मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
" विश्वासाचे दुसरे नाव प्रिय विद्यार्थी गणेश..!"
=====================================
विश्वास अन् माणूस या दोन शब्दांच गारूड एवढं मोठं आहे की, याच विश्वासाच्या बळावर माणसाच्या आयुष्यात नात्यांना बहर येत असतो. हा असा बहर असतो, ज्याला पतझड माहीत नसते. विश्वासाने निर्माण होणाऱ्या नात्यात भोलेनाथ शंकराच्या रुपातील पवित्र श्रावणातील हिरवळ नेहमी शोभून दिसत असते. श्रावणातील हिरवळीने जशी आपली वसुंधरा सजलेली दिसते, अगदी तसेच विश्वासाच्या मानवी नात्यात देखील अशी हिरवळ शोभून दिसते. एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करणं सोप आहे,पण तोच विश्वास टिकून ठेवणं, त्या विश्वासाला चिरंतन अमरत्व प्राप्त करून देणे ही फार मोठी गोष्ट आहे. निदान माणसांच्या सध्याच्या गुंतागुंतीच्या आयुष्यात तरी विश्वास ही एक फार मोठी तपश्चर्याच आहे असे मला वाटते.
मला शिक्षक म्हणून सेवा करत असताना सत्तावीस वर्षे झाली. या सेवेच्या आयुष्यात बहुतांशी विद्यार्थी चांगले लाभले. अर्थात काही असेही लाभले , ज्यांना बघून आपला आपण निमूटपणे रस्ता बदलून पुढे जावे. मात्र जे जे विद्यार्थी चांगले लाभले त्यात त्या त्या विद्यार्थांनी प्राप्त केलेली नैतिक आचरणाची जी तपश्चर्या प्राप्त केली होती त्याचं ते फळ होते. अशा अनेकांनी स्वतः ला समाजात आहे त्या परिस्थितीत सिध्द केले.यात अग्रस्थानी आहे माझा खूप आवडता प्रिय विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे होय..!
मी इ. स.१९९९ मध्ये जि.प.प्रा.शा. हडस पिंपळगाव, कें. लासुरगाव,ता. वैजापूर जिल्हा - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पूर्वीच्या शाळेतून बदली होऊन हजर झालो होतो. संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराजांच्या अध्यात्मिक विचारांचा प्रभाव हडस पिंपळगावच्या नागरिकांवर खूप मोठा होता. अर्थात माझेही जन्मगाव पालखेड येथे आमच्याच घराच्या समोर संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराज आश्रम अन् श्री. पारेश्र्वर महादेवाचे मंदिर असल्याने या गावाशी माझी वैचारिक नाळ पटकन जुळली. येथील शाळेत इयत्ता सातवी मध्ये गणेश नानासाहेब गाजरे हा शिकायला होता.
गणेश नानासाहेब गाजरे हा अभ्यासात फारसा हुशार नव्हता , पण प्रत्येक विद्यार्थ्याला जिथं खरं हुशार असायला हवं त्या नैतिक आचरण अन् अत्यंत विश्वासू या नैतिक मूल्यांच्या बाबतीत खूप श्रीमंत होता. अर्थात आजही आहे..! हडस पिंपळगाव येथील शाळेत लाभलेले सर्वच विद्यार्थी खूपच चांगले होते,पण ज्या विद्यार्थ्याने माझ्या स्व. वडिलांचे मन जिंकले होते त्यात बबन हजारे ( जळगाव, ता. वैजापूर ) या प्रिय विद्यार्थांच्या नंतर ते स्थान फक्त गणेश नानासाहेब गाजरे यानेच प्राप्त केले होते. त्याचं कारणही तसंच होतं. ज्यावेळी आपल्या पश्चात एखादा व्यक्ती आपल्या आई वडिलांची काळजी घेतो, त्यांची सेवा करतो अशी माणसं ही नियतीने आपल्या आयुष्यात पाठवलेली त्याच ईश्वरीय शक्तीचा अंश असतात या मताचा मी आहे.या माझ्या विचारला पुष्टी देणारे वर्तन प्रिय विद्यार्थी गणेश नानासाहेब गाजरे याचे माझ्या स्व. आई वडिलांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत राहिले. विशेषतः माझ्या स्व. वडिलांचा दशक्रिया विधी जो की, कायगाव ता. गंगापूर येथे गोदावरी नदीच्या तीरावर केला होता.त्या विधीची, तिथल्या व्यवस्थेची जबाबदारी याच माझ्या खूप आवडत्या विद्यार्थ्याने , गणेशने खूप जबाबदारीने पार पाडली होती. तो प्रसंग अन् ती सेवा माझ्या स्व. वडिलांना प्रत्यक्ष कृतीतून अर्पण केलेली एक सर्वोत्तम श्रद्धांजलीच होती. यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे थोरपण अजुन काय असू शकते..! ती थोरवी गणेशची नक्कीच आहे.
मी इ. स. १९९९ मध्ये इयत्ता सातवी वर्गाला शिकवायला असताना अभ्यासावरुन एकदा माझ्याकडून गणेशला छडी हातावर जोरात लागली. त्यात त्याला जखम देखील झाली होती. शाळा सुटली. मला उद्याचा धाक पडला होता की, आता उद्या गणेशचे वडील आपल्याला शाळेत नक्कीच याचा जाब विचारण्यासाठी येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत माझ्या वर्गात गणेशचे वडील आले,पण त्यांनी जाब विचारण्या ऐवजी मला असे म्हणाले की.
" गुरुजी, गणेश चुकला तर अजुन झोडपून काढा, आमचं काही बी म्हणणं नाही..!"
हे ऐकूण मी स्तब्ध झालो होतो. त्यात पुन्हा जी शिक्षा गणेशला मी केली होती, त्याबद्दल त्याने साधे डोळे वर करून डोळ्याने देखील मला प्रत्युत्तर दिले नव्हते. एखाद्याने किती नम्र असावे याचा तो परमोच्च प्रसंग होता.
मी अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे गणेश नानासाहेब गाजरे हा अभ्यासात फारसा हुशार नव्हता, पण त्याचं वागणं कमालीचं चांगलं होतं.बुध्दीमत्ता अन् त्याद्वारे आयुष्यात मिळणारे स्थैर्य या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक नाही असे मला वाटते. एक शिक्षक म्हणून मला असे वाटते की, दुनियादारीचे शिक्षण ज्याला मिळाले , किंबहुना अशाच लोकांनी आपल्या आयुष्यात यश प्राप्त केले आहे. बुध्दीमत्ता , दुनियादारीचे शिक्षण अन् त्याच्या सोबतीला जर नैतिक मूल्यांचा ठेवा सोबत असेल तर अशी माणसं सहसा आपल्या आयुष्यात अयशस्वी होत नाही. गणेश अभ्यासात जेमतेम होता त्यामुळे त्याने माध्यमिक शिक्षणाचा मार्ग अर्ध्यावर सोडून दिला. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने गावाच्या जवळच असलेल्या लासूर स्टेशन येथे एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. जिद्द, सचोटी, प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गणेशच्या अंगी असलेला निर्व्यसनीपणा या मूल्यांच्या आधारे स्वतः चा हॉटेल व्यवसाय ' जय बाबाजी हॉटेल ' या नावाने सुरू करण्याचे ठरवले. लासूर स्टेशन येथील सावंगी चौकात सुरुवातीला चहा अन् नाश्त्याचे हॉटेल सुरू केले. त्यात जम बसल्यावर थंड पेय असलेला व्यवसाय सुरू केला. काळाच्या ओघात त्यात चांगला जम बसला. विविध थंड पदार्थ, आईस्क्रीम तयार करण्याचा छोटेखानी प्रकल्प त्याने सुरू केला. जेणेकरून हाच माल दुसऱ्याकडून खरेदी करून ग्राहकांना विकण्यापेक्षा आपणच तयार करून विकु हा व्यावसायिक उद्देश त्यामागे होता. यात गणेशला यश मिळाले. गणेश त्याच्या व्यवसायात दिवसेंदिवस यश मिळवत होता अन् आहे .या यशाच्या मार्गात असताना त्याने त्याचा तोल ढळू दिला नाही हे विशेष..! नाहीतर बऱ्याचदा असे बघायला मिळते की, यश आपल्या सोबत अनेक अयशस्वी गोष्टीना सोबत घेऊन येत असते.
जी व्यक्ती,माणसं आपल्या आई वडिलांचा, घरातील जेष्ठांचा, स्रीयांचा कमालीचा आदर करतात, अशी व्यक्ती, माणसं सदा सर्वदा वंदनीय असतात. माझे स्व. वडील लासूर स्टेशन येथून कधी मधी पालखेड येथे जायचे. माझे स्व. वडील सावंगी चौकातून गावाकडे जाताना दिसले की, माझ्या स्व वडिलांना एखाद्या वाहनात बसून देई पर्यंत गणेश वडिलांच्या सोबतच असायचा. माझे वडील गावाकडून आल्यावर लासूर स्टेशन येथील माझ्या घरी त्यांना आणून सोडत असे. हे सर्व माझे स्व. वडील मला शाळेतून घरी आल्यावर अभिमानाने सांगत असे. हे नैसर्गिक नैतिक संस्कार , गणेशच्या अंगी होते त्यामुळे त्याचे स्थान माझ्या कुटुंबात खूप सन्मानाचे होते,आहे अन् राहील यात तिळमात्र शंका नाही.
मी माझ्या आयुष्यात अगदी माझ्या घरातील सदस्यांचे जे स्थान माझे काही बालमित्र, काही शिक्षक मित्र, जन सहयोग सामाजिक संस्था परिवार छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे सर्व सदस्य यांना दिलेले आहे तेच स्थान माझ्या या खूप प्रिय विद्यार्थ्याला म्हणजेच गणेश नानासाहेब पाटील गाजरे याला दिलेले आहे. हे स्थान माझ्या मुलांच्या पुढील पिढीत देखील राहील हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे..! कारण नियतीने आपल्या आयुष्यात जी काही देव माणसं कोणत्या ना कोणत्या रूपात पाठविलेली असतात ,ती हीच तर आहे..!🙏🏻
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : ४/११/२०२२, शुक्रवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा