मला प्रवासात भेटलेली माणसं..! ©️
" शौर्य तीर्थक्षेत्र भेट - हुतात्मा तुकाराम ओंबळे "
_________________________________________
आम्ही मे २०१७ च्या सुरुवातीच्या आठवड्यात मी, माझी पत्नी अन् दोन्ही मुलं धार्मिक तीर्थक्षेत्र, आधुनिक तीर्थक्षेत्र यांचे मनोभावे दर्शन व वैज्ञानिक कुतूहलापोटी प्रत्यक्ष दर्शन घेऊन आलो. मे २०१७ च्या परतीच्या प्रवासात वेरावल -गुजरातहून दुपारी १:२०ला रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघालो.दुसऱ्या दिवशी सकाळी आमची रेल्वे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सकाळी ७:३४ला पोहचली.सकाळी फ्रेश झालो व मुंबईचा वडा पावचा नाश्ता केला.वास्तविक ज्योतिर्लिंग सोमनाथला जातांना ज्यावेळी मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उतरलो होतो;त्यावेळी तेथील गर्दी पाहून व गतकाळातील याच ठिकाणी आपल्या अस्मितेवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या स्मृति जाग्या झाल्या होत्या. परंतु सोमनाथला जातानाच्या प्रवास नियोजनात मुंबईचे आधुनिक तीर्थक्षेत्र-तारांगण व विज्ञान केंद्र दर्शन होते.आणि त्यांचा उत्स्फूर्त आनंद घेतलाही. सोमनाथहून येतानांच्या प्रवास नियोजनात दर्शन घेण्याची व नतमस्तक होण्याची सारखी हुरहूर लागली होती.
एका असामान्य तीर्थक्षेत्राची, एका असामान्य शूरवीराच्या प्राणाच्या बलिदानाने पूनित झालेल्या " शौर्य तीर्थक्षेत्र " ला भेट देण्याची...! ते " शौर्य तीर्थक्षेत्र " होते सिंधू सागराच्या किनाऱ्यावरील गिरगाव चौपाटीच्या मुख्य रस्त्यालगत..!आणि त्या शौर्य तिर्थक्षेत्राचे वंदनीय शौर्य पूरूष होते..."हुतात्मा तुकाराम ओंबळे साहेब( सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)...!!
टॅक्सीतून उतरून आम्ही अथांग सिंधू सागराला नजरेत सामावून घेतले.मुख्य रस्त्यावर आलो.एका शहर पोलिसाला मी विचारले
" साहेब,इथे शौर्य पूरूष तुकाराम ओंबळेजींचे स्मारक कुठे आहे..?" माझा हा प्रश्न ऐकुन ते शहर पोलिस आश्चर्यचकित व अभिमानास्पद नजरेने माझ्याकडे काही क्षण बघतच राहिले.मग काही क्षणानंतर त्यांनी प्रेमाने ,आत्मीयतेने आमची चौकशी केली.मी त्यांच्या मानसिकतेचा बरोबर अंदाज लावला की, बहुदा हुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या स्मारकाची चौकशी केल्याने त्यांना खूप आनंद झाला होता.आम्हाला दुरून ते ठिकाण दाखवून ते आपल्या सेवेसाठी गेले.
गिरगाव चौपाटीवरील मुख्य रस्त्यालगतच ते "शौर्य स्थळ " होते.आम्ही सर्वजण मी ,माझी पत्नी,थोरला मुलगा चि.नमन व धाकटा मुलगा चि.नयनने त्या महान ,देशरक्षणासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या थोर सुपुत्रास विनम्र वंदन केले.याच ठिकाणी आपल्या शत्रू राष्ट्राने (त्याला राष्ट्र म्हणायच्या सूध्दा स्थितीत ते सध्या नाही..) पाकिस्तानने दि.२६/११/२००८ रोजी मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाठविलेल्या अजमल कसाब नावाच्या राक्षसी अतिरेक्याला जिवंत पकडले होते ...हुतात्मा तुकाराम ओंबळेजींनी.मात्र त्या नराधमाने ओंबळेजींना बंदुकीच्या गोळ्यांंनी घायाळ केले होते.स्वतः घायाळ होवून सूध्दा ओंबळेजींनी क्रूरकर्मा दहशतवादी कसाबला आपल्या वज्रबाहूपाशातून सोडले नव्हते.
अखेर तो क्रूरकर्मा जिवंत पकडला गेला; परंतु भारतमातेचा थोर सुपुत्र तुकाराम ओंबळेजी धारातीर्थी पडले..! धारातीर्थी पडले ते सर्वसामान्य मुंबईकरांचे,भारतवासियांचे प्राण वाचविण्यासाठी..! हे विचारचक्र माझ्या मनात चालू होते.त्या "शौर्य तीर्थक्षेत्राला "पूनश्च एकदा वंदन करून आम्ही पुन्हा त्याच शहर पोलिसांकडे आलो.कारण आमचा टॅक्सी थांबा तेथे होता. मुंबईच्या भीषण गरमीत,खूप जाम करणा-या वाहनांना मार्ग दाखवित आपली सेवा ते शहर पोलिस साहेब इमानेइतबारे करत होते. उष्णतेची परवा न करता. त्यांची व माझी फक्त नजरभेट झाली. त्यांना पाहून मला माझ्या सावलीतील नोकरीचा असणारा पोकळ गर्व पार गलितमात्र झाला. मनोमनी त्यांनाही वंदन केले.त्या शहर पोलिस साहेबांच्या नजरेत " आमचा कुणीतरी सन्मान केला, शौर्य तिर्थक्षेत्राला भेट देऊन ...!" हा आत्मगौरवाचा भाव मला जाणवला. एवढ्या घाईत देखील त्यांनी आमच्याकडे बघून स्मित केले.आम्हाला खूप आनंद झाला होता.
आमची या "शौर्य तीर्थक्षेत्राला" भेट दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. "शौर्य तीर्थक्षेत्र " हुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या पुतळ्याखालील लिहिलेल्या ओळी मनात म्हणत होतो...
" प्राणाचे देऊनी बलिदान..वाचविले असंख्य प्राण... हे शूरवीरा ,आपणास मुंबईकरांचा प्रणाम..!"🙏🏻
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
लेखन दिनांक:२५ मे २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा