मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" निवांतपणाची समृद्ध वैचारिक भेट...! "
_______________________________________________
आदरणीय कमलाकर क्षीरसागर काका ,
( अखिल भारतीय क्रीडा भारती तथा माजी अधिकारी मुंबई महानगर पालिका )
तुम्ही दिनांक २२ सप्टेंबर २०१८ रोजी एवढ्या दुरहुन थेट ठाणेहुन लासुर स्टेशन येथे येणार असे मला सांगितले अन् आपल्या वैचारिक प्रगल्भतेनुसार मला निघण्यापूर्वी सहज विचारले..
" नंदन, आपली उद्या किंवा परवा लासूर स्टेशन येथे भेट होऊ शकते का..?"
मी - " काका ,उद्या नाही; पण परवा रात्री नक्कीच..होईल..मी येईल रेल्वेने लासूर स्टेशन येथे..!"
काका- " ठीक आहे,भेटू मग..!"
या वरील संवादातून एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, समोरच्याचे नियोजन बघून , आपले नियोजन करणे..हे आदरणीय काकांच्या आयुष्यातील मला आवडलेलं मूल्य..! त्यांना माहीत आहे की,माझी बदली सध्या दूर आहे.हा आता लासूर स्टेशन येथे राहत नाही,पण याची भेट तर नक्कीच घ्यायची त्या शिवाय लासूर स्टेशन येथून पुन्हा ठाण्याला जायचे नाही..! दोन पुरुषांमधील वैचारिक प्रगल्भ समृद्धीची ती ओढ होती जी आम्हाला भेटण्यास प्रवृत्त करत होती..!
मी व काकांचे लासूर स्टेशन येथे वास्तव्य असताना ४ ते ५ वर्ष संपर्क राहिला.पण तो फक्त संपर्क न राहता ती एक आत्मीय ओढ निर्माण करून गेली दोघांच्या हृदयात..! माझ्या मित्र परिवारातील ज्येष्ठ मित्र म्हणुया या नात्याला..! लासूर स्टेशन येथे वास्तव्यास असताना लासुरगाव रोड लगत केलेलं वृक्षारोपण अन् वृक्षसंवर्धनाचे कार्य कायमस्वरूपी हृदयात घर करून राहिले आहे. काकांच्या मार्गदर्शनाखाली हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन अंतर्गत झालेलं कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणादायी झालेलं आहे.त्यात काकांचा सिंहाचा वाटा आहे.🌳
मला लासूर स्टेशन येथे जायला रात्र झाली.पण काका,तुम्ही माझ्यासाठी निवांतपणे अशा ठिकाणी बसलात की,जेथे फक्त आणि फक्त अहंकार नसलेली माणसचं बसू शकतात..! तिथे ना चटई होती ना काही काही अंथरायाला..! अस्वच्छ मातीवर बसून तिथे फक्त तुम्ही अन् मीच होतो अन् सोबत होता समृद्ध वैचारिक अथांग सागर..! कदाचित आपल्या दोघात आत्मिक ओढ निर्माण करून समृद्ध मैत्री होण्याचे दोघांचे हेच एकमेव कारण असावे..!
निवांतपणे गप्पा आटोपल्या नंतर आदरणीय काकडे पा.साहेब,( काका)लासूर स्टेशन यांच्या घरी गेलो.तुमची पण लासूर स्टेशन येथून नंदीग्राम एक्स्प्रेस ची निघण्याची वेळ झाली अन् माझ्याही नंदीग्राम एक्स्प्रेस ची औरंगाबाद कडे निघण्याची वेळ झाली.
रेल्वे स्टेशन वर आल्यावर सुध्दा तेच वडीलकेचे मला सांगणे केलेत तुम्ही..
" जपून जा..! तुझी एक्स्प्रेस येते आहे आता..! काळजी घे..!"
" हो ..! " म्हणून निरोप घेतला अन् रात्री १२ वा.घरी आलो.मी पोहचेपर्यंत काका ही त्यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या प्रवासात माझ्या पोहचण्याबद्दल खुलासा विचारत होते..!
ता.क.: ही कमावलेली छोटीशी संपत्ती होती माझ्या आयुष्यातील..! याच संपत्तीवर तर मी मनापासून प्रेम करतो अन् करत राहणार..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
आदरणीय काकांसोबत भेटीचा दिनांक: २२ सप्टेंबर २०१८,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा