सोमवार, २७ मार्च, २०२३

" रसिकांची रसिकता...!"


 

आमचे गाव आमची माणसं ©️


" रसिकांची रसिकता...!"


===================================


रसिक नसलेलं मन , एखाद्या वाळवंटातील काटेरी झुडपा सारखं असतं.रसिक असलेलं मन, कलाकृतींना आपल्या मनाला सतत प्रफुल्लित ठेवण्यासाठी एखाद्या औषधा सारखं उपयोगात नेहमी आणत असतं.ज्याला मन अन् ज्या मनाला भावना असतात अशांनीच रसिकांची रसिकता जपलेली आहे. रसिक असलेलं मन नटरंग देवतेची पाठराखण करत असते. कारण रसिक मनाला पुरेपूर ठाऊक असते की, मनाच्या आजारावरील सर्वोत्तम औषध कोणते असेल तर ते याच नटरंग देवतेच्या चरणी आहे.याच कलेच्या गाभाऱ्यात आहे.याच कलेच्या मंदिरात आहे. बाकी इतरत्र नाही..!


हरिभाऊ वडगावकर लिखित ' गाढवाचं लग्न ' हे वगनाट्य आमच्याच पालखेड गावातील श्री. पारेश्वर महादेव मंदिर गल्लीतील स्व. उत्तम काका निकम यांच्या हॉटेल मध्ये टेप रेकॉर्डर वर मी कित्येकदा ऐकलं आहे.शाळा सुटली की चार वाजेनंतर बऱ्याचदा उत्तम काका निकम यांच्या हॉटेल मध्ये बसून दादू इंदूरीकर यांचं ' गाढवाचं लग्न ' टेप रेकॉर्डर वर ऐकलं आहे. आदरणीय स्व. उत्तम काका निकम यांचे चिरंजीव विलास निकम ( ह.मु. छत्रपती संभाजीनगर) हा आमचा प्रिय मित्र होता अन् आहे.त्या मैत्रीच्या नात्यातून अन् मुळात विकास निकम यालाही दादू इंदूरीकर यांचं गाढवाचं लग्न ऐकायला जाम आवडायचं,त्यामुळं आम्ही काही रसिक मित्र मंडळी उठल्या पडल्या विलास निकम यांच्या हॉटेल मध्ये सदरील वगनाट्य अगदी तल्लीन होऊन ऐकलेलं आहे. वगसम्राट दादू इंदूरीकर यांच्या विशिष्ट अशा संवादाच्या प्रेमात मी पौगंडावस्थेतील वयोगटापासून ते आजतागायत आहे. गाढवाचं लग्न या वगनाट्यात दादू इंदूरीकर यांनी जी ' सावळ्या कुंभाराची ' व्यक्तिरेखा साकारली आहे त्या उंचीची व्यक्तिरेखा अद्याप पर्यंत कोणत्याही अभिनेत्याला साकारता आली नाही.मोहन जोशी, मकरंद अनासपुरे यांनी गाढवाचं लग्न अन् त्यातील सावळा कुंभार सादर केला,पण दादू इंदूरीकरांच्या अचूक संवादाच्या टायमिंगची कमाल यांना साधता आलीच नाही.माझ्या मते हिंदी चित्रपटसृष्टीतील दादू इंदूरीकर म्हणून गोविंदा यांनाच ओळखल्या जाऊ शकते. त्याचं कारण, दोघांच्याही विनोदी संवादाची अचूक फेक सर्वोत्तम ठरली.


मी माध्यमिक वयोगटात असताना ' घाशीराम ड्रायव्हर ' या नाटकाची टेप रेकॉर्डर वरील ऑडियो क्लिप पालखेड येथील आमच्याच गल्लीतील राजू आप्पा जैन याच्या घराच्या बाजूला असलेल्या घरात ऐकलेली आहे.राजू आप्पा जैन याच्या घराच्या बाजूला जे घर होते त्याला आम्ही त्याकाळी ' गोठा ' असे म्हणत असे.संवाद काहीसे आचरट होते, पण रसिकतेने भान असल्याने त्याचा आनंद फक्त एक रसिक म्हणून घेतला होता.


माझे जन्मगाव पालखेड ता. वैजापूर या गावाला जवळ जवळ शंभर वर्षांची नाट्य परंपरा आहे. मला जेंव्हा पासून समज आली तेंव्हा पासून दरवर्षी पालखेड गावातील पारेश्वर महादेवाच्या कार्तिकी यात्रेतील काही नाटकं अन् त्यातील नाट्य कलाकार कायमचे हृदयात स्थान मिळवून आहेत.ते साधारणतः पुढीप्रमाणे..

संत तुकाराम - आदरणीय माणिक मोकाटे 

राक्षशी लालसा - राजा शशांक - आदरणीय निवृत्ती काका कुमावत,

मानी मराठा - छत्रपती संभाजी महाराज - आदरणीय नवनाथ काका गायकवाड ( निवृत मुख्याध्यापक ) , औरंगजेब - स्व.भानुदास शिंदे, गणोजी शिर्के - स्व.रामकृष्ण रोठे

एकच प्याला - सुधाकर - आदरणीय तुळशीदास मुलमुले, सिंधू - आदरणीय अशोक वाणी,

संगीत शारदा - आदरणीय रमेश जैन, आदरणीय जगन्नाथ निकम,

विच्छा माझी पुरी करा - नारायण रोठे ( टेलर ),


तसेच माझ्या पिढीच्या अगोदर जी सर्वोत्तम मराठी नाटकं अन् त्यातील सर्वोत्तम नाट्य कलाकार आमच्या पालखेड गावात होऊन गेलेले आहेत ते गावातील वडीलधाऱ्या माणसांकडून त्या विषयी नेहमी ऐकलं आहे.त्यात प्रामुख्याने 

तंट्या भिल - स्व. ऋषीपाठक गुरु,

संगीत सौभद्र / संगीत शारदा - स्व.आदरणीय नंदलाल भाऊ जैन,


पालखेड गावातील शास्त्रीय संगीत नाटकांना दिग्दर्शित करण्यासाठी माझ्या पाहण्यात आलेले दोन दिग्दर्शक होते ते म्हणजे स्व.आदरणीय एकनाथ नाना पगार अन् आदरणीय एकनाथ आण्णा वाणी होय.


तसेच गावातील पूर्वीच्या काळी जी संगीत प्रधान नाटकं सादर करण्यात आली होती त्याला हार्मोनियमची साथ माझे सख्खे आजोबा स्व.चंपतराव जाधव, अन् तबला साथ माझे चुलत आजोबा स्व.नागोराव जाधव यांनी जी सर्वोत्तम साथ दिली होती, त्या शास्त्रीय उंचीची साथ अद्याप पर्यंत पालखेड गावात कुणालाही देता आली नाही हे गावातील जुने जाणते नागरिक आवर्जून सांगतात.


मला नाटकांची विशेष आवड आहे.छत्रपती संभाजीनगर शहरातील नाट्यगृहात अनेक नाटकं बघितली.कधी पालखेड येथून येऊन तर कधी लासूर स्टेशन येथून येऊन तर कधी छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर बरीच मराठी नाटकं बघितली.या सर्व बघितलेल्या सर्व नाटकांपैकी तीन नाटकं विशेष आवडली ती पुढीलप्रमाणे -

हॅम्लेट ( मराठी ) - चि.नमन सोबत बघितले आहे

ऑल द बेस्ट - ( माझे जेष्ठ प्रिय मित्र आदरणीय दिलीपराव शेलार सर सोबत )

तिसरे नाटक आहे

मी नथुराम गोडसे बोलतोय ( सह कुटुंब अन् पालखेड गावातील पन्नास एक मित्र मंडळी सोबत बघितले आहे)


चित्रपटात देखील काही नाट्य रसिकता दाखवल्या गेलेली आहे. नाटक वेड्या तरुणाची कथा असलेला एन. चंद्रा दिग्दर्शित अन् नाना पाटेकर अभिनित ' वजुद ' नावाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेलेला आहे.नाना पाटेकर यांनी यात मल्हार नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट मध्यांतर पर्यंत खूप छान होता,पण मध्यांतर नंतर पूर्णपणे भरकटून गेला.मात्र याच चित्रपटाच्या अगदी शेवटी ,मल्हार नावाच्या व्यक्तिरेखेने नाटकाच्या मंचावर अप्रतिम असे स्वगत सादर केले होते.असे स्वगत माझ्या मते अद्याप पर्यंत कोणत्याही चित्रपटात ,कोणत्याही अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने सादर केलेले नाही.एका नाटक वेड्या तरुणाची एकतर्फी प्रेमापोटी, अभिनयाच्या वेडा पोटी होणारी मनाची होरपळ वजुद चित्रपटात चित्रित करण्यात आली आहे.बहुदा मध्यांतराच्या नंतर पटकथेत गडबड झाल्याने आपण एका खूप सुंदर चित्रपटाला मुकलो असे मला एक रसिक म्हणून आजही वाटते.रंगभूमीसाठी अन् अभिनयासाठी एखादा अभिनेता किती आसुसलेला असतो याचं खूप छान चित्रण वजुद चित्रपटात आहे.


पालखेड गावातल्या रसिक आठवणी खूप आहेत,पण सध्या आवरतं घेतो. आज या रसिक आठवणींचे स्मरण होण्याचं कारण असे की, आज रंगभूमी दिवस आहे त्यामुळं गतकाळातील अनेक आठवणी मनाच्या गाभाऱ्यात दाटून आल्या अन् त्या सर्व रसिक माय बापांच्या समोर एक रसिक म्हणून प्रस्तुत केल्या..! आजच्या रंगभूमी दिवस निमित्त सर्व नाट्य कलाकारांना माझ्याकडून विनम्र मानवंदना..!🙏🏻


ता. क. - कोणत्याही कलेसाठी रसिकांची रसिकता ही रसिक देवतेचे केलेलं पूजन असते..!


वंदे मातरम्


एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २७ मार्च २०२३, सोमवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा