मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
" जिव्हाळ्याच्या माणसांचे एकत्रीकरण..! "
=============================
लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद..!
पंचक्रोशीतील गावांची व्यापारी पेठ..! मी येथे माझे जन्मगाव पालखेड, ता. वैजापूर येथून इ. स.२००२ मध्ये स्वतः च्या घरात वास्तव्यास आलो. लासूर स्टेशन तसे आमच्या पालखेड पासून साधारणतः १५ किलोमिटर अंतरावर,त्यामुळं पूर्वाश्रमीचा परिचयाचा भाग होता.
दिवसामागून दिवस जात होते. इ.स.२०१३-१४ मध्ये याच लासूर स्टेशन येथे एक जेष्ठ व्यक्तिमत्व आपल्या सहचारिणी सोबत वास्तव्यास आले.त्यांच्या सहचारिणी लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर म्हणून रुजू झाल्या होत्या, आणि ते जेष्ठ व्यक्तिमत्व मुंबई महानगर पालिका मधील सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकारी होते. त्यांचं नाव होतं, तीर्थस्वरुप कमलाकर क्षीरसागर काका..! ते मूळचे राहणार डोंबिवली , मुंबई येथील होते.
मी दररोज पहाटे लासुरगाव रस्त्याने फिरायला जायचो, त्याचवेळी तीर्थस्वरुप कमलाकर क्षीरसागर काका देखील यायचे.मी आपला एकटाच मांगीलाल शेठ यांच्या बर्फाच्या कारखान्याच्या ओट्यावर जशा जमेल तशा शारीरिक कसरती करत असायचो. मी तिथून घरी आलो की, माझ्या घराच्या आसपास असणारा कचरा गोळा करायचो अन् त्याची जाळपोळ करत असायचो.अर्थात आसपासची काही माणसं कचरा फेकून द्यायची अन् पुढील उपक्रम मी करत असायचो.काही दिवस निघून गेल्यावर एक दिवस मी सकाळी फिरून घरी आल्यावर, साधारणतः सकाळी ६ वाजता माझ्या घराचा दरवाजा कुणीतरी ठोठावला.मी दरवाजा उघडला तर बाहेर तेच जेष्ठ व्यक्तिमत्व उभे होते, जे मला दररोज पहाटे दिसायचे. मी लगेच त्यांना म्हणालो ..
" नमस्कार काका...! या ना आत मध्ये..!!"
असं म्हणून काका घरात आले, निवांत बसले. दररोज सकाळी फिरण्याची सवय, कचऱ्याची जाळपोळ इत्यादी विषयी चर्चा झाली अन् काकांनी मुख्य विषय काढला..
" आपण याच लासुरगाव रस्त्यालगत झाडे लावूया, अजुन कुणी तयार झाले तर बरेच आहे,आणि मला खात्री आहे,नक्कीच माणसं उभे राहतील, आपण काम सुरू तर करू..!"
मी लगेच होकार दिला अन् दुसऱ्या दिवशी काकांनी लासूर स्टेशन येथील काही तरुणांना सकाळी सोबत घेतले अन् झांबड शेठ, आदरणीय मोडके सर यांच्या घरापासून झाडे, लावण्यास सुरुवात केली. पहाटे फिरून आल्यावर सकाळी आम्ही खड्डे खणून त्यात झाडे लावू लागलो.दररोज सकाळी साधारणतः ८ वाजेपर्यंत हे काम सुरू असायचे.त्यानंतर माझी शाळेत जायची तयारी करावी लागत असायची,त्यामुळं मी घरी निघून जायचो अन् उर्वरित सदस्य देखील घरी निघून जायचे. हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन येथील सर्व सदस्यांचे निस्वार्थ सेवेने केलेल्या कार्याचं ऋण फक्त निसर्गच उतरवू शकतो,एवढं महान कार्य या सर्व सदस्यांनी केलेलं आहे..!
एक दिवस आम्ही करत असलेल्या या एकत्रित संघटन कार्याचं नामकरण केलं अन् ते म्हणजे ' हरित क्रांती प्रतिष्ठान - लासूर स्टेशन ' कोणत्याही गोष्टीला नाव मिळालं म्हणजे, ते नाव जपावं लागतं हा अगदी साधा नियम ,त्यामुळं आम्हा सर्व हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन येथील सदस्यांवरील जबाबदारी अजुन वाढली होती. आमचा दररोजचा दैनिक क्रम ठरला होता. मी पहाटे फिरून आल्यावर हरित क्रांती प्रतिष्ठानचे बहुतांशी मित्र स्वतः हून अमक्या अमक्या ठिकाणी येऊन वृक्षरोपण अन् संवर्धन हा उपक्रम सुरू झाला.
लासूर स्टेशन येथे, लासुरगाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करण्यासाठी आम्ही हरित क्रांती प्रतिष्ठान चे सर्व सदस्य झोकून देऊन काम करू लागलो.या कामात कडक कपडे घालून काम होणार नव्हते, कारण बऱ्याच ठिकाणी गटारीचे पाणी होते,काही ठिकाणी डुकरांच्या वसाहती होत्या. या सर्वांवर मात करून तिथं वृक्षारोपणासाठी खड्डे घेऊन त्यांचं संगोपन करावं लागणार होते.पण आमच्यात कुणीही कडक कपडे घातलेला सदस्य नसल्याने आम्ही तेही कार्य दररोज सकाळी यशस्वीपणे पूर्ण केले होते.
काम वाढत चालले होते.झाडांना जी ट्री गार्ड असायची ती बांबूची असायची.आम्ही बांबू , तार अन् हिरव्या रंगाचं जाळीदार कापड विकत आणून आठवड्यातील एक दिवस लासूर स्टेशन येथील माझ्या घराच्या समोरील जागेत ट्री गार्ड स्वतः बनवू लागलो.थोडक्यात माझ्या घराच्या समोरील जागेत आमच्या हरित क्रांती प्रतिष्ठानचा ट्री गार्ड चा डेपोच तयार झाला होता.तयार झालेली ट्री गार्ड त्याच दिवशी किंवा इतर दिवशी झाडांच्या भोवती लावत असायचो.या सर्व कामात तीर्थस्वरुप क्षीरसागर काका नेहमी कृतीतून अन् मार्गदर्शकाच्या भूमिकेत सोबत असायचे.
दररोज हे काम करत असताना यात सहभागी असणारे आम्ही सर्व मित्र अगदी मराठी भाषेतील सर्व चवींनी युक्त अशा अधून मधून कोपरखळ्या देखील मारायचो.त्यात बऱ्याचदा लोकशाहीर दादा कोंडके आवर्जून असायचे.कोणतेही काम करत असताना त्यात विनोद, हास्य, खेळकरपणा नसेल तर ते कार्य निरस होते.कोणत्याही कार्यात जर विनोद नसेल तर ते कार्य पूर्ण होऊच शकत नाही.मात्र कोणत्याही कार्यात विनोद,हास्य, मजाक करताना आपल्यातील जो चराचर व्यापलेला अहंकार असतो ना त्याला पार दूर कुठेतरी फेकून द्यावे लागते तरच निर्भेळ आनंद मिळतो, नसता उगीचच गैरसमज होऊन मानवी नात्यात दुरावा निर्माण होतो.
काळाच्या ओघात तीर्थस्वरूप कमलाकर क्षीरसागर काका यांनी लासूर स्टेशन येथील जेष्ठ नागरिकांच एक संघटन उभे केले, " स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघ " या ज्येष्ठांच्या बऱ्याच कार्यक्रमात जाण्याचा , व्यक्त होण्याचा योग यायचा.
मागील आठवड्यात तीर्थस्वरूप कमलाकर क्षीरसागर काका यांनी मला फोन केला अन् सांगीतले की,मी दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी लासुर स्टेशन येथे डोंबिवलीहुन येत आहे,भेटूया पुन्हा..! " मी रजा टाकून नक्कीच येईल काका..!" असं सांगितलं. अखेर काल दिनांक १८/१२/२०२१, शनिवारी लासूर स्टेशन येथे जाण्याचा, सस्नेह भेटीचा योग जुळून आला.स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघातील सर्व जेष्ठ नागरिकांशी आदरयुक्त भेटण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली.या प्रत्येक जेष्ठांमध्ये खूप सारे अनुभवाचे बोल होते, जे की,मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो तो पर्यंत यांच्या संगतीत राहून घेत राहिलो.लासूर स्टेशन येथे माझे तरुण मित्रांपेक्षा हीच जूनी जाणती माणसं जिवलग मित्र होती..! यांच्याशी होणारा प्रत्येक सत्संग मला माझ्या भावी आयुष्यासाठी संचित धन म्हणून मिळायचा.माझी वैयक्तिक विचारधारा अशी आहे की, भले नवीन तरुण माणसं आधुनिकतेची झुल पांघरून आधुनिकतेच्या बढाया मारत असतील,पण याच नवीन ( तरुण ) माणसांना,आपल्या आयुष्याचा खरा मतितार्थ जर कुणी अगदी मोफत सांगत असतील तर ती हीच जेष्ठ नागरिक आहेत..! भले ती कुठेही असू द्या.
काल भेटीचा अजुन दुग्धशर्करा योग असा की, तीर्थस्वरूप कमलाकर क्षीरसागर काका यांच्या धाकट्या चिरंजीवांचे मागील काही दिवसापूर्वी विवाह झाला होता.त्यानिमित्त उभयतांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्याचा शुभ प्रसंग देखील जुळून आला.कमलाकर काका अन् त्यांच्या कुटुंबीयांनी रुचकर जेवणाचे नियोजन केले होते.मस्तपैकी रुचकर जेवणावर ताव मारत,गप्पांच्या मैफिलीत जिव्हाळ्याच्या माणसांचे एकत्रीकरण झाल्याचा, केल्याचा आत्मिक समाधानाचा भाव मनात घेऊन मी पुन्हा औरंगाबादच्या दिशेने घरी निघालो.तत्पूर्वी जिव्हाळ्याच्या माणसांचा,तीर्थस्वरूप कमलाकर क्षीरसागर काका अन् त्यांचे कुटुंबीय यांचा आयुष्याचा स्वल्पविराम देऊन निरोप घेतला, पुन्हा कधीतरी असेच भेटण्यासाठी..!🌹🙏🏻
लासूर स्टेशन येथील हरित क्रांती प्रतिष्ठान अंतर्गत केलेले वृक्षारोपण अन् त्यांचे संवर्धन याचे सर्वात मोठे कृतियुक्त श्रेय जाते ते तीर्थस्वरुप कमलाकर क्षीरसागर काका यांनाच..! लासूर स्टेशन येथे लासूरगाव रस्त्याच्या कडेला जी काही वृक्ष आज वाढ होऊन डोलत आहे, ती सर्व वृक्ष तीर्थस्वरुप कमलाकर क्षीरसागर काका यांना हृदयातून प्रेमपूर्वक धन्यवाद देत असतील..!🌳🙏🏻
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
लेखन दिनांक -१९/१२/२०२१, रविवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा