शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

दोन गोष्टी, दोन पितृतुल्य व्यक्तिमत्वांच्या..! "


 


आमचे गाव आमची माणसं ©️


" दोन गोष्टी, दोन पितृतुल्य व्यक्तिमत्वांच्या..! "


==================================


प्रसंग , साधारणतः नव्वदच्या दशकाच्या अखेरीस घडला होता. मी त्यावेळी पालखेड येथे वास्तव्य करत होतो. मी शिक्षक म्हणून सेवेत गावाच्या जवळील हडस पिंपळगाव, ता. वैजापूर येथे कार्यरत होतो. शाळेतून घरी आल्यावर माझा खूप जिवलग बालमित्र नितीन जैन याच्या कापड दुकानात निवांत जाऊन बसायचो.


तिथं आम्हा दोघा बालमित्रांचे कौटुंबिक स्नेही तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड देखील हमखास भेटायचे. तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड आम्हा दोघा मित्रांना नेहमी वडिलकीच्या दोन गोष्टी नेहमी समजावून सांगत असायचे.ही दोन्ही जेष्ठ व्यक्तिमत्वे आमच्या वडिलांच्या वयाची होती, पण नेहमी नितीन अन् माझ्याशी जिवलग मित्राच्या नात्याच्या सहवासात असायची.


असेच एकदा १ जानेवारी १९९७ रोजी सकाळी मी नित्य नियमाने ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन दररोजच्या नित्यक्रमानुसार नितीनच्या दुकानात काही वेळासाठी आलो होतो. तिथं तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड बसलेले होते. तिघांच्या मस्तपैकी गप्पा सुरू होत्या. नितीनच्या रेडिओ वर सुमधुर गाणी सुरू होती. त्या गाण्याकडे तिघांचेही लक्ष नव्हते. तिघेही गप्पांमध्ये पार रंगून गेले होते. मी तिथं गेल्या गेल्या नितीन जैन यास एक जानेवारी , नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.दुकानाच्या ओट्यावर तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड बसलेले होते. तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड यांना आम्ही काका अन् दादा या प्रेमळ संबोधनाने नेहमी उल्लेखित करायचो. नितीनला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नंतर मी काका अन् दादांना देखील त्यांचा हात माझ्या हातात घेऊन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या..! यावर ती दोघेही पितृतुल्य व्यक्तिमत्वे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागली. मी काही क्षण बुचकळ्यात पडलो.काय झालं तेही कळेना.अखेर तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड अखेर बोलते झाले.


त्यावेळी तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड मला म्हणाले होते - " अरे नंदू , आपून दररोज पहाटे झोपेतून उठतो, तिथून पुढचं आपलं दर्रोज नवीन वर्ष असतं..! अन् काय रे हे जाऊं दे, आपलं नवीन वर्ष तर गुढीपाडव्याला असतं ना..? हे काय काढलं अजुन..?"

मी अन् नितीन फक्त ऐकण्याच्या मनःस्थितीत होतो.नितीनने रेडिओचा आवाज खूप कमी केला होता. लगेच बाजूला बसलेले तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके उपाख्य काका मला म्हणाले ( ते मला नेहमी ' गुरुजी ' म्हणूनच उल्लेखित करायचे ) - " गुरुजी, आपल्या तळ्यापाळी जे घिसाड्याचे माणसं आलेली आहेत.त्यानला कशाचं नवीन वर्ष अन् कशाचं काय..! त्यांच्यासाठी समदी दिवसं सारखीच..!"

( आमच्या पालखेड गावाच्या दक्षिणेला जे मोकळे मैदान होते, त्या परिसराला निदान माझ्या पिढीपर्यंत तळ्यापाळी असं म्हणत असायचो. आता गावाचा फुगवटा झाला आहे त्यामुळं त्या परिसराला आता काय म्हणतात ते माहीत नाही.)


रंगनाथ पाटील काका अन् गिरजीनाथ दादांचे बोलणे ऐकून मी उभयतांना नवीन वर्षाच्या दिलेल्या शुभेच्छा जरा लाजल्या सारख्या झाल्या होत्या. आपण काहीतरी मीस करतोय याची भावना निर्माण झाली होती. पण मी स्वतः ला तथाकथित सुशिक्षित अन् आधुनिक काळातील समजत असल्यामुळे मला एक जानेवारी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे अप्रुप वाटत होते. तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड यांनी अर्थात मी प्रेमाने दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार माझ्या खांद्यावर हात टाकून प्रेमाने केला होता. यातच या जुन्या पिढीचे मोठेपण होते. स्वीकार केला पण दोन वडिलकीच्या गोष्टी देखील सांगून दिल्या..!


तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड या दोन्ही ज्येष्ठांच्या सहवासातील प्रत्येक क्षण मी माझा जिवलग बालमित्र नितीन जैन ( ह.मु. लासुर स्टेशन ) ,आम्हाला आयुष्यासाठी खूप काही देऊन गेला आहे. मी इ. स. १९८९ मध्ये चहा प्यायची बंद केली ती आजतागायत बंदच आहे.याचे संपूर्णपणे श्रेय जाते ते तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड यांनाच..! दादांनी त्यांच्या अख्ख्या हयातीत एकदाही चहा पिली नव्हती.माझा खूप जिवलग बालमित्र सोमनाथ गायकवाड ( ह.मु. बजाजनगर , औरंगाबाद ) याचे वडील होते गिरजीनाथ दादा..! एकाच आळीत राहत असल्याने कायम एकमेकांच्या घरी उठ बैस असायची.


तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके यांचे अन् आमचे घर देखील एकाच आळीत होते. त्यांचा थोरला मुलगा पोपट शेळके हा कायमस्वरूपी हडस पिंपळगाव येथे स्थायिक झाला होता. अर्थात आजही स्थायिक आहे. मी माझ्या शिक्षकी आयुष्यातील सेवेची जवळ जवळ सात वर्षे याच हडस पिंपळगावात व्यतीत केली. मी त्यावेळी पालखेड येथून 

हडस पिंपळगावात दुचाकीवर येणे जाणे करायचो. आठवड्यातून तीन चार दिवस तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका माझ्या गाडीवर सोबत यायचे.ते ज्या ज्या वेळी यायचे , त्या त्या वेळी दुपारच्या मध्यांतरी शाळेच्या जवळच असणाऱ्या पोपट शेळके यांच्या घराच्या ओट्यावर निवांत त्यांच्याशी गप्पा मारायचो. नातं गावचं होतं, त्यातल्या त्यात आम्ही एकाच गल्लीतील मूळचे रहिवाशी असल्याने खूप आत्मियात होती.तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका यांनी प्रवासात, भेटीत, बैठकीत ज्या ज्या गोष्टी आयुष्यात समजावून सांगितल्या होत्या, त्या आयुष्यभर पुरून उरतील इतका मोठेपणा त्यात दडलेला आहे. 


तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड या दोन्ही ज्येष्ठांना आपल्यातून कायमचे निघून जाऊन कित्येक वर्षे झाली आहेत. आजही या दोन्ही ज्येष्ठांच्या सहवासातील प्रत्येक क्षण अन् क्षण सतत सोबत असतो.आयुष्यात कधी काही प्रसंग आलाच तर ज्या काही ज्येष्ठांची आवर्जून आठवण येते त्यात तीर्थस्वरुप रंगनाथ पाटील शेळके काका अन् तीर्थस्वरुप गिरजीनाथ दादा गायकवाड हे दोघेही त्या आठवणीत नक्कीच असतात. कुणी देहाने भले आपल्या सोबत नसेल, पण जर आपण एखायावर निरपेक्ष प्रेम केलेलं असेल तर अशी स्वर्गवासी माणसं देखील आपल्या सोबत सतत असतात, याचा मला अनुभव आहे. अशावेळी ही स्वर्गवासी माणसं, आपल्या सोबत असल्याची जाणीव तेंव्हाच होत असते,जेंव्हा आपण अशा काही रक्ताच्या अन् बिगर रक्ताच्या जेष्ठ नात्यांना कृतीतून प्रेम दिलेलं असेल. 


असो, आम्ही स्वतः ला  सुशिक्षित अन् आधुनिक काळातील नागरिक समजत असल्यामुळे सर्वांना ख्रिस्त नवीन वर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा..!🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १ जानेवारी ,२०२३, रविवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा