शुक्रवार, १७ जुलै, २०२०

चिंतन " थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे..! "




चिंतन
                                                   
" थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे..! "

====================================

ज्ञान ,बुद्धिमत्ता याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ..!नाममात्र शिक्षण,परंतु दुनियादारीनेअसे काही  शिक्षण दिले की,अण्णाभाऊ थोर साहित्यिक या बिरुदावलीने समग्र साहित्य विश्वात आजही  आदराने ओळखले जातात..! संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले..!आपल्या डफावरील थापेने मुंबई महाराष्ट्रात राहू देण्यात अण्णाभाऊंचे योगदान महाराष्ट्र कदापि विसरणार नाही..!

त्यांचे साहित्य म्हणजे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्त्व करणारे व अंतर्मनाला भिडणारे..!त्यांची "फकिरा" व " वारणेचा वाघ"या कादंबऱ्या तर वाचकाच्या भावविश्वाला हिंदळून टाकतात..!

मी वारणेचा वाघ या कादंबरीवरीर चित्रपट  माध्यमिक शाळेत असतानाच पालखेड येथे स्व.दौलतकाका कुमावत यांच्या व्हिडिओ थियेटर मध्ये पाहिला आहे.
कथा,कादंबरी,पोवाडे,प्रवासवर्णने इ.साहित्य विश्वातील सर्व क्षेत्रात भाऊंनी मुसाफिरी केली..अन् साहित्य रसिकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतले..!

कदाचित औपचारिक शिक्षणामुळे माणूस पूर्णपणे दुनियादारीचे शिक्षण नाही घेऊ शकत.मात्र  परिस्थिती अन् परिसर माणसाला सर्वात जास्त साक्षर करून दुनियादारीच्या शिक्षणात साक्षर करत असतो..! दुनियादारीच्या शिक्षणातून माणसाच्या आयुष्यात जी साक्षरता येते,ती आयुष्याला योग्य दिशा दाखवते अन् त्यातूनच मनातील भावना बऱ्याचदा व्यक्त होत असतात.याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे होय..! आण्णाभाऊंनी जे जे आपल्या साहित्यात लिहिलं, ते ते त्यांच्या अंतर्मनातील वेदना व्यक्त होत होत्या..! ते त्यांनी अनुभवलेलं होतं..! मुंबईसारख्या ठिकाणी अतिशय सर्व सामान्य परिसरात,परिस्थितीत आण्णाभाऊंनी ज्या ज्या वेदना सोसल्या,त्याच त्यांनी आपल्या बहुतांशी साहित्यातून ,त्यातील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून व्यक्त केल्या..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचंड प्रभाव होता. दोन्ही वंदनीय व्यक्तींच्या सामाजिक संवेदना सारख्याच होत्या ते त्यांच्यातील एकासुत्रतेचे कारण होते.वंचित समाजातील समाजमनाच्या व्यथा या दोन्ही वंदनीय राष्ट्रपुरुषांनी आपापल्या साहित्यातून व्यक्त केल्या.आण्णाभाऊ साठे यांची ' फकिरा ' कादंबरी तर ,आण्णाभाऊंच्या अंतर्मनातील धगधग व्यक्त करते.त्यातील फकिरा ही व्यक्तिरेखा , वंचित समाजातील व्यक्तिरेखेचे प्रतिनिधित्व करणारी आहे.फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे..!

दुनियादारीने शिक्षित केलेले थोर  साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त (दि.१८ जूलै १९६९)त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन..!🙏

वंदे मातरम्...!
               
अभिवादक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : १८ जुलै २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा