#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
कौटुंबिक स्नेही स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा
====================
जेंव्हा काही व्यक्ती, काही व्यक्तींच्या आयुष्यात सुख दुःखात एकमेकांना साथ देतात तेंव्हा त्या व्यक्तींच्या भाव विश्वात सुंदर अशा नात्यांची वीण घट्ट होऊन जाते. अशांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आपुलकी, जिव्हाळा अन् एकमेकांविषयी असलेल्या आदरयुक्त भावनांचा सुंदर असा मिलाप होऊन आयुष्यभर पुरून उरेल असे निखळ मैत्रीचे नाते निर्माण होते. जातपात, धर्म, वंश इत्यादी बाबी मानवाने मानवाच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या आहेत. मानवाने मानवाच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या या बाबींमध्ये ज्यांना कुणाला एकमेकांविषयी समजून उमजून घेणारी व्यक्ती काहींच्या आयुष्यात येते तेंव्हा अशी अत्यंत मोजकी माणसं विधात्याच्या या मानवी विश्वात नशीबवान म्हणायला हवी. अत्यंत नशीबवान ठरणाऱ्या अशा अत्यंत मोजक्या व्यक्तीत माझे तीर्थरूप स्व. वडील अन् माझ्या वडिलांचे जिवलग मित्र स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले सर दहेगावकर होते.
काल दिनांक २१/५/२०२५ बुधवार रोजी मला संध्याकाळी पाच वाजता माझा जिवलग बालमित्र तथा वर्गमित्र संजय श्रीराम उगले याचा व्हॉट्स ॲपवर मेसेज आला. मी सदरील मेसेज वाचला अन् स्तब्ध झालो. त्या मेसेज मध्ये तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांचा स्वर्गवास झालेला असून दशक्रिया विधी बाबतचा मजकूर होता. मी मेसेज अर्धवटच वाचला अन् लगेच जिवलग बालमित्र संजू उगले यास कॉल केला अन् अत्यंत दुःखद संवेदना व्यक्त केल्या. दुसऱ्याच क्षणाला मी माझ्या मुलांना अन् माझ्या पत्नीला आपल्या स्व. दादांच्या ( माझे वडील ) अन् स्व.तीर्थस्वरुप उगले आण्णांच्या मैत्री विषयी भरभरून बोललो. लगेच छ्त्रपती संभाजीनगरहून दहेगाव ता. वैजापूर च्या दिशेने प्रिय जिवलग बालमित्र तथा वर्गमित्र संजय श्रीराम आण्णा उगले याच्या घराकडे सांत्वनपर गृहभेटी साठी निघालो.
स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा विश्वनाथ पाटील उगले, रा. दहेगाव ता. वैजापूर.
एक अत्यंत प्रेमळ अन् आपुलकी, जिव्हाळा अन् तत्वनिष्ठ असलेलं सात्विक व्यक्तिमत्व..! असं म्हणतात की, विचार जुळणारी माणसं एकमेकांची जिवलग मित्र पटकन होतात. याचं उदाहरण म्हणजे माझे वडील अन् स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा होय. मी बालवयात , पौगंडावस्थेतील वयोगटात असताना माझे वडील अन् श्रीराम आण्णा यांना पालखेड अन् दहेगाव येथील एकमेकांच्या घरी सुख दुःखात जाताना , एकमेकांना भावनिक आधार देताना बघितलेले आहे. ज्यावेळी माझी आई स्वर्गवासी झाली होती त्यावेळी स्व. उगले तात्यांनी माझ्या वडिलांना दिलेला भावनिक आधार कदापि विसरणे शक्य नाही.आमच्या पालखेड येथील घरी साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेगावहुन सलगपणे तीन चार दिवस तीर्थस्वरुप स्व.श्रीराम आण्णा उगले माझ्या वडिलांना भावनिक आधार देण्यासाठी आले होते. वार्धक्यात एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचा साथीदार ज्यावेळी स्वर्गवासी होतो त्यावेळी त्या वार्धक्यातील मनाला सांत्वन देण्याची अत्यंत गरज असते. एकतर वार्धक्य, त्यात नानाविध व्याधी सोबत असतात. मानसिकदृष्ट्या खचलेल्या या वयात मन अन् स्वभाव चिडचिडा होऊन जातो हा मानसशास्त्रीय सिध्दांत आहे. स्री किंवा पुरुषाच्या वार्धक्याततील आयुष्यात जर आपला साथीदार कायमचा या इहलोकातून निघून गेला असेल तर या दुःखद अवस्थेत मानसिक अन् भावनिक आधार देण्याचं काम त्या व्यक्तींच्या आयुष्यातील जिवलग स्नेहीच उत्तम प्रकारे करू शकतात असे मला वाटते. ती भूमिका तीर्थस्वरुप उगले आण्णांनी माझ्या स्व.वडिलांचे जिवलग मित्र म्हणून निभावली होती.
स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले अन् माझे स्व. तीर्थरूप वडील धोंदलगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षक म्हणून सोबत होते. तो कालखंड होता इ.स. १९७० ते १९८० दरम्यानचा..! माझे तीर्थरूप वडील अन् तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले धोंदलगावला सायकलवर जात येत असत. पालखेड ते धोंदलगाव एका बाजूचे अंतर साधारणतः पंधरा किलोमीटर अंतर आहे. शालेय दिवसाच्या रोजी माझे वडील सकाळी पालखेडहून सायकलवर निघायचे. दहेगाव येथून तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले पुढील प्रवासाला सोबत असत. दोघांच्या दोन सायकली असत. पावसाळ्यात सायकलवर जाण्यायेण्याचा अत्यंत त्रास व्हायचा. पूर्ण रस्ता निव्वळ मातीचा असल्याने सायकल चालवणे अत्यंत त्रासदायक ठरत असे. त्यात सर्वात त्रासदायक ठरत असे दहेगाव अन् करंजगाव दरम्यान असलेली बोर नदी..! त्यावेळी पाऊस खूप व्हायचा. बोर नदीला हमखास पूर यायचा. माझे वडील अन् श्रीराम आण्णा दोघांनाही पोहता येत होते. दोघेही पूर्णतः निर्व्यसनी अन् तब्येतीचे काटक होते. बोर नदीच्या पुरातून सायकल काढायची हिम्मत श्रीराम आण्णाच करत असायचे. श्रीराम आण्णा अंगावरील विजार कमरे पर्यंत ओढून अगोदर माझ्या वडिलांची सायकल स्वतःच्या खांद्यावर उचलून नदीच्या पैलतीरावर घेऊन जात असत. मग त्यांची स्वतः ची सायकल नदीच्या पैलतीरावर घेऊन जात असत. शेवटी माझे वडील अन् श्रीराम आण्णा पोहत पोहत बोर नदीच्या पैलतीरावर जात असत.
माझे स्व. तीर्थरूप वडील अन् स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांच्या मैत्रीच्या विश्वातील हे नातेसंबंध अत्यंत सर्वश्रेष्ठ होते. अगदी निस्वार्थ अन् एकमेकांची काळजी घेणारी ही मैत्री दैव देणगीच होती. माझ्या तीर्थरूप वडिलांनी आम्हाला स्व.तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले अन् त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातील कित्येक आठवणी सांगितलेल्या आहेत. त्या आठवणी आज आठवल्या की, असे वाटते ही भली माणसं विधात्याने निर्माण केलेल्या त्याच्या विश्वातील मैत्रीच्या विश्वातील देव माणसं होती. त्यांनी ना कुणाची जात बघितली ना कुणाची आर्थिक परिस्थिती बघितली..! बघितला फक्त आणि फक्त माणुसकीचा स्नेह संबंध..! जो स्नेह त्यांनी एकमेकांच्या वार्धक्यातील शेवटच्या टप्प्यापर्यंत कुठलाही आविर्भाव न आणता जपला हे अत्यंत अभिमानास्पद अन् कौतुकास्पद जाणवते.
माझे तीर्थरूप वडील त्यांच्या सेवेच्या शेवटच्या तब्बल बारा वर्षे दहेगाव येथे मुख्याध्यापक म्हणून सेवेत होते. स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याच्या वेळी माझे तीर्थरूप वडील ज्या हिमतीने अन् अत्यंत खंबीर होऊन श्रीराम तात्या उगले यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले होते ते सदैव संस्मरणीय अन् एका जिवलग मित्राच्या आयुष्यात भक्कमपणे उभे राहण्याचे सर्वोत्तम उदाहरण होते.
दिनांक २१/५/२०२५ बुधवार रोजी संध्याकाळी दहेगाव येथे मी प्रिय जिवलग बालमित्र संजय श्रीराम आण्णा उगले अन् ज्येष्ठ बंधू अनिल भाऊ श्रीराम आण्णा उगले यांच्या शेत वस्तीवर सांत्वनपर गृहभेटी वेळी पोहोचलो होतो. त्यावेळी स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याच्या वेळच्या अन् माझे वडील अन् तात्यांच्या मैत्रीच्या आठवणी दाटून आल्या. श्रीराम तात्यांच्या पाठीशी माझ्या वडिलांच्या खंबीर अन् भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याच्या त्या प्रसंगाला अन् त्यांच्या जिवलग मैत्रीच्या आठवणींना तिथे उपस्थित असणाऱ्या कित्येकांनी उजाळा दिला.
माणसाच्या आयुष्यात अनेकानेक नात्यांची वीण घट्ट होत जाते.त्यात रक्ताची नाती अन् रक्त विरहित नाती माणसाच्या आयुष्याच्या प्रवासात त्याच्या अंतिम श्वासापर्यंत सोबत असतात. त्याच नात्यातून निर्माण झालेले भावूक नातेसंबंध , त्यातून निर्माण झालेले ऋणानुबंध मात्र सदैव चिरंजीव ठरतात. मानवाच्या आयुष्यात मृत्यू शाश्वत सत्य आहे. या इहलोकात जो पर्यंत मानवाचे अस्तित्व असते तो पर्यंत असे भावूक अन् ऋणानुबंध जोडणारे नातेसंबंध वर्तमानात देखील सदैव सोबत असतात, आठवणींच्या रुपात..! जसे की, माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांच्या अन् स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांच्या आठवणींच्या रुपात..!!
स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले सर यांचे दोन्ही चिरंजीव बँकेत नोकरी करत आहेत. तसेच तात्यांचे जावई तथा माझे प्रिय बालमित्र गोविंद गावंडे कामगार आयुक्त कार्यालय छ्त्रपती संभाजीनगर येथे सेवेत आहे. प्रिय बालमित्र संजय श्रीराम उगले, ज्येष्ठ बंधू अनिल भाऊ श्रीराम उगले , मंगलताई श्रीराम उगले गावंडे अन् प्रिय बालमित्र गोविंद गावंडे पाटील यांना दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो हीच विधात्याच्या चरणी प्रार्थना..!
स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले सर यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!🙏
स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले सर यांना आमच्या कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏
वंदे मातरम्
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव. ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २२ मे २०२५, गुरुवार
एक अत्यंत प्रेमळ अन् आपुलकी, जिव्हाळा अन् तत्वनिष्ठ असलेलं सात्विक व्यक्तिमत्व..! असं म्हणतात की, विचार जुळणारी माणसं एकमेकांची जिवलग मित्र पटकन होतात. याचं उदाहरण म्हणजे माझे वडील अन् स्व. तीर्थस्वरुप श्


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा