शनिवार, १४ मार्च, २०२६

जिवलग बालमित्रांच्या सस्नेह भेटी..!


 

आमचे गाव आमची माणसं ©️


जिवलग बालमित्रांच्या सस्नेह भेटी..!


=====================


काल दिनांक १४/३/२०२६, शनिवारी रात्री आमचा जिवलग बालमित्र विलास उत्तम निकम हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर याच्या कन्येच्या विवाह निमित्त आम्ही बालमित्र छत्रपती संभाजीनगर येथे एकत्र भेटलो. सोबत होते सर्व जिवलग बालमित्र गोपीनाथ निकम, वाल्मीक निकम, वधू पिता विलास निकम आणि डॉ. संजय राऊत..! यातील काहींवर यापूर्वीच ब्लॉगवर यापूर्वीच लिहिले आहे.काही बाकी आहेत.वधू पिता तथा जिवलग बालमित्र विलास निकम तथा संजय राऊत यांच्यावर माझ्या ब्लॉगवर यापूर्वीच  लेख लिहिलेले आहेत.


वधू पिता विलास निकम या बालमित्राच्या पालखेड येथील तत्कालीन हॉटेल मध्ये ( घर आणि हॉटेल एकच होते ) बसून आमच्या घरात एवढं थांबलो नाही तेवढं विलासच्या हॉटेल मध्ये उठल्या पडल्या बसून अनेकानेक विषयांवर पारायणे केलीत.त्याविषयी सविस्तर विलासवर यापूर्वीच लिहिलेल्या लेखात लिहिलेले आहे. त्या जिवलग बालमित्राच्या कन्येच्या विवाह सोहळ्यातील उपस्थिती खूप साऱ्या आठवणी पुन्हा एकदा आठवण करून गेल्या.


काल रात्री माझा अत्यंत जिवलग बालमित्र Dr. संजय राऊत अन् मी  ज्या धावपळीत सदरील विवाह सोहळ्यास आलो ते फक्त आणि फक्त आम्हीच करू शकतो. गतकाळातील , बिकट परिस्थितीत एकमेकांना दिलेला भावनिक आधार अन् एकमेकांच्या घरात घरातल्या सारखं वावरणं या नात्याचा हा मूळ आधार..!  एकमेकांची गतकाळातील बिकट परिस्थिती अन् त्यात एकमेकांना दिलेला आधार हाच कोणत्याही नात्याचा सर्वोत्तम आधार असतो.बाकी सगळी नाती मिथ्या ठरतात अन् आहेत. रक्ताची अन् रक्तविरहित नाती हा काय प्रकार असतो अन् त्यातील खरे खोटे कोणते याचा निदान आम्हा काही जिवलग बालमित्रांना अन् इतर काही जिवलग मित्रांना अजून तरी उलगडा झालेला नाही आणि होऊ पण द्यायचा नाही. त्याचं कारण जे नाते आपल्याला आहे त्या परिस्थितीत अन् बिकट परिस्थितीत एकमेकांच्या परिस्थितीला समजून उमजून घेते तेच नाते शाश्वत..! बाकी सब मोह माया आहे.हाच श्रीमद् भागवताचा सार आहे; पण आपल्याला आपल्या महान पूर्वजांनी जे सांगितले आहे त्यातील भावार्थ समजून न घेता आपण नको त्या बेगडी नात्यात स्वतःला शोधत असतो.विषयांतर झाले, पण आमच्या अनेक बालमित्रांच्या नात्यातील हाच भावार्थ आम्ही शोधला अन् आजही त्यावर कायम आहोत त्या विषयाच्या अनुषंगाने उपरोक्त विषय लिखाणात आला.


विशेष म्हणजे आम्ही गोपीनाथ निकम बाळगता यातील सर्वजण चित्रपटाचे विशेष रसिक..! एखादी कथा कशी तोंडी सादर करावी या बाबतीत उपस्थित दोन जिवलग बालमित्रांचा हात  पाय अन् तोंड कुणीच धरू शकणार नाही.अर्थात त्या कथा ऐकताना फक्त आमच्यातच एक श्रवण भक्त म्हणून सहनशक्ती आहे हे आम्हा यात उपस्थित नसलेल्या काही बालमित्रांना ठाऊक आहे.🙂


लग्न सोहळा आटोपला.वधू पिता विलास निकम याच्या तीर्थस्वरूप  सासूबाईंची श्रद्धेय भेट घेतली.वधू पिता विलास निकम याच्या तीर्थस्वरूप सासूबाईचे माहेर  आमच्याच मूळ परिसरातील धोंदलगाव येथील..! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जिवलग बालमित्र विलासच्या सासुबाई माझ्या तीर्थरूप वडिलांच्या माजी विद्यार्थिनी..! त्या भेटीत माझ्या तीर्थरूप वडिलांच्या आठवणी निघाल्या अन् पित्याच्या सानिध्याची जाणीव झाली.


मी अन् डॉ. संजय राऊत रात्री लग्न सोहळ्यातून निघाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरातील कित्येक गल्ल्या पालथ्या घातल्या. त्यात प्रत्येक गल्लीत गतकाळातील आपले दिवस शोधले. तो स्वतंत्र्य लेखनाचा विषय असेल.एकमात्र नक्की ज्यावेळी काल रात्री उशिरापर्यंत मी अन् संजू राऊत छत्रपती संभाजीनगर शहरातील गल्ल्या हिंडलो त्यावेळी वाल्मीक निकम , Dr.गणेश वाणी, स्व.शाम शेळके, आण्णासाहेब म्हस्के, संजय गायकवाड, संजय भाऊ गणपतकाका शेळके, पारसनाथ भोईटे इत्यादी बालमित्रांच्या आठवणींना गतकाळातील सानिध्याचा अंधारलेल्या रात्री उजाळा मिळाला.त्यात कैलासनगर मधील स्मशानभूमी, बाजूलाच जळणारे मृतदेह, कित्येक रात्री रूम मधील खिडक्यातून दिसणाऱ्या त्या जळणाऱ्या मृतदेहाच्या सोबत मित्रांच्या रूमवर मुद्दामहून केलेला मुक्काम सगळं काही सोबत होते.फक्त आज त्या त्या ठिकाणाला ग्लॅमर मिळाले आहे इतकेच..!माझ्या मुलांना कैलासनगर मधील स्मशानभूमी, तिथला परिसर आणि तिथल्या आठवणी प्रत्यक्ष तिथे नेऊन दाखविलेल्या अन् सांगितलेल्या आहेत.छत्रपती संभाजीनगर येथील कैलासनगर परिसरातील तत्कालीन किरायाच्या खोल्या वारसा हक्काने आमच्याच इतर जिवलग बालमित्रांना मीठ ,मिरची, भाजीपाला रूम मधील सर्व भांड्यासह सुपूर्द केल्या होत्या. किती तो जीव..!♥️


मध्यरात्र ओलांडली होती. भले आम्ही आजच्या ग्लॅमर लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर  शहरात अंधारलेल्या रात्रीत फिरत होतो, मात्र आम्ही त्याच गतकाळातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात स्वतःला शोधत होतो. गतकाळातील वास्तवात जगलेल्या आठवणींना झोप येऊ लागली होती.पुन्हा कधीतरी त्या गतकाळातील आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील व्यक्त होण्यासाठी..! जिवलग बालमित्र Dr. संजय राऊत यास देखील दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कर्मस्थळी जायचे होते.


वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : १५/३/२०२६, रविवार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा