे.प्रेम अन् प्रेमात असणारी माणसं कशी आपल्या भावनेच्या द्वारे ईश्वरिय अनुभुतीत जगत असतात याच खूप सुंदर चित्रण काकस्पर्श चित्रपटात आहे. प्रेम काय फक्त व्यक्त केल्यानेच होते का..? प्रेम फक्त व्यक्त केल्यानेच होते असे ज्यांना वाटते त्यांची प्रेमाबद्दलची समजच कमी असते असे वाटते.


उत्कट प्रेमाची अव्यक्त कहाणी आपण यापूर्वी काकस्पर्श मध्ये बघितली अन् एखादी व्यक्ती त्यात स्री अन् पुरुष दोघेही आलेत, ते प्रेमात कसे कुंठित आयुष्य व्यतीत करत असतात हे बघितले आहे. कुंठित आयुष्य यासाठी म्हणतोय की, बऱ्याच प्रेमकथा ह्या तहहयात अव्यक्तच राहतात अन् त्यांचा शेवटही प्रेमाची सर्वोच्च पातळी गाठून पूर्णत्वाला जातात.अशावेळी जी व्यक्ती प्रेमात असते ती कधीकधी आपले देहभान विसरून त्यात तल्लीन होऊन जाते. तर अशाही काही व्यक्ती असतात, ज्या तल्लीन तर होऊन गेलेल्या असतात,पण स्वतः वर संयम ठेवून एखाद्या देवतेला पुजावे तसे ते आपल्या प्रेमाला पुजत असतात, अख्खी हयात..!


माझ्या मते, आदरणीय महेश मांजरेकर सरांनी त्यांच्या दिग्दर्शनाच्या आयुष्यात जर कोणती सर्वोत्तम कलाकृती निर्माण केली असेल तर ती फक्त आणि फक्त ' काकस्पर्श - विलक्षण प्रेम कहाणी ' हीच आहे..! ही सर्वांग सुंदर कलाकृती निर्माण करताना आदरणीय महेश मांजरेकर सरांनी त्यात आपल्यातील सर्वोत्तम भावना ओतली आहे. जी जी माणसं आपल्या आयुष्यात जगत असताना भावनेच्या देवतेला सदैव पूजत असतात, त्यांच्यासाठी काकस्पर्श ही सर्वोत्तम कलाकृती नक्कीच आहे..! 


माझ्या मते महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट सृष्टीतील काकस्पर्श ही उत्कट प्रेमाची अव्यक्त असणारी एकमेव सर्वोत्तम कलाकृती आहे..! आता तेच आदरणीय महेश मांजरेकर सर, पुन्हा तोच प्रेमाचा भावनिक हिंदोळा घेऊन येत आहेत, ज्याचं नाव आहे ' पांघरून ' - एक विलक्षण प्रेम कहाणी मध्ये..! बऱ्याचदा काहींचे लग्नापूर्वी प्रेम करून मग लग्न होतात तर बऱ्याच जणांचे लग्न झाल्यावर दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटून त्याचा वटवृक्ष होतो.मात्र अशीही काही मने असतात ज्यांच्या नशिबी अव्यक्त प्रेमात कुंठित आयुष्य व्यतीत केल्याशिवाय पर्यायच नसतो.अशा प्रेमात भावनेची देवता स्री किंवा पुरुष या दोघांवर किंवा दोघांपैकी एकावर पूर्णपणे आरूढ झालेली असते.अख्खं आयुष्य अव्यक्त राहून निरागस प्रेमाची महती ही दोन मने तहहयात अव्यक्तपणे व्यक्त करत असतात,आपल्या नजरेने, मनाने..!


असो, आशा करूया, महेश मांजरेकर सर दिग्दर्शित पांघरून या चित्रपटात तोच निरागस प्रेमाचा अंकुर पाहायला मिळेल, जो काकस्पर्श मध्ये रसिक प्रेक्षकांना बघायला मिळाला होता..!🙏🏻🌹


ता.क. खालील लिंक मध्ये पांघरून चित्रपटाच्या ट्रेलरची व्हिडिओ लिंक आहे.

https://youtu.be/4boog5x8r2A


वंदे मातरम्..!


शब्दांकन - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक -२४/१/२०२२, सोमवार.

रविवार, १६ जानेवारी, २०२२

" प्यूवर दुष्काळात आम्ही सोबत होतो..! "😊

 






आमचे गाव आमची माणसं..!©️


" प्यूवर दुष्काळात आम्ही सोबत होतो..! "😊


==================================


मराठवाडा अन् दुष्काळ यांचं नातं, प्रियकर अन् प्रेयसी यांचं जसं नातं असतं अगदी तसंच आहे. दोघेही एकमेकांना जीवापाड जीव लावतात. याला निसर्ग कारणीभूत आहे की, राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत आहे की अजुन कुणी, यावर ज्यानं त्यानं आपापल्या सोयीने काथ्याकूट करावा..! कितीही काथ्याकूट  केला तरी एक दुजे के लिये असल्यानं यांना एकमेकांपासून अद्याप पर्यंत तरी कुणीही दूर करू शकलेले नाही..! बहुदा काही प्रश्न मुद्दामहून सोडवायचे नसल्याने असं होत असावं..!😊

 

याच मराठवाडी दुष्काळाची झळ आम्ही पालखेडकरांनी साधारणतः इ. स.१९९५ ते १९९७ दरम्यान सोसलेली आहे. गावाच्या उत्त्तर दिशेला पाण्याचा आड  होता, अर्थात सध्याही आहे.हाच आड गावच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवायचा.  काळाच्या ओघात या आडाचे पाणी देखील कमी झाले होते.वर उल्लेख केलेल्या काळात गावात तीव्र पाणी टंचाई होती.


आज दिनांक १६/१/२०२२ रविवार रोजी गोरज मुहूर्तावर  औरंगाबाद येथे अचानक भेट झालेल्या माझ्या दोन धाकट्या भावासारखे असणाऱ्या जिवलग मित्रांची भेट झाली अन् आम्ही त्याच दुष्काळी कालखंडात गेलो. त्या काळातील प्यूवर दुष्काळात आम्ही सोबत होतो त्या दुष्काळी आठवणीत रमून गेलो..!


सदरील फोटोत पांढरा सदरा परिधान केलेला प्रिय बंधू डॉ.गणेश पा.भेंडे अन् काळया रंगाचे जॅकेट परिधान केलेला प्रिय बंधू डॉ.प्रमोद राऊत उपाख्य बबलू..! मी वर उल्लेखित केलेल्या कालखंडात  प्राथमिक शिक्षक म्हणून जळगाव, ता. वैजापूर येथे सेवा करत होतो. आम्ही वरील मित्रांनी सोबतच तीव्र पाणी टंचाई काळात आपापल्या घरी सायकलवर प्लास्टिक कॅन अडकवून पाण्याची जी सेवा दिली होती, त्यानं आमच्या प्रत्येकाच्या घरातील आमच्या मातोश्री सुखावून जात होत्या..! 


माझ्याकडे सायकल होती.याच सायकलच्या मागील कॅरियरला दोन्ही बाजूला पस्तीस पस्तीस लिटरच्या कॅन अडकवायचो. सीट पुढील नळीला दोन्ही बाजूला पस्तीस पस्तीस लिटरच्या दोन कॅन अडकवायचो. पाणी मिळण्याचं ठिकाण होते, गावच्या  पश्चिम दिशेला आदरणीय के. टी. त्रिभुवन यांच्या घरासमोरील हातपंप..! पस्तीस लिटरच्या चार कॅनी हातपंप हाताने हाफसून भरणे म्हणजे खूप कष्टाचे काम होते.त्यात पुन्हा सदरील हातपंपाचे पाणी, खूप खोलवर असल्याने हातपंप हाफसतांना दमछाक व्हायची.हातपंप हाताने हाफसायची जबाबदारी प्रामुख्याने प्रिय गणू अन् प्रिय बबलू पार पाडायचे. त्यांना दम लागला की, मी हातपंप हाफसायचो. एवढ्या वजनदार कॅन अडकवल्याने सायकल तिच्या प्रचंड शारीरिक दबावात यायची,पण एकाच खेपेत जास्त पाणी न्यायचे या हावरट अट्टाहासापाई आम्ही तीन सजीव, त्या एका निर्जीव सायकलवर अत्याचारच करत असायचो. सायकल हॅण्डलला धरून लोटायची जबाबदारी माझी असायची. के. टी. त्रिभुवन यांचं घर ते आम्हा तिघांचे घर साधारणतः अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर होते. एक एक खेप आम्ही प्रत्येकाच्या घरी घेऊन जायचो.सांघिक कार्यातून आम्ही हे काम करत असायचो, त्यामुळं काम सोपे वाटायचे.


अखेर एक दिवस, ज्याची भीती वाटायची तेच झाले.जास्त वजनामुळे सायकलची नळी पूर्णपणे वाकून गेली. आता घरी कसं जायचं याचा मला धाक पडला होता.माझे वडील अतिशय शिस्तप्रिय असल्याने वडील रागावतील याची भीती वाटायला लागली होती.मी प्रिय गणू अन् प्रिय बबलू यांना माझ्या घरापर्यंत यायला सांगितले, जेणेकरून सोबत हे दोघे असल्याने वडील रागावणार नाही हा उद्देश होता.आमचा उद्देश सफल झाला होता. माझ्या वडिलांनी  सायकल पाहिली अन् वाड्यात लावून दिली.


सायकलची नळी मोडल्याने आम्ही आता, माझ्या राजदूत दुचाकीवर पस्तीस लिटरच्या कॅनने पाणी आणू लागलो होतो.पाणी आणण्याचे ठिकाण बदलले होते.परसराम पाटील रोठे यांच्या शेतातील हातपंपाचे पाणी हाफसून आणू लागलो होतो. परसराम पाटील रोठे यांचे शेत अन् आमचे घर, यातील अंतर साधारणतः दीड किलोमीटर होते.दर रविवारी अन् शाळेतून घरी आल्यावर हा दिनक्रम सुरू झाला होता. आदरणीय के. टी. त्रिभुवन यांच्या घरासमोरील हातपंपाला पूर्वीसारखे पाणी राहिले नव्हते.


काळाच्या ओघात प्रिय गणू भेंडे अन् प्रिय प्रमोद ( बबलू )  राऊत यांनी व्हेटरनरीचे शिक्षण पूर्ण केले.आमच्या पालखेड गावाच्या पंचक्रोशीत मुक्या पाळीव प्राण्यांची आजारपणात सेवा पुरविण्याचे पवित्र कार्य दोघेही करत आहे. यातील प्रिय गणू उपाख्य डॉ.गणेश पा.भेंडे हा काही काळ, आमच्या पालखेड येथील ग्रापंचायतीचा उपसरपंच देखील राहिला आहे. आदरणीय शरद पवार साहेबांवर निष्ठा बाळगून असणारा प्रिय गणू..!


आमच्या पालखेड गावातील नागरिक कलेवर निस्सीम प्रेम करणारे..! नाटकं अन् चित्रपट यावर निस्सीम प्रेम करणारे..! त्यातल्या त्यात नाटकं, कारण आमच्या पालखेड गावाला अंदाजे शंभर वर्षांची गावच्या यात्रेत रात्री नाटके सादर करण्याची परंपरा आहे.मागील काही वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील संत एकनाथ नाट्यगृहात शरद पोंक्षे अभिनित  ' मी नथुराम गोडसे बोलतोय ' हे नाटक होते, त्यावेळी आमच्या पालखेड गावातून  जीप भरून नाट्य रसिक ' मी नथुराम गोडसे बोलतोय ' हे नाटक पाहण्यासाठी आले होते, त्यात प्रिय डॉ.गणेश पा.भेंडे अन् प्रिय डॉ. प्रमोद राऊत देखील होते..! मी त्यावेळी लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो. मी लासूर स्टेशन येथून रेल्वेने सदरील नाटक पाहण्यासाठी औरंगाबाद येथे आलो होतो.आजची आमची भेट देखील अशाच कलेच्या व्यासंगाच्या निमित्ताने झाली हे विशेष..!


काळ बदलत असतो,पण त्याच काळातील आठवणी कधीही बदलत नसतात.प्यूवर दुष्काळात आम्ही सोबत होतो या आठवणी आजही आम्हाला टवटवीत करतात.भले त्या आठवणी दुष्काळी असतील,पण आमच्या मनाला हिरवेगार करून प्रफुल्लित नक्कीच करतात..!😊


असो, प्रिय गणू अन् प्रिय प्रमोद आज ज्या निमित्ताने आपली औरंगाबाद येथे अचानक भेट झाली, पुन्हा त्याच निमित्ताने दुसऱ्या वेळी नक्कीच होईल याची खात्री आहे..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १६/१/२०२२, रविवार.

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

" आई, तू नसती तर.....?










 

चिंतन ©️


" आई, तू नसती तर.....?


==================================


" आई, तू नसती तर.....?


स्वकर्तूत्व सिध्दशिरोमनी,इतिहासातील आजतागायत एकमेव चारित्र्यसंपन्न राजा,रानटी मूघलांना,हिदवी स्वराज्याच्या शत्रूंना त्यांची जागा दाखविणारे शौर्यशील धूरंधर ,एका स्रीच्या ,आईच्या मार्गदर्शनाने एक मूर्तीमंत,स्वराज्यप्रेमी व्यक्तिमत्व कसे आकारास येते याचे ज्वलंत उदाहरण, तळागाळातील सर्व जातीधर्माच्या माणसांना आपल्या संघटनचातूर्याने एकत्र करणारा जाणता एकमेवद्वितिय लोकराजा,लोकशाहीची मूल्ये प्रथमत:स्वत:मध्ये अनुकरून मग राजपध्दतीत राबविणारे थोर मूल्यपूजक,अखंड सावध असणारे एकमेव अष्टावधानी..!


 देहापेक्षा...आप्तस्वकियांपेक्षा देशहितास प्रथम प्राधान्य देणारे देशाभिमानी सेवक, देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो याचे सदैव भान असणारे महान राष्ट्रपूजक, लोकांच्याकरिता लोककल्याणकारी योजना लोकांमध्ये जाऊन यशस्वीरित्या राबविणारे पहिले लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवराय, यांचे अद्वितीय कार्य घडलेच नसते अन् पुढील कोणत्याच राष्ट्रपुरुषांना,विरांगणांना प्रेरणा मिळालीच नसती..!


आई तू नसती तर यवनांच्या क्रूर राज्यातल्या जनतेला स्वातंत्र्याची पहाट दिसलीच नसती..!


आणि आई ,तू नसती तर....

 आज माझे जे नाव ," नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव " आहे, ते राहिलेच नसते..!  भलतेच नाव असते..!

खूप खूप धन्यवाद आई..माझ्या आजच्या असणाऱ्या नावाला व अस्तित्वाला फक्त तू आणि तूच निमित्त आहेस..!


राजमाता जिजाऊ आई, आपणास आपल्यातील मातृत्वास अन् कुशल नेतृत्वास आज आपल्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🏻🌹

जय जिजाऊ

जय शिवराय

वंदे मातरम्

अभिवादक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक:१२ जानेवारी २०१९