शनिवार, २८ मार्च, २०२०

नियतीचा फटका..!




चिंतन

नियतीचा फटका..!
===================================

दिवसभर असे काम करा की,रात्री पटकन झोप येईल किंवा त्या चांगल्या  कामाच्या आठवणींनी उशिरा झोप येईल..!
आणि..
आयुष्यात असे कार्य करा की, मृत्यूच्या वेळी समाधानाने प्राण त्यागावे वाटेल..किंवा..जरी जर्जर व्याधींनी अंथरुणावर पडून राहिलात तरी...आयुष्यातील त्या चांगल्या कार्याला आठवत...आठवत वेदनाही गुदगुल्या करून त्याच जर्जर व्याधींना हसवतील..!

आज जरी गैरमार्गाने अनेक काहीही मिळवून सफेद पोष म्हणून आपण समाजात वावरत असू,तरी...नियती सगळं काही गुपचूप बघत असते.ती नियती अशा वेळी घाला घालते की,ज्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही..! माणूस त्याच्या तब्येतीच्या अन् नाहक पोकळ सौंदर्याच्या अहंकारात वावरत असतो आणि.....
" माझ्या गैरकृत्याला कुणीच पाहत नाही..!"
याच एकांगी भूमिकेत त्याचे ऐन तारुण्यातील पात्र वठवत असतो.मात्र याच पात्राची भैरवी त्या वेळी गायन करते ,ज्यावेळी  माणसं आयुष्याच्या शेवटच्या अंकात प्रवेशित होतात..! एकतर अशी माणसं मूर्ख असतात किंवा नियतीला माहीत करून घेण्याची अशांची लायकी नसते...!

तेंव्हा  आपल्या सोबत राहतो तो फक्त भग्नावशेष झालेला आपल्या देहाचा जिवंत पिंजरा अन् त्यातील कुढत...कुढत जगत असलेला प्राण..! माझ्या बालपणापासून ते आजतागायत असे कित्येक जण मी पाहिले आहेत ,पाहत आहे की,ज्यांच्या काळात सर्वदूर आमचेच होते किंवा आहे..! पण ज्यावेळी नियतीने फटके द्यायला सुरुवात केली त्यावेळी असे अनेकजण फक्त शून्यात नजर लावून बघत राहिले..त्याच गतकाळातील गैरकृत्यांकडे....!

नियतीला फसवून गुपचूप दूध पिणाऱ्या  मांजरी सारखी अवस्था काहींची असते..! मात्र ही मांजर किंवा असे बोके हे विसरून जातात की,आज जरी अशा मांजरी किंवा बोके मी माझ्या गैरकृत्याचे परिमार्जन अमके.. अमके खूप चांगले कार्य करून प्रायश्चित्त घेईल..! तर अशा  मांजरी किंवा बोके स्वतः ला फसवत असतात..! अशांचे मन सदैव...त्याच गतकाळातील गैरकृत्य असणाऱ्या आठवणीत पिंगा घालत असते..!

नियती एवढी दूधखुळी नसती रे माझ्या माणसा..! ती असे याचे प्रायश्चित्त तिथं करून कुणालाही सुखी करत नसते..! सगळं काही..जिथल्या तिथेच असते..!

आजही मी ज्यावेळी कुणाला एखाद्या दिवशी किंवा अनेक दिवशी त्या नियतीला फसवून,स्वतः च्या तुंबड्या भरून जगताना पाहतो,त्यावेळी हे तेच माणसं असतात,जे भविष्यात अशा नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या माणसांची प्रतिनिधित्व करणारी असतात..!

असे ज्यांच्या आयुष्यात होणार नाही...त्यांनी..... आज ,आत्ताच ,ताबडतोब.....
" अरे, एक चक्कर स्मशानभूमीत सहज मारून या रे..!"

ता.क.- सदरील छायाचित्र ठिकाण गोलवाडी फाटा, वाळूज,अहमदनगर रोड, सैनिकी क्षेत्र औरंगाबाद.येथे आम्ही जन सहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद अंतर्गत जवळजवळ सात हजार देशी झाडे लावली आहेत.

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२८ मार्च २०१९,गुरुवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा