मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

आदरणीय भाऊ तोरसेकर, एक समृद्ध विचारांचे प्रगल्भ विद्यापीठ..! "


 


____________________________________________


मी प्रथमतः नम्रपुर्वक हे स्पष्ट करू इच्छितो की, खालील छायाचित्रात मी ज्येष्ठ पत्रकार व लेखक आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या जवळ , खूप जवळ बसलेलो असलो तरी भाऊंशी काहीही चर्चा केलेली नाही.

हल्ली कोणत्याही थोर,मोठ्या माणसांच्या नुसता जवळ जरी एखादा कुणी उभा राहिला तरी असले कित्येक माणसं , वर्तमापत्राद्वारे किंवा विविध तांत्रिक प्रसार माध्यमांवर असे मजकूर लिहितात की, 

" अमक्या...अमक्या शी अमक्या अमक्या विषयावर चर्चा करताना अमके..किंवा तमके..! "


असो,माझ्या व आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या एकमेकांसोबत असलेल्या छायाचित्रा बाबत माझ्या वतीने केलेले नम्रपूर्वक स्पष्टीकरण समाप्त झाले.

____________________________________________


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


" आदरणीय भाऊ तोरसेकर, एक समृद्ध विचारांचे प्रगल्भ विद्यापीठ..! "

__________________________________________


ज्येष्ठांच्या संगतीचा मला पहिल्यापासून छंद..! माझ्या आयुष्यातील आता पर्यंत सहवासात आलेल्या प्रत्येक जेष्ठ नागरिकांपासून मी सतत काहीतरी शिकत आलो.त्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना बोलते केले होते त्यांच्या गत अनुभवांचा खजिना खोलायला..!


आज दिनांक २१/१०/२०१८ रोजी मात्र माझ्या समोर असे ज्येष्ठ नागरिक उभे होते, ज्यांच्या सिद्धहस्त लेखनीचा तर मी प्रचंड चाहता होतोच...पण दिनांक २१/१०/२०१८ रोजी त्याच लेखणीच्या जादुगाराला प्रत्यक्ष याची देही याची डोळा व कानी ऐकण्याची व पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली.


ज्येष्ठ पत्रकार व लेखक आदरणीय भाऊ तोरसेकर यांना ऐकलं अन् एखाद्या विषयावर मुद्देसूद ,परखड विवेचन कसे असावे ,एखाद्या पत्रकाराची पत्रकारिता कशी असावी,त्यातील मुद्द्यांचे विवेचन कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण..माझ्या व उपस्थित सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले.


बहुदा परखड पत्रकार स्व. आचार्य अत्रे यांच्या बऱ्याच परखड विचारांचे सोने असेच त्याकाळी श्रोत्यांनी लुटले असणार.


माझ्या सारखी कित्येक माणसं विचारांवर , प्रचंड श्रद्धा बाळगून असतात.एखाद्या व्यक्ती वरील श्रद्धा कालपरत्वे बदलत असते,पण त्याच अशा कित्येक राष्ट्र पुरुषांच्या प्रगल्भ विचारांना कधीही अन् कुणीही मृत करूच शकत नाही.कारण विचार हे चिरंजीव असतात. विचार हे सदैव तरुण असतात..! मात्र ते विचार फक्त तरुण,चिरंजीव असून भागणार नाही तर..


ते विचार नदीतील वाहणाऱ्या पाण्या सारखे निर्मळ असावे..!


विचार एखाद्या वनराईने नटलेल्या पर्वतासारखे असावे..!

विचार हे पहाटेच्या मंद सुगंध देणाऱ्या हळुवार गार वाऱ्यासारखे असावे..!


विचार हे एखाद्या नववधू सारखे असावे, ज्या प्रमाणे नववधू आतुर असते,आपल्या भावी आयुष्या विषयी..!

ओढ असते तिला आपल्या होऊ पाहणाऱ्या सुंदर स्वप्ना विषयी..!


विचारांचे ही अगदी तसेच असावे..त्या विचारांना ओढ असावी आपल्यातून निर्माण होणाऱ्या उज्वल भविष्या विषयी..!


विचार हे एखाद्या क्षत्रियाचा तेज निर्माण करणारे असावे..!

विचार हे निरागस देखील असावे पण पोरकट कदापि नसावे..!


मी आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या सर्वार्थाने परिपूर्ण असणाऱ्या पोक्त विचारांचे सोने मी यथेच्छ लुटले.भाऊंची मिश्किल शैली, प्रत्येक मुद्द्यांचे सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडून गेली. 


 आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या खूप जवळ जाऊन मला त्याच्या साध्या सरळ वागण्याचे कमालीचे कौतुक वाटले.अगदी साधी राहणी.श्रोत्यांना आपलंस करणं, इ.अनेक गुण वैशिष्टे मला भावून गेली.भाऊंच्या जवळ जाऊन त्यांच्या मध्ये असलेली विद्वत्ता व नम्रता जवळून पाहिली.गर्दी खूप होती.भाऊ प्रत्येकाला काहीसा वेळ देत होते.


आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला एखाद्या ग्रेट माणसाचा वैचारिक स्पर्श हा परीस स्पर्शाहुन श्रेष्ठ असतो.मी दूर झालो..अन् दुरून न्याहाळत राहिलो त्या अतिशय सामान्य राहणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वाला,आदरणीय भाऊ तोरसेकर यांना..! मला विशेष आनंद याचा आहे की, आदरणीय भाऊ तोरसेकर माझ्या सुटसुटीत फेसबुक मित्रयादीत आहे..! 🌹


ता.क.: एखाद्या विद्वान माणसाला फक्त एक ते दीड तास ऐकणे म्हणजे एक संपूर्ण ग्रंथ वाचण्यासारखे असते.

मी दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ रोजी संध्याकाळी एक ग्रंथ मन लावून वाचला,ऐकला अन् प्रत्यक्ष पहिला देखील..!


वंदे मातरम्..!🙏


आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या लेखणीचा नियमित वाचक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


प्रसंग स्थळ: तापडिया नाट्य मंदिर,औरंगाबाद.


निमित्त - स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला


प्रसंग दिनांक: २१ ऑक्टोबर २०१८ आणि..

लेखन दिनांक - २२/१०/२०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा