मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

" पहिले बाजीराव पेशवे यांना त्रिवार वंदन..! "🙏







चिंतन ©️

" पहिले बाजीराव पेशवे यांना त्रिवार वंदन..! "🙏

=================================

आपल्या भारतात काही राष्ट्रपुरुष " ते आले,त्यांनी पाहिले अन् त्यांनी जिंकले " या उक्तीप्रमाने त्यांचे अख्खे आयुष्य भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. आपल्या मराठी सत्तेचा विचार करायचा म्हंटल्यास त्यात छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज व पहिले बाजीराव पेशवे या तीन महान सेनानींना वरील उक्ती अगदी चपखल बसते.

वास्तविक आपल्या मराठी सत्तेच्या मध्ययुगीन इतिहासातील कालखंडात जाज्वल्य व अनुकरणीय ऐतिहासिक प्रसंगाचे तीन प्रमुख श्वास.त्यात पहिला श्वास म्हणजे थोरले महाराज छत्रपती शिवराय,‌ दुसरा श्वास ,धाकटे महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरा श्वास म्हणजे..मराठी हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान पहिले बाजीराव पेशवे हे होय.

अर्थात पहिला श्वास हा चिरंतन आयुष्याचा पहिला जिवंत साक्षात्कार असतो..कोणत्याही सजीवांकरिता. थोरले महाराज होते म्हणून बाकीच्या सर्व श्वासांना किंमत होती..!थोरले महाराज नसते तर...या फक्त कल्पनेने अंगावर काटा येतो.एवढी थोरवी थोरल्या महाराजांची आहे. मध्ययुगीन कालखंडात व तदनंतर मराठी माणसात, नव्हे नव्हे समस्त भारतीयांमध्ये जिवंतपणाचा, श्वासाचा पहिला हुंकार भरला तो थोरले महाराज शिवरायांनी. मराठी अस्तित्वाचा दुसरा श्वास अर्थात छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरा श्वास...श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे..! या तिन्ही श्र्वासांच्या तरल कंपणावर आधारलेले अनेक सुंदर स्वर ( शूर सरदार) तयार झाले. त्या सर्व स्वरांचे (शुर सरदारांचे)आरंभवबिंदू होते हेच तीन श्वास होते. आज आपण आपल्या आजच्या असण्यातील श्वासातील तिसरा श्वास म्हणजे पहिले बाजीराव पेशवे यांच्या विषयी थोडक्यात बघुया. 
                                                                      
पहिले बाजीराव म्हंटल्यावर बहुतांशी लोकांना पटकन नजरेसमोर येते ती फक्त मस्तानी..! ह्या मस्तानीच्या निख्खळ प्रेमाचं वलय एवढं काही गडद आहे की, त्यापलिकडचे पहिले बाजीराव आम्हाला ठाऊक नसतात किंवा ठाऊक असूनही आम्ही या थोर राष्ट्रपुरुषाची एका विशिष्ट मर्यादित किंबहुना जातीच्या आकसापोटी एका विषयात यांना गुंतवून ठेवतो. पहिले बाजीराव पेशवे हे वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे पेशवा झाले. असं म्हणतात की ,तुम्ही किती वर्ष आयुष्य जगलात याला महत्त्व नाही,तर जे काही आयुष्य जगलात ते कसं जगलात याला खूप महत्त्व आहे. पहिले बाजीराव पेशवे यांना केवळ ४० च वर्षांचं आयुष्य लाभलं..! राऊंचा जन्मदिन १८ ऑगस्ट १७०० व मृत्यू दिनांक : २८ एप्रिल १७४० म्हणजेच फक्त ३९ वर्ष ८ महिने व १० दिवस एवढेच पण दैदिप्यमान आयुष्य राऊ जगले. त्या एकूण आयुष्यापैकी केवळ २० च वर्षांची क्षत्रिय कारकीर्द लाभलेला हा महान योद्धा. त्या २० च वर्षांच्या काळात राऊंनी ,आपल्या सर्वांचे पहिले श्वास,छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं ,हिंदवी साम्राज्य केलं.

हिंदवी स्वराज्याचे संकल्पक वंदनीय शहाजी राजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न छत्रपती शिवराय यांनी प्रत्यक्ष पूर्ण केले. त्याच हिंदवी स्वराज्याला आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळले वंदनीय छत्रपती संभाजी महाराज यांनी. आणि छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्याला थेट दिल्ली पर्यंत नेण्याचे कार्य पहिले बाजीराव पेशवे यांनी केले. पूर्वीपासून महाराष्ट्रास थेट आव्हान देणारी दिल्ली राउंनी फक्त जिंकूनच नाही, तर दिल्लीवर मराठी सत्तेचा अंकुश ठेवण्यात यश मिळविले ते ह्याच पहिल्या बाजीराव पेशवे यांनीच. थोरले महाराज शिवरायांना अभिप्रेत असलेले हिंदवी साम्राज्य, एवढ्या मग्नतेने वाढविले की, त्यापोटी वैयक्तिक आयुष्यची झालेली हेळसांड, तहान-भूक सारं सारं तुच्छ ठरलं आणि ह्या असामान्य वीराला मृत्यू आला तोही मोहीम करतानाच. रावेरखेडी (मध्यप्रदेश) येथे..दिनांक २८ एप्रिल १७४० रोजी...!😔

पहिले बाजीराव हे अनेक शतकांमधून उदय होणारे निष्णात व अतिशय चपळ सेनापती होते. या सेनानीस फक्त ३९ वर्ष ८ महिने व १० दिवस एवढच आयुष्य लाभलं. त्यातील २० वर्षांची कारकीर्द एक हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारा व वाढविणारा पंतप्रधान म्हणून अथक कार्य राऊंनी केले. आपल्या शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध करत अजिंक्य राहिलेल्या या महारथीचा आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे.पण आपल्यातील काहीजन मात्र पहिल्या बाजीरावांना प्रेमवीर म्हणून पाहतात, वाचतात किंवा चर्चेत घेतात. शेवटी काही नाहीच तर मग त्यांची जात पाहतात. वास्तविक अशा अनेक महापुरुषांची " जात " नसते बघायची. हे आपण जेव्हा शिकू, तेव्हाच इतिहास नावाचा खजिना आपल्याला खऱ्या स्वरुपात खुला होतो.
        
मान्य आहे की,पेशवाई मधील काहींनी मानवी मूल्यांची पार अवहेलना केली होती. त्यांच्या या असल्या घाणेरड्या प्रवृत्तींच्या त्रासाचे चटके पहिले बाजीराव पेशवे यांना देखील बसले होते. मात्र आपण प्रत्येक वेळी वस्तुनिष्ठ मूल्यमापन न करता सरसकट सर्वच घटकांना त्यात गोवतो..अन् आम्ही इथेच चुकत जातो. वास्तविक अनेकातील जे कुणी अतिशय वाईट,दृष्ट प्रवृत्ती असतात,अशांना दूर करून त्यांना दंडित करायला हवे; मग ते वैचारिक असो किंवा इतर मार्गाने..! अशा घाणेरड्या प्रवृत्ती प्रत्येक जाती, धर्मात होत्या व आहेत.काहींनी चूक केली म्हणजे अख्ख्या समुदायाला दोषी ठरविणे हे कधीही योग्य नसते. जेंव्हा सूक्ष्मपणे अन् वस्तुनिष्ठ मानवी समाजाचे मूल्यमापन होईल तेंव्हाच प्रगल्भ विचाराच्या समाजाची सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. पेशवाई म्हंटली की सगळेच त्यातील वाईट अशी आपली मानसिकता होऊन जाते. तसे न करता त्यातील ज्या मानसिकता तुच्छ होत्या त्या सदा सर्वदा तुच्छच मानायला हव्यात.

पहिले बाजीराव पेशवे यांना तत्कालीन जातिव्यवस्थेच्या अनिष्ट प्रथांचा भयंकर त्रास झाला.ते स्वत: ज्या सामाजिक व्यवस्थेचे घटक होते ,त्याच घटकातील काही मानवी मूल्यांवर गदा आणू पाहणाऱ्यांनी राऊंना विरक्त केले होते.मुळात राऊ वाईट चालीरीती विरूध्द बंड करून उठणारे व्यक्तिमत्त्व होते. राऊंच्या वैयक्तीक आयुष्याची पार लक्तरे झाली ,पण धीरोदात्तपणे या सर्व प्रसंगाला सामोरे गेले. या सर्व आत्मिक त्रासात व कौटुंबिक कलहात सुध्दा राऊंनी हिंदवी स्वराज्याच्या कक्षा थेट दिल्लीपर्यंत विस्तारल्या..हे विशेष..!
 
मी स्वतला धन्य समजतो की,पहिले बाजीराव पेशवे यांचे पदस्पर्श माझ्या जन्मभूमीला पालखेड, ता. वैजापूर ,जि. औरंगाबाद येथे लागलेले आहे..! निमित्त होते..पाहिले बाजीराव पेशवे व निजाम यांच्या मध्ये, रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेली जगप्रसिद्ध लढाई माझ्या जन्मगावी,पालखेड ,ता.‌वैजापूर,जिल्हा,औरंगाबाद येथे झालेली आहे..!

आज, पहिले बाजीराव पेशवे यांचा स्मृतिदिन आहे..!
( २८ एप्रिल १७४०) त्यानिमित्त या थोर सेनानीला विनम्र अभिवादन..!

वंदे मातरम्..!

ताजा कलम : माणूस बाहेरच्या शत्रूला सामोरे जाऊ शकतो,त्यांच्यावर विजय सुध्दा प्राप्त करू शकतो..!
पण घरातील शत्रूंना तो सामोरे जाण्यास कमीच पडतो हे राऊंच्या आयुष्यावरून जाणवते..! नव्हे नव्हे आजही हीच परिस्थिती चहूकडे आहे..!                                     

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव. ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: २८ एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा