शनिवार, २६ मार्च, २०२२

" एका तीर्थस्थळाला, भेट द्यायची राहूनच गेली..! " 😔


 







मला प्रवासात भेटलेली माणसं ©️

" एका तीर्थस्थळाला, भेट द्यायची राहूनच गेली..! " 😔

===================================

तीर्थस्थळाची व्याख्या काय असं कुणी मला विचारलं तर मी सांगेल की, ज्याठिकाणी माणसाला आत्मिक समाधान लाभते ते ठिकाण अन् ज्याचा भूतकाळ ज्याला जिथं पुन्हा एकदा गहिवरून भेटतो असे ठिकाण म्हणजेच तीर्थस्थळ होय..! माणसाचं मन सतत गुंतागुंतीच्या आयुष्यात गुंतलेलं असतं.याच आयुष्याच्या गुंतागुंतीच्या धाग्यात माणसाला कधी आत्मिक समाधान शोधावं वाटतं तर कधी आपल्या गतकाळातील आठवणी ज्या ठिकाणी व्यतीत झालेल्या आहेत, तिथं स्वतः ला न्यावं वाटत..! आत्मिक समाधान अन् भूतकाळातील त्यानं व्यतीत केलेल्या स्थळांना भेट देऊन स्वतः ला समृध्द करण्यासाठी माणसानं विविध ' तीर्थस्थळं ' निर्माण केली..!

मी याच तीर्थस्थळांना ज्या ज्या वेळी शोधण्यासाठी बाहेर पडलो त्या त्या वेळी ते आत्मिक समाधान कधी पूर्ण ज्योतिर्लिंग रामेश्वरम् येथे लाभले, कधी वाराणसी येथे लाभले, कधी सोरटी सोमनाथ येथे लाभले तर कधी पुरी जगन्नाथ येथे लाभले..! या प्रत्येक  तीर्थस्थळांना भेटी देताना नेहमी माझे स्व. तीर्थरूप वडील सोबत होते.मी अशाही स्थळांना भेटी दिल्या होत्या, ज्याठिकाणी गेल्यावर माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.अर्थात ही तीच ठिकाणं होती, ज्याठिकाणी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी खूप मेहनत करून स्वावलंबी आयुष्याची पायरी चढायला सुरुवात केली होती. माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांनी इ.स.साठच्या दशकात कधी कोपरगाव सारख्या ठिकाणी हॉटेल मध्ये काम करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते, तर श्रीरामपूर येथे ' कमवा व शिका ' हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ब्रीद अंगिकारून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांना शिक्षण घेण्यासाठी वाटेल ती कामं करणं गरजेची होतं,कारण घरून अजिबात आर्थिक, सामाजिक  पाठिंबा कोसोदुर कुणाचाही नव्हता..! कोपरगाव अन् श्रीरामपूर येथे ज्याठिकाणी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी खूप कष्टाची, हलकी कामे त्यांच्या तारुण्यात केली होती, त्या स्थळांना ज्यावेळी माझ्या स्व.वडिलांना त्यांच्या वार्धक्यात सहपरिवार भेट द्यायला घेऊन गेलो होतो, तेव्हा तेंव्हा माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना खूप गहिवरून आले होते. आपला गतकाळातील भूतकाळ वर्तमानकाळ  भेटला की, माणसाला नक्कीच गहिवरून येते, फक्त तो भूतकाळ अन् त्यातील आठवणी खूप शून्यातून निर्माण करणाऱ्या असाव्यात..! श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयाला दिलेल्या भेटीवर मी यापूर्वीच पाच भागांची लेखमाला लिहिलेली आहे.

मात्र, माझ्या आयुष्याची एक खंत कायमची मनात राहून गेली अन् ती म्हणजे माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांची शिक्षकी आयुष्यातील काही वर्ष व्यतीत केली होती, त्या स्थळांना भेट देण्याचं राहूनचं गेलं..! मी भविष्यात या स्थळांना माझ्या वडिलांना सोबत घेऊन भेट देण्याचं नियोजनही केले होते,पण नियतीने तत्पूर्वीच माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना आमच्यातून कायमचे हिरावून घेतले..! ती तीर्थस्थळं होती, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नाचनवेल व बहिरगाव, ता.कन्नड, जि.प.प्रा.शा. शहापूर, घोडेगाव व मेहबुबखेडा, ता.गंगापूर, धोंदलगाव, भिवगाव, अन् दहेगाव ता. वैजापूर..! यातील दहेगाव तर आमच्या पालखेड गावाचेच जुळे गाव..! दहेगावाचे अन् माझ्या स्व.वडिलांचे विशेष नाते तहहयात राहिले..!

काल दिनांक २६/३/२०२२, शनिवार रोजी दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने अशाच एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा योग आला. ज्याठिकाणी माझ्या स्व.वडिलांना घेऊन जाण्याचे माझे नियोजन होते पण, नियतीने ते पूर्ण होऊ दिले नाही.ठिकाणं होते जिल्हा परिषद प्रशाला नाचनवेल, ता.कन्नड, जि. औरंगाबाद. याच शाळेत माझ्या स्व.वडिलांच्या शिक्षकी आयुष्याची सुरुवात इ.स. साठच्या दशकात झाली होती.याच माध्यमिक शाळेत एक शिक्षक म्हणून माझ्या स्व.वडिलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम शिस्तप्रिय मुख्याध्यापक अन् शिक्षक वंदनीय स्व. दाशरथे सर पहिल्यांदा भेटले होते. ( आदरणीय स्व. दाशरथे सरांच्या शिस्तप्रिय आयुष्यावर मी यापूर्वीच एक लेख माझ्या ब्लॉगवर लिहिलेला आहे. ) याच नाचनवेल माध्यमिक शाळेतील माझ्या स्व.वडिलांच्या कित्येक विद्यार्थ्यांनी विविध प्रशासकीय, राजकीय ,धार्मिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली होती..!

काल दिनांक २६/३/२०२२ रोजी जेंव्हा भर दुपारी मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाचनवेलच्या प्रांगणात प्रवेश केला, तेंव्हा माझ्या स्व.वडिलांनी याच शाळेविषयी नेहमी व्यक्त केलेल्या आठवणींनी माझ्या मनात जागा घ्यायला सुरुवात केली होती. त्या स्थळाला भेट देण्यासाठी माझ्या स्व.वडिलांना घेऊन येण्याचं माझं स्वप्न अपूर्णच राहून गेलं होतं. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाचनवेलच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर सर्वात अगोदर मुख्याध्यापक कार्यालयात गेलो तिथं खूप शिस्तप्रिय मुख्याध्यापक आदरणीय स्व.दाशरथे सरांच नाव, फलकावर बघितलं अन् भूतकाळात रमून गेलो. आदरणीय स्व.दाशरथे सर अन् माझ्या स्व.वडिलांचं असलेलं भावनिक नातं मनात भावनेचा हिंदोळा निर्माण करून गेले.आदरणीय स्व.दाशरथे सरांनी माझ्या स्व.वडिलांना जो जीव लावला होता, तो याच भूमीत..! जो पर्यंत माझे वडील हयात होते तो पर्यंत ते नेहमी आदरणीय दाशरथे सरांविषयी खूप अभिमानाने भरभरून व्यक्त व्हायचे.भावनिक ऋणानुबंध असला की, माणूस जरा जास्तच व्यक्त होतो किंवा त्या आठवणी चिरंजीव असतात हेच खरं..! प्रत्येक वर्गाच्या समोर मुद्दामहून जाऊन आलो कारण, याच जागेवर माझ्या स्व.वडिलांनी त्यांच्या शिक्षकी आयुष्यातील काही काळ व्यतीत केला होता.ज्या तरुणाला ना सामाजिक आधार होता ना आर्थिक आधार होता, त्या तरुणाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सिद्धांतावर आयुष्य व्यतीत करून शिक्षण घेऊन कमवा व शिका व्रत अंगिकारून स्वतः ला सिद्ध केले होते. 

हीच ती जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाचनवेल होती, जी आमच्या आजच्या असणाऱ्या थोड्याफार सुखाला निमित्त ठरली होती, कारण येथूनच सर्वात पहिल्यांदा माझ्या स्व. वडिलांना  स्वतः च्या पायावर उभे राहण्यास सुरुवात झाली होती.  याच नाचनवेल प्रशालेचे आमच्या स्व.वडिलांना स्वतच्या कक्षेत घेतले होते. नाचनवेल या गावातील याच शाळेतून माझ्या स्व.वडिलांनी त्यांच्या शिक्षकी आयुष्याला सर्वात पहिल्यांदा प्रारंभ केला होता.एका अर्थाने नाचनवेलची हीच शाळा आमच्या कुटुंबाची पाहिली पालकत्व निभावणारी वस्तू अन् वास्तू ठरली होती..! याच नाचनवेलच्या तत्कालीन शाळेतील अतिशय शिस्तप्रिय मुख्याध्यापक आदरणीय स्व.दाशरथे सरांनी दिलेला मूलमंत्र, तहहयात माझे वडील त्यांच्या शिक्षकी आयुष्यात पाळत राहिले..! याच नाचनवेल गावातील अनेक विद्यार्थ्यांनी माझ्या स्व.वडिलांवर खूप प्रेम केले..! मी मागे एकदा नाचनवेल येथील प्रतिष्ठित  नागरिक तथा माजी जिल्हा परिषद औरंगाबाद उपाध्यक्ष आदरणीय विठ्ठलराव थोरात पाटील भाऊंना फोनही केला होता. आदरणीय विठ्ठलराव थोरात यांना फोन करण्याचे कारण असे की, माझ्या स्व.वडिलांचे खूप आवडते विद्यार्थी होते आदरणीय विठ्ठलराव थोरात पाटील..! आज वेळेअभावी त्यांच्या घरी जाणे शक्य झाले नाही,पण भविष्यात कधीतरी नक्कीच जाईल..!

काल दिनांक २६/३/२०२२ रोजी मला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाचनवेलच्या प्रांगणात घेऊन जायला जे निमित्त ठरले ते माझे  सहकारी शिक्षक  आदरणीय सुरेश भाऊ अक्कर सर..! खूप खूप धन्यवाद सर, तुमच्यामुळे एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा सुवर्णयोग जुळून आला..! सोबत होते, खूप जिवलग मित्र तथा सहकारी शिक्षक आदरणीय संजय भाऊ राजपूत ( गोठवाल ) सर..!

नियती माणसाच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी पूर्ण करत नाही,त्यात अपूर्णता ठेवतेच..! कदाचित याच अपूर्णतेत्त ,पूर्णत्वाचा आत्मानंद घ्यावा हेच नियतीला अपेक्षित असेल..! माझ्या आयुष्यातील एक अपूर्णता हीच राहिली होती की, ज्या ज्या ठिकाणी माझ्या स्व.वडिलांनी एक शिक्षक म्हणून अगदी समरसून सेवा दिली होती, त्या स्थळांना माझ्या स्व.वडिलांना सहपरिवार भेटी देण्याची अपूर्णता राहूनच गेली..! आज जेंव्हा  कधी या शाळांना भेटी देतो किंवा भविष्यात देईल तेंव्हा तेंव्हा तो अपूर्णतेचा आनंद, खूप गहिवर निर्माण करून मनाला आनंद नक्कीच देतो किंवा भविष्यात देईल,कारण तिथल्या आठवणी आपल्याशी खूप गहिवर निर्माण करून जोडल्या गेलेल्या आहेत म्हणून..!

बहुदा, नियतीने माणसाला, सर्वच गोष्टी पूर्ण दिलेल्या नाहीत, कारण अपूर्णतेत पूर्णत्वाचा आत्मानंद माणसाला घेता यावा म्हणून..! अर्थात हे भावविश्वाच्या सागरात पोहणाऱ्यानांच जाणवेल..!🙏🏻

वंदे मातरम्..!

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

लेखन दिनांक - २७/३/२०२२, रविवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा