मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९

" का, हो सर..तुम्हाला कव्हापासून पाहू राहिलो मी..!"





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" का, हो  सर..तुम्हाला कव्हापासून पाहू राहिलो मी..!"
==============================

माझ्या आज पर्यंतच्या साडे चोवीस वर्षाच्या शिक्षकी आयुष्यात सर्वच विद्यार्थी खूप चांगले मिळाले.मात्र त्यातील काही विद्यार्थ्यांनी अगदी छोट्याश्या प्रसंगातून आपल्या निरागस ,निष्पाप निव्वळ प्रेम ,मानवाची सुंदर संस्कृती जिला माणुसकी असे म्हणतात या अमूल्य अशा सद्गुणांनी मला विशेषकरून प्रभावित केले..! त्यात बऱ्याच विद्यार्थिनी अन् विद्यार्थी आहेत.

जि.प.प्रा.शा.एकलहेरा,ता.गंगापूर,जि.औरंगाबाद येथे शिक्षक म्हणून सेवा करत असताना, अनेक प्रेमळ मुलं ,मुली असेच मायाळू भेटले.मात्र त्यात असाच एक खूप प्रेमळ मुलगा मला माझ्या आयुष्याच्या वाटेवर  एक प्रेमळ प्रवासी म्हणून भेटला ज्याच्या वयाच्या मानाने त्याच्यात खूप समजूतदारपणा जाणवत होता.तो छोटासा प्रिय विद्यार्थी होता चिरंजीव भावेश संतोष औसरमल..!

हा  चिरंजीव भावेश इ.३ रीला शिकत  होता.मी सकाळी शाळेत गेल्या गेल्या माझ्याकडे धावत यायचा..!तसे बरेच मुलं माझ्या वयोवृध्द दुचाकीकडे धावत यायचे..! हा भावेश,तत्कालीन इ.३ रीचा वर्गप्रमुख ( मॉनिटर ) होता.त्यांना शिकवायला होते, आईच्या मायेचे प्रिय कल्याणराव डमाळे सर..!हा भावेश सरांना वर्गात शैक्षणिक उपक्रम घ्यायला खूप मदत करत असायचा. हा प्रिय भावेश त्या वर्गाचा एक छोटासा पण खूप निरागस शिक्षकच मला जाणवत असायचा..!मला जर यदा कदाचित एखाद्या दिवशी विषण्ण वाटायला लागलं की,मी इ.३ रीच्या वर्गात जाऊन स्वतः मधील बालक जिवंत करत असायचो..!

मी या वर्गाला अध्यापन करायला नव्हतो.मात्र मायेच्या नात्याला वर्ग मर्यादित करूच शकत नाही..! कितीतरी वेळा हा प्रिय भावेश,माझ्या वर्गात यायचा अन् फक्त भेट घेऊन पुन्हा त्याच्या वर्गात निघून जायचा..!दुपारच्या मध्यांतरच्या सुट्टीत चिरंजीव भावेश याने एकदा एका छोट्या डब्यात काहीतरीआणले होते.त्यानं मला एकलहेरा येथील लक्ष्मी माता मंदिरात शोधलं,प्रत्येक वर्गात शोधत शोधत तो, मी ज्या वर्गात बसलेलो होतो तिथं आला.मी जो पर्यंत एकलहेरा येथे नोकरीला होतो तो पर्यंत नेहमी दुपारच्या दीर्घ सुट्टीत एकतर एकलहेरा गावातील लक्ष्मी माता मंदिरात जाऊन निवांत बसायचो किंवा वर्गात एखादं पुस्तक वाचत..! पुस्तकं अन् मंदिर या ठिकाणी आपल्यातील बरच काही सापडतं... असं माझं वैयक्तिक मत आहे..!

भावेश  वर्गात आल्या आल्या मला म्हणाला..
" का, हो  सर..तुम्हाला कव्हापासून पाहू राहिलो मी..!"
मी वाचत असलेले पुस्तक बाजूला ठेवले अन् त्याला म्हणालो..
" का...रे काय झालं..? कुणी मारलं का..?"
भावेश- " नाही हो सर..! हे डब्ब्यात मी ,तुमच्यासाठी दही आणले आहे,घ्या बरं..!"
मी- " अरे,तुला कुणी सांगितलं होतं दही आणायला..? जा घरी ठेवून ये पुन्हा..!"
भावेश- " सर,मी माझ्या आजीला विचारून आणले आहे,आजीला म्हणलं, मला जाधव सरला दही न्यायचे आहे नेऊ का..? तर आजी म्हणली जाय घेऊन..!"
मी- " अरे,बेटा,मी तुला द्यायचं असतं ,पण तूच मला देत आहेस..! नको,जा...घरी  अन्  घरी ठेवून ये दही..!"
भावेश  -" नाही हो सर..! तुम्ही आत्ताच्या आत्ता दही खावून घ्या,मंग डब्बा घरी घेऊन जातो..! किंवा घरी घेऊन जा..!"
मी त्याला खूप खूप समजावून सांगितले पण पठ्ठ्या ऐकायचं नाव घेत नव्हता.अखेर  मला त्यानं आणलेलं दही मुकाट्यानं पिऊन घ्यावं लागलं..!

हीच ती मुलं असतात,ज्यांच्या अंतर्रमनात  सदैव प्रेम,वात्सल्य अन् माया यांचा अंकुर सदैव प्रफुल्लित होत असतो..! मी प्रिय भावेशच्या आग्रही मायेनं खूप भावूक झालो होतो.मी थोड्या वेळाने मोठ्या वर्गातील एका मुलाला बिस्कीट पुडा आणायला सांगितला.वर्ग भरल्यावर पुन्हा भावेशला माझ्या वर्गात बोलावून घेतले अन् त्याला बिस्कीट पुडा देऊ केला,तर त्याने घ्यायला चक्क नकार दिला.मग मी त्याला म्हणालो...
" का...रे..तू आग्रहाने मला दही पाजले अन् आता तू माझ्याकडून बिस्कीट पुडा घ्यायला नकार देतो..! घे हा बिस्कीट पुडा..!"
यावर प्रिय भावेशला बहुदा जाणवले असावे की,कोणालाही प्रेमानं,मायेनं केलेल्या आग्रहाचं प्रत्युत्तर त्याच प्रेमानं,मायेनं होत असतं..! फक्त तो हे शब्दात व्यक्त करू शकत नव्हता..! अर्थात प्रत्येक माणसं या तत्वात बसत नाहीत.कारण बऱ्याच माणसांना कितीही प्रेम ,माया द्या..! ते त्यांचं कृतघ्न मनाचं विकृत रूप सोडतच नसतात..! मात्र आमचा प्रिय भावेश संतोष औसरमल याला नक्कीच अपवाद होता..!

मी जो पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहेरा, ता.गंगापूर येथे कार्यरत होतो तो पर्यंत आईच्या मायेच्या सुसंस्कारित माझ्या मुली देखील भेटल्या..!

आज मी माझ्या सध्याच्या अंधारी शाळेत कार्यरत आहे.येथेही मला अनेकानेक चिरंजीव भावेश भेटले आहेत,माझ्या अनेक मायाळू मुली देखील भेटल्या आहेत.त्यांच्यात तोच भावेश सतत दिसत असतो.  एकाच स्वभावाची माणसं दुसरीकडे  सतत आपल्याला भेटत असतात,फक्त आपण त्या माणसांच्या भावविश्वात खोलवर रुजलेलो असायला हवे..!

ता.क.: त्यावेळी माझ्या मुलाने केलेल्या मायेचा जो तृप्तीचा ढेकर मला आला होता,त्याची प्रेमळ चव अद्याप माझ्या जिभेवर अन् अंतर्रमनात  आहे..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १९ नोव्हेंबर २०१९, मंगळवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा