बुधवार, २७ एप्रिल, २०२२

" इंचू चावला, मला इंचू चावला..!"

 



आमचे गाव आमची माणसं ©️


" इंचू चावला, मला इंचू चावला..!"


===============================


दिनांक २४ एप्रिल २०२२, रविवार रोजी रात्री पालखेड येथे जाण्याचा योग आला होता.निमित्त होते, माझे मित्र श्री.बाळू पाटील शेळके यांच्या कन्येचा विवाह सोहळा.. !ज्या शेळके पाटील घराण्यावर माझ्या पणजोबा पासून श्रद्धा आहे,त्याच घराण्यातील प्रिय मित्र बाळू पाटील शेळके हे माजी सरपंच तसेच याच मित्राच्या धर्मपत्नी वैजापूर पंचायत समितीच्या माजी सभापती देखील होत्या. लग्न सोहळ्याला खूप गर्दी असल्याने माझ्या सोबत असलेला माझा जिवलग बालमित्र आण्णासाहेब म्हस्के ( औरंगाबाद ) अन् मी मुख्य गर्दीतून गेटच्या बाहेर दूर उभे राहून अक्षता टाकणार होतो.


इतक्यात आमच्या बाजूला आमच्याच पालखेड गावातील काही तरुण बसलेले होते.त्यापैकी एकजण इतरांना माझ्याविषयी हातवारे करून काहीतरी सांगता होता असे माझ्या लक्षात आले.मला राहवलं नाही अन् मी त्या समूहाकडे गेलो.मी म्हणालो...

" काय मित्रानो, काय चाललं..? मजेत आहात का..? काय म्हणताय..?"


त्यावर त्यातील एकजण मला म्हणाला..

" काही नाही सर..! तुम्ही कसे आहात..? '

मी म्हणालो - " मजेत आहे भो..!"

यावर त्यातील एक तरुण त्याच्या इतर मित्रांना सांगू लागला की, " अय, जाधव सरांना ना..एकदा इच्चू चावला होता, नाटकाच्या ओट्यावर..! मी.. बी तिथं होतो..!"

मी त्या मित्राला मध्येच थांबवून त्या मित्रांना म्हणालो.." अरे, हाव ना..राव..! तुझ्या बरं लक्षात आहे अजुन..! पण तू कोण..? मी तुला ओळखले नाही..! " 

त्यावर तो तरुण मला म्हणाला - " सर,मी भैय्यासाहेब त्रिभुवन..!"

हे नाव ऐकल्या बरोबर मला याच नावाची एक फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट कित्येक दिवसांपासून आलेली आहे यांचं स्मरण झाले.मी त्याला म्हणालो.." मित्रा, मला भैय्यासाहेब त्रिभुवन याच नावाची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे, तो तूच का..? मित्रा, काहीतरी परिचयाचा धागा असल्याशिवाय मी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत नाही..! तू आमच्या गजा भाऊ त्रिभुवनचा कोण आहेस..? "

त्यावर तो तरुण म्हणाला -" सर,गजा भाऊ, माझे चुलते आहेत..!"

मी म्हणालो - " आता, फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारतो बरं का..! गजा भाऊ त्रिभुवन म्हणजे आमच्या कुटुंबातील सदस्यच बरं का..! अन् काही बी पोस्ट नको करत जाऊ.." असं म्हणालो अन् यावर भैय्यासाहेब त्रिभुवन पण म्हणाला -" नाही हो सर..!"

मी तेथील उपस्थित मित्रांना म्हणालो - " बाकी, नाटकाच्या ओट्यावर मला इच्चु चावला हे लई मोक्कार काम झालं होतं. त्यात अशोक मराठे हा आपला बालमित्र अजुन तेल टाकायला होता..!" यावर आम्ही हसलो.


तर माझ्या फेसबुक मित्रानो मला इच्चू चावला होता तो प्रंसंग पुढीप्रमाणे -


इ. स.१९९९,मी त्यावेळी पालखेड येथे राहत होतो. त्याकाळी दररोज रात्री आमच्या पालखेड गावातील जो नाटकाचा ओटा आहे, तिथं जाऊन बसायचो.तिथं अनेक मित्र येऊन बसायचे अन् माझ्या जागण्याच्या वेळेपर्यंत आम्ही तिथं गप्पा हासडत बसायचो.सोबत असायचे जिवलग बालमित्र शाम शेळके, राजू पाटील शेळके ( दाजी ) , अशोक मराठे,आप्पा जाधव इत्यादी. त्यात आमच्या वयापेक्षा काही लहान मुले पण असायची, त्यात हाच भैय्यासाहेब त्रिभुवन असायचा.


असेच नोव्हेंबर १९९९ मध्ये याच नाटकाच्या ओट्यावर रात्रीच्या वेळी आम्ही गप्पा मारत बसलो होतो.तिथं मी, शाम शेळके, अशोक मराठे इत्यादी उपस्थित होतो.बाजूलाच भैय्यासाहेब त्रिभुवन अन् त्याच्या वयोगटातील काहीजण होते.नाटकाच्या ओट्यावर शहाबादी फर्शी होती. ओट्याच्या फर्शीच्या खाली काही ठिकाणी कपार होती.त्यात सांध म्हणजेच रिकामी जागा सुटलेली होती. गप्पा मारल्या मारल्या अन् मी ओट्यावरून कडेने दोन्ही हात त्यावर टेकून खाली उडी मारू लागलो इतक्यात...

मला काहीतरी टोचल्यासारखे जाणवले.मी लगेच माझ्या बाजूला बसलेल्या अशोक मराठे या बालमित्राला म्हणालो - " यार, अशोक, मला काहीतरी लई टोचले राव, लई आग होऊ राहिली..!"

शाम शेळके याने तिथं बघितले पण अंधार असल्याने त्याला काही दिसेना. शामचे घर अगदी जवळच असल्याने तो पटकन घरी गेला अन् बॅटरी घेऊन आला. फर्शीच्या कपारीत उजेड मारला तर तिथं भला मोठ्ठा इच्चू दिसला.माझ्या बाजूलाच असलेला बालमित्र अशोक मराठे मला म्हणाला - " अरे, नंदू दादा, लई मोठ्ठा इच्चू हाये, तू होय बाजूला, मी मारतो त्याला..!"

अशोकने त्या इच्चूला मारायच्या अगोदर शामने काडीने त्या इच्चूला खाली पाडले अन् चपलेने त्याचा निर्घृण खून केला.


माझ्या उजव्या हातातील मधल्या बोटाला विंचू चावला होता.वेदना वाढायला लागल्या होत्या.त्यात दुसऱ्या दिवशी माझे लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षक मित्र आदरणीय दिलीपराव शेलार, आदरणीय शेषराव गंडे , वाघुर्डे सर, नितीन पगार , मेंढे मामा इत्यादींच्या सोबत लासूर स्टेशन येथून रेल्वेने तिरुपती बालाजी येथे जाण्यासाठी बसायचे होते.मला वेदना असह्य व्हायला लागल्या होत्या.माझ्या जवळ उभा असलेला मित्र अशोक मराठे मला म्हणाला - " नंदू दादा, आता तुला लई दुखणार भो.. तुला रात्रभर झोप येणार नाही..!"

माझे त्याच्या बोलण्याकडे अर्धवट लक्ष होते,कारण वेदनेने मी विव्हळत होतो.अखेर शाम शेळके याने मला धरले अन् मला म्हणाला " अय, नंद्या चूप रे, नको इवळू..! अश्या ( अशोक ) तू याच्या जवळ थांब रे, मी पँट घालून येतो.याला आपण गणेश वाणी डॉक्टरकडं घेऊन जाऊ..!" शाम पँट घालून आला म्हणजेच तो आता पर्यंत आमच्या जवळ फक्त अर्धवट लुंगी लावूनच होता.


शाम शेळके पँट घालून येई पर्यंत अशोक मला म्हणू लागला - " नंदू दादा, तुला लई दुखणार भो आता..! आता हे बोट असचं धरून राहावं लागेल..! रात्रभर तू कन्हत राहशील..!" 

अशोक असं म्हणाल्या मुळे मी अजून गडबडून जात होतो.माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच विंचू चावला होता. विंचू चावल्याचा पूर्वाश्रमीचा अनुभव नसल्याने मी जरा जास्तच गडबडून गेलो होतो.शाम पँट घालून आला होता.त्याने मला एका दंडाला धरले अन् परसराम भेंडे याच्या गल्लीतून मला डॉ.गणेश वाणी या बालमित्राकडे घेऊन चालले होते. एखादा अंत्यसंस्कार करून आल्यावर जसं पाणी पाजणाऱ्या व्यक्तीला जसे दंडाला धरून घेऊन कुणीतरी चालते अगदी तसेच शाम माझ्या दंडाला धरून गल्लीतून घेऊन गणेश डॉक्टरकडे चालला होता. रस्त्याने पुन्हा अशोक मला म्हणाला - " यार, नंदू दादा, तुला इच्चू चावायला नको होता राव..! लई हाल होत्या, झोप येत नाही, लई दुखतं.."

शाम , अशोकला म्हणाला - " का..रे..आश्या मी कव्हांच पाहू राहिलो, याला धीर द्यायचा सोडून तू याला अजुन घाबरून देऊ राहिला..! तुला काही अक्कल हाये का..? चूप बस आता..!"

अशोक आता चूप झाला होता.आजू काळे गुरू या बालमित्राच्या गल्लीतून आम्ही अखेर डॉ.गणेश वाणी याच्या दवाखान्यात आलो होतो.रात्रीचे अंदाजे नऊ वाजले होते.त्यावेळी डॉ.गणेश वाणी याचा दवाखाना त्याच्या जुन्या घराजवळील आदरणीय बाबू काका मूलमूले यांच्या घरी होता.थेट नाटकाच्या ओट्यापासून ते गणेश वाणी याच्या दवाखान्यात येई पर्यंत मला दंडाला धरून आणल्यामुळे मी स्वतः ला VIP पेशंट समजू लागलो होतो.


डॉ.गणेश वाणी याच्या दवाखान्यात गेल्या गेल्या प्रिय बालमित्र अशोक मराठे पुन्हा मला म्हणू लागला..

" नंदू दादा, आता घाबरु नको.आता डॉ.इंजेक्शन देतील.तरी पण रात्रभर दुखलचं..!"

अखेर डॉ.गणेश वाणी याने ज्या बोटाला, ज्या ठिकाणी विंचू चावला होता त्याच ठिकाणी इंजेक्शन दिले.पुन्हा अशोक मला म्हणाला..

" नंदू दादा, आता घाबरु नको, तीन चार तास आता तुला वेदना होणार नाही,पण नंतर पुन्हा लई दुखायला लागेल..!"

हे ऐकल्या बरोबर बालमित्र डॉ.गणेश वाणी त्याला म्हणाला.." का..रे..तू याच्या सोबत याला धीर द्यायला आला की अजुन घाबरून द्यायला..!"

हे ऐकल्यावर शाम हसू लागला अन् म्हणाला..

" अरे ,मी याला कव्हापासून हेच म्हणू राहिलो..!"

अखेर अशोक देखील हसू लागला अन् म्हणाला..

" डॉक्टर, मी धीरच देत होतो..!"

डॉ.वाणी म्हणाले -" राव, ही कोणती नवीन पद्धत आहे धीर देण्याची..!"

आम्ही सर्वजण अशोक या बालमित्राच्या धीर देण्याच्या पद्धतीवर आश्चर्यकारक नजरेने पाहू लागलो होतो.


जिवलग बालमित्र शाम शेळके, अशोक मराठे, डॉ.गणेश वाणी आणि आमचे लहान मित्र परिवार भैय्यासाहेब त्रिभुवन यांनी माझ्या चावलेल्या विंचूच्या वेदनेला असह्य होण्यापासून सुसह्य केले होते.फक्त जिवलग बालमित्र अशोक मराठे याने जरा जास्तच असह्य केले होते इतकेच..!😊🙏🏻


गावच्या आठवणी ह्या सर्वात दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या आठवणी असतात,कारण त्या आठवणीत अमृत साठवलेले असते. अमृत संजीवन आयुष्य प्राप्त करून देते म्हणून..! याचमुळे गावच्या आठवणी संजीवन असतात. गावची माणसं अन् बालमित्र ही देवानं दिलेली सर्वोत्तम देणगी असते माणसाला, अर्थात ज्यांना यातील भाव समजला त्यांनाच..! .! आमचा खूप जिवलग बालमित्र अशोक मराठे हयात नाही, पण त्या विधात्याच्या नगरीतून आम्हा सर्व मित्रांची नक्कीच आठवण काढत असेल..! त्या विधात्याच्या नगरीतून या त्याच्या बालमित्राला ,त्याच्या भाषेत त्याच्या नंदू दादाला म्हणत असेल....

" अरे, नंदू दादा, पुन्हा जर इच्चू चावला तर ध्यानात ठेव, लई वेदना होतात बरं का..!"😊


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २७/४/२०२२, बुधवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा