रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

" चपाती आहे का..? कोड्यास आहे का..? "




** मला प्रवासात भेटलेली माणसं..! **

" चपाती आहे का..?   कोड्यास आहे का..? "
___________________________________________

आज दिनांक २७/१०/२०१८ रोजी  संध्याकाळी माझा प्रिय  बालमित्र आण्णासाहेब कारभारी म्हस्के याच्या निमंत्रणावरून औरंगाबाद शहरातील एका कोपऱ्यात धार्मिक कार्यक्रमा निमित्त प्रसाद घेण्यासाठी गेलो होतो.
( प्रसाद याचा येथे अर्थ  पोट भरून  जेवण करणे..असा अभिप्रेत आहे😂)
प्रसाद घेण्यासाठी पंगती बसल्या.मीही बसलो..! पत्रवाळी व त्यात एक..एक खाद्य पदार्थ वाढणाऱ्या माणसा,मुलांकडून वाढल्या जाऊ लागले.एकदाचे सर्व पदार्थ वाढून झाले अन् सुरू झाले जेवण...!

एक शहरी मुलगा हातात स्टीलचे घमेले घेऊन...म्हणत येत होता.....
" पोळी. .पोळी...पाहिजे का पोळी...?"
असे म्हणत..म्हणत तो मुलगा माझ्या समोर आला अन् मलाही म्हणाला..
" काका, पोळी पाहिजे का..?"
मी म्हणालो, " पोळी नको,चपाती आहे का..?"
तो मुलगा- " नाही काका..!"
मी- " अरे छोट्या, पोळीलाच चपाती म्हणतात..दे अर्धी ..चपाती..!"
तो मुलगा गालातल्या गालात हसला अन् पुढे निघाला.
तो मुलगा पुढे वाढत...वाढत गेला..पण आता तो प्रत्येकाला म्हणत होता...
" चपाती..पाहिजे..का..चपाती..?"

थोड्या वेळाने दुसरा एक शहरी मुलगा म्हणत..म्हणत येत होता..
" भाजी..पाहिजे का..भाजी..?"
माझ्या समोर आला अन् मलाही म्हणाला...
" काका, पाहिजे का भाजी..?"
मी त्याला म्हणालो, " भाजी नको, कोड्यास आहे का..?"
तो मुलगा- " नाही काका..भाजी आहे..!"
मी- " अरे छोट्या, भाजीलाच कोड्यास असेही म्हणतात..!
पण खेड्यात म्हणतात..!!"
हा मुलगा मात्र पुढे वाढत जातांना भाजीच म्हणत गेला.

अखेर जेवण सुरू झाल्यावर माझा मित्र माझ्या जवळ आला अन् बसला...! माझ्या मित्राला हा किस्सा मी सांगितला. खेड्यातील मराठीतील बरेच शब्द आज शहरातून जवळ..जवळ हद्दपार झाल्यात जमा झाले आहेत.आजच्या शहरातील बऱ्याच मुलांना ,निदान आमच्या पिढीला खूपच जवळचे वाटणारे खेड्यातील मराठी शब्द परिचयाचेच नाहीत.
रा.रं.बोराडे, शंकर पाटील यांच्या सारखे मराठी ग्रामीण साहित्यकार आज लेखन करत नाहीत..अन् अशांचे मराठी साहित्य आजच्या शालेय पाठ्यक्रमात देखील पाहिजे तितक्या प्रमाणात नाहीत...!

आम्हाला  लेखक शंकर पाटील यांचा बहुदा इ.९ वी ला " वळीव " नावाचा धडा होता. काय अप्रतिम ग्रामीण भाषा शैली त्यात व्यक्त केली होती..! सगळं कसं अस्सल  मातीतील  वाटायचे..!
दुर्दैव आजच्या मुलांचे शहरातील..अन् काही प्रमाणात खेड्यातील सुध्दा..! कारण खेड्यात सुध्दा ३० ते ४० वर्षांपूर्वीचे अस्सल ग्रामीण मराठी शब्द आजच्या खेड्यातील मुलांना माहीत नाही..!

मराठी माझी मायबोली...!
तिची अशी दशा कुणी अन् का केली..?
मी काही महिन्यांपासून औरंगाबाद येथे वास्तव्यास आहे.जिथे पहावं तिथं  व्यावसायिक ठिकाणी हिंदीत बोलावं लागतं.मी ओढून... ताढून बोलतो..पण..मराठी मध्ये बोलल्यास समोरचा फार ..फार कन्हुन....कुथुन मराठीत बोलतो...किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो...!
हिंदीला माझा आक्षेप नाही....पण..
मराठी जास्त प्रमाणात का वापरल्या जात नाही औरंगाबाद येथे..?

बहुदा आपल्यावर पूर्वीच्या असलेल्या मोगलाईच्या अमीट छापाची ती निशाणी असावी..!
सुंभ जळाला पण पिळ..अजुन बाकी आहे..😂
कधी कधी असे खरचं वाटते की, माननीय राज ठाकरे साहेब हे जे मराठी भाषा विषयी बऱ्याचदा बोलताहेत ते कटू सत्य आहे..!
काळाच्या पुढे जाऊन सत्य बोलणारे ते एक उत्कृष्ट  सामाजिक भाष्य करणारे नेते आहेत..!

ता.क.:  येत्या परवाच्या सोमवारी मी माझ्या  अंधारी प्रशालेत एक संवाद रुपी चर्चा सत्र वर्गात मुलांमध्ये आयोजित करणार आहे.त्याचा इतिवृत्तांत कळवतो नंतर..!
प्रतीक्षा..!

वंदे मातरम्..!

एक खेडूत लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:  २७ ऑक्टोबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा